जे पीड परायी जाणे रे .....

बऱ्याचदा असे जाणवते लोक रिलेट करून घेत नाहीत. एकतर त्यांना ते येत नसावं किंवा ते मुद्दाम करत नसावेत. आपल्यासारखाच हाडामासाचा देह समोरच्यालापण आहे व आपल्याला असणाऱ्या भाव भावना देखील त्याला आहेत हे अनेकदा लोकांच्या गावीच नसल्यागत वावरत असतात. 

बऱ्याच gangster मुव्ही पहा. अनेकांचे सहज मर्डर करणाऱ्याला स्वतःचे मरण दिसायला लागले कि किती केविलवाणा चेहरा दिसायला लागतो त्याचा. असे मुव्ही समाजातील घटनांवरून व मानवी स्वभावाच्या स्वाभाविक अभ्यासावरून बनवलेले असतात. 

सिंडलरर्स लिस्ट मध्ये मृत्यूच्या रांगेत उभे असलेले ते लोक आठवा नक्कीच त्यांना मारणारे लोक त्याही वेळी नॉर्मल असतील तेव्हा त्यांना हा मृत्यू रिलेट करता येत नसेल काय? 

अलीकडे मी anarchy हे विलियम dalrymple चे पुस्तक वाचत होतो. शेवटचे जे काही मुघल सम्राट होते त्यातील काहींचे व त्यांचे सरदारांचे मृत्यू डोळ्यात तप्त सळइ घालून, हात पाय तोडून, तुकडे करून असे केले जात. कुठे जात असतील भावना ? 

आपल्याला जे वाटतेय त्यातील थोडे का असेना पण समोरच्याला वाटत असेल इतकी जाणीव देखील आहे कि नाही इतकी माणसे सामान्य जीवनात  क्रूर होऊन जगतात.

हि क्रूरता फक्त मर्डर वा शारीरिक हिंसेपुरती नसती. कोणाला प्रचंड दुखावणे, विश्वासघात करणे, वेळ न पाळणे, शब्द न पाळणे .... अशा खूप काही मानसिक टोर्चारिंग करण्यात देखील समोरचा व आपण यात करोडो मैलाचे अंतर असल्यागत लोक वागत जातात. 

# लिटररी नोंदी १९



जिव्हाळा - रामदास भटकळ

पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ यांनी जिव्हाळा हे पुस्तक लिहिले आहे. अलीकडेच ते  माझ्या वाचण्यात आले. त्यांच्या संपर्कात आलेल्या लेखक कवींविषयी त्यांनी यात लिहिले आहे. ते त्यांचे व्यक्तिगत अनुभव  आहेत. पण असे असले तरी त्यांनी ज्या व्यक्तींबाबत लिहिले आहे त्या व्यक्ती पब्लिक फिगर असल्याने लोकांना देखील आवडतील असेच अनुभव त्यांनी व्यक्त केले आहेत. आपल्या आवडत्या लेखक कवीविषयी अधिकची माहिती मिळणे हे वाचकांसाठी आनंददायी असते.  

१) पहिला लेख वरदान हा तारा वनारसे यांच्यावर तर  २) दुसरा कलासक्त हा लेख ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्यावर आहे.

३) वलय –

·      श्री. पु. भागवत यांच्यावर हा लेख लिहिला आहे. मौज-सत्यकथेवर संपादक म्हणून विष्णूपंत यांचे नाव असायचे पण खरे संपादकीय सूत्रधार श्री पु अर्थात श्रीकृष्ण पुरुषोत्तम भागवत हे होते.

·      श्रीपू हे १९५४ पासून रुईया कॉलेज मध्ये शिकवू लागले होते. १९८३ ला सत्यकथा हे मासिक बंद पडले. १९८६ साली ते साहित्य महामंडळाचे अध्यक्ष झाले. श्रीपू महत्मा गांधींना भेटले होते. गांधी जिना बोलणी असफल झाल्यानंतर बिर्ला हाउसमध्ये वार्ताहर परिषद झाली तेव्हा प्रभात दैनिकाचे संपादक श्री.शंनवरे यांच्यासोबत श्रीपू तेथे गेले होते. तसेच १९४२ च्या गवालिया tank वरील ऐतिहासिक सभेच्या वेळी ते खूप लहान होते पण तिथे मोठ्या भावासोबत हजर होते.

·   करंदीकरांनी एका लेखात लिहिले, “कविता कशी भोगावी असं विचारलं तर त्यांच्यासाठी एक ग्राम्य उत्तर असं: ‘कपडे काढून’.” तेच करंदीकर गमतीने मित्राबद्दल म्हणत असत, ‘आपला श्रीपू काही झाले तरी कपडे काढायला तयार होनार नाही’ (पे.१०४)

४) नंदनवन –

·       हा लेख गंगाधर गाडगीळ यांच्यावर आहे.

·       बॉम्बे बुक डेपो ची स्थापना १९२४ ची. गाडगीळ, बापट, पाडगावकर, सदानंद रेगे, व करंदीकर हे मित्र होते. ते एकत्र जमायचे. खाणे, पिणे असे कार्यक्रम सुरु राहायचे. गंमतीने ते या गटाला ‘मुर्गी क्लब’ म्हणत असत.

·       आपटे समूहानंतर गाडगीळांनी वालचंद समूहात अनेक वर्ष सल्लागाराचे काम केले. १९८३ मध्ये गाडगीळांना ६० वर्ष पूर्ण झाली.

५) उन पावसाच्या शोधात –

·       वसंत कानेटकर यांच्यावर हा लेख आहे. वसंतराव यांची पहिली कादंबरी ‘घर १९५० मध्ये प्रकाशित झाली.

·       १९५५ च्या काळात ते कॉलेजच्याच आवारात छोट्याशा घरात राहत होते. १९६७ मध्ये ते शिवाई बंगल्यात स्थायिक झाले. ते गोखले शिक्षणसंस्थेचे आजीव सभासद होते. १९७१ मध्ये या मेंबरशिपला पंचवीस वर्ष पूर्ण झाली.

·       वसंतरावांचे लग्न त्यांची मामेबहीण असलेल्या सिंधुताई यांच्याशी झाले होते. ते त्या दोघांनी स्वतः ठरवले होते. त्यांना एक मुलगी व एक मुलगा होता. सिंधूताईंचा कवितासंग्रह – ‘ मातीलाही कधीतरी वाटत...’.   नंतर वसंतरावांनी सुमन बेलवलकर यांच्याशी लग्न केले. मार्च १९९७ मध्ये वसंतरावांना ७५ वर्ष पूर्ण झाली. तेव्हा नाशिकमध्ये त्यांचा मोठा सत्कार झाला होता.

६) उंच जिथे माथा –

·       दुर्गा भागवत यांच्यावर हा लेख आहे.

·       एखादा अभ्यासाचा विषय त्यांच्या मनात घोळत असला कि, आपण सांगतो ते कोणाला याचे भान त्यांना राहत नसे. एकदा दुर्गा भागवत या रामदास भटकळ यांच्या ऑफिसमध्ये गेल्या असता तिथे अडवाणी नावाचा एक कागदाचा व्यापारी बसला होता. बाई बोलत होत्या. मध्येच भटकळ कामात इतर कोणाशी बोलत असल्याचे पाहून त्या व्यापाऱ्याला सांगू लागल्या...

·       काही वेळाने त्याला वाटले कि बाईंना प्रतिसाद दिला पाहिजे म्हणून ते दुर्गाबाईंना म्हणाले,madam, यु राईट ऑल धिस, आय विल गिव्ह यु व्हेरी गुड पेपर टू प्रिंट

·       दुर्गाबाइंनी महात्मा गांधींना प्रथम पाहिले ते टिळकांच्या अंत्ययात्रेत. व त्यांचे भाषण ऐकले ते १९२५ मध्ये. गांधींचे भाषण ऐकून सतरा आठरा वर्षांच्या दुर्गेने आपल्या सोन्याच्या बांगड्या कस्तुरबांच्या झोळीत टाकल्या होत्या. (पे.२२७)     

७) कविवरा – 

·       हा कुसुमाग्रजांवरील लेख आहे. भटकळ यांची कुसुमाग्रज यांच्याशी पहिली भेट नाशकात १९५५ ला झाली. (मी हा विचार करतोय मला आठवते काही तरी १९९६-९७ च्या आसपास मी नाशिकला आलो होतो, तेव्हाच्या वृत्तपत्रात भरभरून त्यांच्याविषयी आलेले होते. पूर्ण नाशकात सगळीकडे होर्डिंग बनर लागलेले होते. कशाने ते आठवत नाही पण होते. त्यावेळचे नाशिक माझ्यासारख्या खेड्यातून आलेल्या युवाकासाठी खूप मोठे शहर होते. १९५५ ला जेव्हा यांची भेट झाली होती तेव्हा नाशिक कसे असेल. कसे दिसत असेल?...खूप लहान असेल, छोट्या इमारती असतील. गर्दी कमी असेल. हि लोक कुठे भेटत असतील... कोणत्या रस्त्याने गेले असतील.) तेव्हा शालिमार जवळ कुसुमाग्रजांचे घर होते असा उल्लेख येतो. तात्या मद्यप्राशानाच्या बैठकीला 'ग्रंथवाचन' म्हणत 'रामायण' म्हणजे 'रम' असाही उल्लेख त्यात आला आहे. 

·       सुरुवातीच्या काळात तात्या पत्रकार म्हणून पुण्याला प्रभाकर पाध्यांच्या स्वदेस मध्ये, रांगणेकरांच्या चित्रा मध्ये, मुंबईच्या धनुर्धारी मध्ये काम करत होते. शाळा कॉलेजात असतांना त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. मित्रांनी स्थापन केलेल्या ध्रुव मंडळान पैसे जमवून त्यांच्या 'जीवनलहरी' या पहिल्या संग्रहाचे प्रकाशन केले. त्यांनी गोदावरी सिनेटोन मध्ये पटकथा संवाद लेखन केले होते तसेच लक्ष्मणाची देखील भूमिका केली होती. तात्यांच्या कविता खांडेकरांकडे पोहोचल्यानंतर त्यांनी स्वतः प्रस्तावना लिहून १९४२ साली विशाखा कवितासंग्रह प्रसिद्ध करून घेतला.  

