दुरावलेली गावं व माणसं!

 

व्यासपीठ दिवाळी अंकातील माझा लेख -

टेकडीवर व दाट झाडांमध्ये लपलेले ते छोटेसे गाव, गाव कशाला वाडी देखील मोठी असेल अशा काही घरांची वस्ती. आदिवासी भाषेत पाडा. नीट लक्ष देऊन पाहिले तर बस जातेय त्याच्या खिडकीतून उजव्या हाताला थोड वर झाडांमधून चमकणारे कौलारू छत दिसतील तेच हे गाव अर्थात पाडा. पाऊस पहिल्यांदा इथेच भेटला. जाणवला. अंगाखांद्यावर मुसळधार बरसला. ओलेचिंब कपडे, केसातून, चेहर्‍यावरून व कपड्यातून  नितळणार पानी, चिखलाने भरलेले पाय आणि मऊशार हिरव्यागार, पोपटी गवतावरून उड्या मारत लोळत मित्रांसोबत घरी येत असलेला मी. सागाची मोठ-मोठी झाडे, त्याची मोठे पाने, त्यावरून ओघळणारे पावसाचे पानी, पावसाच्या पांढर्‍याशुभ्र धारांमध्ये झाकला गेलेला आडवा-तिडवा डोंगर. चिंब पावसात अंग चोरून उभी असलेली मोठ-मोठी झाडे. भातशेतीची खाचर, त्याच्या काना-कोपर्‍यात गवताच्या काडीला काहीतरी बांधून आनंदाने खेकडे पकडणारे मित्र. मग घरी येऊन त्या भाजलेल्या खेकड्यांवर मारलेला ताव. वरुन झिमझिमणारा पाऊस, कौलातून बाहेर निघत असलेला चुलीचा धूर. मातीचा रस्ता, त्यावर साचलेल्या पाण्यात पुन्हा वरुन पडणारे पावसाचे मोठ-मोठे थेंब. पाऊस बंद झाल्यावर त्यावर सोडलेल्या कागदाच्या होड्या. अशा खूप काही न विसरणार्‍या फ्रेम्स या गावाने पुरवल्या आहेत. इथे एक नदी होती. मुलांसोबत पोहायला जायचो. कोकणातील नद्या मुसळधार पावसाळ्यात दुथडी भरून वाहत, गणपतीच्या आसपास स्थिर होत. मग आम्हाला परवानगी मिळे. वाहत्या पाण्याचा पहिला स्पर्श इथेच झाला. सोबतचे आदिवासी मित्र मुख्य धारेत जाऊन पोहत, त्याची भीती वाटायची. नंतर त्यांनी त्या नदीवर असणार्‍या पूलावरून नदीत उड्या मारायला सुरुवात केल्यावर भरीस पडून मी पण पुलावर गेलो. इथे देखील आपली उडी जास्त पाण्यात जाऊ नये म्हणून थोडे अलीकडे उडी मारायचा प्रयत्न केला ते थेट दगडावर कपाळ आपटले. पाण्यात रक्त पाहून सर्वच घाबरले. सुदैवाने डोळा वाचला होता व घाव तितकसा खोल नव्हता. पुन्हा घरच्यांनी पोहायला जाऊ दिले नाही. पण पोहणे सोडून बाकी सर्व उनाडक्या करायला मित्र सोबतच होते. गावाच्या आजूबाजूला अस्ताव्यस्त पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा. जंगल, झाडी व अध्येमध्ये दिसणारी शेती, नदी व पाऊस. आमचे घरमालक स्थानिक आदिवासी. त्यांच्या भातशेतीत अनेकदा गेलेलो. त्यांची दोन मुले. माझ्या वयाच्या आसपासची. नावेही किती सोपी. लहाण्या व मोठ्या, विशेष म्हणजे त्यांची नावे शाळेत पण हीच होती. या लहाण्या-मोठ्याने त्यांचे जग मला दाखविले. मी त्यांच्याच जगात वावरत होतो. त्यांचीच भाषा अस्खलित बोलत होतो. कदाचित ती वारली किंवा कोकणी असावी. पण मला नीटस मराठी येत नव्हते हे नक्की आणि खांदेशातील असून अहिराणी भाषा काय असते  हे देखील माहीत नव्हते.

