नाळ

नाळ हा तसा ठीकठाक श्रेनीत मोडनारा चित्रपट आहे. तो फार अप्रतिम किंवा दर्जेदार असा नाही.  चित्रपटाशी नागराजचे नाव व झी टॉकीज चे आक्रमक प्रचारतंत्र   जोडले गेले नसते तर कदाचित  हा चित्रपट केव्हा येवून गेला असता कळले पण नसते. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात संपूर्ण समाजमन जोडले गेले तर  त्याने नंतर जे काही केले असेल ते अप्रतिमच असेल हे डोळे झाकून बघणे म्हणजे नाळ हा अप्रतिम चित्रपट आहे असे वाटने होय. 

एक किंवा फार फार तर दोन सीन ( तेहि अवघ्या काही तिन- चार मिनिटांचे)  चित्रपटातुन काढून टाकले तर एक निसर्गरम्य खेड्यामध्ये राहणारे एक कुटुंब व त्यातील लहान मुलाच्या नजरेतून केलेले चित्रण, अप्रतिम एरिअल शूटिंग,  सिनेमेटोग्राफी व नैसर्गिक संवाद इतकच हाती लागत. 

तशी तुलनाच करायची असेल तर किल्ला या चित्रपटाशी करावी लागेल. की ज्यातही लहान मुलाच भावविश्व दिग्दर्शकाने त्या तुलनेत बर्यापैक्की  दाखवलय. अर्थात किल्ला पण तसा सो सो च आहे. पण कमीत कमी मुलांच्या मनात जी  भावनिक आंदोलने, उलाढाल चालतात  ती शब्द-संवादासोबतच निसर्गाच्या विविध प्रतिमा वापरून उलगडून दाखावने हे त्या दिग्दर्शकाला खुप छान जमलय. त्या बाबतीत नाळ मध्ये हे जमले नाहीय.

चैत्या व त्याची आई यांचा  व बच्चन चा अभिनय व त्यांच्यातील केमिस्ट्री खासच आहे. बाकी नागराज चा अभिनय त्याच्या वलयामुळेच ठीक आहे. फारस काही हाती लागत नाही व तशी अपेक्षा पण भविष्यात वाटेल अस काही तो जाणवू देत नाही. फॅन्ड्री मध्ये इंटर्नली तो स्वतः involved असल्याने स्वतःच्या अभिनयासाठीची जागा त्याने राखीव ठेवलीय पण इथे त्याच्या ऐवजी कोणीही असते तरी चालले असते इतक्या सपक चेहऱ्याने संपूर्ण चित्रपटभर तो  वावरतो. 

नागराज च्या आतापर्यंतच्या कलाकृति (कवितासंग्रहासह) कौतुकास्पद व लोकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. त्या तितक्या उंचीच्या नक्कीच होत्या. पिस्तुल्या व  फॅन्ड्री  पासून नागराज च्या अभ्यासपूर्ण दिग्दर्शकाने माझ्यासाहित लाखो लोकांच्या मनात घर केले आहे. त्यामुळे सैराट  सुसाट सूटल्यानंतर  नागराज कुठल्या मैलाच्या दगडावर थांबतो ही उत्सुकता सर्वांमध्ये होती. अर्थात प्रत्येक  वेळी  यश मिळने शक्य नाही हे खरे असले तरी अस्सल दिग्दर्शकाचा स्वतःचा असा काही मिडास टच उमटतोच (जरी तो स्वतः दिग्दर्शक नसून निर्माता वा सहनिर्माता असला तरी)  पण इथे त्याही पाउलखुणा दिसत नाहीत.
हिंदी मध्ये एके काळी राम गोपाल वर्मा हे नाव वेगळ्या व दर्जेदार चित्रपटासाठी घेतले जायचे पण कालांतराने तो स्वतःच्याच चौकटीत अडकत गेला व तेच तेच फॉर्मुले वापरून कालांतराने संपून गेला. दुसरा अनुराग कश्यप सतत वेगवेगळे प्रयोग करून स्वतःचा दर्जा कायम ठेवत अस्सल प्रेक्षकांना त्याने कधी नाराज केले नाही त्यामुळे कमर्शियली काही वेळा त्याचे चित्रपट चालले नाहीत तरी रसिकांना मात्र त्याने नाराज केले नाही.
महाराष्ट्रातील एकूणच सामाजिक व राजकीय  वीण ज्या मोजक्या दिग्दर्शकांना कळलीय अस वाटतेय त्यात नागराज आहे त्यामुळे नवनवीन विषयांना हात घालून, प्रेक्षकांचे व अपेक्षांचे दडपण न घेता नागराज येत्या कालावधीत मराठीतील राम गोपाल वर्मा बनतो कि अनुराग कश्यप बनतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
- समाधान महाजन 

खेळ


मोठे झाल्यानंतर स्वानुभवातून, वाचनातून, कार्यालयीन प्रोटोकोल म्हणून वा मित्रांचा प्रभाव म्हणून आपल्याला खेळाचे महत्व पटत जाते. आयुष्यातील स्ट्रगल पिरिअड संपत जातो व मनुष्य जसजसा सेटल्ड होत जातो तस तो आपल्या आरोग्याबाबत जास्त जागरूक होत जातो. मग तो सकाळी मैदानावर फिरायला जातो, जॉगिंग ग्रुप, लाफ्टर ग्रुप जॉईन करतो, ट्रेकिंग ग्रुप जॉईन करतो , या ना त्या मार्गाने फिटनेस कडे लक्ष देतो. मुलांना लहानपणापासून खेळाबाबत सजग करतो, विविध खेळांची शिबीर अलीकडे सुट्टीत व वर्षभर सुरु असतात. त्या ठिकाणी आलीकडे खूप गर्दी दिसते. आम्ही कार्यालयीन कामात जास्त व्यस्त झालो कि स्ट्रेस वाढतो अशा वेळी कोणताही खेळ किंवा व्यायाम आम्हाला रील्याक्स करतो. अलीकडे तर मी ट्रेकिंग ग्रुप तयार करून बरेच किल्ले, डोंगर चढून गेलो, गेल्या दोन वर्षापासून जिम सुरु आहे  त्याचा कामावर होणारा परिणाम खूप सकारात्मक होतो. सर्वात महत्वाचे म्हणजे घरी  आल्यावर मुलांसोबत खेळन्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी उर्जा टिकून राहते.
पण जस मला आठवते तस लहानपणी खेळाची मला इतकी आवड नव्हती. कदाचित त्याचे कारण असेल कि वडिलांची सतत बदली व्हायची मग गाव बदलले कि माझी शाळा माझा वर्ग सर्व बदलायचे त्यामुळे सर्वात मोठा परिणाम व्हायचा तो म्हणजे खेळायसाठी मित्र भेटायचे नाहीत,  जेमतेम ओळख होऊन खेळणे सुरु झाले कि बदली व्हायची त्यामुळे ग्रुप टिकायचा नाही मग परत दुसऱ्या ठिकाणी जावून त्यांच्याशी लगेच ओळख करून घेण्याइतपत माझा बोलका स्वभाव पण नव्हता.  त्यामुळे कुठ गेले कि खेळणारे मुल दिसले कि मला जुने मित्र आठवायचे. मला आजपण वाटत कि जी मुले लहानपनापासून एकाच ठिकाणी राहतात त्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांना गोतावळा मोठा भेटत जातो. शेवटी काही इनडोअर गेम सोडले तर मुळात खेळ हा सांघिक पणे खेळण्याचा प्रकार आहे. अशा वेळी शाळेतील खेळाच्या तासिका सोडल्या तर सुट्टीच्या काळात मुलांना खेळायला मित्र हवेत.  
आजकाल ज्या शाळा खेळांकडे लक्ष देतात त्या सोडल्या तर बाकी ठिकाणी अधिक मार्क्स च्या ‘मार्क्सवादात’ मुलांचे बालपण खुरटले जाते. शाळा सुटली कि काही वेळातच पुन्हा पाठीवर दप्तर घेवून शिकवणी वर्गाला पळणारी पोर दिसली कि ती काही तरी गमावत आहेत अस वाटत राहत. आलीकडे थोड्याफार प्रमाणात खेळांना ग्ल्यामार आलय पण त्याची कारणे वेगळी आहेत. नेहमीप्रमाणे क्रिकेट मध्ये येणारा अफाट पैसा सोबत प्रसिद्धी हे तर आहेच शिवाय मेरी कोम, चक दे इंडिया, दंगल , गोल्ड, भाग मिल्खा भाग, सारख्या चित्रपतांमुळे खेळूडांना मिळणारी प्रसिद्धी पाहून पालकांना आपल्या मुलांनी पण अस काही केल पाहिजे अस वाटण्यातून पण खेळाकडे लोकांचा ओढा वाढला आहे. शिवाय सरकारी प्रोत्साहानातून अनेक बाबी सुरु आहेत, एशियाड, कॉमोनवेल्थ, ऑलम्पिक सारख्या अंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून जिंकणाऱ्या खेळाडूंवर होणारा बक्षिसांचा वर्षाव व प्रसिद्धी पण काही जणांना या कडे आकर्षित करते पण त्या साठी त्यांनी घेतलेली मेहनत व त्रास पण पाहिला गेला पाहिजे. एक एक खेळाडू त्याचे सर्वोत्तम देण्यासाठी व ध्येय गाठण्यासाठी अहोरात्र किती कष्ट करतो ते महत्वाचे आहे.    