·       तरुणपणात तात्या कलंदर वृत्तीचे होते. त्यांना गंगुबाई सोनावणे यांच्याबद्दल आकर्षण वाटत असले तरी लग्नचा विचार लौकिकदृष्ट्या शक्य नव्हता. बाई शिक्षिका होत्या. वयाने मोठ्या होत्या. (पेज नंबर २४१)

·       नाशिकमध्ये तात्या व वसंत कानेटकर हे दोन्ही मोठ्या व्यक्ती राहत होते. पण दोग्घांचे वयक्तिक सबंध चांगले होते. कुसुमाग्रज हे कानेटकरांपेक्षा दहा बारा वर्ष मोठे होते. वसंत कानेटकर हे कवी गिरीश यांचे चिरंजीव. वसंतरावांनी आपल्या नाटकात मुक्तपणे कुसुमाग्रजांच्या कवितांचा उपयोग केला.

·       बोरकरांना आपला काविपणा कधी विसरता येत नसे. ‘ते फोन उचलला कि पोएट बोरकर स्पिकिंग असे म्हणत तात्यांचे उत्तर होते कि, बाकीबा हे फुल टाईम पोएट आहेत तर मी पार्ट टाईम पोएट आहे

·       तात्यांनी नटसम्राट सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदाही सलग पाहिले नाही.(पे.२५४) नटसम्राट मधील एक ओळ अशी होती – ‘गंगेने कसे वाहावे ते ब्रम्हपुत्रेने सांगू नये आणि ब्रम्हपुत्रेने कस वाहावे ते गंगेने

·       तात्यंना साहित्य अकादमी मिळाला तेव्हा ते बारा तेरा जणांसोबत गाडीवर दिल्लीला गेले होते.

८) आनंद करंदीकर-

·       हा लेख विंदा करंदीकर यांच्याशी संदर्भात आहे.

·       करंदीकरांची पहिली वर्ष कोकणात गेली. पुढे शिक्षण आणि अध्यापन कोल्हापूर परिसरात झाले. मुंबईला आल्यावर ते रामनारायण रुईया कॉलेजात इंग्रजी शिकवू लागले. १९४९ मध्ये करंदीकरांचा पहिलाच कवितासंग्रह ‘स्वेदगंगा’ प्रकाशित झाला.

·       केशवसुतांच्या कविता प्रसिद्ध करायला हरी नारायण आपटे यांना पुढे यावे लागले. कुसुमाग्रजांची विशाखा खांडेकरांमुळे उजेडात आली. करंदीकर-पाडगावकर यांचे पहिले कवितासंग्रह प्रसिद्ध करण्यास स्वतः कवींना जुळवाजुळव करावी लागली. (पेज २७४)

·       शिकागो विद्यापीठाची फेलोशिप करंदीकरांना मिळाली होती. त्यातून ते पुढे इंग्रजी कविता करू लागले होते. ए.के. रामानुजम हे कानडी व इंग्रजी भाषेतील महत्वाचे कवी होते. विंदांनी रामानुजम यांच्या मदतीने स्वतःच्या कवितांची इंग्रजी भाषांतरे केली.

 

९) संधिकाळ – 

  • हा लेख ग्रेस यांच्याशी संदर्भात आहे.
  • ग्रेस यांचे शब्द ‘अनाघ्रात किंवा व्हर्जिन असले आणि त्यामुळे त्यांना पूर्वीचे काही संदर्भ नसले तरी खूप काही सांगून जातात.
  •  ग्रेस यांच्या पत्नीचे नाव लीलाताई तर मिथीला, माधवी आणि राघव हि त्यांच्या मुलांची नावे होती ज्यांना ते बाला, बेला आणि बिशू असे म्हणत असत.
  •  त्यांच्या लेखनात विशेषतः गद्य लेखनात अनेक साहित्यकृतींचा उल्लेख येतो. त्यात सार्त्र, चक्रधर, गालिब अशा विविध साहित्य प्रवाहातील थोरांचा उल्लेख असतो.
  •  युरोपातील फ्रेंच नाटककार सम्युअल बेकेट यांच्या ‘वेटिंग फॉर गोदो’ नाटकाची थीम काय आहे हे कोणाला समजेना म्हणे! ते नाटक पन्नास वर्ष टिकून राहिले. त्यानंतरच्या टीकाकरांना कळेना कि पन्नास वर्षांपूर्वी यात न समजन्यासारखे काय होते.
  • ग्रेसच्या कवितातील/लेखनातील तीन वैशिष्ट्य – १. त्यांच्या कवितात संगीत आणि चित्र अर्थात श्राव्य आणि दृश्य संवेदनांना चाळवणारे उल्लेख मोठ्या प्रमाणावर येतात. २. ग्रेसच्या कवितेत कलाकृतींचे आणि त्यातील व्यक्तींचे संदर्भ येतात.ते समजून घेण्यासाठी ती प्रत्येक कलाकृती वाचणे, पाहणे किंवा ऐकणे शक्य नसले तरी योग्य ती संवेदना आपल्यात निर्माण करता आली पाहिजे. ३. ग्रेसचा शब्दसंभार- अशा शब्दांचा वापर करतात जे शब्दकोशात पण सापडणार नाही. आपल्याला सापडला तोच त्याचा अर्थ. एका कवीने म्हटल आहे कि मी ते लिहिलं तेव्हा त्याचा अर्थ मला आणि देवाला ठाऊक होता आता तो फक्त देवाला ठाऊक आहे.
  • शब्द आणि प्रतिमा यांचा अर्थपूर्ण कोलाज करण्याची ग्रेसची ताकद लक्षात घेणे हि ग्रेसच्या कवितेला भिडण्याची पहिली महत्वाची पायरी आहे. प्रत्येकाने आपल्या भाववृत्तीनुसार कवितेचा आस्वाद घ्यावा.
  • जी.ए. आणि ग्रेस यांची प्रत्यक्ष आयुष्यात कधी भेट झाली नाही. त्यांच्यातील संवाद जास्त पत्रातून व नंतर फोनवर होत असे.

 

१०) रणांगण – स्नेहबंधाच

·       हा लेख विश्राम बेडेकर यांच्यावर आहे.विश्रम हे नाव त्यांचे मूळ नाव नाही. त्यांचे नाव विश्वनाथ. लहानपणी त्यांना बाबू म्हणायचे.

·       बेडेकरांची ब्रम्हकुमारी आणि रणांगण हि पहिली दोन पुस्तके ह.वि.मोटे प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली होती. हरी मोटे व विश्राम बेडेकर हे दोन्ही मित्र होते तरी त्यांच्या पत्नी या सख्ख्या बहिणी होत्या, कृष्णाबाई मोटे व मालतीबाई बेडेकर असे त्यांचे नाव. दोन्ही खरेमास्तरांच्या मुली होत्या.

·       कृष्णा खरे यांचे शिक्षण पुण्याच्या शिरूर तालुक्यातील घोडनदी या गावी झाले. तिथ पुढे शाळा नसल्याने १९१४ मध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना हिंगणे येथील महर्षी कर्वे यांच्या शाळेत पाठविले. तिथे त्यांना गृहीतागामा हि पदवी मिळाली. त्यांचे व हरिभाऊ यांचे लग्न १९३१ च्या आसपास झाले. कृष्णाबाईंनी दृष्टीआडची श्रुष्टी आणि मीनाक्षीचे जीवन हि दोन पुस्तके लिहिली.  

·       विश्राम बेडेकर १८ वर्षांचे असतांना त्यांचे पहिले लग्न झाले. बाळूताई बेडेकर अर्थात विभावरी शिरूरकर यांनीच हिंदोळ्यावर हे पुस्तक लिहिले होते. बाळूताई या विश्राम बेडेकर यांच्या मैत्रीण नंतर दुसऱ्या पत्नी. ३० डिसेंबर १९३८ मध्ये त्यांनी लग्न केले. श्रीकांत हा या दोघांचा मुलगा. बाळूताई या देखील मोठ्या बहिनिसारख्या गृहीतागामा झाल्या. त्यांच्या इंग्रजी भाषणाची तारीफ सरोजिनी नायडू यांनी देखील केली होती.  लीलाताई या बेडेकरांच्या तिसऱ्या पत्नी.

 

अशा तऱ्हेने जिव्हाळा या पुस्तकातील व्यक्तिचित्रणाचा सारांश मी माझ्या परीने मला भावाला तसा लिहिला.

-    समाधान महाजन

१८/१२/२०२२

बटर फ्लाय - सुंदर शॉर्ट फिल्म

Butterfly short film

सुजित पाटिल या डॉक्टर मित्राची शॉर्ट फिल्म पाहिली. बटर फ्लाय नाव आहे. थोडं वेळ काढून व थोड्या सहनशिलतेने ही फिल्म पाहिली तर .... निव्वळ अप्रतिम..

सुरुवातीला वाटत हा तोच गरीब श्रीमंत मधील पारंपरिक वर्ग संघर्ष असेल मग कोणीतरी बदला घेईल किंवा कोणतरी दया दाखवेल व फिल्म संपेल..पण असे काही झाले नाही. 

फिल्म सुरू झाली की काही मिनिट फक्त पाहत राहायचे नंतर फिल्म तुम्हाला आपोआप पाहायला लावील. मला ही फिल्म पाहतांना साऊथच्या 96 या चित्रपटाची प्रकर्षाने आठवण आली. तो पाहताना सुरुवातीची माझी प्रतिक्रिया होती की काय बोअर करतायत ते राव....पण खूप जणांकडून रेकमंडेशन आल्यामुळे थोडे नेट लावून पाहिले आणि चक्क पूर्ण चित्रपट संपला तरी वाटत राहिलं की अजुन काही हवं होत....पण सुजित सारखी दिग्दर्शक लोक प्रचंड हुशार असतात त्यांना कळतं कुठं थांबावं...सुजित चा बटर फ्लाय देखील नेमका तिथेच थांबलाय...जिथं आपल्याला वाटतं संपू नये.. बटर फ्लाय ला पूर्ण आनंद मिळावा..काहीतरी चमत्कार व्हावा. पण तो होत नाही. त्यामुळे या शॉर्ट फिल्मचा इफेक्ट जोरदार मिळतो

मनात रेंगाळत राहतो. 

सुजित प्रोफेशनने डॉक्टर असून  डायरेक्टर म्हणून वावरतांना एखाद्या कुशल सर्जनप्रमाणे अनावश्यक भागाला कात्री देत मोजक, हव ते तो दाखवतो. निर्मिती मूल्य उच्च आहेच. संगीत अप्रतिम आहे. कॅमेरा वर्क जोरदार आहे. 

विशेष म्हणजे यात काम करणारे दोन्ही लीड ॲक्टर पेशाने पत्रकार व डॉक्टर असल्याचे कोणत्याही अँगल ने वाटत नाही. वाटत की हे थिएटर ॲक्टर आहेत. सर्वांचेच काम उत्तम झाले आहे. सुजीतकडून पुढे भरपूर अपेक्षा आहेत त्या नक्कीच तो पूर्ण करील. अर्थात आता देखील बटर फ्लायला एकूण 54 अवॉर्ड मिळाले हेही नसे थोडके. 

