जीव द्यावा कि चहा घ्यावा

जीव द्यावा की चहा घ्यावा या नावाचे पुस्तक हातात घेतल्यावर सर्वप्रथम सगळ्यांची उत्सुकता चाळवली जाते नावाबद्दल, तसे माझेही झाले. मध्यंतरी कुठं तरी या पुस्तकाचे नाव वाचल होत. नंतर कळाले की ज्ञानपीठ प्राप्त कोकणी लेखक दामोदर मावाजो यांचे ते पुस्तक आहे.
तर पहिले नावाबद्दल.... जीव द्यावा की चहा घ्यावा.. चहा मलापण आवडतो त्यामुळे हे नाव भारी वाटले. पुस्तकात अधून मधून बऱ्याच ठिकाणी चहा येतो. किंबहुना चहा भोवती काही प्रसंग आहेत. नायकाला चहा आवडतो, कॉफी नाही हे मला लैच भारी वाटले कारण माझे पण तसेच आहे. तर हा चहा अधनमधन कथानकात येत असतो विविध पद्धतीने.
नावाची तुलना करायची झाल्यास घर, बंदूक बिर्याणी या अलीकडे आलेल्या चित्रपटाच्या नावाशी करता येईल. ज्यात घर, बंदूक व बिर्याणी हे तिन्ही नावं कथेचा भाग होते. अजून दुसरं उदाहरण म्हणजे TDM या नावाचा अजून एक मराठी चित्रपट ज्याचा अर्थ होतो ट्रॅक्टर ड्राइव्हर ऑफ महिंद्रा. आणि कथानकात ट्रॅक्टरला तितके महत्व आहेच. (अर्थात अशा वेगळ्या नावामुळे चित्रपट चालतील असे नाही. पण ते नाव लक्ष वेधून घेते हे नक्की.) तसेच हे पुस्तकाचे नाव लक्ष वेधून घेते पण इथे नाव व पुस्तक दोन्ही चांगले आहेत.
असो, तर आपले म्हणजे ज्या बद्दल आपण अर्थात मी बोलत होतो अर्थात लिहीत होतो ते पुस्तक म्हणजे दामोदर मावजो यांचे जीव द्यावा की चहा घ्यावा.
यात विपीन नावाचा नायक आहे. ज्याचा प्रवास त्याला कळायला लागल्यापासूनचा आहे. याचे बालपण तितके सामान्य नाही. आई वडील यांच्यातील तुटक नाते. घरातील वेगळे व कडक वातावरण. हे त्या लहान मुलाच्या नजरेतून वाचायला भारी वाटते. त्यातील निरीक्षणे curiosity व interest तयार करतात.
अर्थात हा मुलगा शाळा, कॉलेज करत मोठा होत जातो...आयुष्यातील नेमक्या घटना तो टिपत जातो. सर्व नाही.
दामोदर मावोजो

गोव्याच्या पार्श्भूमीवर हे सर्व घडत जाते. 

वडिलांचे आजारपण व निधन, मां चे विक्षिप्त वागणे आधीपासूनच तो टिपत आलाय.... खुरटलेले बालपण...कमी मित्र.. मार्टिन सर, नंतर भेटणाऱ्या दोन मैत्रिणी..फातिमा व चित्रा.. . आणि घरी मदतीला येणारा मुलगा कृष्णा..असा प्रवास घडत जातो.

चित्रा चांगली वाचक आहे, नायक विपीन प्रमाणे..फातिमा चित्राची मैत्रीण अर्थात चित्रा तिची ओळख विपिन सोबत करून देते. नंतर चित्राचे काय होते किंवा विपिन व फातिमा चे काय होते हे कादंबरी वाचल्यावरच समजेल. 
काही आवडलेली वाक्य / ओळी 
1. अंधारात छान झोप लागते. का माहिती आहे का? सकाळी उजाडेल याची खात्री असते. 
2. अल्बरट काम्यूचे प्रसिद्ध वाक्य आहे, ‘should I kill myself or have a cup of coffee.’ 
3. If u feel lonely when u r alone, then u r in bad company. 
4. जगात दोन प्रकारच्या tragedy असतात, एक हवं ते काहीच मिळत नाही. दोन, हवं ते सगळ मिळत. 
कदाचित यातील काम्यूचे प्रसिद्ध वाक्य should I kill myself or have a cup of coffee हे या पुस्तकाच्या नावामागील प्रेरणा असावी. पुस्तक वाचतांना सारख जाणवत राहते हे काहीतरी वेगळे आहे. त्याचा प्रवास लिनियर पद्धतीने होत नाही, अनपेक्षित पण लोजिकल व सटायर पद्धतीने शेवटाकडे जाते. एकंदरीत नक्कीच वाचण्यासारखे पुस्तक आहे. 
- समाधान महाजन