खेळाचे व माझे तसे सुरुवातीपासूनच कधी जमले नाही. अधिकृतपणे खेळ व मैदान  या प्रकाराशी माझा सबंध आला तो सहावीला नवोदय विद्यालय मध्ये गेलो त्या वेळी. तिथे आमचा सकाळचा दिनक्रमच सुरु व्हायचा "मॉर्निंग पी टि" या कम्पल्सरी व जीवघेण्या प्रकाराने,  सकाळी पाच साडेपाच ला ऐन गाढ झोपेत असतांना जाणीव पूर्वक टेपरेकॉर्डर वर मोठ्या आवाजात देश भक्तिपर गीते , सोबत मुलांच्या हालचालींचे आवाज, ग्राऊंड वर पालवे सरांची वाजणारी जोरदार व्हिसल, सकाळच्या निरव शांततेत 'गिनती कर' म्हणून घुमणारा सरांचा आवाज , पाठोपाठ"एक दो तीन ...." गिणती चा होणारा आवाज व लगेचच राउंड मारतांना येणाऱ्या सर्वांच्या बुटांचे एका तालासुरात होणारे टप टप आवाज ...या क्रमाने हळूहळू आमची झोप उडत जायची व  दिवस सुरु व्हायाचा. संपूर्ण झोप उडून स्वतःच्या देहासकट आजूबाजूच्या स्थल काल परिस्थितीचे आकलन होईस्तवर एक तर मोठ्या मुलांची क्रॉस कंट्री स्पर्धा सुरु होऊन संपयाच्याच बेतात आली असे, वा क्लस्टर किंवा रिजनल साठी मुलांचे सिलेक्शन सुरु असे. किंवा आम्ही फार फार तर परतिच्या मार्गाने राहत असो.
नवोदयची हि पाच वर्ष व त्यातही तिथली सकाळ ही स्मरणीयच राहीली आहे. सकाळी मॉर्निंग पी टि  साठी जाग यावी म्हणून लाउडस्पीकरवर मोठ मोठ्या आवाजात गाणी लावली जात. 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो', 'ए मेरे वतन के लोगो' , ए देश है वीर जवांनो का' अशा प्रकारची.  त्यामुळे पी.टी. साठी तयार होणे म्हणजे एक प्रकारे युद्धासाठी तयार होतोय कि काय असला फील यायचा. त्यातही अगदी सहावीलाच सर्व जन घर सोडून होस्टेल मध्ये आलेले, त्यामुळे घरची सकाळ ज्या निरव शांततेत व्हायची तस काही इथे नसायचे त्यामुळे सकाळी सकाळी बुटांच्या लेस बांधून ग्राउंड वर पळत जाण्यात एक   मिशन चे स्वरूप यायचे.
या पी.टी. चे सर्वसाधारण स्वरूप म्हणजे सुरुवातीला 'हाउस' नुसार गिनती, नंतर मोठ्या मैदानावर राउंड मारणे, मग वार्मअप साठीचे व्यायाम करणे, नंतर काही स्पर्धा असतील तर त्यांची तयारी थोडा वेळ व मग नंतर डीस्बर्स. पण यात बऱ्याचदा पी.टी च्या सरांचा मूड, बाहेरचे पावसाळी वातावरण किंवा शाळेतील कार्यक्रम यानुसार बदल होत असत. मग सकाळी ग्राउंड वर जमलो, गिनती झाली कि  'इनथ्रीज'मध्ये (म्हणजे मुलांच्या तीन मिळून  जोड्या)  गाव जागे व्हायाच्या आधी सकाळी साडेपाच पावणेसहाच्या आसपास  आम्ही गावातील एकमेव मुख्य रस्त्यावर   लागायचो अर्थात पळत. हळूहळू गार वारे अंगाला झोंबू लागले व पळन्यामुळे अंगाला घाम येवू लागला कि झोप उडून जायची. हे सकाळी बाहेर पडणे म्हणजे सरळ निसर्गाच्या अंगणात जाणे होते. अजूनही ते गवतावर पडलेले दवबिंदू, झाडे, जंगली फुले व गवताचा वास जसच्या तस आठवत.
काही अंतर पळत गेलो कि केव्हा केव्हा पालवे सर क्रॉस कंट्री स्पर्धा घ्यायचे. एकदम सुरुवातीची काही दिवस हा शब्द समजण्यातच गेला. अर्थात सहावीची मुले लहान म्हणून आम्हाला त्यात भाग घेता येत नसे. पण थोडे मोठे झाल्यानंतर आम्ही पण सहभागी होऊ लागलो. आमची हि क्रॉसकंट्री स्पर्धा मजेशीर असे शेतातून, बांधावरून, कच्च्या रस्त्याने अशी वेडीवाकडी बरीच अंतर गेल्यावर एंड पौईट येत असे. अशा वेळी पांढरे बूट व पांढऱ्या कपड्यांची वाट लागत असे, पण अर्थात मजा येई. मोठमोठ्या गवतामधून, चिखलाने घसरड्या झालेल्या बांधावरून पळण्यात भीती सोडा वेगळेच थ्रील यायचे. आजकाल स्वतः ची मुल अस काही वेगळे करू लागली कि पटकन त्यांना घरात बोलवण्याचा आमचा कल असतो. नको कुठे काही हातापायाला लागेल, गवतामधून काही निघेल, चिखलात कपडे भरतील, आजारी पडतील एक ना दोन हजार शंका. आमच्या सर्वांच्या आई वडिलांनी मनात कुठलीही शंका मनात न ठेवता आम्हाला नवोदयच्या हवाली केले तस आजही आम्ही आमच्या मुलांसाठी करू कि नाही यात शंका आहे.

पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पाउस पडत असला कि आम्ही राहत असलेल्या एम.पी हॉल मध्ये किंवा गोडाऊनमध्ये सर योगासन करायला म्हणून सर्वांना बोलवत. अर्थात सर्व कॉट टाकलेली जागा सोडली तर मध्ये असलेली रिकामी जागा कमी होती त्यात काही जन बसत व बाकीच्यांना कॉटवर बसून योगासन करण्याची मुभा असे. सर अधून मधून आतील भागात फिरत असत पण पाउस जास्त सुरु झाला व सरांचे लक्ष नसले कि आहे तिथेच सरळ झोपून जाण्यात मजा असे. योगासनात सर्वांचे सर्वात आवडत आसन म्हणजे शवासन. एकदा कॉटवर पडल कि केव्हा झोप लागयाची कळायचं नाही. पण मुळात असा दिवस उगवला कि बाहेर उठून न जाण्याचा आनंद मोठा आसायचा. कारण सकाळी उठण्याचा खूप कंटाळा यायचा. नको नको वाटायचं. कधी एकदा नवोदय मधून बाहेर पडतो व सकाळी खूप वेळ आरामात गोधडी पांघरून पडून राहायला मिळेल  असं वाटायचं. आमच्याच आजूबाजूच्या शाळेतील मुलांना असं सकाळी लवकर उठण्याची सक्ती  नव्हती त्यामुळे ते आरामात उठून मग शाळेत यायचे. त्यामुळे ती मुले खूप नशीबवान वाटायची.
अर्थात त्या वयात ते साहजिकच होते पण नंतर कळत गेल कि खरे नशीबवान तर आम्ही होतो ज्यांना खूप चांगली सवय लावली जात होती अर्थात तेव्हा ती मनाविरुद्ध का असेना पण अंतिमतः आमच्या फायद्याची सवय होती. तिथे शिकवलेले सर्व व्यायामाचे व जॉगिंग चे प्रकार नंतरच्या आयुष्यात खूप कामी आले. वार्म अप करतांना कसा करावा त्याचा एक क्रम असतो, शरीराचा रक्तपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी एक तर खालून वर किंवा वरून खाली अशा पद्धतीने व्यायामाची सुरुवात करायची असते हे कळले. शास्रीय पद्धतीने सूर्यनमस्कार कसा करावा हे प्रथम तिथल्या शिक्षकांनी शिकवले.
थोडा पाउस कमी असला कि आम्हाला शाळेच्या व्हरांड्यात बसवत व वेगवेळ्या पार्थना गाणी आमच्याकडून म्हणून घेत असत. सकाळची ती शांत वेळ, अंधार कमी होत पूर्वेकडे दिशा उजाळत चाललेल्या व एकाच सुरात आम्ही ‘अधरम मधुरम वदनम मधुरं’ अस मधुराष्टकम म्हणतोय, गीतेचे श्लोक म्हणतोय किंवा अजून काही प्रार्थना म्हणतोय हे फारच सुंदर चित्र असायचं. काहीतरी वेगळी उर्जा अंगात यायची आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने दिवसाची सुरुवात करतोय व त्या मुळे संपूर्ण दिवस प्रसन्न चित्त जायचा.
सकाळची पी.टी. व संध्याकाळचे गेम्स यात फरक राहायचा. सकाळची पी.टी हि व्यायाम, वार्म अप, रनिंग वर भर देणारी आसायची. तर गेम्स मध्ये संध्याकाळी खेळायला मिळायचे. फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, बास्केट बॉल यासोबतच खो-खो, कबड्डी असे आपले देशी खेळ पण भरपूर खेळायला मिळायचे.
   
आमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा खच्चून भरलेल्या असत,  विविध प्रकारात सातत्याने त्या होत असत. शाळेत मुलांचे हाउस पाडलेले असत, त्याचे साधारण स्वरूप असे कि जवळपास प्रत्येक वर्गातील सात आठ ते दहा मुले एका हाउस मध्ये येतील. मुलांना कोणता हाउस भेटेल ते निश्चित नसे अन त्याचे वाटप सहावीला अडमिशन घ्यायच्या वेळेसच व्हयाचे. आपला हाउस व आपला रोल नंबर सहावीला एकदा मिळाला कि तो कायमसाठी राहत असे. आज अगदी वीस बावीस वर्ष झालेत तरी आम्हाला सर्वांना आमचे रोल नंबर व हाउस लक्षात आहेत म्हणजे फक्त आमचेच नाहीत सर्व bachchya मुलांचे लक्षात आहेत. तर असे हे हाउस विविध नावांनी असत. हिमालय,सातपुडा, सह्याद्री, विन्ध्य, अरवली अशी मुलांच्या हाउस ची नावे होती. मुलींची निलगिरी कांचनगंगा अशी नावे असली तरी ज्या विविध स्पर्धा होत त्या साठी त्या आमच्या हाउस लाच aatach राहत.
तर अशा या विविध हाउस मध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा होत असत त्यात बरीच चढाओढ राहत असे. प्रत्येक हाउसच्या मुलांना वाटायचे कि आपले हाउस एक नंबर आले पाहिजे. वर्षाच्या शेवटी सर्व क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे मिळून मार्क्स लक्षात घेवून हाउसेस ला विनर घोषित करण्यात येत असे. पण यात  स्पोर्ट स्पर्धांकडे मार्क्स चे पारडे झुकलेले असायचे. म्हणून मग ग्राउंड वर जास्त मार्क्स असणारा हाउस ट्रॉफी घेवून जाणार हे निश्चित असे.
नवोदय विद्यालय हे ग्रामीण talentला वाव देणारे नाव. या ठिकाणी ग्रामीण पण हुशार व मजबूत काटक विद्यार्थी येत. त्यामुळे खेळाडूंच्या संख्येला काही तोटा नसे. त्यातही आमचे अक्कलकुवा नवोदय म्हणजे सातपुड्याच्या अगदी कुशीत  अक्कलकुवा  येथे. त्यामुळे सातपुड्यातील आमचे आदिवासी बंधू बऱ्याच संख्येने येथे राहत. त्यातील काही जन अव्वल नंबरचे खेळाडू होते. खो-खो व कबड्डीतील त्यांच्या अंगाचे चापल्य, वेगवान हालचाली अतिशय देखण्या व विजय मिळवून देणाऱ्या असत. भाला फेक,  थाळी फेक, फुटबॉल व विशेषतः रनिंग मध्ये हि पोर एक नंबर असत. त्यांचा stamina व कौशल्य जबरदस्त असे. आजही त्यातील काही जन अक्षरश त्यांच्या खेळासह डोळ्यापुढे उभे राहतात. एक जन जो आम्हाला सिनिअर होता, त्याचा खो-खो मधील खेळ पाहणे म्हणजे एक सुंदर अनुभव असे. पाठलाग करणाऱ्या स्पर्धकांना चुक्वतांना तो एक  प्रकारे नृत्यच करत असे. त्याच्या हालचाली फार चपळ असत कधी कधी वेळ संपून जायची  पण तो बाद होत नसे. त्याचे ते मैदानभर वावरणे डोळ्याचे पारणे फिटणारे असे. जालमसिंग पावरा नावाचा आमचा एक सोबती होता तो जेव्हा भाला घेवून मैदानात उतरायचा तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स बघण्यासारखा असायचा. दमदार पावलांनी पायात योग्य ते अंतर घेवून समोरून धावत येणाऱ्या जालमसिंग ला पाहतांना हा जणू शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक तडफदार मावळा स्वराज्यासाठी शत्रूवर तुटून पडतोय कि काय असला त्याचा आवेश असायचा व त्याच वेळी त्याने फेकलेला भाला समोर चुन्याने मारलेल्या सीमारेषेच्या पलीकडे जावून जमिनीवर सरळ उभा रोवलेला असायचा. तसाच तो गोळाफेकेतही तरबेज होता. अनेक जन रनिंग मध्ये चाम्पियान होते, १०० मीटर असो ८०० मीटर असो वा रिले असो वा क्रॉस कंट्री असो हि मुले कायम एक नंबर अगदी रेकॉर्ड वेळेत पूर्ण करत. त्यांची क्षमता हि आम्हा नोकरदार घरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांच्या तुलनेत खूप जास्त होती.
तेव्हाही, त्यानंतरही व आताही मला वाटत कि भारताला ऑलम्पिक सारख्या खेळात सुवर्णपदक हवे असेल तर असे आदिवासी talent लहानपणीच हेरून त्यांना त्या angle ने प्रशिक्षण दिले गेले तर nationalच काय अनेक अंतरराष्ट्रीय व ऑलम्पिक रेकॉर्ड तोडण्याचे सामर्थ्य या युवकांमध्ये आहे. पण दुर्दैवाने अजूनही तस होतांना दिसत नाही. नवोदयला असतांना आमच्या क्लस्टर, रिजनल व अगदी national पर्यंत हे खेळाडू चमकायचे पण पुढे काय? सर्व अंधार. आधीच सातपुड्याच्या आदिवासी पाड्यातील कुठल्यातरी पाड्यातील किंवा वस्तीतील घर, घरी आठराविश्व दारिद्र्य व  शिक्षण म्हणजे नोकरी मिळेलच समजून कसतरी शिक्षण झाल कि कुठतरी नोकरीवर चीटकायाचे इतकी माफक अपेक्षा व दुर्दैवाने तस नाहीच झाले तर काही तरी पोट भरण्यासाठी करणे इतकच. या सर्व प्रकारात अनेक दर्जेदार खेळाडूनी आपला खेळ सोडून दिला. मग मैदानावर राजासारख्या वावरणाऱ्या अशा दर्जेदार खेळाडूंना कुठेतरी वर्ग तीन चार च्या कारकुनी प्रकारची कामे करतांना पाहिले कि त्रास होतो. जर काही वेगळ घडल असत तर आज अनेक रेकॉर्ड नावावर असलेले ते स्टार खेळाडू राहिले असते.

मी स्वतः मात्र नवोदयला असतांना खेळात खूप मागे असायचो. जेव्हा क्रीडांगनावर जाण्याचा प्रसंग यायचा तेव्हा तेव्हा मी व् माझे एक दोन  मित्र आम्ही मागे राहून टाईमपास कसा करता येईल ते बघायचो. आमचे काही batchmets अजूनही आम्हाला बांधावरचे म्हणून चिडवतात. कारण आमच्या शाळेचे जे मैदान होते ते पूर्वी शेती होती मध्ये सर्व आखून रेखून मैदान झाले असले तरी त्या शेतीचे जुने बांध तसेच होते. त्यामुळे खेळ सुरु झाले कि नजर चुकवून त्या बांधावर जावून आम्ही बसायचो किंवा त्यावरून पिरीयड संपेपर्यंत फिरत तरी बसायचो.
विविध क्रीडा स्पर्धांसाठीची निवड सुरु झाली कि मनात धडकी भरायची. इतके सगळे रथी महारथी बघितले कि आपण कशात काय म्हणून अजूनच कमीपना वाटायचा पण त्यातल्या त्यात मी अभ्यासात चांगला असल्या कारणाने (म्हणजे किमान मला तरी तस वाटायचं)  किमान न्यूनगंडापासून स्वतःला वाचवू शकत होतो.
या ठिकाणी सर्वात महत्वाच म्हणजे मला खेळांविषयी अनेक बाबी समजल्या. खेळातील बऱ्याच बाबतीत मुलांना पण समाविष्ट करून घेतल्यामुळे त्यांचे या बाबतीचे ज्ञान चांगले होते. खेळांचे ग्राउंड कसे आखायचे. खो-खो, कबड्डी, फुटबॉल पासून तर पार रनिंग track आखण्यापर्यंत विद्यार्थी सोबत असल्याने त्यांना मैदानाची माहिती असायची. वरच्या स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड झाली कि त्यांना थोडे विशेष प्रशिक्षण देण्यात येई. आमची रेग्युलर पी.टी सुरु होण्या आधी व नंतर पण त्यांचा सराव सुरु असायचा. दुध सोबत अंडी दिले जायचे. किमान ते मिळण्यासाठी तरी आपल्याला काही खेळता यायला हव होते अस वाटायचं. त्यांना रनिंग साठी विशेष ते खिळ्यांचे बूट मिळायचे. संध्याकाळी पण बराच वेळ त्यांचा सराव सुरु असायचा. स्पर्धा सुरु झाल्या कि माहोल अजून रंगतदार व्हायचा. जिंकलेल्या स्पर्धकांना बक्षिसे व कप मिळायचे ते बघायला खूप छान वाटायचे. एकूणच खेळ सर्वांच्या अंगात भिनायचा. अर्थात याचे श्रेय त्या काळात असलेले आमचे क्रीडा शिक्षक पालवे सर, मुदलियार madam, राव सर व अर्थातच त्यांच्या कडून हे सर्व काम करवून घेणारे आमचे प्राचार्य वाळिंबे सरांना जाते. जागतिक स्तरावर घेतल्या जाणाऱ्या फुटबॉल स्पर्धांचा कार्यक्रम टी. व्ही  वर सरांनी आम्हाला दाखवला. त्या विषयीची  भरपूर माहिती दिली, त्यामुळे इतक्या लहान वयात अंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांबाबत काय सुरुय हे कळायचे. त्याचा आवाका कळायचा. आमचे सर खेळणाऱ्या मुलांसोबत राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावरील रेकॉर्ड बाबत चर्चा करायचे हे एक प्रकारचे त्यांना त्यांच्या क्षेत्रात मिळणारे वैश्विक भानच होते.
असा पाया जोपासला गेल्यामुळे आयुष्यभर सजग राहण्याइतपत भान मिळाले. असेच शिक्षक व अशाच शाळा मुलांना मिळाल्या तर आजच्या काळात खेळातील एखाद्या प्रकारात अव्वल दर्जाचे खेळाडू निर्माण होणे अशक्य नाही.


समाधान महाजन


आठवणीतील नाशिक


एकदा सरकारी नोकरी म्हटली कि बदली हा प्रकार अटळ असतो, त्याचा त्रास एकूणच जीवनात माणसाला होतो, सततच्या बदलांमुळ काहीशी अस्थिरता माणसाला स्वीकार करावी लगते. पण त्याचा दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेगवेगळ्या गावात शहरात जायला मिळते,राहायला मिळते, विविध माणसांशी परिचय होतो, मैत्री जोडली जाते, आयुष्यभरासाठी चांगली माणसे, चांगले क्षण आपल्या आयुष्यात जोडली जातात.

बालपण वडिलांच्या सततच्या बदल्यांमुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात तसेच शाळा कॉलेजची सुरुवातीची वर्षे धुळे व नंदुरबार जिल्ह्यात व नंतर स्वतः  शिक्षक म्हणून बरीच वर्ष मराठवाड्यात काढल्याने मला नाशिकबद्दल तसे मनातून खुप आकर्षण होते. जीवनाच्या एकूण तीन वेगवेगळ्या टप्प्यावर माझा नाशिकशी संबंध आला. शालेय वयात, बारावी नंतर व तिसऱ्यांदा आला तो थेट माझी पोस्टिंग सहायक आयुक्त म्हणून विक्रीकर खात्यात झाली तेव्हा आला. जुलै २०१८ ला माझी बदली नाशिकहून जळगाव झाली अन नेमक त्याच वेळी नाशिकविषयी लिहिण्याच व्यासपीठ चे पत्र मिळाले हा योगच.