जीवनातील पहिली अक्षरे मी येथे गिरवली. शिकायला सुरुवात झाली. वडील त्या आश्रमशाळेत शिक्षक होते. तेव्हा सर्व आश्रमशाळेतील शिक्षक त्याच गावात मुक्कामी राहत अगदी बदली होईस्तव. त्यामुळे आमचे शिक्षण पण त्याच आदिवासी आश्रम शाळेवर सुरू झाले. शाळा लहान होती. कदाचित सातवी पर्यन्त. आमचा तो पहिलीचा वर्ग होता,ज्याला पत्र्याच्या भिंती होत्या. दोन इमारतींमधील तो वर्ग होता. बर्‍याचदा अंधारच असायचा. वाढू नावाचे सर होते. ते खूपच कडक होते.. ते चुकल की शिक्षा करत ती पण विचित्र पद्धतीने. पोटात चिमटा धरत व चिमटा धरलेला हात गोल फिरवत तसा त्यांच्या तावडीत सापडलेला मुलगा वाकलेला असतांना कळवळून मोठयाने रडत-ओरडत असे. जमलच तर पोटात गुद्दा देत असत. हे सर्व प्रकार बघून खूप भीती वाटायची. पहिल्या दिवशी तर मी घरीच आलो, नंतर पण अनेक दिवस मी शाळेला जायला घाबरायचो. जायचो नाही... नंतर कस ते आठवत नाही पण मग रोज जायला लागलो.

कुडाच्या भिंती, कौलाचे छत, शेणाने सारवलेली जमीन. हे आमचे तिथले घर असे तुकड्या तुकड्यात आठवते. तो साखरे पाडा जव्हारवरुन विक्रमगड जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे तेथून वडिलांसोबत जव्हार किंवा विक्रमगड कधीतरी जायला भेटायचे. खूप मोठी गावे वाटायची ती. रस्ते काळे-कुळकुळीत, मोठ्या इमारती, रस्त्यांवर गाड्यांची गर्दी. खूप मस्त वाटायचे. पण परत फिरून आले की आमचेच घर मस्त उबदार सुरक्षित वाटत असे.

चार-पाच वर्षांपूर्वी कामानिमित्त त्या मार्गे गेलो तेव्हा आवर्जून त्या पाड्यावर गेलो. 35-40 वर्षांपूर्वी ते जसे होते तसेच आजही तितक्याच झाडांमध्ये आहे. आजही तो पाडा तिथे आहे हे त्या रस्त्यांवरून जाणार्‍या गाड्यांच्या पटकन लक्षात येत नाही. शाळा बदलली होती. शाळेच्या बर्‍याच पक्क्या इमारती झाल्या होत्या वॉल कंपाउंड झाले होते. पूर्वी गाव व शाळा यांच्यातील फरक चटकन लक्षात येत नसे. आता तो डोळ्याला जाणवेल इतका दिसत होता. गाव तेच होते. तितकेच होते, पूर्वीची मातीची रस्ते आता मात्र पक्क्या सीमेंटमधील दिसत होती. काही घरांचे रंगरूप बदलले होते. जुन्या प्रकारातील मोजकीच घरे आपले अस्तित्व कसेबसे टिकवून होती. त्या काही घरांवर डिश आलेले होते. लहान असतांना याच गल्ल्यांमध्ये ऐकलेले रेडियोचे स्वर कानात येत होते. आम्ही राहत होतो ते घर शोधण्याचा प्रयत्न केला. अधीरतेने मी तिकडे गेलो...हो ते तेच घर होते. आता खूप बदलले होते. मोठे झाले होते. आता तिथे कौले नव्हते. अर्धा स्लॅब व अर्धा पत्रे दिसत होते. मी माझे मित्र लहान्या-मोठ्याला शोधत होतो. घरात आवाज दिला एक मध्यम वयीन स्रि पुढे आली. घरात कोणीही पुरुष नव्हता. मी लहाण्या-मोठ्याची नावे विचारली तिच्या चेहर्‍यावर थोडे परिचयाचे हसू दिसले पण ते गावी गेल्याचे ती म्हटली. मला आता ती भाषा येत नव्हती. साफ विसरलो होतो मी. त्यामुळे तिला समजेल असे मला बोलता येत नव्हते व माझी भाषा तिला पूर्ण समजत नव्हती. कसेबसे बोलून पुढे आलो. आम्ही ज्या रस्त्याने घसरगुंडी करत मुख्य रस्त्याला लागायचो तो आंब्याच्या झाडाखालचा रस्त्यावर आता पायर्‍या झाल्या होत्या. ते जुने झाड मात्र आता तिथे नव्हते त्याऐवजी दुसरी छोटी तीन-चार झाडे दिसत होती. तेथून मुख्य रस्त्यावर येऊन नदीकडे गेलो. ती नदी-तो पूल तिथेच होते. आता तो पूल फारच छोटा वाटत होता. नदीला थोडे पानी होते. बालपणीच्या विश्वात त्या नदीला सीमा नव्हती, नजर जाईल तिथपर्यन्त पानी दिसायचे. आता नदीचे किनारे दिसत होते, पलीकडील शेती दिसत होती. त्या पलीकडे पसरलेला डोंगर दिसत होता. एकूणच माझ्या त्या लहानपणी पाहिलेल्या गावाला क्षितिजरेषा नव्हती. अस मान वर केली की हात टेकेल असे झाडे, निळे आभाळ, गच्च पाऊस, हिरवा रंग आणि धमाल. पण आता तसे नव्हते मुळीच. नुकताच हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागत होती. शुष्कता पसरली होती. पानगळ काही प्रमाणात झालेली होती. मी शोधत असलेले ते अमूल्य  क्षण तेथीलच वातावरणात विखूरलेले असतील. ते आता माझ्या हाती लागणार नव्हते. मला तेच परत जगता येणार नाही, पण ही अक्षरे जी आता मी लिहिली आहेत ती तीच आहेत जी मी इथे गिरवली होती. कोण कुठले गाव-कोण कुठला मी आणि हे असे जन्मो-जन्मीचे नाते.            