एक वेगळा अनुभव म्हणून ही शॉर्ट फिल्म एकदा नक्की पाहायला हवी. 

- समाधान महाजन 

11/12/2022

दुडिया

नक्षलवाद हा भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा मोठा प्रश्न गेल्या काही वर्षापासून अस्तित्वात आहे. विशेषतः सत्तरच्या दशकापासून सुरु झालेल्या या प्रश्नाने कालांतराने मोठे स्वरूप धारण केले आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतानाच्या काळात या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यातही मुलाखतीला कामाला येईल म्हणून  बरीच माहिती मी जमा केली होती. त्यावेळी गडचिरोलीमध्ये काम करणाऱ्या अजय खर्डे या माझ्या एपीआय मित्राकडून खऱ्या अर्थाने ग्राउंड लेव्हलची माहिती मिळवली होती. त्याच्याकडून अम्बुश/ट्रप, नक्षली शरीराची करत असलेली विटंबना, वातावरणात कायम पसरलेली भीती, रोड ओपनिंग, पोलीस स्टेशन भोवतीची CRPF ची तुकडी. CRPF व लोकल पोलीस मध्ये नसलेला ताळमेळ, वरिष्ठ लेव्हल कडून सतत येत असलेल्या आदेशानुसार वागावे लागणे, सततचा ताण या कागदावर कुठे नसलेल्या माहितीची दारे मला त्याच्यामुळे खुली झाली होती.

आज हे सर्व आठवायचे कारण म्हणजे ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांची नक्षलवाद या विषयावर असलेली व नुकतीच प्रकाशित झालेली दुडिया नावाची कादंबरी वाचण्यात आली. विश्वास पाटील यांच्या नेहमीच्या कादंबरीच्या तुलनेत हि दुडिया कादंबरी जराशी वेगळीच आहे. वर्तमानकाळातील देशापुढील नक्षलवाद सारख्या महत्वाच्या समस्येकडे हि कादंबरी लक्ष वेधतेच पण इतकेच नव्हे तर या समस्येच्या मुळाशी जाऊन त्याच्या उगमाची व विस्ताराची परखड कारणमीमांसा देखील करते.   

या कादंबरीची सुरुवातच मुळी सलवा जुडमचे प्रसिद्ध नेते महेंद्र कर्मा यांच्यासह ३२ जणांच्या हत्येच्या बातमीने होते. छत्तीसगडमध्ये निवडणूक निरीक्षण अधिकारी म्हणून पवार नामक एका महाराष्ट्रीयन अधिकाऱ्याची नेमणूक होते. त्याच्या ड्युटीच्या पहिल्या दिवसापासून त्याने केलेल्या निरीक्षणांच्या नोंदीचा आगळावेगळा प्रवास म्हणजे दुडिया नावाची कादंबरी. त्याच्या नजरेतून व अभ्यासातून  आपल्याला छत्तीसगड मधील नक्षली समस्येची पाळमूळ कळत जातात. अबूजमाड सारख्या विस्तीर्ण पसरलेल्या जंगल व डोंगररांगावर नक्षलीच्या भीतीची काळी छाया क्षणोक्षणी जाणवते. उखडून टाकलेले रस्ते, पेरलेल्या स्फोटकांमुळे छिन्नविछिन्न झालेल्या गाड्या व मानवी देहाची तुकड्यात केलेली विटंबना अंगावर काटा आणते. सगळीकडे जंगलासोबत एके ४७, एस.एल.आर. एलएमजी/लाईट मशीन गन प्रेशर बॉम्ब, antilandmine व्हेईकल यांचा प्रभाव जाणवतो. 

साठ सत्तरच्या दशकात सरकारी या नावाने ओळखले जाणारे स्थानिक स्तरावर काम करणारे फॉरेस्ट, पोलीस, पटवारी टाईपच्या लोकांनी या आदिवासी लोकांच्या अज्ञानाचा, भोळेपणाचा, प्रचंड गैरफायदा घेतला. त्यांचे शोषण झाले. मोहाची फुले, शेती, जंगल, तेंदूपत्ता यात रमणारा आदिवासी कायद्यांनी परका ठरवला.  त्यातून नक्षललोकांना हातात बंदूक घेऊन बदला घेण्याची भाषा बोलणारे लोक आदिवासींना आपले वाटायला लागले. त्यांचा प्रभाव व प्रसार वाढायाला लागला. तो इतका वाढला कि शस्र आल्याने मूळ आपलेच आदिवासी बांधवांना ते आपल्या बाबी ऐकायला भाग पाडू लागले. ते आणि पोलीस यांच्या लढ्यात सामान्य आदिवासी भरडला जाऊ लागला. 

या सर्वांचा परामर्श कादंबरीत घेत असतांनाच त्या भागात राहनारे आदिवासी लोक, त्यांचे पूर्वीचे व आताचे जीवन, नक्षल चळवळीत शामिल असलेले आदिवासी व ती चळवळ सोडून  पुन्हा मुख्य प्रवाहात येण्याची धडपड करणारे असंख्य युवक युवती , त्या भागात कर्तव्यावर असनारे अनेक सरकारी अधिकारी, कर्मचारी या सर्वांचा  एकूणच मानवीय पातळीवर, भावनिक संघर्ष व उलाढाल पकडतांना कादंबरीकाराला यश आले आहे. 

कादंबरी ज्या दुडिया नावाने आहे ती दुडिया हि आदिवासी मुलगी, तिचे पात्र अगदी जिवंतपणे डोळ्यापुढे उभे राहते.  लहानपणापासून म्हणजे अगदी जन्मापासून  तर कादंबरीच्या शेवटापर्यंत असणारी  दुडिया यात एक नायिका आहेच पण ती अशा असंख्य दुडीयांचे प्रतिनिधित्व करते ज्या मुली असे जीवन जगत आहेत. 

यातील ज्या निवडणुकीच्या कामासाठी नायक पवार छत्तीसगड मध्ये जातो. मुळात ते निवडणुकीचे काम आपल्या नागरी भागात घडते इतके सोपे नक्कीच नक्षल भागात नाही. पण ज्या तळमळीने व मनापासून अधिकारी कर्मचारी काम करतात त्याचे उत्कृष्ट चित्रण कादंबरीत आले आहे. मला 'न्यूटन' या राजकुमार राव च्या चित्रपटाची आठवण आली. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी भारतीय लोकशाही व त्याचा प्राण असणारी निवडणूक यशस्वी व्हावी म्हणून न्यूटन आपली ताकद लावतो. प्रत्यक्षात लेखकाच्या अनुभवांप्रमाणे अशी असंख्य माणसे आहेत तेही अशा भागात म्हणून तर भारतीय लोकशाही टिकून आहे. 

निवडणुकीच्या कामाला जातांना कर्मचारी अगदी पॉलीसी पेपर, गुंतवणुकीचे डीटेल्स घरच्यांना सांगून निघतो, शाश्वती नसते परत येऊ कि नाही म्हणून. असे प्रसंग वाचतांना डोळ्यात पाणी तरळते. 

चौबे, शर्मा सारखे अधिकारी आपल्या प्राणांची पर्वा न करता हि समस्या सोडविण्याच्या सातत्याने प्रयत्न करत राहतात हे यात आहेच शिवाय अनेक सूक्ष्म नोंदींमुळे कादंबरीतील उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहते. 

अनेक हत्या प्रतीहत्यांच्या बातम्यांची नोंद कादंबरीत घेतली आहे. जसे- 

1. एप्रिल २०१० मध्ये ताडमेटाला गावाजवळ CRPFची एक अक्खी कंपनी ८३ पैकी ७८ जवान जागीच ठार केले होते. बेसावध असतांना गोळीबार करून हे कृत्य केले गेले होते. 

2. एप्रिल २०१२ मध्ये सुकमा जिल्ह्याचे कलेक्टर अलेक्स पॉल मेनन हे मांझीपारा नावाच्या खेड्यात गेले होते. तेथून नक्षलवादीनी त्यांचे अपहरण केले व बारा दिवस बंदी बनवले होते. 

3. २५ मे २०१३ रोजी झिरम घाटातील नक्षली हल्ल्यात केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल व सलवा जुडूमचा प्रसिद्ध नेता महेंद्र कर्मा यांच्यासह ३२ जणांना ठार करण्यात आले. 

4. व्ही.के.चौबे सारख्या एसपींना बॉम्बस्फोटात ठार करण्यात आले. ते राजनांदगाव जिल्ह्याचे एस.पी. होते. 

नक्षलवादाच्या उगमाचे विवेचन ओघाने कादंबरीत येत असतांना अलीकडील काही महत्वाच्या कारणांचा देखील ते आढावा घेतात जसे- 

1. निर्णय घेणारे IAS अधिकारी दरवेळी बरोबरच असतात असे नाही. किंबहुना स्थानिक ज्ञान नसतांना फक्त एक परीक्षा पास झाल्यामुळे त्यांना मिळालेल्या विशेषाधीकारांचे ते नक्की चांगला वापर करतील याची काय शाश्वती हे सांगतांना लेखक म्हणतात, “स्पर्धात्मक परीक्षेला बसून उत्तीर्ण होणारे सारेच काही बुद्धिमान नसतात. दुर्दैवाने ज्यांची बस चुकते, जे थोड्याशा मार्कांनी पास होतात, तेही काही बेअक्कल नसतात. भाई यह एक्झाम पास होना tact और तकदीरवाली बात होती है”... 

मग मध्येच ते कठोर होऊन स्वतःच्या कॅडरवर टिप्पणी करणार, ‘हमसे जनता बार बार पुछती है, एक बडी एक्झाम क्लियर करने कि हमको क्यू और कितनी सजा दोगे भाई?” 

2. रंगदारी या प्रकाराबद्दल ते सांगतात, “कर्मचाऱ्यांच्या पगारातील एक ठराविक हिस्सा वरिष्टांना द्यावाच लागतो. आप आगर भीतर पाहाडी मुलुख मे जाओगे तो – दरमहा हिस्सा MLA आणि जंगलातल्या एके ४७ वाल्या नाक्षालीन्पर्यंत देखील न चुकता जातो. काम करणे अवघड आहे. पाच सहा किलोमीटरचा रस्ता करणे अवघड आहे कारण सर्व सामुग्री जाळली जाते, काम करणाऱ्यांना मारले जाते. अशात कोण कंत्राटदार काम घेईल?