एकदा शालेय वयात असतांना एक परीक्षा देण्यासाठी वडिलांसोबत नाशिकला आलो होतो. तेव्हा इतक मोठ शहर पाहून दबुन गेलो होतो. ऐसपैस रस्ते, भल्या मोठ्या बिल्डिंग, नळाला येणारे पानी, मोठमोठे मॉल त्यातील चकचकीत वातावरण, एकदम झगमगाट,  झगमग कपडे सारे कसे चित्रपटातील वाटत होते. त्यामुळे अगदी एक किंवा अर्धा दिवस जरी अशा शहरात आपण फिरतोय अस वाटल तरी त्याचे खूप अप्रूप वाटे. मी नाशिकला अस भरपूर काही पाहिलंय हे कधी एकदा गावी जावून मित्रांना सांगतोय अस सारख वाटायचं.

अन नाशिकहून परत गावी गेल्यानंतर असला प्रकार पण गेला, माझ्या ज्या मित्रांनी धडगाव व तळोद्या पलीकडे मोठे गाव पाहिले नव्हते त्यांच्यासाठी मी नाशिकविषयी सांगतोय तो एक वेगळाच अविष्कार ठरत होता, कळत नकळत माझ्या मित्रांमध्ये माझे वजन वाढले होते. नाशिक बघितलेला मी एक मोठा माणूस आहे अस त्यांच्या नजरेत मी टिपत होतो, अन मनातून मला आनंद वाटत होता.

तर असं हे नाशिकबद्दल तेव्हापासूनचे आकर्षण मनात कायम होते,  कॉलेज म्हणजे बारावी संपली पुढे काय करावे याबाबत अंधार होता. आईचे म्हणणे होते डी एड केलं तर पटकन नोकरी लागेल, वडिलांना वाटायचे हा हुशार आहे काहीतरी वेगळं केलं पाहिजे, पोरगं अधिकारी वैगेरे झालं पाहिजे पण कस होईल याबाबत त्यांच्याच कल्पना स्पष्ट नसाव्यात वा परिस्थितीपुढे त्यांना काही सुचत नसावं पण मग काहीतरी करन भाग होत
........हा दीर्घ सुट्ट्यांचा अनिर्णित कालावधी कुठंतरी घालणं भाग होतं. तेव्हा माझा मोठा भाऊ ज्याला आम्ही दादा म्हणायचो तो नाशिकला राहत होता. अर्थात कुठल्यातरी कंपनीत हजार बाराशे रुपयाच्या पगारावर तो काम करत होता, सिडकोतील छोट्याशा एकाच खोलीच्या रूम मध्ये दादा वहिनी राहत होते. आमच्या दृष्टीने तेव्हा तो नाशिकला राहतोय याचं अप्रूप वाटायचं, आमच्या गावाकडे अशी नाशिकला कामानिमित्त गेलेली अनेक जण होते, ते गावी येत तेव्हा हे शहरात राहणारे कोणीतरी मोठी माणसे आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत लोक एकतर फटकून वागत किंवा कौतुकाने तरी अर्थात सरळ सरळ कामगार म्हणून काम करतांना मिळणारा तुटपुंजा पगार ज्यात घरखर्च धड भागवता येत नसे व इकडे गावी काही मदत करीत नाही म्हणून गावातील घरचे लोक कायम नाराज राहत असत. असं सारख मन कुरतडत कसंतरी दोन दिवस सनासुदीचं गावी राहून परत कधी एकदा नाशिक जाणाऱ्या गाडीत बसतो अशा मानसिकतेत अनेक जण तेव्हा नाशिक - गाव व गाव- नाशिक असा प्रवास करत, आता तर त्यांच्या नंतरच्या पिढीने गावाकडे जाणे तर दूर पाहणेही सोडून दिलेय अर्थात त्याला दोन्ही बाजूंची अनेक कारणे आहेत.
तर अशा या ये जा करणाऱ्या लवाजम्यात एका सुट्टीत मी पण शामिल झालो. एक चुलत भाऊ रहायचा एक दिवस त्याच्या छोट्या टेम्पोत सकाळीच त्याच्यासोबत गेलो , काही कंपन्यांचे स्पेआर पार्ट एक कम्पनीतून दुसऱ्या कंपनीत पोहचवण्याचे काम तो करत होता. त्याच्या ओळखीने अंबड एम.आय.डी.सी. च्या एका कंपनीत मला पण काम मिळाले. कामाचे स्वरूप पहिल्याच दिवशी मला फार आवडले. प्लास्टिकचे बॉक्स तयार होऊन एका ठिकाणी पडायचे ते बॉक्स एका ट्रोलीत भरून ती ट्रोली ढकलत दुसऱ्या ठिकाणी जावून खाली करावे लागत. पहिल्याच दिवशी खूप उत्सहाने मी दुपारपर्यंत हे काम केले. दुपारी जेवायला सर्वांसोबत बसलो , ते जेवण म्हणजे आतापर्यंतच्या जेवनापैकी केलेले सर्वात वेगळे जेवण होते, आजूबाजूला बसलेली माझ्यासारखीच मजूर मंडळी होती, अंगावर कंपनीचे कपडे,घामाचा उग्र वास पसरलेला, मिळेल त्या जागेवर बसलेली व त्यातल्या त्यात थोड्या वेळासाठी का असेना कामातून  मोकळा वेळ मिळाला याचा किंचितसा आनंद चेहऱ्यावरून न लपवणारी माणसे मला इतस्त दिसत होती.  मी पण माझा पहिल्या दिवसाचा डबा त्यांच्यासोबतच खाल्ला. याठिकाणी उदरभरण शब्दाचा खरा अर्थ मला कळत होता,
संध्याकाळी घरी जातांना शिफ्ट सुटल्यावर कामगारांची गर्दी रस्त्यावरून घाईगर्दीत  जातांना दिसायची, तेव्हा सायकली जास्त होत्या, समोरच्या हँडल ला डबे अडकवून कधी सिंगल तर कधी डबल सीट जातांना ते दिसायचे, कंपन्यांचे चिमणीचे धूर आसमंतात पसरलेला दिसायचा, दिवसभर एकच एक ठराविक काम करतांना जणू काही आपण यंत्रामध्ये प्रवर्तीत होत असल्याची भावना मनात अनेकदा येवून जायची. आर्थिक दृष्ट्या सतत रखडत व महिन्याचा खर्च मेटाकुटीस येवून पार पाडणारी अनेक कुटुंबे आजूबाजूला दिसत होती. सिडकोतील घरं म्हणजे एक प्रकारे खुराडेच. एक रूम फार फार तर कोणाला दोन रूम. पण अशा घरात राहणे म्हणजे एक प्रकारे कम्पनीच्या दोन ड्युटी मधील वेळ काढणे असं वाटायचं मला, एका बाजूला श्रीमंतीचे टोलेजंग मिनार चढत असतांना हे अस कोनाड्यात पडलेलं पाहतांना मार्क्स आठवायचा. त्याचा साम्यवादी सिद्धांत व आहे रे नाही रे ची दरी डोळ्यासमोर दिसत असतांना वेदना व्हायच्या पण आपण स्वतः काहीही नसतांना व हे सर्व बदलवण्याची कुठलीही क्षमता नसतांना फक्त विचारांचे  कढ काही कामाचे नव्हते त्यामुले अशा वेळी काहीतरी मोठे बनून हे सर्व बदलून टाकायची भावना प्रबळ व्हायची.
या काळात वया परत्वेआकलन कमी असल्याने व तितका आवाका  नसल्याने नाशिकची सांस्कृतिक ओळख झाली नाही, वेळ मिळाल्यास सी बी एस जवळ च्या हुतात्मा स्मारकात जाऊन पेपर वाचण्याचे काम करायचो, तेथून परत सिडको तील घरी येतांना सी बी एस च्या समोरील जे सिटी बसेस चे स्टॉप होते त्यात नेमकी कुठली बस आपल्या घराकडे घेऊन जाईल काही कळायचे नाही.कोणाला विचारायची इच्छा व्हायची नाही, भयंकर अपमानास्पद वाटायचं कि साल आपल्याला या जगात काहीच माहीत नाही. या शहराच्या एकूणच आधुनिक साच्यात आपण गावरान लोक बसू शकत नाही असा कसलासा न्यूनगंड आत साचत चालला होता.
एकदा असंच कम्पनीला सुट्टी असल्याच्या दिवशी जरा बाहेर फिरून येऊ अस ठरलं, जायचं कुठं तर खूप नाव ऐकलेलं होत पंचवटीचे म्हणून म्हटलं पंचवटीला जाऊ. पंचवटी नाव रामायणकालीन त्यामुळे म्हटल तिथे छान मंदिरे वैगेरे असतील तर जावून बघू. तस सिडकोतून जाणाऱ्या जवळपास सर्व बसेस पंचवटी या नावानेच जायच्या, एक दिवस असाच मनात धीर धरून पंचवटी नावाची पाटी लिहिलेल्या  बसमध्ये बसलो हळहलू सिड्को चा भाग गेला सी बी एस मागे पडले, अशोकस्तंम्भ गेले , आर.के. गेले पंचवटी कारंजा म्हणून कंडक्टर जोरात ओरडला मग कंडक्टरला म्हटल पंचवटी चा स्टॉप हाच का  तर तो म्हटला की पंचवटी याचा पुढचा स्टॉप , झाले कही मिनीटातच  पंचवटी स्टँड आले सर्व जण  उतरले, गाडीत आता फक्त तीनच जण राहिले मी , कंडक्टर व ड्रायव्हर ....कंडक्टर माझ्याकडे '"कुठून कुठून येतात " अशा अत्यंत चमत्कारिक नजरेने पाहत होता . सर्व जन उतरल्यावर मी त्याला म्हटल,
            'पंचवटी कुठे आहे ?'
            तो म्हटला , हेच पंचवटी ,
            मी म्हटल,  'नाही हे नाही ते दुसरे पंचवटी,
             तो म्हटला अरे भाऊ हेच पंचवटी ...
बर म्हटल मग बस आता पुढे कुठपर्यंत जाणार?
            ' डेपो पर्यंत'
            ' मग म्हटल मला तिथपर्यंत सोडून द्या'
 ... त्यानंतर त्यानेही माझा विचार केला नाही व बस पुढे घेण्यास सांगितले. झाल बस काही अंतरावर गेल्यावर जशी डेपोत जायला लागली व आजूबाजूला बसेस दिसायला लागल्या तस मी पटकन बसचा स्पीड कमी होताच उडी मारून खाली उतरलो. आजूबाजूला फक्त दुकाने, रस्ता, रस्त्यातून वाहणारे वाहने यापलीकडे काही दिसत नव्हत. मंदिरांचा मागमूस पण नव्हता. उलट्या दिशेने झपाझप चालत मी परत पंचवटी stand कडे निघालो तेव्हा का कुणास ठावूक पण कोणालाच विचारल नाही..कि पंचवटीतील ती प्रसिद्ध मंदिरे कुठे आहेत ज्यांना पाहायला सर्व जन जात राहतात. अन अस काहीही न करता मी परत गप बस मध्ये बसून सिडकोच्या घराकडे जायला निघालो.माझी फार भव्य दिव्य अपेक्षा होती कि पंचवटी हे नाव फार मोठे आहे खूप वेळा खूप वेगवेगळ्या संदर्भात ऐकलेले आहे तर तस काही दिसावं पण त्या ऐवजी पंचवटी नावाच्या बस, पंचवटी नावाचे बस stand व डेपो पाहून माझा प्रचंड भ्रमनिरास झाला. असाच भ्रमनिरास माझा झाला होता जेव्हा लहानपणी वडिलांनी आणले होते नाशिकला व बस मधून मला दाखवले होते हि बघ हि गोदावरी नदी मी कुठ कुठ करेपर्यंत नदी निघून गेली होती मग परत येतांना परत लक्ष ठेवून वडिलांनी नदी दाखवली तीही खूपच छोटीशी वाटली ...पुस्तकात वाचून गोदावरी बद्दलच्या ज्या कल्पना होत्या त्या मानाने हि प्रत्यक्ष नदी खूप लहान जवळपास एखाद्या घाण नाल्यासारखा तिचा प्रवाह भासत होता.
अस हे दुसऱ्या टप्प्यातील नाशिक माझ्या वयाप्रमाणे धुक्यातील दिसणाऱ्या स्वप्नाप्रमाणे अर्धअपूर्ण होते. खर व परिपूर्ण नाशिक हे तिसऱ्या टप्प्यात मला भेटले ज्या वेळी माझी बदली धुळ्याहून नाशिकला २०१२ मध्ये सहायक आयुक्त म्हणून झाली. नाशिक व या पदावरची पोस्टिंग या दोन्हींसाठी मी तितकाच नवखा होतो जस नाशिक बद्दल मला जुजबी ज्ञान होते तसच नोकरीत पण फक्त एकच प्रोबेशन वर्ष झाल होत.
पण आता नाशिकला आलो होतो तेव्हा वयात पण समज आलेली होती, अर्थात मधल्या काळात गोदावरी मधून भरपूर पाणी वाहून गेले होते, इतक्या वर्षात माझ्या अभ्यासामुळे साहित्यविषयी वाचनाची लिखाणाची  व त्या अनुषंगिक कार्यात रमण्याची जी भूक बाकी होती तिला नाशिकला अत्यन्त सकस व योग्य वेळेस आहार पुरवला... येथील सावाना, कुसुमाग्रज स्मारक, सायखेडकर व कालिदास नाट्यगृह येथे सतत काहीना काही सुरु असते. अनेक कार्यक्रम ऐकायला पाहायला मिळाले, अनेक दिग्गज साहित्यिक व विविध क्षेत्रातील व्यक्तींना पाहण्याची, त्यांना जवळून ऐकण्याची संधी मला मिळाली ..अनेक वर्षांपासून लिहित आलेल्या कवितांची बाड बाहेर काढली, काही  पुस्तक विकत घेऊन वाचण्याची क्षमता थोडी निर्माण झाल्याने बरीच पुस्तके संग्रही जमा व्हायला लागली. सर्वात महत्वाचे म्हणजे नाशिकमध्ये अनेक मित्र गणगोत नाते तयार झाले.