जूबली

 'Acting is just a matter of editing…Editing can create a different character.'


'देखो ये दुनिया के मेले, सारे के सारे अकेले. लाखो दिलो के ये रेले सारे के सारे अकेले.


विक्रमादित्य मोटवाने याची नवीन सिरीज ' जूबली चांगली आहे. ४०-५० च्या काळातील फिल्म इंडस्ट्री संदर्भातील हि स्टोरी आहे. चित्रपट निर्मिती मागील अनेक घटना यातून कळतात. आपल्याला पडद्यावरचा चित्रपट दिसतो. तो आपल्यापर्यंत पोहोचण्या आधी खूप काही झालेले असते. हे खूप काही म्हणजे जुबली. यात रॉय टॉकिजवर दाखवण्यात आलेले आहे. असे म्हणतात की, तेव्हाच्या बॉम्बे टॉकीज वर ते बेतलेले आहे. ज्यांना चित्रपटात व त्याच्या विविध काळातील घटनांमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना ही सिरीज नक्की आवडेल.

यातील मला आवडलेली गोष्ट म्हणजे तो काळ दिग्दर्शकाने जिवंत उभा केला आहे. गाड्या, कपडे, इमारती, फोन अगदी ५० च्या काळातील वाटतात. ड्रेस डिझायनर व आर्ट परफेक्ट उभे केले आहे. गाणी अप्रतिम आहेत. त्या काळातीलच वाटतात.

यात आतील संघर्ष, स्पर्धा, डावपेच, अंतर्गत राजकारण दाखवल्यामुळे जेव्हा खान स्वतःचा चित्रपट पाहायला थिएटर मध्ये जातो तेव्हा त्याच्या प्रती लोकांचे प्रचंड कौतुक त्याच्या वाट्याला येते ते बघतांना त्याची gravity कळते. 

रॉय टॉकीज एकेकाळी जी सिने निर्मितीत टॉप असते ते एम्पायर काही निर्णयांमुळे जमीनदोस्त होते. त्याचा प्रवास यात आहे असे म्हणणे सरधोपटपणाचे होईल. यातून आपल्याला खूप काही मिळते. जीवनाचे चढउतार कळतात. निष्फळपणा, शून्यता कळते आणि विशेष म्हणजे असे खूप काही जे शब्दात सांगता येणार नाही. 

मदनकुमार, निलोफर, रॉय बाबू, सुमित्रा सर्वांनी जबरदस्त अभिनय केला आहे. स्पीड स्लो आहे. पण त्या काळाशी सुसंगत आहे. 


द थेफ्ट ऑफ इंडिया - रॉय मोक्झाम

 

रॉय मोक्झम यांचे द थेफ्ट ऑफ इंडिया असे एक पुस्तक आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘असा लुटला भारत’ या नावाने सरिता आठवले यांनी केला आहे. मेहता मार्फत त्याचे प्रकाशन करण्यात आले आहे. 212 पानांचे हे पुस्तक आहे. रॉय मोक्झम हा एक ब्रिटिश इतिहासकार आहे. इतिहासातील दुर्लक्षिल्या गेलेल्या घटनांचा, नोंदींचा अभ्यासपूर्ण ऊहापोह हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ठ्य समजले जाते. 

वास्को द गामाच्या मोहिमेआधी पासून ते ब्रिटीशांनी बंगाल ताब्यात घेईपर्यन्तचा कालखंड यात समाविष्ट केला आहे.  मुळात यात पहिल्यांदा एक बाब नवीन कळली की, पोर्तुगीज किती क्रूर व अमानुष होते. यातील त्यांच्या हत्याकांडांची वर्णने वाचतांना अंगावर काटा येतो. कोजिकोडे, गोवा, दिव या ठिकांनावर ताबा घेण्यासाठी क्रूरतेची सगळी सीमारेषा त्यांनी पार केली होती.   त्यांचे एकच काम चांगले होते त्यांनी मिरची, साबुदाणा, बटाटे,  अशी पदार्थ भारतात आणली.  