3. सलवा जुडूम हि महेंद्र कर्मा यांनी सुरु केलेली चळवळ. सुरुवातीला लोकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. विकासासाठी आदिवासी लोक नक्षलींच्या विरोधात उभे राहिले. सरकारने देखील त्यात एस.पी.ओ नेमले. त्यांच्या हाती शस्रे दिले. हजारो संख्येने आदिवासी मेळावे होऊ लागले. नक्षली चिडले. दोन्ही गटात सिव्हील war सारखी परिस्थिती निर्माण झाली. मानवी हक्क वाले जागे झाले. कोर्टात केस गेली.  सरकारी बाबू लोकांना जुने व्यसन असत, नवी समस्या मिटविण्यासाठी जुनाट कायद्यांच्या एखाद्या कलमाला लोंबकळत राहायचे. झाले एस.पी.ओंच्या नेमणुका बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. चळवळ अधोगतीला लागली. महेंद्र कर्म नक्षलींच्या हिट लिस्टवर आले. त्यांना देखील निर्घुण पणे ठार करण्यात आले. त्यांच्या मृतदेहावर अक्षरशः नाचले.

4. शस्रांची कमतरता किंवा राजकारणांची तडजोड यातून अलीकडे शासकीय यंत्रणांनी खूपच मार खाल्ला आहे. याबाबत कादंबरीतील एक पात्र म्हणते, “तिच्या मते सरकारी फौजा म्हणजे- नपुसक नवरा- तो घरात निजला काय अन बाहेर पावसात भिजला काय, काय फरक पडतो?

5. नक्षलवादाच्या बंदोबस्तासाठी केंद्र सरकारकडून दरवषी नक्षलप्रभावित राज्यांना हजारो कोटींची मदत केंद्राकडून मिळत असते. ती इतकी प्रचंड असते कि सर्वांना तिची चटक लागली आहे.उद्या अचानक हे नक्षलवादि संपले तर हा फंड आपोआप बंद पडेल ज्याची अनेकांना सवय झाली आहे. 

असे विविध प्रश्न उपस्थित करून व नक्षल प्रश्नाचा सांगोपांग आढावा घेत असतांना दुडिया नामक एका तरुणीची नक्षल ते पोलीस मदनीस अशी कहाणी लेखक आपल्याला तिच्या तोंडून सांगत असतो. दुडिया नामक या तरुणीच्या मार्फत कादंबरी नक्षलचा अमानुष चेहरा आपल्या समोर मांडत असतो. त्यांच्यातील एकमेकातील मतभेदाचा मुद्दा देखील अगदी बेमालूम पणे कथानकात आलेला आहे. 

एकूणच कादंबरी नक्कीच वाचनीय आहे. 

समाधान महाजन 

३/१२/२०२२


नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य

 
नाभितून उगवलेल्या वृक्षाचे रहस्य हा प्रणव सखदेव यांचा कथा संग्रह नुकताच वाचला. निळ्या दाताची दंत कथा, काळे करडे स्ट्रोक्स व चतुर यानंतर मी त्याचे वाचलेले हे चौथे पुस्तकं. अर्थात या सर्व पुस्तकांचे प्रकाशित वर्षांच्या अनुक्रमे ते मी वाचले नाहीत. पण एक नक्की की प्रणवच्या कथा कादंबरी या आजची भाषा बोलतात. आजचे प्रश्न मांडतात. उगाच तत्व, नैतिकता वा मूल्य निष्ठा असल्या बाबी ते वाचकांवर थोपवत नाहीत. आजचा दिवस, आजच्या जगण्यातील गुंतागुंत बारकाव्या निशी मांडतात. उगाच अभिनिवेश बाळगत नाहीत. त्यामुळे सेक्सुएलl कंटेंट  व संवाद वाचतांना देखील त्यात ओघवते व सहज पणा आहे. 

 या कथासंग्रहातील सर्वच कथा छान आहेत. आजच्या काळाची भाषा बोलतात. आजचे प्रश्न मांडतात. 

यातील अबॉर्षण कथा एका वेल सेटेल्ड फॅमिलितील. आर्थिक प्रश्न नसलेली. माणसाला पोटाची व थोड्या सुख्वस्तू पानाच्या गरजा संपल्या की दुसरेच प्रश्न सुरू होतात. नवरा बायकोच्या नात्यात काळानुसार होत गेलेले बदल. लग्न झाले .सुरुवातीची उत्सुकता आवेग संपला. कमवायचे काय तेही संपले. एक मेकांच्या आयुष्यात आपण का आहो ? का राहायचं सोबत? माझी तिला किंवा त्याला काळजी आहे का? तीच कीव त्याच माझ्यावर प्रेम आहे का? याची उत्तरं मिळत नाही. संवाद कमी होत जातो. गरजा भागवल्या जातात...

या सर्वांवर नितांत सुंदर भाष्य करणारी कथा आहे ही. ..


काळ करड आकाश हा शब्द येत राहतो. प्रणव च्या कथेत. 

ग्लोरिया मधील अलंक्रिता व सीसीडी मध्ये नेहमी येणारे सर. त्यांची एक इच्छा जशी डोंबिवली फास्ट मध्ये लोकल ट्रेन ने कायम प्रवास करणाऱ्या माणसाला शेवटची सीट मिळणे एक स्वप्न असते तसे. इतक्या मोठ्या आयुष्यात मानसिक उलाढालीत कधी कधी मनाच्या किती छोट्या गरजा असतात. 

ट ची गोष्ट वाचतांना मुंबई व मुंबईची लोकल डोळ्यापुढे उभी राहते. 

प्रत्येक कथा विश्व दर्जेदार आहे. वाचनीय आहे. 

- समाधान महाजन 

मेलुहा सभ्यतेचा शोध

 
नितीन वाघ यांचे मेलुहा सभ्यतेचा शोध हे पुस्तक वाचतांनाच त्यामागील संशोधन व  चिकित्सक अभ्यास  लगेचच लक्षात येतो. सिंधू संस्कृती म्हणजेच मेलुहा संस्कृती. प्राचीन सुमेरियन भाषेतील क्यूनीफॉर्म लिपीत भारतातील विस्तीर्ण भूभागावर पसरलेल्या सभ्येतेसाठी मेलुहा हा शब्द वापरण्यात आला आहे. नितीन यांनी पुस्तकाचे नाव तेच ठेवले आहे. 

मी आतापर्यंत प्राचीन भारताच्या इतिहासावरील जी पुस्तके वाचली व त्यातून ज्या सिंधू संस्कृतीची ओळख व माहिती मला झाली त्यापेक्षा अत्यंत वेगळी अशी माहिती पहिल्यांदाच मला या संस्कृतीविषयी या पुस्तकातून मिळाली. 

अगदी पुस्तकाच्या नावापासूनच या पुस्तकाच्या वेगळेपण टिकून आहे. आपल्या प्रस्तावनेत नितीन वाघ म्हणतात, " ऐतिहासिक कथनातून वर्चस्व टिकवून ठेवता येतं आणि राबवता येतं, असं एक प्रबळ वैदिक कथानक उभारलेलं आहे, तेसुद्धा समजायला लागलं होतं. या कथनाच्या आधारे सगळ्या इतिहासाची मांडणी केली जाते आणि याच चौकटीच्या आधारे या कथनाला विरोध सुद्धा केला जातो, हेसुद्धा लक्षात आलं.".. आणि हे जसे त्यांच्या लक्षात आले त्यातून या विषयावरचे  वाचन व संशोधन त्यांनी वाढवले. त्यातील विविध कंगोरे आपल्याला पुस्तक वाचतांना सहज लक्षात येतील. 

वैज्ञानिक, पुरातात्विक, भाषिक अशा विविध perspective मधून नितीन वाघ यांनी मेलुहा सभ्यतेचा शोध घेतलेला आहे. या संस्कृतीची अशी वेगळ्या पद्धतीची मांडणी पहिल्यांदाच मराठीतून येत आहे. नक्की वाचावे असे हे पुस्तक आहे. 

पुस्तक - मेलुहा सभ्यतेचा शोध (Before Amnesia)  

लेखक - नितीन भरत वाघ 

प्रकाशक - आर्हान बुकस्मिथस( प्रथम आवृत्ती - २०२२)


- समाधान महाजन 

१९/११/२०२२


आठवणीतील दिवस - न्या. नरेंद्र चपळगावकर

  • न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे आत्मचरित्र ‘आठवणीतील दिवस’ २०१८ मध्ये मौज तर्फे प्रकाशित करण्यात आले. त्यांचा जन्म व बालपण बीडमध्ये गेले. १४ जुलै १९३८ या दिवशी त्यांचा जन्म झाला. सोलापूर जिल्ह्यातील चपळगावचे हे मूळ घराणे. पणजोबा नोकरीनिमित्त बीड मध्ये स्थायिक झाले. १९४२ मध्ये सुरु झालेल्या चंपावती शाळेत त्यांचे शिक्षण झाले. 
  • पेठेच्या पलीकडे मन्सूरशाह वली आणि शहेनशहा वली असे दोन दर्गे होते. मन्सूरशाह हे महादजी शिंदे यांचे गुरु होते. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारकडून या दर्ग्याच्या व्यवस्थापनासाठी अनुदान मिळे. 
  • निजामी राजवटीत इमदादे बहामी म्हणजे जिल्हा सहकारी बँका आणि टाका म्हणजे तालुका शेतकरी सहकारी संघ. 
  • हैद्राबाद मुक्ती लढ्यात त्यांचे काका तुरुंगात गेले होते. नरेंद्र यांचे मामा नाशिकचे होते त्यामुळे येथील पेठे हायस्कूल मध्ये देखील ते काही काळ शिकले. ते नाशिकला असतांना गांधींची हत्या झाली होती. मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या हस्ते रामकुंडात गांधींच्या रक्षेचे विसर्जन करण्यात आले होते. तसेच गांधींच्या शवावरची दोन फुले शाळेच्या काचेच्या सूचनाफलकात लावलेली होती. सर्वजण त्याला नमस्कार करत होते असे त्यांनी लिहिले आहे. 
  • नाशिकनंतर पाचवीला पुन्हा बीड मध्ये सरकारी शाळेत प्रवेश घेतला. मध्यम उर्दू.  सर्व पुस्तकांच्या मुखपृष्ठावर निजाम मीर उस्मान आलीखान याचे चित्र छापलेले असे. शाळेत निजामाला दीर्घायू चिंतणारी प्रार्थना होत असे, 

ताबदे खालीके आलम यह रियासत रक्खे 

तुझको उस्मा बसद इजलाल सलामत रक्खे”