एखादी नाव राहिले तर उगाच इतरांना  राग येईल अशी अनेक मित्र, गणगोत मला या काळात नाशिकने दिले.
सुरुवातीला आल्यावर मी कविवर्य  किशोर पाठक यांची भेट घेतली, साहित्यिक गप्पा झाल्या त्यांनी आवर्जून माझ्या लिहिलेल्या कविता मागवल्या त्या वाचल्या वाचून कौतुकाची थाप दिली प्रोत्साहन दिले व सर्वात महत्वाचे म्हणजे मला 'सिंचन भवन' च्या साहित्यिक वर्तुळाशी व त्यातही विवेक उगलमुगले सरांशी जोडून दिले. विवेक सरांना मी सरच म्हणेल एकतर ते वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत व आपल्या आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात ज्या हक्काने आपल्याला काही सांगू शकतात त्यापैक्की एक म्हणजे विवेक सर. माझा  कवितासंग्रह अस्तित्वात येवू शकतो याची पहिली जाणीव सरांनी करून दिली व इतकेच नव्हे तर संग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमापर्यंत सर्व प्रकारची मदत उत्स्फूर्तपणे व स्वतःचे शंभर टक्के देत दिली, याशिवाय त्याचं वैशिष्ट्य म्हणजे मी नेमक संध्याकाळी त्यांच्या भेटीस सिंचन भवनला जात असे अशा वेळी दिवसभरच्या कामाने सर खूप थकलेले असले तरी माझ्याशी बोलतांना कधी कंटाळा केला नाही. त्यांच्या विषयी सांगणे हा एक संपूर्ण लेखाचा विषय होईल पण काही व्यक्ती   अशा  असतात ज्या स्वतःत च एक शहर घेवून जगतात, त्यामुळे  नाशिक विषयी लिहितांना आपसूकच विवेक सरांविषयी लिहीन साहजिकच आहे.
त्यातूनच पुढे किरण भावसार, हेमन्त पोतदार सर, रवींद्र मालुंजकर, प्रशांत केंदळे, यांच्याशी सम्पर्क आला. किरणच्याच घरी कविवर्य खलील मोमीन सर व मी अशा तिघांची मैफेल एकदा जमली, निम्मित होते माझ्या ‘अस्वस्थ क्षणांचे पाश’ या कवितासंग्रहासाठीच्या कविता निवडीचे. पण असे असले तरी त्या दिवशी  मोमीन सरांकडून ऐकलेल्या त्यांच्या व इतर कवींच्या कविता आजही कानात तशाच ऐकू येतात.
नाशिकमध्ये अजून एक महत्वाचं काम करायला मिळाले ते म्हणजे  आतापर्यंत केव्हाच संधी मिळाली नव्हती इतके चित्रपट पाहायला मिळाले अर्थात यातील 90 टक्के चित्रपट पूर्वीच्या कलात्मक व समांतर चित्रपटाच्या व्याख्येत मोडणारे होते माझ्या बौद्धिक भुकेला हे गरजेचे होते सर्वात महत्वाचं म्हणजे थोड्या खर्चिक जरी असल्या तरी मल्टिप्लेक्स सारख्या सुविधा उपलब्ध असंन महत्वाचे होते, या काळात आलेल्या  अनेक दर्जेदार चित्रपटांनी माझं आयुष्य समृद्ध केलं. संतोष बागुल सारखा हक्काचा मित्र यासाठी मला सोबत होता, काही चित्रपट त्याने सुचवले बाकी मी पण आम्ही सोबत पाहिलेले चित्रपट
नाशिकच वातावरण अल्हाददायक आहे, ते सतत नाशिकला राहून जाणवत नाही त्यासाठी माणूस विदर्भ किंवा मराठवाड्यात राहून आलेला पाहिजे. नाशिकच्या या शांत व प्रसन्न वातावरणाचा माणसाच्या मनावरील परिणाम पण चांगला होतो, विविध ऋतूंमधील नाशिकचे रूपे मनात साठून राहिलेली आहेत. पावसाळ्यातील नाशिकच्या आजूबाजूचे निसर्गरम्य रूप बघण्यासारखे असते. तेथील सुरुवातीचे तीन वर्ष विक्रीकर भवनच्या तिसऱ्या मजल्यावर माझे केबिन होते तेथून मागच्या खिडकीतून पांडव लेण्यांचा डोंगर छान दिसत असे. कोसळणारा पाऊस, धुके, उन-सावलींचा खेळ खूपच मस्त वाटत असे. . कामाचा ताण निवळन्यासाठी मला त्या खिडकीतुन दिसणार्या दृश्याचा फार उपयोग होत असे. 
या काळातील नाशिकच्या रहिवासात  माझ्या  वैयक्तिक आयुष्यात खुप चांगल्या घटना घडल्या, स्वताचे घर झाले, गाड़ी झाली, आमचे त्रिकोनी कुटुंब चौकोनी झालेपार्थ नंतर पाच वर्षांनी प्रद्न्या चा जन्म झाला. माझा कविता संग्रह 'अस्वस्थ क्षणांचे पाश' प्रकाशित झाला. एम्.पि.एस.सी चा अभ्यास करणार्या मुलांसाठी 'आधुनिक भारताचा इतिहास' या पुस्तकाचे लिखाण तर माझ्याकडून झालेच पन शिवाय त्याच्या पाच आवृत्त्या देखिल प्रकाशित झाल्यात. या काळात अनेक व्याख्यानांच्या मदतीने मला अभ्यास करणार्या मुलांना मार्गदर्शन करण्याची संधि मिळाली. त्यांच्या समस्या सोडवन्याचे समाधान मिळाले. त्यातील अनेक जनाची नंतर अधिकारी म्हणून निवड झाली. 
एकुनच नाशिकने व नाशिकच्या गोतावल्याने मला आयुष्यभरासाठी खुप काही दिलेहे जे शब्दात मांडता आले व असे भरपूर काही जे मांडता नाही आले. 

                 - समाधान महाजन 
                    ७९७२५५२४३९



नदी

तुकड्या तुकड्यातील जगण्यासारखीच
अनेक तुकड्यात भेटत राहिली नदी.