नंतरची आठवण तेथून जवळच असणाऱ्या दुसऱ्या गावाची. आता दिशा व अंतर स्पष्ट आठवत नाही फक्त या दोन्ही गावांना रस्ता होता जव्हारहूनच. या गावासाठी एका अवघड व तीव्र उतारावरून बस खाली उतरत असे. ते तितकं वळण लक्षात आहे. पुढे मग पुढचा रस्ता आठवत नाही. आठवते ते थेट गाव जवळ आल्यानंतर ची दृश्य. जिकडून बस येत असे त्याच रस्त्याला प्रथम शाळा लागत असे, मग आमचं ते गाव. अर्थात हा पण पाडाच. याला बरीच नावे होती. घोडंखिंड, गाढवखिंड, साखरे न अंजून काय काय. हा पाडा मात्र त्याच्यासारखा मेन रस्त्यावर नव्हता.  या ठिकाणीं गावात दोन टाईम एस.टी. बस येत असे तितकीच काय ते कनेक्टिव्हिटी. तेव्हा तर बाईक वा कार असे काही कोणाकडे नसायचे. त्यामुळे बस हाच जगाशी संपर्क ठेवण्याचा मार्ग होता.  इथे जरा अवकाश मोकळे मोकळे होते. शाळा राहायच्या ठिकाणापासून लांब होती. या ठिकाणी पहिल्यांदा आठवते ते म्हणजे आमच्या सामानाची आलेली गाडी. गाडी असेल एखादी टेम्पो. पण लक्षात राहिली ती गाडीच्या समांतर पळणारी वडिलांच्या शाळेतील वर्गातील मुले. वडील म्हटले आधी आलो होतो तेव्हा सांगून आलो होतो त्यामुळे ही मुले आपला सामान उतरवायला आलेली आहेत. गाडी थांबली. तिथे लगेचच दहा-बारा मुले जमा झाली. भरभर सामान उतरवू लागली. तेव्हा वडिलांविषयी खूपच आदर व अभिमान दाटून आला. अर्थात तेव्हा फक्त भावना दाटून आल्या होत्या त्यांची ही नावे आताची.

या शाळेवर जातांना रस्त्यात एक मोठे गोडाऊन लागायचे. ते कदाचित धान्य भरण्यासाठी पूर्वी वापरले जात असे. पण मी कधीच त्याला उघडे पाहिले नाही. त्याचा उडालेला रंग फिकट पिवळसर होता. त्याच्या त्या एका बाजूच्या भिंतीवर एक भला मोठा हाताचा पंजा काढला होता. त्याखाली असलेले ‘ताई,माई अक्का… हे शब्द मला वाचता येऊ लागले होते. पुढील शब्द पुसलेले होते. हे असे काय लिहिले आहे त्याचा अर्थ तिथे असेपर्यंत मला मात्र कळला नव्हता व ते कुणाला विचारव इतक ते महत्वाचं वाटलं नसावं. पण तो भला मोठा पंजा बरेच दिवस लक्षात होता. ते गोडावून व शाळा जव्हारवरुन येणार्‍या रस्त्याच्या उजव्या बाजूला होते तर डाव्या बाजूला एक मोठ्या मैदानासारखी जागा होती. आम्ही गेल्यानंतरच्या काही दिवसात तिथे मोठी हालचाल सुरू झाली. काही मोठ्या मशिनी येऊन पडल्या. बर्‍याच मोठ्या डंपर सारख्या गाड्या आल्या त्यातून मग गवत आले. हो ते गवताचे मोठ मोठे भारे होते. हे असे गवत होते जे येथील जंगलात बर्‍याचदा दिसत असे. त्या गवताचे कटींग करून मोठे गोल आकाराचे पॅकिंग केले जात होते. ते परत दुसर्‍या गाडीतून पाठवले जात होते. येणारे गवत कुठून येत होते व ते परत पॅकिंग करून कुठे जात होते हे आम्हा मुलांना काहीच माहीत नव्हते. पण अशा ठिकाणी माणसांची व गाड्यांची गर्दी होतेय हेच आमच्यासाठी अप्रूप होते. संध्याकाळी व सुट्टीच्या दिवशी इथे यायचे, खेळायचे व तेथील लोकांची नजर चुकवून त्या गवताच्या गंजीवर लोळून घ्यायचे, उड्या मारायच्या हा आमचा आवडता उद्योग होता.      