  • शाळेत असतांना विद्यार्थी नावाचे हस्तलिखित वार्षिकी त्यांनी काढले होते. इंटरपर्यंतचे शिक्षण अमरावतीत घेतले व नंतर औरंगाबादमध्ये. 1959 मध्ये मराठवाडा विद्यापीठ सुरु झाले.  तिथे त्यांनी एम.ए केले त्यांचे शिक्षक म्हणजे वा.ल. कुलकर्णी, यु.म.पठाण, सुधीर रसाळ. 
  • १९५१ साली बीडला मोठे फौजदारी खटले चालवणारे सत्र न्यायालय स्थापन झाले होते. त्यांचे काका हे बीड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. वडील देखील चळवळीत सक्रीय होते. वकील होते. १९५२ च्या पहिल्या निवडणुकीत नरेंद्र यांचे वडील अंबाजोगाई मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे विधानसभेची निवडणूक लढवत होते. हरले. नंतरच्या वर्षी म्हणजे १९५३ मध्ये कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन हैद्राबाद येथे भरले तेव्हा नरेंद्र यांचे वडील जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. या अधिवेशनाला ते वडिलांसोबत हजर होते. यावेळी त्यांना अनेक राष्ट्रीय नेते पाहण्यास मिळाले. शेख अब्दुल्ला यांचे वाक्य “जहा जवहार का कदम होगा वहा अब्दुल्ला का दिल बिछा होगा”.  
  • १९५९ मध्ये तेव्हाचे मराठवाडा विद्यापीठ सुरु झाले.  ते म्हणतात १९५७ साली औरंगाबादला साहित्य संमेलन झाले तेव्हापासून त्याबद्दल त्यांन आकर्षण निर्माण झाले. जानेवारी १९६१ मध्ये दहावे मराठवाडा साहित्य संमेलन बीडला झाले त्याच्या आयोजनात चपळगाव्कारांचा मोठा वाटा होता.  
  • साहित्य संमेलनात अनेक वेळा त्यांनी भाग घेतला काही परिसंवादाचे ते अध्यक्षही होते. मराठवाडा या साप्ताहिकात गोफणगुंडा हे सदर काही काळ लिहिले. 
  • जालन्याजवळ बेथेल नावाचे एक गाव आहे. बायबलमध्ये नाव असल्यासारखे हे गाव मराठवाड्यात कसे याचा शोध त्यांनी घेतला तेव्ह असे समजले कि, नारायण शेषाद्री हा परळीचा ब्राम्हण ख्रिस्ती झाला. त्याने नवख्रिस्त्यांची वस्ती करण्यासाठी हैद्राबादचे पंतप्रधान सालारजंग यांच्याकडून मोठी जमीन मिळवली. त्यानेच हे गाव वसवले होते.
  • लातूरला एक वायर गिरणी नावाने ओळखली जाणारी बंद गिरणी होती. लोकमान्यांनी ब्रिटीश हद्दीबाहेर ती मुद्दाम काढली. टिळकांचे भाचे विद्वांस तिचे व्यवस्थापन करत असे लेखकाने टिळक चरित्रात वाचले होते. र्रीकाम्या पडलेल्या या गिरणीच्या जवळ वस्ती झाल्यास त्याला टिळकनगर असे नाव द्यावे अशी सूचना नरेंद्र चपळगावकर यांनी केली होती. आज लातूरमध्ये टिळकनगर अस्तित्वात आहे. 

  • जून १९६० मध्ये ते मराठीचे प्राध्यापक म्हणून लातूरच्या दयानंद महाविद्यालात काम करू लागले. तेथेच ते मराठी विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. जानेवारी १९६३ पासून त्यांनी बीड येथे वकिली सुरु केली. १९६७ साली बीड नगरपालिकेचे सभासद म्हणून ते निवडून आले. 
  • १८५७ च्या उठावात सामील झालेल्या औरंगाबाद परिसरातील काही सैनिकांना फाशी देण्यात आले होते. त्यांच्या स्मरणार्थ एक काळा चबुतरा औरंगाबादच्या क्रांतीचौकातील एका कोपरयाजवळ तयार करण्यात आला होता. तो नंतर काळाच्या ओघात नष्टच झाला. 
  • २००५ साली माजलगाव येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. जून २०१० मध्ये स्थापन झालेल्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. मार्च २०११ मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. 
  • नरेंद्र चपळगावकर यांची प्रकाशित झालेली पुस्तके - १. कर्मयोगी संन्यासी २. राज्यघटनेचे अर्धशतक ३. सावलीचा शोध ४. मनातली माणस ५. संघर्ष आणि शाहणपण ६. ना. गोखले यांचा भारत सेवक समाज ७. तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ ८. विधिमंडळे आणि न्यायसंस्था: संघर्षाचे सहजीवन 


- समाधान महाजन 
१३ नोव्हेंबर २०२२ 

चतुर

चतुर हे प्रणव सखदेवचे मी वाचलेले हे तिसरे पुस्तक. याआधी काळेकरडे स्ट्रोक्स व निळ्या दाताची दंतकथा हि पुस्तके वाचली.

चतुर वाचतांना ज्या बाबी मला नोंदाव्याशा वाटल्या त्या अशा-  

* या पुस्तकात काही नवीन शब्द जाणवले. जे रोजची भाषा मांडतात. रोजच्या भाषेतील म्हणजे त्याला फार अलंकारिक बनवलेलं नाही. जसे

1. पांढरी पोकळी हा अर्थ कि बोर्ड वरील स्पेस बार दिल्यानंतर दोन अक्षरात पडलेले अंतर यासाठी वापरला आहे.

2. टिश्यू पेपर होऊन टिपून घ्यावे

3. ओल्या सिमेंट मध्ये पायाचा ठसा उमटतो तसे आपल मन टिपत सगळं

4. जेली सारखं स्तब्ध वातावरण ..


चित्रपट व गाणी यांचा चांगला वापर यात आहे. जे आवश्यक असते पण बऱ्याच कथा कादंबरीत तो भाग टाळला जातो. इथे तसे न करता महत्वाचे स्थान दिले आहे.

१.हेमंत कुमार..तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है

२.तुमसे ही तुमसे ही


पुढे काय होईल ही उत्सुकता तयार होत नाही ...खूप हळूहळू चाळीस पन्नास पेजेस नंतर होते व नंतर चांगलीच पकड घेते. 

या पुस्तकात कोण कधी केव्हा.... कुठूनही प्रकट होईल सांगता येत नाही मग ती  कोणतीही आकृती असू दे, फुल, पाखरू, पतंग ते पार मल्लिका शेरावत. राखाडी ढग, पाण्यातून येणारा माणूस... अगदी कोणीही .. त्यामुळे हि प्रयोगशीलता आवडली. 

imagination मस्त आहे अगदी ..मल्लिका शेरावत वर्गात संस्कृत च्या तासाला येऊन बसते ....आणि पुढे भिगे होठ तेरे...

...वाचण्याचा कंटाळा असणे व तो नवीन मुलांना येणे हे आवडले...श्यामची आई...आजची पिढी नाही रीलेट करू शकत....

पुस्तकाचे अंतिम ध्येय पुस्तकातून बाहेर पडायला लावणं हे आहे.

         “धूप मे निकलो, घटाओ मे नहाकर देखो

           जिंदगी क्या हैं किताबो को हटाकर देखो.”

प्रत्येकाच्या डोक्यावर असा एक ढग असतो ज्याची एक वाळवंट वाट पाहत असते.

हेही दिवस जातील हे कांनफ्युसियास या तत्वज्ञाचे वाक्य आहे. 

यात प्रश्न गाडी महत्वाची आहे.  यात निर्मिती कलाकार यांची मीमांसा छान केली आहे. कलाकार प्रोडक्ट तयार करतो त्याला कच्चा माल म्हणजे त्याला आलेले अनुभव व जीवन.

कलावंताच्या निर्मिती नंतर रसिक वाचकाची कोडींग डीकोडींग होते. तो अर्थ लावतो. आणि त्याचे डिकोडिंग ही त्याची स्वतंत्र निर्मिती असते.

adolescence and puberty well mentioned...त्याच्याबद्दल जे लिहिलंय...शारीरिक बदलांबद्दल ते वास्तव आहे...शेअर करत नाहीत मूल भीतीने. फुलपाखरू..पतंग...फुल ...ही सर्व प्रतीके आहेत. मला तर मुळात पुस्तकाची बेस थीमच पौंगडावास्था आहे असे वाटते.

एकूणच पुस्तकात अनेक नवीन प्रयोग आहेत. लेखक लेखकाची गोष्ट सांगत आहे. तो मेल्यानंतर त्याची बायको ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. एकूण मस्तच आहे. अशा छोट्या कादंबऱ्या मराठीत यशस्वी पण होतात. जसे मिलिंद बोकील यांची समुद्र, एकम, किंवा भाऊ पाध्ये यांच्या काही कादंबऱ्या १५० पेजेसच्या आत असून कंटेन च्या दृष्टीने अव्वल आहेत. त्यातील हि चतुर आहे असे मला वाटते. 

- समाधान महाजन  

 


फोर मोर शॉट्स...

फोर मोर शॉटस या सिरीजचा तिसरा सिझन आता आलाय. हे..हे..हे... आता काय त्यावर लिहिणार? अरे ती सिरीज लिहिण्यासारखी तरी आहे का? काहीही आपल. असे प्रश्न पडू शकतात. बट वाटल लिहावं त्याला काय करणार?  

खरे तर पहिले दोन सिझन कधी आले तेहि मला माहिती नव्हते. अर्थात अशी सिरीज आहे असे मी वाचले होते. काही इमेजेस पाहिल्या होत्या. एकदा थोडा वेळ बघितले पण होते पण काही वेळातच मी बोअर झालो होतो.

सारखी सारखी बार व सेक्सची दृश्य व एकदम बोल्ड भाषा त्यातच चारही प्रमुख पात्र स्रिया. यात फार काही वेगळे बघण्यासारखे असेल असे वाटले नव्हते. त्यामुळे सिरीज माझ्याकडे होती पण मी ती पाहत नव्हतो. एक दिवस असाच उगवला. रात्री झोप येत नव्हती. नवीन काही चांगले उरले नव्हते बघण्यासारखे. अलीकडील चित्रपट पाहण्यातही तितका इंटरेस्ट येत नाही. मग नाईलाज म्हणून हि सिरीज सुरु केली. तेव्हा दुसरा सिझन देखील आलेला होता पण पहिल्यापासून पाहू म्हणून पहिल्या सिझनच्या पहिल्या भागापासून सुरु केले. आणि त्या रात्री तो पूर्ण सिझन पाहूनच मी झोपलो. अर्थात नंतरच्या दिवशी त्याचा त्रास झाला. पण जे काही वेगळे विश्व माझ्या डोक्यात या सिरीजने घातले होते. ते पूर्ण नवीन नव्हते पण अनेक विखुरलेले तुकडे एकत्र करून सलग, प्रवाही मांडून व त्यात मला माहित नसलेल्या अनेक बाबी दाखवून या सिरीजने माझ्या मनाची
पकड मात्र नक्की घेतली होती. 