डूम्बलो कोवळया वयात अनेकदा
गुडुप निळ्या अंधारात, ते डोह धूसर झाले.

मग पेलले नाहित केव्हा तिचे अवखळ जोरकस प्रवाह
मग गच्च डोळ्यातुन उतरत गेली.

नंतरच्या  प्रवासात वाहत जायची आजुबाजुने अनेकदा
पण जिथे माझ्याच अस्तित्वाचे प्रश्न अंगावर चालून यायचे
तिथे तिच्या कोणत्या प्रवाहांच्या नोंदी ठेवायच्या?

गाव बदलत गेलीत, तशीच नावही
पन वाहत राहिली माझ्यात कायमच.

खर तर नदी आहेच माझ्यात,
आरपार - माझ विश्व व्यापून
मला सतत वाहत ठेवून
नाहीतर अडखळउन थांबलो असतो केव्हाच.

             - समाधान महाजन
               


माझा इतिहास

माझा इतिहास

शाळेत असतांना इतिहास खुप आवडायचा 
शिवाजी, राणाप्रताप,  झाशीची राणी .....तशाच युद्धजन्य वेशात स्वप्नातही येवून जायचे ....
पानिपत, हळदीघाट व अनेक लढयातील तलवारींचा खणखणाट दिवसात केव्हाही ऐकू यायचा.
अशोक, अकबर, कबिराच्या धर्मात गुंतून जायचो
मी विचारात राहायचो त्या प्रसंगाच्या, घटनेच्या
व शोधू लागायचो त्या व्यक्तींच्या मनाचा तळ .....
व त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आसपास...
मी वर्तमानात असूनही जगत राहायचो भूतकाळात.
कसल्याशा ओढीने.

ब्रिटीश  शत्रूशी  लढणारे गांधी,सुभाष,नेताजी, पटेल , आझाद हे सर्व थोर पुरुष सारखेच वाटायचे....
समाजाच्या भल्यासाठी लढणारे फुले,शाहू,आंबेडकर,शिंदे, कर्वे या सर्वांचे कार्य महान वाटायचे...


माहीत नाही काय झालेय, कस झालेय
पण आताशा  मला इतिहास आवडेनासा झालाय ....


....आजचा इतिहास मोडून-तोडून माझ्यासमोर येतोय....
घटना आपल्या कोनातून फिरवून आपल्याच रंगाचा गडद प्रकाश त्यावर टाकला जातोय...
इतकच नाही तर जुन्या जीर्ण झालेल्या घटना, व्यक्ति, कथांना आपलाच रंग दिला जातोय.
येणाऱ्या पिढ्यानी  जाती धर्माच्या इतिहासापलीकडे जाऊन
सत्याचा शोध घेऊ नये याची काळजी घेतली जातेय आटोकाट.


इतिहासाच्या कुठल्याही पुस्तकाच पान उघडाव वाटत नाहीय.
उघडल तर  त्यात  नक्की काय असेल शास्वती नाहीय
विव्देषाचे काळसर प्रवाह चाल करून  येतील कि 
सत्याचा खून करायला नंग्या तलवारी बाहेर येतील
काहीच सांगता येत नाही.

कारण आता विचारांना नाही
माणसांना कापलं जातंय
भूतकाळातील भुतं वर्तमानाच्या मानगूटीवर बसून भविष्याचा गळा घोटतायत
वाटतंय हळूहळू  स्मृतीपटलावरून उडून जाव्यात आतापर्यंतच्या कोरल्या गेलेल्या सर्व  घटना ज्या बुद्धी,विवेक व शास्राला धरून होत्या व भग्न इमारतीच्या पायाशी पडलेल्या दगडाप्रमाणे पडून राहावे विचारहीन वर्षनुवर्ष.

- समाधान महाजन

(दिवाळी अंक कविता - रती -२०१८ मध्ये प्रकाशित झालेली कविता)





या पुस्तकाची सहावी अद्यावत आवृत्ती  प्रकाशित होत आहे. अल्पवाधितच इतका विक्रमी प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व वाचक व विद्यार्थी मित्रांचे मनःपूर्वक आभार.  पहिली आवृत्ती  प्रकाशित झाली तेव्हापासून तर आजतागायत अनेक विद्यार्थी मित्रांशी मी कळत नकळत जोडलो गेलोय, असा एकही दिवस नाही ज्या दिवशी मला कोणी हे पुस्तक वाचल्यानंतर संपर्क केला नसेल. महाराष्ट्राच्या कानाकोपरयातून मुलांचे फोन येत असतात, मेल येत असतात. या सर्व प्रतिक्रियांमुळे व अपेक्षांमुळे  दरवेळी पुस्तकाचा एकूणच कंटेंट व क्वालिटी सर्वोत्तम ठेवण्याची माझी जबाबदारी अधिकच वाढते.  पहिल्यांदा पुस्तक  आले तेव्हा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम डोळ्यापुढे ठेवून त्याची रचना करण्यात आली होती कारण त्या परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एकच असे एकही  पुस्तक नव्हते , आजही नाही ( त्यामुळे आजही पुस्तकाचा मुख्य गाभा तोच आहे). सुरुवातीच्या एक दोन आवृत्या फक्त खूपच ओब्जेक्टीव नोट्स सारख्या काढल्या होत्या खर तर ज्यांचा बेस इतिहासाचा पक्का आहे व ज्यांना सर्व घटना व अभ्यासक्रम एकाच पुस्तकात हव्या आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे मेजवानी होती.
पण जसजसे पुस्तकाच्या आवृत्या वाढायला लागल्या व संपूर्ण महाराष्ट्रात पुस्तक पोचायला लागले तसे विविध ठीकांनाहून व विविध जणांकडून पुस्तकातील  नोट्स च्या स्वरूपातील मुद्दे सविस्तर करण्याविषयी व अधिकाधिक मजकूर add करण्याविषयी  विद्यार्थ्यांच्या मागण्या वाढू लागल्या तोपर्यंत राज्यसेवा व इतर परीक्षा यांच्यातील इतिहास या विषयावर आयोगाने जे प्रश्न विचारले होते त्यांच्यात फारसा फरक नव्हता.  म्हणून मग या पुस्तकाच्या तिसऱ्या  आवृत्तीपासून बरेच बदल करण्यात आले. अधिकाधिक परीक्षाभिमुख, अद्यावत व तरीही बोजड नसणारे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती देणे हे मिळनाऱ्या कमी वेळात खूपच  कष्टदायक व कस लागणारे काम  असते पण दरवेळी विद्यार्थी मित्रांनी माझ्यावर टाकलेला विश्वास व प्रेमापोटी हे करता येणे मला शक्य झाले आहे.
हे काम सुरु असतांना मला काही जनांनी विचारले पण कि, इतिहास विषयात काहीच बदल होत नाहीत तर मग नवीन आवृत्ती काढायाची काही गरज नसेल.
खर तर या प्रश्नांचे खूप सविस्तर उत्तर आहे, थोडक्यात सांगायचे झाले तर आजचा दिवस उद्यासाठी इतिहास असेल. आजच्या प्रश्नाची पाळेमुळे इतिहासात रुजलेली असतात ती समजून घेतली कि, मग प्रश्नांचा वटवृक्ष  सहज समजून घेणे सोपे असते.
म्हणून मग आसाम प्रश्न असो, पंजाब प्रश्न असो, नक्षलवाद असो कि नेहरू परराष्ट्र धोरणाला नव्याने समजून घेणे असो. हे इतिहासात असले तरी त्याचे परिणाम आज आपण पाहत असतो. हे सर्व परत एकदा चर्चेला आले किंवा मिडियामध्ये येवू लागले कि त्यातील परीक्षेला गरजेपुरत्या व महत्वाच्या अशा दोन ओळी का असेना पण त्या आपल्या पुस्तकातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे मला महत्वाचे वाटते. वृत्तपत्रातून सातत्याने त्यातील तज्ञ व्यक्तींकडून इतिहास व अनुषंगिक लिखाण येत असते  वा माझ्या वाचनाच्या सवयीमुळे बरीच संदर्भ मला सापडत असतात ती त्या त्या वेळी टिपून ठेवून जेव्हा पुस्तकाची नवीन आवृत्ती येते ती मी त्यात समाविष्ट करत असतो, यामुळे अनेक बाबी नव्याने माहिती झाल्याचे विद्यार्थी मला सांगत असतात. उदाहरण सांगायचे झाल्यास - या मे-जून २०१८ मध्ये जेव्हा हे पुस्तकाचे अद्यावतीकरन सुरु होते तेव्हा मला वृत्तपत्रात एक बातमी वाचायला मिळाली  'प्रख्यात वारली चित्रकार जिव्या सोम्या म्हसे यांचे निधन झाले' मला लागलीच आठवले कि फक्त जिव्या म्हसे यांच्या नावावर एक प्रश्न राज्यसेवेत विचारला गेलाय (तो पण महाराष्ट्राच्या इतिहासातील कला व सांस्कृतिक घटकावर) त्यामुळे त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवत ती या नव्याने येणाऱ्या पुस्तकात समाविष्ट केली आहे. असे अनेक बारीक सारीक संदर्भांसह भरपूर माहिती समाविष्ट केलेले , महाराष्ट्राच्या इतिहासावर परीक्षभिमुख माहितीचे एक प्रकरणच  समाविष्ट केलेले, मुलांना सतत त्रास देणारे विविध वृतपत्र, आयोग, पुस्तके या विषयी नव्याने अजून माहिती समाविष्ट केलेले  व महत्वाचे म्हणजे एम.पी.एस.सी ने ऑगस्ट-२०१८ पर्यंत घेतलेल्या सर्व प्रकारच्या परीक्षेत इतिहास या घटकावर विचारलेल्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण करून तसे बदल केलेले  "आधुनिक भारताचा इतिहास-महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात" या माझ्या पुस्तकाची नवीन सहावी आवृत्ती आपल्याला देण्यास मला विशेष आनंद होत आहे. आता सर्व परीक्षेतील इतिहासाच्या अभ्यासाला हे पुस्तक उपयुक्त आहे.  सर्व विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा सूचना व प्रतिक्रियांचे कायमच स्वागत आहे.
                                                                                                               - समाधान महाजन