या गावात आल्यामुळे एका अद्भुत गोष्टीशी माझा परिचय झाला तो म्हणजे टीव्ही. त्यातही त्या काळात सुरू झालेले रामायण. हे रामायण पहाण्यासाठी त्या पूर्ण पाड्यावर फक्त एकाच घरात टीव्ही होता. रामायण लागायच्या आधी बराच वेळ आम्ही तिथे जाऊन बसत असू. त्यांचा पुढचा दरवाजा बंद असायचा. घराच्या उजव्या बाजूला त्यांचा एक दरवाजा होता. तेथून जावे लागत असे. त्या दरवाज्यात जाण्यासाठी त्यांच्या गार्डनच्या गेटमधून जावे लागत असे. त्याच गार्डन मध्ये त्यांनी मोठा गोबर गॅस प्लांट तयार केला होता. त्याचे खोदकाम व नंतरचे बांधकाम पाहण्यासाठी देखील आम्ही बराच वेळा जात असू. ज्या दिवशी प्लांट सुरू झाला त्या दिवशी देखील पाहण्यासाठी आम्ही मुले गेलो होतो. त्या गॅसच्या निळ्या लाल ज्वाला व त्यावर भांडे ठेऊन तेथील आजींनी पाजलेला चहा त्यासोबतच पहिल्यांदाच घेत असलेला गोबर गॅसचा वास सर्व घर व आवरभर पसरलेला होता. त्या काळात सगळं कस नवीन नवीन वाटत होते, त्याचे अप्रूप असे. हे घर एका सभापतीचे होते असे वडीलधार्‍यांच्या बोलण्यातून कळत असे. त्यांच्याकडे एक जुनी जीप होती ती त्यांच्या घरासमोरच्या मोठ्या पडवीत लावलेली असे. पडवीत थंड वातावरण राहत असे. कंपाऊंड म्हणून पुन्हा छोट्या झुडपांचा वापर केलेला होता. ते सभापती व्हरांड्यात एका खुर्चीवर बसलेले असत. त्यांचे ते तिथे बसलेले असणे हे माझ्यासाठी एक स्टीलफ्रेमसारखे होते. कारण मी फक्त त्यांना तिथेच पाहिले होते. एक पांढरी खादीची बंडी व पांढरा पायजमा घालून ते बसत असत. त्यांच्या डोळ्यावर एक चश्मा असे ज्याच्या कडा तपकिरी रंगाच्या होत्या. त्या माझ्यासाठी वेगळ्या होत्या कारण मी आतापर्यंत असे वृद्ध बाबा पाहिले होते ज्यांच्या चष्म्याचा रंग काळा होता. ते त्यांच्या जीपवर कधी जातांना दिसले नाहीत. घरात आम्ही सर्व जन टीव्ही पाहतांना गुंग असतांना कदाचित मागे ठेवलेल्या पलंगावर ते येऊन बसत असतील. माहीत नाही. त्या सभापती बाबांची मोठी शेती होती. आमच्या घराच्या मागच्या बाजूला थोड्या अंतरावर ती शेती दिसत असे. शेती लक्षात राहण्याचे कारण म्हणजे जसे ऊन वाढत असे तसे सगळीकडे हिरवा रंग नष्ट होत असे, डोंगरावरील हिरवळ नष्ट झालेली असे. पण ओसाड व मोकळ्या जागेच्या पलीकडील त्यांच्या शेताचा पट्टा मात्र हिरवागार चमकत असे. आमच्या घरातून दिसणारे ते शेताचे कंपाऊंड तारेचे असले तरी त्यावर लटकलेल्या विविध वेली, झुडपे, अध्ये-मध्ये असणारी मोठी झाडे यामुळे आतील पिके दिसण्याऐवजी ही हिरवीगार भिंत दिसत असे. सोबतचे त्याच गावातील माझ्या वयाचे मुले सांगत की त्या शेतात खूप फळे आहेत, मोठी विहीर आहे, सगळीकडे पानी देण्यासाठी पाईपलाईन आहे तसेच त्या बाबांचे दोन्ही मुले शेती पाहतात.