Kriti Kulhari

यात काय आहे. पेक्षा यात काही नाही. जिथे आपल्या टिपिकल मध्यमवर्गीय कल्पना संपतात तिथे खर तर हि सिरीज सुरु होते. कसे असायला पाहिजे. कसे निर्णय घ्यायला पाहिजे, एकट्या स्रीने / मुलीने कसे वागायला पाहिजे किंवा संसारातील प्रश्न कसे असतात. हि यादी खूप मोठी करता येईल. त्यातल्या त्यात अजून स्क्रिप्टच्या जवळ जाऊन सांगयचे म्हटले तर प्रत्येक स्री/मुलीला केव्हा ना केव्हा जगण्याचे पारंपारिक नियम झुगारून देऊन जरा मनासारखे वागायचा विचार तिला येत असेल ना ते या चार जणी अगदी बिनधास्त जगल्या आहेत. कुठलीही भीडभाड न ठेवता. कोणतेही फुकाचे नैतिक बंधन स्वतःवर न लादता व त्या नजरेने दुसऱ्याकडेदेखील न

Sayani Gupta
बघता. निष्ठा, एकपत्नी व एकपती व्रत, लोक काय म्हणतील, कोणाला काय वाटेल? कोण काय म्हणेल असे प्रश्न यांना पडत नाहीत व सिरीज बघतांना आपण पण ते पाडून घ्यायचे नाही. 
Maanvi Gagroo
मे बी आपल्या आजूबाजूला अशा थोड्या सधन व मोकळ्या वातावरणातील मुली नसतील पण यात त्यांना येणाऱ्या ज्या समस्या आहेत, त्यांचे जे प्रोब्लेम्स आहेत, त्यातील बारकावे आहेत, स्ट्रेस आहेत, ते मोकळ करण्याचे मार्ग आहेत हे सर्व पाहून अनेक भारतीय मुली यात स्वतःला रिलेट करत असतील यात वाद नाही. आणि यात दाखवलेले प्रश्न व लाइफस्टाइल काही आता मेट्रो सिटीज मोनोपॉली राहिलेली नाही. अनेक छोट्या गाव शहरांमध्ये हे वारे वेगात वाहत आहेत. किंबहुना याचेच आकर्षण आहे. त्यातून हे अगदीच युनिव्हर्सल दाखवले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 
VJ Bani
या सिरीजच्या अगदी पहिल्या भागापासून जाणवते कि भाषा व सेक्स यांचे कोणतेच बंधन यांनी स्वतःवर घातलेले नाही. तसे केले असते तर कदाचित या सिरीजचा जीव गुदमरला असता कारण यात घेतलेला प्लॉट व निवडलेली भाषा हे
 match होतात. बघता बघता आपण पण या सर्व बाबी सहज घ्यायला लागतो. आपल्याला ते सर्व आवडायला लागते.   

तिसरा सिझन आल्यावर वाटल आता हे काही नवीन नाही दाखवू शकत. किंवा आता फार काय उरले आहे दाखवन्यासारखे? अर्थात आपण सर्व त्यातील पात्रांना व त्यांच्या बेसिक्सला युज्ड टू झालो असल्यामुळे curiosity नसतांना आपण जरी बघायला सुरु केली तरी पुढील पूर्ण सिझन सहज बघू शकतो. इट्स अगेन वर्थ. 

 Thanks to Pritesh nandy and all related persons that giving such well packed, well scripted, mind-blowing series.   

- Samadhan Mahajan 


नाटक

 कधी कधी कोणाला काय वाटेल हा विचार आपले मुळचे विचार दाबून टाकण्याची शक्यता अधिक असते. पण मी त्यातल्या त्यात माझे मूळ विचार जपण्याचा प्रयत्न करतो कारण माणूस म्हणून आपल्या वाटण्याला दाबून टाकणे तितकेसे बरोबर नाहो. ते नैसर्गिक नाही. फार फार तर नवीन बाबी शिकता येतात. अंगवळणी पडून सवयीच्या होऊ शकतात. पण म्हणून त्यांना पूर्ण नाकारणे चांगले नाही. 

आता हेच पहा खूप खूप दिवसानंतर आज मी नाटक पाहायला गेलो. मुळात माझा आतापर्यंतचा वावर अशा गावांमध्ये होता जिथे नाटक हा शब्द फक्त पुस्तकात, दिवाळी अंकात, मासिकात व वृत्तपत्रात वाचायाला मिळायचा. त्यावर बोलणे त्याहीपेक्षा कोणाशी बोलायचे हा यक्षप्रश्न होता. आजही मला याची जाणीव आहे कि मी नाटक पाहायला बसलो असतांना मी ज्या भौगोलिक परिसरात होतो तिथे आजही त्याबाबत अंधारच आहे.  

पहिले नाटक मी परभणीला मित्रांसोबत पाहिले. त्याहीसाठी तालुक्याच्या गावाहून संध्याकाळी जाऊन पुन्हा रात्री बस नसल्याने ट्रक वर प्रवास करून घरी आलो व पहिल्या नाटक पाहण्याचा सोपस्कार पार पाडला. इतका त्रास घेऊन नाटक पाहणे हा प्रकार मुळातच शक्य नव्हता. आणि तिथेच कशाला पुणे मुंबई नाशिक नागपूर औरंगाबाद कोल्हापूर अशी काही मोजकी शहरे सोडली तर सातपुडा सह्याद्री अजंठा सातमाळा कृष्णा पैनगंगा गोदावरी च्या विशालकाय भौगोलिक परीसराभर पसरलेल्या  महाराष्ट्रातील बहुसंख्य जनता यापासून माझ्याइतकीच कोसो दूर आहे.  

तेव्हापासून तर आतापर्यंत काही नाटके पाहण्यात आली. अर्थात नाटकाबद्दल मी बऱ्याच बाबी तशा पुस्तकातून वाचल्यात. काही नावे चांगलीच परिचयाची झाली. 

पुन्हा नाटक पाहणे हे जसे प्रिव्हिलेज लहानपानापासून मिलाले नाही तसे चित्रपट तरी कुठे आधी उपलब्ध झाले पण त्यातल्या त्यात चित्रपटांशी लिंक पटकन लागते. तेही हिंदी किंवा मराठी. इंग्लिश चित्रपट अनेक पाहिले. अगदी ऑस्कर ची लिस्ट काढून निवडून निवडून पाहिले. पण का कोण जाणे मी त्यांच्याशी स्वतःला जोडून नाही घेऊ शकलो. हिंदी मराठी चित्रपट वेब सिरीज पहातांना जे मी जोडला जातो ते हॉलीवूड मुव्ही व नाटक याबाबत माझे होत नाही.  

# लिटररी नोंदी १८

ताम्रपट व्हाया सातपाटील कुलवृत्तांत

ताम्रपट हि काळाचा मोठा व्यापक व समावेशक पट मांडणारी रंगनाथ पठारे यांची एक दमदार कादंबरी आहे. कादंबरीची प्रथमआवृत्ती १९९४ ची आहे. जेव्हा आम्ही शाळेत होतो. म्हणजे ती जेव्हा आली तेव्हा त्यावर काय ज्या चर्चा झाल्या असतील वा जे काही त्यावर लिहून आले असेल तर ते तेव्हा आमच्या परिघाबाहेरचे होते. ते निश्चितच मला माहिती नाही. १९९९ साली ताम्रपटला साहित्य अकादमी मिळाला तेव्हा पूसटस वृत्तपत्रात वाचल्याचे आठवते. त्यानंतर थेट mpsc चा अभ्यास करतांना साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक व त्यांचे पुस्तक यात ताम्रपटचे नाव पुन्हा वाचण्यात आले. काहीनाकाही कारणांमुळे ताम्रपट वाचण्याची राहून जात होती. दरम्यान रंगनाथ पठारे सरांचे बरीच पुस्तके वाचण्यात आली. मध्यंतरी पठारे सरांच्याच हस्ते माझ्या ‘अस्वस्थ क्षणांचे पाश’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. त्यालाही आता ८-९ वर्ष होऊन गेली. अखेर या दिवाळीत सर्व दिवाळी अंक बाजूला सारून फक्त ताम्रपट हाती घेतली आणि मराठी कादंबरीतील एक मैलाचा दगड ठरणारी कादंबरी वाचून संपवली. एक समाधान लाभले. काहीतरी भक्कम चांगले वाचून झाल्याचे समाधान होते ते.  कादंबरीच्या प्रकाशनानंतर तब्बल २८ वर्षांनी मी ती वाचली. ही एक विशाल कादंबरी आहे. विशाल या अर्थी कि ती तब्बल ८५१ पानांची आहे.  दोन तीन वर्षांपूर्वी पठारे सरांची सातपाटील कुलवृत्तांत वाचली. ती देखील तब्बल ७९६ पानांची आहे.
 
ताम्रपट व सातपाटील या दोन्ही कादंबरींचे एक वैशिष्ट्य म्हणजे काळाचा दीर्घ पट त्या आपल्यापुढे मांडतात. सातपाटील ईस.१२८९ ते २०१९ या भव्य कालपटावर पसरलेली आहे. तर ताम्रपट १९४२ ते १९७९ या कालपटावर पसरलेली आहे. कदाचित ताम्रपट मध्ये दीर्घ काळाचे कवेत घेतलेले अवकाश सातपाटील मध्ये अधिकच विस्तारलेले दिसते. किंबहुना इतका भव्य पट यशस्वीपणे मांडता येऊ शकतो हा आत्मविश्वास लेखकाला आधीच्याच कादंबरीमुळे मिळाला असणर हे नक्की. 

दोन्ही कादंबरींची दुसरे वैशिष्ट्य म्हणजे- भारतीय इतिहासातील राजकीय सांस्कृतिक सामाजिक ज्या काही घटना झालेल्या आहेत त्यांचा वापर कादंबरीत झालेला दिसतो.
पण तरीही त्यात मला एक नोंद करावीशी वाटते कि लेखक त्या मोठ्या घटना व व्यक्तींचा वापर कादंबरीतील गोष्ट फुलवण्यासाठी करत आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हटले तर इतिहासातील सत्य घटना या एखाद्या background music सारख्या कार्य करतात. त्या tune वर लेखक आपले पात्रांद्वारे त्याच्या मनात असलेली गोष्ट सांगतो. उलट ऐतिहासिक घटना व पट निवडल्यामुळे अधिक ठळकपणे आपली वैचारिकपेरणी करण्यात लेखक यशस्वी होतो. अर्थात विषयाला, पात्रांना व त्यातील अंतरसंबंधांना पुरेपूर न्याय देऊनच लेखकाची गोष्ट पुढे सरकत जाते.
 