धर्मांतर व व्यापार ते सोबतच करत असत. त्यांचे अनुभव व व्यापारातील प्रगति लक्षात घेता ब्रिटीशांनी आपली रणनीती बदलली. त्यामुळे अनेक वर्ष येथील सामाजिक व धार्मिक बाबतीत ब्रिटिश लुडबूड करत नसत. आपण समजतो तसा ईस्ट इंडिया कंपनीचा प्रवास किवा प्रगति देखील लिनियर पद्धतीने झाली नाही. सुरूवातीचे त्यांच्या समस्या फार वेगवेगळ्या असत. मुळात इतका लांबचा समुद्रप्रवास, बोटीवर आजारी पडून मृत्यूमुखी पडणारे लोक शिवाय येथे आल्यावर देखील हवामान सूट न झाल्याने विविध आजारांना बळी पडून कैक इथेच जीव सोडत असत. 

फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज कोणीही असो सुरुवातीच्या काळात येणार्‍यांसोबत त्यांच्या बायका नसत. किंवा लग्न न झालेले तरुण येत. त्यामुळे येथील देशी स्रीयांशी ते लग्न करत त्यातून परत अनेक समस्या उद्भवत. 

पिटर मुंडी याने भारतातील प्रवासाचे केलेले वर्णन आजही इतिहासकार तेव्हाची स्थिति कशी होती यासाठी आधारभूत मानतात. तो सूरत हून बरहानपुर मार्गे आग्रा येथे गेला त्या प्रवासातील आंखो देखा हाल त्याने लिहून ठेवला आहे. तेव्हा दुष्काळ पडलेला होता. लोकांना खायला अन्न नव्हते. नंदुरबार जवळ आल्यावर त्याने रस्त्यात पडलेले अनेक प्रेते पाहिले. हेच चित्र त्याला पुढे देखील दिसले. 

या पुस्तकात पोर्तुगीजांचे वर्णन आहे. मात्र ब्रिटिशांची क्रूरता तितकी दाखवली नाही. त्यासाठी विलियम डलरिंपल यांची पुस्तके वाचायला हवे. पण या पुस्तकात अनेक बाबी नव्याने कळतात. 

- समाधान महाजन 

11 एप्रिल 2023 


सूरज एंगडे व कास्ट मॅटर्स

 नुकतेच सूरज एंगडे यांचे कास्ट मॅटर्स हे पुस्तक वाचले. त्याबाबत बरीच उत्सुकता होती. एप्रिलच्या पहिल्या पंधरवाड्यात पुण्यात तीन चार ठिकाणी सूरजच्या मुलाखतीचे कार्यक्रम अगदी हाऊस फूल झालेले दिसले. तशा बातम्या वृत्तपत्रासह सोशल मीडियावर सगळीकडे दिसल्या. खर तर सूरज सोबत आमची भेट मार्च मध्येच झाली. आणि थोडी थोडकी नव्हे तर तीन दिवस सातत्याने आम्ही भेटत होतो.  कधी कधी काही बाबी इतक्या अनपेक्षितपणे घडतात की त्या घडून गेल्यावर अनेक दिवस त्यांच्या लाटांमध्ये आपण वाहत असतो. 

सूरजची व माझी भेट होण्याचे कारण ठरले आमचे Additional Commissioner  येंगडे साहेब. साहेब स्वतः सखोल व चौफेर वाचतात. त्यांचा जनसंपर्क देखल दांडगा आहे. त्यांच्या परिचयातूनच सूरजची नुसती भेट झाली असे नाही तर तीन चार दिवस आम्ही सातत्याने भेटत होतो. त्यातून औपचारिक अनौपचारिक अशा भेटी-गप्पा-चर्चा झाल्या. नाशिक नंतर सूरज पुण्यात गेला व एकदम सर्व मीडियातून त्याच्या बातम्या प्रसारित व्हायला लागल्या. अर्थात आधी जी मंडळी लोकसत्ता व एक्सप्रेस वाचत होती. ट्विटरला होती त्यांना त्याबद्दल माहिती होती. सूरज इथे असतानाच मी त्याचे कास्ट मॅटर्स बुक केले. ते आले. आणि वाचून संपवले तेव्हा बर वाटले. 