त्या मुलांपैकी एक मुलगा माझ्यासाठी खासच होता. त्याचे नाव तेव्हाही माहीत नव्हते. पण ते माहीत नसण्याने फार पडणार नव्हता. तो करत असलेले काम भारीच होते. त्याच्याकडे एक मोठी रजिस्टर वही होती. त्यात व्यस्थित पट्टीने रेषा वैगेरे मारून तो काय लिहीत असे माहितीय?!... तर तो लिहीत असे दर आठवड्याला दूरदर्शनवरून एकदाच प्रसिद्ध होणारी साप्ताहिकी. त्यामुळे या रविवारी कोणता चित्रपट आहे. किती वाजता काय दाखवणार आहेत याची वेळेसहित नोंद तो घेत असे. अभिलेख वा दस्ताऐवजाची नोंद करून ठेवणारा तो माझ्यासाठी मोठा बखरकारच होता. अगदी जो चित्रपट असेल त्यात काम करणार्‍या


कलाकारांची नावे देखील तो लिहून ठेवत असे. चुकून दूरदर्शनने एखादी चित्रपट परत दाखविला तर तो लगेच मागचे पान काढून सांगत असे की अमुक एका तारखेला हा चित्रपट दाखवला गेला होता. त्यामुळे आज काय आहे ही माहिती पाहिजे असेल तर त्याला विचारावे लागत आसे. मला आजदेखील वाटते की तिथे परत जावे व त्या मुलाकडून जो आता आजोबा झाला असेल ती वही मागावी. हातात घ्यावी,चाळावी वाचावी. बघू या कधी होईल हे स्वप्न पूर्ण. मराठीतील तत्कालीन प्रसिद्ध असलेले सर्व चित्रपट तिथे पाह्यला मिळत असे कारण त्यांच्याकडे व्हीसीआर देखील होता. रंगीत टीव्ही व व्हीसीआर यामुळे ज्या चित्रपटांची नवीनच पेपरला वाचत असू ती लगेचच तिथे पाहायला मिळत असे. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन यांची अनेक चित्रपट तिथे पाहिली. दे दणादण त्याच ठिकाणी दोन-तीनदा पाहिल्यामुळे गाण्यांसाहितसर्वच पाठ होते. तसेच रेग्युलर जुनी मराठी चित्रपट म्हणजे ज्यात तमाशा असतो, सवाल-जवाब असतो, लावणी असते व निळू फुले हे खलनायक असतात. तसेच मिशीवाले अरुण सरनाईक, सूर्यकांत-चंद्र्कांत हे हीरो असतात. हे अस काहीबाही कळू लागले होते. अशा जुन्या चित्रपटात थोड्याफार गाण्यांनंतर जी मुख्य हिरोईन असे तिला कोणीतरी त्रास देत असे ते आमच्याकडून बघवेले जात नसल्याने आम्ही खेळायला पळून जात असू. कालांतराने शाळेतील एका शिक्षकाकडे टीव्ही आला. ते वडिलांचे मित्र होते. त्यामुळे अगदी मुक्तपने त्यांच्या घरात आमचा वावर असे. पुढचे रामायण मात्र आम्ही इथेच पाहिले. एकदा असेच काहीतरी घरी चालले होते. वडिलांची इच्छा होती तालुक्याला जाऊन थिएटरमध्ये कुली चित्रपट पाहवा. ते मला पण सोबत घेऊन गेले. जिकडे चित्रपट लागला तिकडे आम्ही गेलो तर तो चित्रपट बदलून दुसराच लागला होता. त्यामुळे न पाहताच आम्ही परत आलो. वडील नाराज झाल्याचे दिसत होते. हा चित्रपट जर आमच्याकडून बघणे शक्य झाले असते तर हा मी वडिलांनी थिएटरमध्ये सोबत बसून पाहिलेला पहिला व शेवटचा चित्रपट ठरला असता.          