दोन्ही कादंबरीची तिसरे वैशिष्ट्य म्हणजे-  एक काळ व त्यातील घटना लिहून झाल्यावर मध्ये अनेक घटना व वर्ष सोडून लेखक काळाच्या पुढच्या टप्प्यात जाऊन तेथील घटना मागच्या पात्रांच्या संदर्भात घेऊन पुन्हा सुरु करतो. आता एकतर या पात्रांच्या आयुष्यात बराच काळ पुढे गेलेला असतो किंवा त्यांची पुढची पिढी आता कार्यरत असते. उदाहरणार्थ ताम्रपटमध्ये १९४२ च्या चळवळीने सुरुवात केल्यावर ते १९४३-४४ ला थांबतात व १९४७ च्या स्वातंत्र्य वर्षावर भाष्य न करता अत्यंत क्रूरपणे सरळ १९५७ पासून सुरु करता. क्रूर या अर्थी कि सामान्य वाचक आता पुढील काळात ज्या घटना अपेक्षित करत असतो त्या न मांडता लेखक सरळ काळाच्या पुढे अनेक वर्षांनी जाऊन काळपटाचा दुसराच तुकडा निवडतो. अर्थात मध्येच चार दोन ओळीत लेखक हा दुवा वाचकाला जोडून देतो. त्यामुळे काळाचे जोडले जाणे शक्य होते. पण वाचतांना तितका धक्का मात्र जाणवतो अर्थात दोन तीन वेळा असे झाले कि मात्र वाचक देखील यात सरावतो. दोन्ही कादंबरीतील हे वैशिष्ट्य विशेष आहेत हे नक्की.    

सातपाटील मधील श्रीपती हा पहिला नायक अल्लाउद्दीन खिल्जीच्या पैठनच्या आक्रमणाच्या आसपासच्या काळात आहे व त्यानंतर येणारा साहेबराव निजामशाहीतील 1490 च्या काळाच्या आसपास आहे. त्यानंतर येणारा दशरथ हा नायक 1760 च्या आसपासचा. इतिहासातील देवगिरी, खिल्जी, आदिलशाही, पेशवाई, ब्रिटिश ते २०१९ हा भव्य काळात ते आपल्या नायकांना व सोबत वाचकाला फिरवून आणतात. त्यामुळे एकूणच हि पात्र खऱ्या इतिहासातच होती कि काय या भावतरंगावर ते वाचकाला आणण्यात यशस्वी होतात. 

सेम प्रकार हा ताम्रपट मध्ये. अर्थात मी आधी सातपाटील वाचली असल्यामुळे हे उलटे वाटू शकते. पण खरे तर ताम्रपट मधील काळ, इतिहास व आपल्या मनातील गोष्ट यांची बेमालूम मांडणी करण्यात सक्सेस आल्याने हा प्रकार पठारे सरांनी सातपाटील मध्ये वापरला असण्याची शक्यता आहे असे माझे आपले भाबडे मत आहे. ते यासाठी कि पठारे सर व त्यांच्या कादंबऱ्या या साहित्यातील उच्च टोकावर आहेत. मी आपला एक सामान्य वाचक म्हणून हे लिहित आहे. समीक्षा हा प्रकार देखील फार थोर आहे. मी हे आपले जे भावले व वाटले ते लिहिले आहे. कोणाला काय वाटेल त्याचा विचार यात नाही. 

असो तर या दिवाळीत मी ताम्रपट वाचली. यात १९४२ च्या चलेजाव चळवळीपासून त्यातही भूमिगत चळवळी पासून सुरुवात होते. तारा तोडणे, पुल उडवणे, स्फोट घडवणे. चळवळीतील लोक त्यांचे एकमेकांशी संबंध... कोठडीतील हाल हे सर्व त्यात येते. पत्री सरकारशी जोडलेली पण तरीही एका जिल्ह्याशी त्यातही नगर जिल्ह्याशी जोडलेली काही पात्र नायक यात आहेत. तत्कालीन राजकारणातील प्रसिद्ध लोक यात कथानकाचा भाग म्हणून येतात. तेही तितक्यापुरतेच. साने गुरुजी येतात, यशवंत राव चव्हाण येतात. एस एम. अच्युत राव पटवर्धन आदी लोक आहेत. 

पण यात मुख्य पात्र आहेत नानासाहेब शिरूर वकील, बापूसाहेब, गोविंदराव, भोईटे पाटील,… यात कोणाचीना कोणाची आपल्याला आठवण येते. उदाहरणार्थ नानासाहेब वाचून मला पत्री सरकारमधील क्रांतीसिंह नाना पाटील आठवतात. बाकी देखील संदर्भ काही स्थानिक राजकारनाचे असू शकतात. देशासाठी घरादाराचा विचार न करणारी ती एक पिढी होती. त्यामुळे “लोक घरी येत ते मोठ्या आदराने बोलत. पण प्रपंचाचा गाडा रेटायला त्याचा काय उपयोग. कितीही मोठ नाव असलं तरी ते काही भाजून खाता येत नाही.” असली वास्तवदर्शी वाक्य मनाला भिडतात.  

१९४४ नंतर कादंबरी एकदम १९५७ सालात येते. आता वातावरण एकदम बदलले आहे. तेव्हाची तरुण असणारी पिढी आता थोडी उताराला आहेत. आता संयुक्त महाराष्ट्र चळवळ व आगामी निवडणुका यावर भाष्य आहे प्रजा समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी हे सर्व पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात किती प्रभावी होते हे आजच्या पिढीलाच काय आजच्या पत्रकरांना देखील लगेचच आठवणे अवघड आहे. ते या कादंबरीत आहे. राजकारणातील तिकीट देण्यासाठी केलेले डावपेच, पैसा व जातीचा वापर हा स्वतंत्र भारतातील दुसऱ्याच निवडणुकीपासून सुरु झाल्याचे यात दिसते.

पुढचा टप्पा १९६२ चा आहे. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा आहे कारण १९६० मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झालेली असते. या भागात साखर कारखाने, शाळा, कॉलेज याच्या आजूबाजूला फिरणारे राजकारण, राज्याच्या केंद्रीय राजकारणातील यशवंतराव चव्हाणांची वाढती पकड. सत्ता व पैसा या ताब्यात ठेवण्याच्या संघर्षात हळूहळू स्वातंत्र्य चळवळीत प्राणाची बाजी लावणारे खरे योद्धे हळूहळू मागे पडत जात असल्याचे चित्र या काळात दिसते. तरीही त्यांची पकड ढिली झाल्याचे दिसत नाही. नानासाहेब शिरूर वकील, बापूसाहेब देशमुख, गोविंदराव, भोईटे पाटील, बुवासाहेब यांच्यातील अंतर्गत राजकारण उमलत आता प्रत्येकाचे मार्ग वेगळे झाले. बापूसाहेब यांच्याजवळ भूजाडीमामा, काशिनाथ ढोरमले, श्रीपतराव ढमाले, भुजंगराव निकम व इंदिराराजे देशमुख. हे तेच बापूसाहेब देशमुख जे ४२ च्या चळवळीत लोक तहसील कचेरीवरील मोर्चात शामिल होऊन अंगावर लाठ्या झेलत असतांना रक्त सांडत असतांना इंग्लिश साहित्याचा आस्वाद घेत वाड्याच्या  खिडकीतून अगदी निवांत पाहात बसत. त्यांनाच आता कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत तिकीट आमदारकीसाठी मिळाले होते. 

नानासाहेब यांच्याजवळ निस्सार मोमीन त्याची पत्नी लीला, शाळीग्राम पाचपुते, आवडाबाई, राधाकिसन, अकबरभाई व जोडलेली असंख्य माणसे.
 
या काळात गरिबी कंठत असलेले गोविंदभाई जे ४२ च्या चळवळीत अग्रभागी होते ते वय व अपंगत्व यामुळे थकून गेलेले होते. पांडुरंग तिकोने नोकरीत असल्याने त्यांच्या राजकारणाच्या वावरावर मर्यादा होत्या. रावसाहेब पटवर्धन यांनी राजकारण सोडले होते. हि सर्व मंडळी ४२ च्या काळात राज्याच्या राजकारणात तळपणारी होती. 
या काळातील एक बाब कादंबरी वाचतांना प्रकर्षाने जाणवते कि ६२ च्या काळात आजच्या सारखी प्रसारमाध्यमे नव्हती तेव्हा नेत्यांच्या येण्याने व त्यांच्या भाषणाने लोकात वैचारिक भूमिका घेतांना बदल होत असत. मते कोणाला द्यायची यात मोठा फरक पडत असे.

१९६२ च्या भारतातील या तिसऱ्या निवडणुकीत प्रजासमाजवादी पक्षाचे नानासाहेब हरतात व बापूसाहेब देशमुख कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी होतात. यात २६५ पैकी २१४ जागा यशवंतराव चव्हाणांच्या पक्षाच्या अर्थात कॉंग्रेसच्या निवडून येतात. हि निवडणूक काही अंशी जातीवर होते किंवा प्रभावी उमेदवाराला पाडण्यासाठी लोकात भाषणातून जातीची पेरणी करून आधार घेतला जातो.  

कादंबरीतील उल्लेख पुढीलप्रमाणे, “नवे मराठा युग सुरु झाले होते. त्याला मराठी राज्य म्हणणे, जबाबदारीने वागणे असे समजुतीने सुरु झाले होते. ब्राम्हनादी उच्च जातींचा वरचष्मा आधीच संपला होता. आता सरदार, सरंजामदार अशी मंडळीही नगण्य होऊन मध्यम मराठा वर्गाच्या प्राब्ल्याचे युग सुरु झाले होते. एक बहुसंख्य जात म्हणून ते स्वाभाविक होते आणि यशवंतरावांची समतोल दृष्टी असलेले नेतृत्व त्याला लाभलेले होते. इतर मध्यम जाती-जमाती यांचे स्थानही सत्तेत राखले जाईल याची काळजी घेण्यात आली होती. एक बहुमुखी व्यवस्था आकार घेऊ लागली होती.” (पेज४४३-४४४)

१९६२ हे वर्ष असे होते कि पहिल्यांदाच सत्तेच्या विकेंद्रीकरण तत्त्वातून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लागलेल्या असतात. आतापर्यंत नानासाहेब बापूसाहेब यांची कार्यकर्ते म्हणून वागणारी मंडळी झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, सदस्य अशा विविध पदांवर निवडून आलेली होती. दादासाहेब भोईटे पाटील जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवडून आले. बापूसाहेबांची ओळख यशवंतराव चव्हाणांशी ज्या भूजाडीमामांनी करून दिली होती त्यांनाच पंचायत समितीसाठी बापूसाहेब पाठींबा देत नाहीत. खऱ्या अर्थाने ६२ हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारे वर्ष होते व कादंबरीत ते चांगलेच उमटून आलेय.