पहिली बाब म्हणजे हे मूळ इंग्रजी पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद मेहता प्रकाशनामार्फत प्रसिद्ध झाला आहे. प्रियंका तुपे व प्रणाली एंगडे यांनी या पुस्तकाचा अनुवाद अगदी ओघवत्या शैलीत केलेला आहे. पण मराठी पुस्तकाच्या शेवटच्या पानावर जे अनुवादीत आत्मकथन असे म्हटले आहे. ते तसे नाही. यात सूरज स्वतःची माहिती ओघाने आली तरच सांगत आहे. Otherwiseनाही. ती देखील खूपच त्रोटक आहे. त्यातून त्याचा जीवनप्रवास काही पूर्ण सांगितलेला नाही. त्यामुळे ते आत्मकथन नाही हे नक्की. 279 पेजेसचे हे पुस्तक तुमच्यातील नसलेले समाजभान जागृत करेल किंवा असलेल्याची पुन्हा नव्याने मांडणी करेल हे नक्की. 

दलित शोषित वर्गाकडून काही लिहून आले त्यातही आत्मभान जागृत करण्याविषयी तर ते आक्रस्ताळी असेल, आग ओकणारे असेल, प्रस्थापितांना शिव्या देणारे असेल, वरच्या वर्गाविषयी आकस व द्वेष असणारे असेल. असा काहींचा समज असतो. सूरजचे हे पुस्तक या सर्वांना एका दमात फाट्यावर मारणारे आहे. 
इथे फॅक्टस आहेत. लॉजिक आहे. उदाहरण आहेत. काही स्वानुभव आहेत. समाजाचा स्वतः घेतलेला अनुभव आहे. इतरांच्या नजरेतून अभ्यासलेला समाज आहे. शिवाय हार्वर्ड व ऑक्सफोर्डच्या इमारतीत बसून आपल्याला योग्य ती खिडकी उघडून भारताकडे व इथल्या जाती व्यवस्थेकडे सोयीने पाहणार्‍यांचा घेतलेला परखड समाचार आहे. आवश्यक तिथेच आकडेवारी आहे. 

इथे आलेले डॉ. बाबासाहेब व्यक्ति म्हणून आलेले आहेत. प्रतिमा व देव म्हणून नाहीत. स्वामी चक्रधर, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब, यांचा देखील वस्तुनिष्ठ संदर्भ आहे. त्याला संदर्भ ग्रंथांची जोड आहे. 

जर कास्ट मॅटर्सची रचना करायची असती तर दुसर्‍या समाजाला नावे ठेऊन ती सोपी झाली असती पण हे अति सुलभीकरण होईल हे मुळात हार्वर्ड मध्ये शिकणार्‍या व एकुणच सामाजिक रचनेचा चांगलाच अभ्यास असलेल्या सुरजला माहिती आहे. त्यामुळे सत्यच्या अधिक जवळ जात त्याने एकूण सामाजिक मांडणी आहे ती दर्शवितांनाच दलित समाजाचे दोष देखील ठळकपणे अगदी त्यांचे प्रकार पाडून लॉजिकल मांडणी केली आहे. ब्राम्हण यातही सुधारक व भेदक दोघांचाही आढावा आहे. 

दांभिक भारतीय समाजरचनेची व्यवस्थित चिरफाड करून त्याचे अंतरंग दाखवण्याचा प्रयत्न सूरजने केलेला आहे. त्यामुळे जे आहे ते असे आहे असं तो आरशासारखं आपल्यापुढ उभे करतो. पुस्तक वैचारिक असल्याने व अनेक बाबी नव्याने कळत असल्याने हळूहळू वाचल्यास उत्तम. ते तस भिनत जाते. 

मी समीक्षक नाही त्यामुळे एका वाचकाच्या नजरेतून हे लिहिलं आहे. 

- समाधान महाजन    

8 एप्रिल 2023