आम्ही राहत होतो त्याच्या समोर बरीच मोठी रिकामी जागा होती. पुढे थोड्या पायर्‍या होत्या व मग खाली रस्ता होता हाच रस्ता पुढे शाळेच्या बाजूने जव्हारला जात होता. त्या पायर्‍या उतरायच्या आधी उजवीकडे एक घर होते तिथे एक बाबा राहत होता. त्याचे सारखे एक काम चालायचे. कागदाच्या लगद्यापासून तो मुर्त्या तयार करत असे. एका मोठ्या पातेल्यात रद्दी,पृष्टे न काय काय तो भिजू घालत असे. नंतर ते सर्व एकत्र करत असे त्यात चिकटपणा यावा म्हणून जंगलातून गोळा करून आणलेला डिंक टाकत असे. आणि त्या सर्व मिश्रणातून सुंदर सुंदर मुर्त्या बनवीत असे. मुखवटे बनवट असे. त्या मुर्त्या व मुखवटे दूरदूरपर्यन्त प्रसिद्ध आहेत असे बोलण्यातून समाजत असे. एकदा तर विदेशातून आलेल्या 10-15 मुली त्या गावात आल्या होत्या. तेव्हा बाबाची ती कला बघण्यास खूप वेळ त्या तिथेच बसून होत्या त्याची सर्व माहिती घेतली, फोटो काढले. त्यानंतर मात्र तो सर्वग्रुप आमच्या घरी पण आला होता. विदेशातील लोक आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो. आमचे वडील व त्यांच्यात काहीतरी संवाद होत होता. कोणाला काही तरी कळत होते. मग सर्वांना आनंद होत असे. मग अनावश्यक आम्हीही हसत होतो.

एकदा तालुक्याहून पांढर्‍या शुभ्र ड्रेसमधील बरीच मुले-मुली आमच्या शाळेच्या कॅम्पस मध्ये दिसली. ते आमच्यापेक्षा मोठे होते. कदाचित कॉलेजमध्ये असावीत. ते क्रिकेट खेळत होते. इतक्या नीटनेटक्या कपड्यातील मुले आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो. विशेष म्हणजे त्यातील मुले व मुली यांचा एकदम मोकळा संवाद होत होता. ते पण अप्रूप वाटत होते. त्यातील दोन-तीन मुली मुलांसोबत क्रिकेट पण खेळत होत्या. आमची सर्व शाळा जागा मिळेल तिथून हे अभूतपूर्व दृश्य पाहत होती. त्यांचे क्रिकेट झाल्यानंतर सर्व एकत्रित पटांगणात बसले. त्यांच्यातील एका मुलाने हम बने तुम बने एक दुजे के लीये हे गाणे म्हटले... सर्वांना खूप आवडले त्यानंतर आमच्या शाळेतील एक मुलीने तेव्हा प्रसिद्ध असलेले नगिनामधील ‘मै तेरी दुश्मन’.. हे गाणे अगदी नृत्यासह सादर केले तेव्हा आम्ही जोरदार टाळ्या वाजवत मैदान डोक्यावर घेतले. पण त्यानंतर त्यांच्यातील एका मुलीने तेच गाणे पुन्हा म्हनण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे ती मुलगी टी शर्ट व पॅंटवर होती. तिने बसायला एक खुर्ची मागितली. माइक हातात घेतला व पुन्हा तेच गाणे इतक्या टेचात म्हटले की, गाण संपल्यावर आम्ही कोणीच टाळ्या वाजविल्या नाहीत, त्या पोरांनी जोरदार टाळ्या व शिट्ट्या वाजविल्या पण त्यांची संख्या कमी असल्याने आमच्यापेक्षा त्यांचा आवाज कमीच होता. त्या शहरी मुलीने ते गाणे मुद्दाम म्हटले असे आम्हा सर्वांना वाटत होते. एक प्रकारे तिने आमच्यातील एक कलाकार मुलीचा अपमान केला होता म्हणजे आमचा सर्वांचा अपमान केला होता. त्यामुळे आम्ही सर्व जन अत्यंत नाराज झालो होतो. शेवटी हे शहरी लोक असेच करतात अशा निष्कर्षाप्रत आम्ही आलो होतो आणि इकडे आमच्या शिक्षकांवर कोणताही फरक पडलेला नव्हता हे अजून एक विशेष वाटत होते.

आम्ही सहकुटुंब जव्हारचा राजवाडा पाहायला गेलो होतो. आदिवासी संस्थानचे हे राजधानीचे ठिकाण होते. भिंतीवर तलवार बंदुका टांगलेल्या दिसत होत्या. इथे आत प्राण्याच्या कातडीत भुसा भरून ठेवलेले जतन केलेले होते. वास्तु भव्य वाटत होती. राजवाड्याच्या बाहेर काजूचे भरपूर झाड होती. जव्हार खूप मोठे शहर वाटत होते. ते देखील आजपासून 40 वर्षांपूर्वी. किराणा कपडे चप्पल असे काही घ्यायचे असल्यास आम्ही इथेच येत असू.