राजेश पाटील अर्थात "ताई मी कलेक्टर व्हयनू" मधील कलेक्टर

आज भेट झाली राजेश पाटील सरांची अर्थात ताई मी कलेक्टर व्हयनू या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक, जिल्हाधिकारी म्हणून ओरिसात कार्यरत असलेले, खान्देशातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील  लाखों अभ्यासू विद्यार्थ्यांची प्रेरणास्थान असलेले व आम्हा सर्वांचे लाडके दादा अर्थात राजेश दादाचीं भेट झाली.
अर्थात आमचे फोनवरून बोलणे अनेकदा झालेले, माझ्या काही लिखाणाला त्यांनी मेसेजवरून दाद दिलेली पण भेट अशी पहिल्यांदाच झाली. 
अभ्यासाच्या अनेक टप्प्यावर त्यांची मदत व सोबत मिळाली ती त्यांच्या "ताई मी कलेक्टर व्हयनू" या पुस्तकाच्या रुपाने. जेव्हा जेव्हा खूप निराश झालो असेल , काय करावे कळत नसेल तेव्हा तेव्हा मी हे पुस्तक घेऊन बसायचो अनेकदा वाचल्यावरही त्यात काय होते असे वाचण्यासारखे तर माझ्यासाठी ते पुस्तक नसायचे, ती एक कथा नसायची, ते पुस्तक हातात घेणे हीच एक प्रेरणा असायची. या पुस्तकातला एक खेड्यातील गरीब घरातील मुलगा प्रचंड संघर्षातून  upsc देऊन कलेक्टर होतो हि एकच टॅगलाईन माझ्या मनाला उभारी देऊन जायची व मी पुन्हा अभ्यासाला लागायचो. अनेक रात्री ते पुस्तक तसच छातीवर ठेवून मी झोपी जायचो.
माझ्या upsc च्या मुलाखतीच्या  टप्प्यावर  तर सरांचे बहुमोल मार्गदर्शन लाभलेच पण सर्वात जास्त वेळ त्यांनी मला दिला तो IRPS  मिळाल्यानंतर joining बाबत असलेल्या डायलेमा मध्ये. तेव्हा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी मी त्यांना हक्काने विचारून त्रास दिला आणि अगदी जवळच्या मित्राला सांगावे तस त्यांनी मला मार्गदर्शन केले.
अशा अत्यंत विनम्र, ज्याला आपण to the ground अस म्हणतो अन इतक्या वर्षाच्या सेवेनंतरही स्वतः मधील मृदूता, संयम व तरीही ध्येया प्रती कठोर असलेल्या व्यक्तित्वाला आज भेटणं हा माझ्या जीवनातील अमूल्य ठेवा म्हणून मी जतन करेल.
या नंतर सर भेटतीलही अनेकदा पण आपल्या मनात उच्च स्थान असलेल्या व्यक्तीची प्रथम भेट संस्मरणीय असते अन म्हणून हे अस काही लिहिण्यास प्रेरित करणारी पण असते.

- समाधान महाजन 

एकांताची दुःखे

एकटेपणा हवाहवासा वाटतो जेव्हा आपण गर्दीत कुटुंबात कार्यालयात अस कुठंतरी असतो. आपल्याला सारख वाटत राहत एकट असतो तर हे केले असते, ते केले असते , लिहिलं असत, वाचलं असत, अनेक अपूर्ण प्रकल्प आठवू लागतात व जितकं जास्त व्यस्त आपन होत जातो तितके जास्त एकांतपणाची ओढ वाढत जाते,

पण खरच एकांत मिळाल्यावर ठरवलेले सर्व होते का तर बिलकुल नाही, हा एकांत मारक पण ठरतो, तो धड काहीच करू देत नाही सर्व केओस तयार होतो डोक्यात मग मोबाईल व नेट हातात पडलं कि त्यात किती वेळ निघून जातो कळत नाही, मग परत माणूस स्वतःच मन खायला  निघतो किती वेळ वाया गेला म्हणून .........एकांत हि फार भयानक दुधारी तलवार आहे तिचा छान व योग्य वापर करणाराच मनुष्य जीवनात यशस्वी होतो.

 - समाधान महाजन 

श्याम मनोहर-प्रेम आणि खूप खूप नंतर

श्याम मनोहर यांचे नुकतेच प्रकाशित झालेले व मित्रवर्य नामदेव कोळी याच्यामुळे लगेचच वाचायला उपलब्ध झालेले 'प्रेम आणि खूप खूप नंतर' हे पुस्तक दोन दिवसात वाचून संपवलं,
मुळातच खूप दिवसांपासून काही तरी जबरदस्त आशय असलेली मोठी कादंबरी वाचावी अस मनात होतं, योगायोगाने जळगावात नामदेव ने हि कादंबरी उपलब्ध करून दिली अन अक्षरशः बैठकीत वाचून संपवली.

अन खूप निराश झालो, या ऐवजी अजून काही दुसर वाचलं असत तर बर झालं असत अस वाटायला लागलं. कादंबरीची सुरुवात करायला गेलो अन वाचतांना अस वाटायला लागलं कि, जणू शंकर महादेवन चा ब्रीथलेस अलबम चे कडवे वाचतोय कि काय . वाचतांना दम न घेता वाचलं कि तो अलबम च होईल ब्रीथ लेस गाण्याचा. उगाचच फुल स्टॉप दिलेयेत.

बदाम पसंदा ची रेसिपी छान आहे, तेव्हडी तीन चार पाने व त्याच्या रेसीपीचे चित्र पाहतांना काही वेळ वाटले कि मी खाना खजानाचे पुस्तक वाचतोय कि काय,

बर हे सर्व वेगवेगळ्ळे प्रयोग करून हि खिन्नता, विषन्नता, satire nes , आनंद, दुःख, आवड, पात्रांमध्ये गुंतन, फिल करणं या पैकी चक्क काहीही वाटत नाही.

गणित तज्ज्ञ रामनुजांचे आतून बाहेरून एकाच विषयाने भरलेले विचार, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, यांच्या विषयीचे मते, विचार श्रीमंत लोकांच्या जीवनातील चढउतार अस काहीस अत्यन्त विस्कळित पणे मांडलेल्या पटात वाचक involved होत नाही.

आधुनिक जीवन पद्धती,  NGO त काम करणारे लोक व भांडलवाद यांच्यातील विविध पैलू रवींद्र रुक्मिनाथ यांच्या कादंबरीत अधिक सकस वाटत राहते.

- समाधान महाजन

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी........

माणस माणूस बघून वागतात म्हणजे नेमके काय करतात?....
बऱ्याचदा जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत कस वागायचं किंवा त्याच्याशी कसा संवाद ठेवायचा किंवा एकूणच त्याच्याशी ठेवल्या जाणाऱ्या संबंधाचा बेस काय असेल असा प्रश्न पडतो तेव्हा सामान्यतः लोक स्वतःच्या विचाराऐवजी दुसऱ्यांनी त्या व्यक्तीबद्दल काय सांगितल आहे त्याचा अधिक विचार करतात व त्याप्रमाणे वागतात....

नवीन जागेत राहायला गेले तेव्हा शेजारी म्हणून किंवा नवीन संस्था किंवा ऑफिस जॉईन केले तेव्हा सहकारी म्हणून बॉस म्हणून किंवा हाताखालची व्यक्ती म्हणून एकूणच माणसांनी भरलेल्या त्या आपापल्या जगात प्रत्येकाचे दुसऱ्याबद्दल मत असतात. काही व्यक्तींचा स्वभाव सर्वांना माहिती असल्याकारणाने त्याच्याबद्दलचे मते जगजाहीर असतात. मग लोक अशा माणसांशी ठरवून वागतात....


मला दरवेळी वाटत राहत कि हे अस नसावे ......ज्याप्रमाने एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्या नकारात्मक बाजूने बोलले जाते तर नक्की ते तसे का बोलले जात असावे या मागे काही कारण असल्याशिवाय ती व्यक्ती तसे वागणार नाही....पूर्वी मी अशा व्यक्तींशी नैसर्गिकपणे बोलायचो माझा जसा स्वभाव आहे त्याप्रमाणे बोलायचो व मला जाणून घ्यायचे असयाचे कि ती व्यक्ती लोक म्हणतात तशी आहे का नक्की......
व ती तशी नाही वाटली मला कि मग प्रश्न पडायचा कि एखाद्या व्यक्तीला पारखतांना लोक स्वतःच्या डोक्याचा का वापर करत नाहीत? का दुसऱ्यांनी सांगितलेल्या मताला बेस बनवून तिसर्याशी कसे वागायचे ते ठरवतात....कदाचित एखादी व्यक्ती सर्वांनी सांगितल्यापेक्षा आपल्याशी वेगळे वागू शकते...जर आपण आपल्या नैसर्गिकपद्धतीने त्या व्यक्तीशी संवाद साधू शकलो व आपली काही मते जरी जुळली तरी हे सबंध इतरांपेक्षा वेगळे व चांगले असू शकतात......पण बरेच जन असे स्वतःच्या हिकमतीवर सबंध ठेवण्याचे धाडस करत नाहीत.....

एकदा एक साहित्यिक कार्यक्रम होता....महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संस्थेचे संचालक जे माझे मित्र होते तेही या कार्यक्रमास एक रसिक म्हणून उपस्थित होते...कार्यक्रमात वेगवेगळ्या साहित्यिकांनी आपापली मते मांडली ...मी माझ्या या मित्राच्या प्रतिक्रियांचे नकळत निरीक्षण करत होतो....जे साहित्यिक महाराष्ट्रात प्रसिद्द आहेत किंवा ज्याची नावे या ना त्या कारणाने वृत्तपत्रात किंवा इतर माध्यमात झळकत असतात ती लोक बोलायला आली कि याच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसत असे. त्यांच्या टाळ्याखाउ वाक्यांना हा जोरदार प्रतिसाद देत असे अगदी मन व मान लावून तो ऐकत असे....पण मध्येच एक साहित्यिक ज्यांचे फार पुस्तके नव्हती एक-दोन कवितासंग्रह व एखाद दोन कथासंग्रह त्यांच्या नावावर होते...ते बोलण्यासाठी उभे राहिले........ या व्यक्तीचे जे काही लिखाण मी वाचले होते ते मला खूप आवडले होते..त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी मी उत्सुक होतो ....त्यांनी पण आपली मते छान मांडली ....फक्त त्यांना टाळ्याखावू वाक्य फेकता आले नाही किंवा लोकांना हसवता आले नाही साहजिकच त्यांचे भाषण फार सपक वाटले लोकांना.....