१९६८ चा हा चौथा टप्पा सुरु होतो... दादासाहेब तुकाराम भोईटे पाटील आता खासदार झालेले आहेत. नानासाहेब अजूनही कामगार शेतकरी साठी आंदोलनांच्या तयारीत आहेत. बापूसाहेब महसूल खात्याचे मंत्री झालेले आहेत... भूजाडीमामांची राजकारणातील स्थिती आता अधिकच खराब झालेली. कुठलेही पद नाही. अगदी स्वातंत्र्यसैनिक म्हणून सरकारकडून मिळणारे सन्मानपत्र देखील नाही. त्यासाठी ते बापूसाहेबांना मुंबईला भेटायला जातात. हे अधिकच वेदनादायी. ६० च्या काळात कॉलेज काढण्यासाठी धडपड करणारे शंकरनाना आता स्वतःसाठी पेट्रोल पंप पाहिजे म्हणून दादासाहेब-बापूसाहेब यांच्या घराच्या चकरा मारू लागतात. त्यांना तो मिळतो. बापूसाहेब व त्यांची पत्नी इंदिराराजे यांचे पती-पत्नीनात्यातील ताण मोकळे होऊन प्रकट होऊ लागल्याचे दिसते. इकडे बुवासाहेबांचे राजकारण पद्धतशीरपणे संपवले. अगदी हनी trap करून संपवले.नंतर परत काही वर्षांनी ५१ हजारांची थैली देऊन त्यांचा जाहीर सत्कार पण केला जातो.  नानासाहेब ज्यांच्या नेतृत्वात हि सर्व मंडळी ४२ चा लढा लढली होती ते आता एकाकी होत असल्याचे चित्र दिसते. स्वतःच्या मुलाला जयप्रकाशला इंजिनियरिंगला अर्धा टक्का कमी पडत असतांना नानासाहेब स्वातंत्र्यसैनिक असलेले प्रमाणपत्र घेण्यासही तयार नव्हते. अखेर तो स्वतःच IIT परीक्षा पास होऊन पवईत लागतो. आता भोईटे पाटलांचा चिरंजीव अंकुश भोईटे यांचे पुण्यातील कॉलेज निवडणुकीतून आगमन झाले होते. शरद पवारांचा संदर्भ येतो. 

हिंदू मुस्लीम दंगल व त्यामुळे धार्मिक प्रवृत्तीच्या विचारसरणीला मिळणारे खतपाणी तसेच दलित व सवर्ण यातील जातीय तेढ, अन्यायाचा बदला..मुन्तोडेचे बदला घेणे या बाबी येतात. इकडे नानासाहेब तत्व व विचार यापायी चांगले मित्र तोडत आहेत ..नाकारत जातात अखेर पदमश्री देखील नाकारतात. 

१९७५ ... पाचवा टप्पा -  आणीबाणीचे वर्ष. या भागात पहिल्यांदाच ताम्रपट शब्द वाचायला मिळतो. दादासाहेब भोईटे पाटील यांच्या बंगल्याचे नाव असते ताम्रपट. स्वातंत्र्य मिळून पंचवीस वर्ष झाली त्यानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांना या वर्षी  पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ताम्रपट प्रदान करण्यात आले होते. त्यानंतर बंगल्याचे हे नामकरण कार्यकर्त्यांनी केले. ७२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर बापूसाहेबांना मंत्रिपद मिळाले नाही. केंद्रात यशवंतरावांची ताकद कमी होत गेली. इंदिरा गांधींचा प्रभाव वाढत गेला. आणीबाणीत संघाच्या व इतर विरोधी पक्षाच्या लोकांना होणारी अटक. कुटुंब नियोजनाचा सक्तीचा कार्यक्रम, संजय गांधी आदी येतात. आणीबाणीची भीती काही लोकांच्या मनात वावरते. ते सतत पोलीस व अटकेच्या दडपणाखाली वावरतात. तर गोरगरीब सामान्य जनतेला त्याचे काहीच वाटत नाही. त्यांचे प्रश्न व त्यांचे जीवन यात काहीच बदल झालेला नसतो.  दादासाहेबांनी केंद्रात जुळवून घेतले. आता मुलाला राजकारणात  आणण्याची त्यांची तयारी सुरु झाल्याची दिसते. इकडे नानासाहेब यांचा मुलगा आय आय टी करून सामाजिक कामांकडे वळतो. 

१९७९ हा शेवटचा टप्पा- आणीबाणी उठून निवडणुका झालेल्या असतात. बापूसाहेब विधानसभा हरतात. पाचशे मतांनी भोईटे यांचा मुलगा अंकुश निवडून येतो. बाप खासदार, पोरग आमदार बनते. जिल्हाभर भोईटेयांचे वर्चस्व वाढते. जनता पक्षाच्या मदतीने राज्यात पवारांच्या नेतृत्वात पुलोदचे सरकार तयार होते. खासदार भोईटे यशवंतराव चव्हाणांची सोबत सोडून इंदिरा गांधींच्या गटात थांबणे पसंत करतात. तरी इंदिरा गांधींविषयी अर्थात त्यांच्या राजकारण करण्याच्या पद्धतीविषयी कायम मनात आशंका असते. केव्हा गेम होईल सांगता यायचे नाही अशी स्थिती. बापूसाहेब पुलोदमध्ये मंत्री होतात. पुन्हा नाराज मंडळी त्यांना जोडली जातात. 
---------

नानासाहेब, दादासाहेब, बापूसाहेब या तिघांचे रस्ते वेगळे, ध्येय एकच पण मार्ग वेगळे. लवकर व कन्फर्म यश देणारा मार्ग निवडायच्या नादात मूल्य, नैतिकता या तडजोडीच्या बाबी तरी ठरतात either त्यांना जागा तरी नसते. सत्तेच्या प्रांगणात संस्थात्मक पातळीवर अगदी कडेकोट बंदोबस्त लाऊन इकडची काडी तिकडे न होऊ देणारे दादासाहेब वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे शेवटी जीवनाच्या तत्वज्ञानात समाधान कशात आहे या तुम्हा आम्हा सामन्य जनतेला पडणाऱ्या प्रश्नापाशी येऊन थांबतात. नानासाहेब, भूजाडीमामा, बापूसाहेब हे देखील आपला निवडलेला मार्गावर त्यांच्या पद्धतीने विचार करतातच. कुठलेही नाट्य न येऊ देता, कोणतीही कलाटणी न येऊ देता, कोणत्याही ठोस निष्कर्षावर न येता, कादंबरी संपते. ते सर्व वाचकाने ठरवू देत..काय चूक काय बरोबर अशी सरधोपट मांडणी नसल्याने निष्कर्ष तरी कसा काढणार. त्यामुळे विविध शक्यअशक्यतांचे काहूर वाचकाच्या मनात उमटवून लेखक थांबतो. 
...............

सुरुवातीचा ४२ व ५८ चा भाग वगळला तर पुस्तक थोडे रेंगाळत जाते... ग्रीप घेत नाही थोडे शॉर्ट केले असते, काही कंटेन वगळला असता तर अजून गोळीबंद झाले असते. त्या तुलनेत सातपाटील बऱ्यापैकी आटोपशीर आहे. कदाचित काळाचे बदलत जाणारे राजकीय, सांस्कृतिक, नैतिक वैचारिक बदल हे ज्या पद्धतीने हळूहळू होत जातात ते कालानुक्रमे टिपण्याचा हा प्रयत्न असावा. चिंतन, मीमांसा व मनोविश्लेषण या बाबी अजून वाढवता आल्या असत्या. घटना कमी करून ते आले असते तर अजून बरे झाले असते. 

    एकूणच देशमुख व शहाण्णव कुळी यांच्यातील स्रीयांच्या प्रश्नांच्या विविध छटा यात मांडलेल्या आहेत. पार गडगंज श्रीमंत असो, राजघराण्यातील असो, राजकीय वर्तुळातील असो, गरीब असो सगळ्यांच्या आपल्या काहीना काही समस्या आहेतच. या कादंबरीतील विविध स्री पात्रांवर देखील भरपूर काही लिहिण्यासारखे आहे. इंदिराराजे नावाचे पात्र त्याच्या अंगभूत वैशिष्ट्यांसह डोळ्यापुढे उभे राहते. काही वेळा तर असे वाटते कि कदाचित बापूसाहेबांना बाजूला करून इंदिराराजेच राजकारणाची सूत्रे हाती घेतात कि काय पण तसे होत नाही. या कादंबरीचा पुढचा भाग खरे तर पठारे सरांनी लिहायला हवा. पात्र व पार्श्वभूमी तीच ठेऊन १९७९ ते २०२२ असा भव्य पट पुन्हा उभा केल्यास अप्रतिम राहील. 


ताम्रपटच्या जुन्या आवृत्तीचे मुखपृष्ठ
खर तर आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास या ताम्रपट कादंबरीवर एखादी अप्रतिम वेब सिरीज वा चित्रपट देखील येऊ शकतो. राजकारणावरील मराठीतील हि एक नि:संशय श्रेष्ठ दर्जाची कादंबरी आहे.   

कादंबरी वाचतांना त्यातही नानाचे पात्र पुढे आले कि वाटत राहते गांधी नेहरू आदी मंडळींनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्या विचारांची बैठक दिली होती ती तेव्हढ्यापुरतीच  ठेऊन  ही मंडळी नवीन विचार व प्रहावांना सामोरे का नाही गेली? नवीन प्रश्न व विचार तेच यातून तर हा पेच झाला नसावा? पण ते तरी आपला मार्ग व ध्येय का बदलतील? बर दादासाहेब सारख्यांनी बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःत बदल करून व उधळ्त्या वारूवर स्वार होऊन देखील ते आयुष्याच्या शेवटी पुन्हा समाधान शोधतच होते कि मग नाना तरी काय चुकले? अर्थात दोन्ही तिन्ही जन आपापल्या निवडलेल्या मार्गाबद्दल तरी कुठे ठाम राहतात. ठाम कुठे काय असते जीवनात?

पूर्वीच्या काळी राजे देत असलेले ताम्रपट तरी काळाच्या ओघात भले टिकले जरी असले पण त्यांच्यावरील मजकूर कुठे शाश्वत राहिला. ताम्रपटावर नाव कोरले असून देखील जर शेवटी सर्वच काही टिकत नसेल तर कशाला काय अर्थ आहे? असे अनेक विचार निर्माण करून हि कादंबरी आपल्याला सम्रुद्ध करते. 
- समाधान महाजन