या पाड्यावरील अवकाश मोकळं होत. शाळेतून बाहेर आले की लगेच एक उतरती लागत असे. पावसाळ्यात त्यावर फार वेगाने पानी वाहत असे. मुद्दाम त्या पाण्यातून पाय टाकत आम्ही खालून वर व वरून खाली उतरत असू. एकदा आमच्या तिसरीच्या वर्गात एक नवीन मुलगी आली. ती शेजारच्या गावात कोणाकडे तरी पाहुणी म्हणून आलेली होती असे नंतर कळले. तिचा आवाज पण वेगळाच होता. थोडा भीती वाटत असल्यासारखा. ती थोडी अर्धशहरी वाटायची. सरांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात ती व मीच पुढे असायचो. त्या मुलीचे गाल लालसर होते व टपोर्‍या डोळ्यात कायम पानी असल्यासारखे दिसायचे. मला कायम असे वाटायचे की, तिच्या गालाला हात लावावा व तिच्या डोळ्यात पानी येते का ते पहावे. तिच्याशी बोलावे असे वाटायचे.

एका रात्री आमच्या पाड्याच्या रस्त्यावरून एकदम भरधाव वेगाने गाड्या जाऊ लागल्या. अंधारात दाटलेल्या त्या आदिवासी पाड्यांवरील कायम काळोखात बुडालेल्या रस्त्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्यांचे तितके लाइट्स पहिल्यांदाच चमकत होते. एक पाठोपाठ एक वेगाने त्या गाड्या जात होत्या कधी एखाद्या गाडीत एकच माणूस बसलेला दिसत असे तर कधी दोन तर कधी आतील अंधारात काहीच दिसत नसे. खूप गर्दी रस्त्याच्या बाजूने जाऊन उभी राहिली आम्ही पण गेलो. अस समजलं की कुठल्याशा कार कंपनीने ही कार रेस ठेवली आहे. कोणी म्हणे की गाड्यांचे टायर चेक करण्यासाठी ही टेस्टिंग आहे. काहीही असो पण शांत असलेल्या पाड्यावरील वातावरण मात्र या गाड्यांमुळे ढवळून निघाले होते. पाड्याच्या थोडे पुढे गेले की सुरू होत असलेल्या डोंगरावरून ते लाइट्स रस्त्याच्या वळनाप्रमाणे फिरतांना दिसत होते. पुढे पुढे तर गाड्या ऐवजी लाइट्सच दिसत होते. हा रस्ता त्या डोंगराच्या पलीकडे कोणत्या गावाला जातो माहीत नव्हते.

अशा अनेक उत्सुकता मनात तशाच असतांना पुन्हा आमची बदली झाली होती. ती टपोरी डोळ्यांची मुलगी पाहण्यासाठी म्हणून शेवटच्या दिवशी शाळेत गेलो होतो पण ती आलीच नव्हती. ती पाच-सहा दिवसांपासून शाळेतच नव्हती. म्हणजे ती आता भेटणारच नव्हती. पोटात कससच झालं. भूक लागली परत घरी आलो. बदलीमुळे मी जास्त नाराज झाल्याचे समजून आई मला समजावत राहिली.

परत कधी तिथे जाण्याचं जमल नाही. आता कधी गेलोच तर तो सभापती बाबा व तो मूर्ति बनवणार्‍या बाबांना भेटेल. ते तिथे नसतील नक्कीच. पण त्यांच्या आठवणी चाळ्वणार्‍या घरच्या लोकांना भेटेल. त्यांच्याशी बोलेल त्यांना सांगेन मी अजूनही तुमची आठवण काढतो. मी त्या बाबांच्या मुलाकडे ते रजिस्टर मागेल ज्यावर त्याने 86-87 च्या काळातील दूरदर्शनची साप्ताहिकी लिहिली होती. त्याला ते लगेच आठवणार नाही पण इतके नक्की की तो विसरलेला नसेल. मी त्याला अजून एक गुपित सांगेल की त्याचे किशोर कुमारच्या गाण्यांचे पुस्तक जे त्याने मला सहज म्हणून पाहायला दिले होते ते मी अनेक वर्ष सांभाळून ठेवले होते. नंतर ते कुठेतरी हरवले.  त्यांच्या शेतात जाऊन ते पूर्ण शेत पाहिल. गावाच्या मागच्या डोंगराच्या पलीकडे कोणती गावे आहेत हे मी विचारेल. जमल्यास फिरून येईन. ती टपोर्‍या डोळ्यांची मुलगी परत दिसणार नाही. आसपासच्याच गावात कुठे असेल तरी कळणार नाही. कदाचित आता तिच्या डोळ्यातील ते पानी संपून पण गेले असेल. कदाचित ... जाऊदे पण नक्कीच मी तो वर्ग बघून येईल जिथे आम्ही सोबत शिकत होतो. जव्हारला जाऊन मी ती जुन्या थिएटरची जागा शोधून काढेल जिथे वडील मला चित्रपट पहण्यास घेऊन गेले होते. ते नक्कीच आता बंद झाले असेल. चालू असेल तर तिथेच बसून जो सुरू असेल तो चित्रपट पाहिल व मनातल्या मनात वडिलांना सांगेल yes i complete your dreams… हे थोड मूर्खपणासारखे वाटू शकते पण शेवटी माणसाचे जीवन म्हणजे तरी काय असते? काही प्रश्नांची उत्तरे कुठे एका वाक्यात देता येतात. अनेक क्षण, अनेक अनुभव, अनेक व्यक्ति, अनेक गावे, अनेक घटना व अनेक अनुभवांचे एकत्रीकरण म्हणजे जीवन असते. ही अशी अनेक दुरावलेली गावे व माणसे आपल्याला समृद्ध करून गेलेली असतात.