कार्यक्रमानंतरच्या चर्चेत माझा मित्र म्हटला कि या सर्व कार्यक्रमात कमजोर कडी कोण मला वाटल असेल तर ते साहित्यिक..म्हटल का रे बाबा ...तर म्हणे ते काही खास बोलले नाही .....म्हटल तुला ते तस वाटल नाही कारण तू त्यांचे नाव ऐकले नाही पण ते लिहितात दर्जेदार ....पुढे जाणारा माणूस आहे हा .....

झाल काही दिवसात त्या साहित्यिकाच्या पुस्तकाला लागोपाठ चार-पाच पुरस्कार मिळाले ...वृत्तपत्रात नाव आले ....आणि अपेक्षितपणे माझ्या त्या मित्राचा मला फोन आला कि, तू म्हटला होता ते बरोबर होते. हे अस का झाल असावं याचा मी विचार केला ...माझ्या त्या मित्राच्या संस्थेचा पसारा इतका मोठा होता कि त्याला एकूणच वाचनाकडे लक्ष देण्यास वेळच नव्हता...त्यामुळे लहानपणी त्याने वाचलेले साहित्यिक ....सतत माध्यमातून झळकणारे साहित्यिक ....मोठ्या संमेलनांचे अध्यक्ष ......भाषणात तरबेज असणारे साहित्यिक हाच मापदंड तो लावत होता ...अन तस पाहिलं तर ते त्याच्या बाजूनेही मला बरोबर वाटत होत....एकूणच आयुष्यात इतकी धावपळ असतांना,  स्वतः वाचून मग दर्जेदार साहित्य व साहित्यिक ठरवण्याचा वेळ त्याच्याकडे नसतांना तो अजून काय करू शकत होता पण मला सोबत वाईट या गोष्टीचे वाटत होते कि मग असे अनेक चांगली लोक या क्षेत्रातील त्याला कधी कळतील कारण त्याच्या संस्थेच्या मोठमोठ्या कार्यक्रमात तो फक्त अशा आधीच प्रसिद्द असलेल्या लोकांना बोलवत असेल तर या अशा लोकांपर्यंत तो कधीच पोहचू शकणार नाही .....व ती लोक पण जास्त लोकांपर्यंत पोहचू शकणार नाही....

हा विचार माणसांसोबतच मला पुस्तकांबाबत येतो....जगात वेगवेगळ्या भाषांमध्ये इतकी दर्जेदार पुस्तके आहेत निव्वळ नोबेल विजेत्या लेखकांची पुस्तके जरी घेतली किंवा निव्वळ भारतातील चांगली चांगली पुस्तके जरी घेतली फार फार काय तर मराठीतील प्रसिद्ध लेखकांची पुस्तके जरी घेतली तरी ती वाचण्यासाठी लागणारा वेळ खूप असेल .......श्री.ना.पेंडसे., नेमाडे, माडगुळकर, शिरवळकर, पाध्ये, आणि अजून अनेक जन असे वाचण्यासच खूप वेळ लागेल तेव्हा  माणूस नक्कीच selective होत असेल का? आणि जर तो असा होत असेल तर एक-दोन दर्जेदार पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांवर तो अन्याय नवे का ? 

म्हणजे मग एकूणच जगण्यातील धावपळ व वेळेचे गणित लक्षात घेता एखाद्या माहित नसलेल्या व्यक्तीशी स्वतःहून अंदाज करून सबंध न वाढवता ऐकीव माहितीवर आधारित त्याच्याशी बोलणे म्हणजे त्याच्या एकूणच असण्याकडे व त्याच्या स्वभावाकडे दुर्लक्ष करण्यासारखे नव्हे काय किंवा मुळातच वेळ कमी असल्याने प्रसिद्ध तितकीच पुस्तके वाचणे व इतर काही माहित नसलेल्या पण  दर्जेदार पुस्तकांकडे दुर्लक्ष करण्यासारखे नव्हे काय? 

                                                       - समाधान महाजन 

ख्वाडा ते बबन व्हाया सैराट

बबन चा शेवट हा एखाद्या इंडियन किंवा हॉलीवूड आर्ट फिल्म मध्ये फार फार तर शॉर्ट फिल्म मध्ये शोभेसा आहे....पण एकूणच वास्तव ढंगाचा ग्रामीण पार्श्वभूमीवर कमर्शियल चित्रपट बनवला जात असतांना असा शेवट टाकणं हे दिग्दर्शकाच्या धाडसाचे कौतुकास्पद काम आहे, अशी भावना काही काळ निर्माण होते. पण काही काळच...

बबन पाहतांना काही जागी सैराट ची आठवण येते अर्थात एखादा कल्ट बनल्यानंतर तशा तुलना होतातच...इतकेच नाही तर भाऊ साहेब कऱ्हाडेंच्या या आधीच्या ख्वाडा चीही आठवण येते...

नागराज मंजूळेंचा फॅन्ड्री व सैराट व भाऊसाहेब कऱ्हाडेंचा ख्वाडा व हा आता बबन या साऱ्या चित्रपटात अस काही आहे कि यातील एक बघतांना इतरांची आठवण नक्कीच येते ...या साऱ्या चित्रपटांमध्ये काही मूळ बाबी सारख्याच आहेत .....ग्रामीण भागातील अर्थात  खेड्यातील आजच्या वास्तव सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे आकलन आपल्या चित्रपटातून मांडणारे जे काही थोडे दिग्दर्शक आहेत त्यातील भाऊराव कऱ्हाडे.

पण बबन पाहतांना व त्यातही शेवट पाहतांना जाणवत राहते कि वास्तव अस्सल दाखवण्याच्या प्रयत्नात मुद्दामच भडक पणा तर निर्माण केला जात नाहीय ना ? कि हि आंतरिक स्पर्धा आहे कलाकृतीचे प्रदर्शन मांडण्याची....

फॅन्ड्री तील दगड प्रतिकात्मक आहे त्या अंधारात चित्रपट संपतो, ख्वाडातील हातात शस्र आहे जे शोषण करणारयाच्या हाताला मुळापासून उखडू इच्छितात.....सैराट मध्ये शेवटी लहान मुलाची रक्ताने भरलेली पावले व मूक किंकाळी दिसते पण बबनचा शेवट अंगावर येतो ...इतक्या अंत्यतिकतेची खरच गरज होती का अस वाटत राहतं. कि हि पण स्पर्धा आहे अधिक वास्तव व प्रेक्षकांना जास्तीत जास्त सुन्न करून टाकण्याची....

एक सत्य हेही आहे कि जर या चित्रपटात हा भडक पण गंभीर प्रसंग नसता तर बबन वरील हल्ल्याचे व त्याच्या संघर्षाचे निवडक प्रसंग वगळता हा चित्रपट एक ग्रामीण वास्तव व  विनोदी चित्रपट बनून राहिला असता...पण एकूणच सर्व वेगवेगळ्या घटनांचे एकत्रीकरण म्हणून तो सलग चित्रपट पहावा वाटतो व तो त्याची पकड बनवून ठेवतो.

बऱ्याच ठिकाणी पटकथा विस्कळीत आहे, काही  बाबी  अधाराविना सोडून दिल्याने प्रश्न अनुतर्रीत राहतात.नायिकेचे कुटुंब एकदाही दाखवलं गेलं नाही त्यामुळे सुरुवातिला पडलेला प्रभाव शेवटी निघून जातो.

Upsc च्या तयारीच्या वेळी चित्रपटाचा समाजावर पडणारा प्रभाव
अशा अर्थाचा एक निबंध लिहिला होता त्यावेळी दोन्ही बाजू लिहिल्याचे आठवते....

चित्रपटावर समाजाचा प्रभाव असतो कि समाजावर चित्रपटांचा प्रभाव असतो या विषयात एक बाजू घेऊन चालणारच नाही कारण दोन्ही विषय एकात एक मिसळलेले आहेत .....कधी कोणता घटक प्रभावी ठरेल सांगता येत नाही.

सैराट च्या वेळीही हि चर्चा रंगली होतीच, किंबहुना शाळा, टाईमपास, सैराट व आता बबन ....शाळकरी व वयात येणारी मुलं अशा चित्रपटांनी बिघडतात हा आरोप एकीकडे होतो तर समाजात जे दिसत ते आम्ही मांडतो असे या संदर्भातील लोक म्हणत असतात .....

मुळात चित्रपट हि स्वतंत्र कलाकृती आहे व तिचा आस्वाद कला म्हणून घेण्याची समज  समाजात असली  कि मग चित्रपटाकडे निखळ दृष्टीने बघता येते.
                                             
 - समाधान महाजन

नऊ

कधी काळी लहान असलेले शहर हळूहळू विस्तारत जाते ...रस्ते वाढतात, इमारती वाढतात...महापालिकेचे कामे वाढतात...अशी नव विस्तारित जाणारी शहरे जेव्हा गावांपर्यंत पोहचतात व गावाला पण आपल्यात ओढून घेतात...तेव्हा त्या गावाचं भांबावलेले पण सहज कळत ज्या वेगाने शहर त्याला कवेत घेते तो वेग त्याला पेलावत नाही पण त्याच्या हातात आता काहीच नसत ...चोहोबाजूने गावाला पडलेला शहराचा वेढा त्याच्या गल्लीबोळात घुसून धुडकूस घालू लागतो तेव्हा हळूहळू गावाला त्याची सवय होवून जाते.......

जशी मला आता तुझी सवय झालीय ....

......
.....

पण  अनेक शतकांनंतर त्या साम्राज्याचे  खंडहर झालेले पाहावेसे वाटत नाही......... कोणे एके काळी अंगावर मिरवलेले समृद्धीचे लक्षण.....पार नेस्तनाबूत झालेले पाहतांना .......इतिहास पार डोळ्यात दाटून येतो.

                                                                - समाधान महाजन.