- समाधान महाजन 

The Empire (द एम्पायर)

The Empire (द एम्पायर) ही वेब सिरिज जबरदस्त आहे. सध्या एक सीझन रिलीज झालाय. जर पुढील सीझनमध्ये अशाच प्रकारचे निर्मितीमूल्य कायम ठेवले तर ही सिरिज इंडियन गेम ऑफ थ्रोन होईल असे वाटते. ही सिरिज आलेक्स रुदरफोर्डच्या 'द एंपायर ऑफ मुघल' या fiction नॉवेल वर आधारित आहे. मुळात या नॉवेलचेच सहा खंड आहेत. त्यातील पहिल्या खंडाचे नाव आहे 'रायडर्स फ्रॉम द नॉर्थ' याच नावाने वेब सिरिजचा पहिला सीझन आहे. याचा अर्थ पुढील खंडावर आधारित पुढील पाच किंवा त्यापेक्षा जास्त सीझन निघू शकतात. 

सिरिज पाहायला सुरू केली तेव्हा काही मिनिट असे वाटले की, एखाद्या हॉलीवूडच्या सिरीजचा हिन्दी रिमेक बघतोय की काय असे वाटत होते.  आतापर्यंत ऐतिहासिक सिनेमे वा सिरिज बघतांना एक तर डोक गहाण ठेऊन बघणे किंवा कान बंद करून फक्त दृश्य बघणे किंवा डोळे बंद करून फक्त कानाने ऐकणे असे काहीतरी करावे लागत होते. ही सिरिज बघतांना आपोआप पूर्ण एकाग्र होऊन तुम्ही बघायला लागतात व फील करायला लागतात की भारतात पण असे काहीतरी भन्नाट बनू शकते. 

अप्रतिम सिनेमेटोग्राफी, अप्रतिम संवाद, अचूक दिग्दर्शकीय पकड.... आणि बरेच काही. यातील कुठलीही फ्रेम अनावश्यक वाटत नाही. किंबहुना काही वेळा काही दृश्य अजून काही सेकंद हवी होती असे वाटत असतांनाच असा काही टर्न बसतो की ते विसरून आपण नवीन visuals बघायला लागतो.  इतके प्रोफेशनली भारतात फार क्वचितच निर्मिती होती.  

एखादा सुंदर स्टोरी प्लॉट जर त्याचे मूल्य ओळखणार्‍या  जाणकार लोकांच्या हाती पडला तर त्यातून अशी दर्जेदार निर्मिती होऊ शकते. ...आणि मग बटबटीत हिंसा व सेक्स सिन नसतांना देखील देखील लोक आवडीने  सिरीज बघतात.

द एंपायर ही सिरिज आहे भारतातील पहिला मुघल बादशाह बाबर याच्यावर. पण मुळात सिरिजचे वैशिष्ठ्य असे की यात बाबर रेडिमेड सम्राट दाखवला नाहीय....  तर सम्राट बनण्याच्या त्याच्या प्रवासावर आहे. त्या प्रवासातील युद्धावर आहे, मित्र व शत्रूवर आहे. सम्राट झाल्यावर देखील त्याच्यातील आंतरिक कलाहावर आहे. घरातील नातेसबंधवार आहे. सत्तेच्या स्पर्धेवर आहे.  म्हणून एक प्रसंगी बाबर जे म्हणतो की,   'मौत और  जीत मेहबूबा है हमारी, दोनो हमारे साथ खेलती रहती है.... पास आती है फिर दूर चली जाती है'  हे शब्द व अर्थश आपल्याला स्क्रीनवर दिसते. 

जहीरुद्दीन मुहम्मद बाबर. त्याच्या वडिलांचे नाव होते उमरशेख मिर्झा आणि आईचे कुत्लघ निगार खानम.  वडिलांकडून तो तैमूरलंग तुर्काचा पाचवा वारस, तर आईकडून चंगीझखान मोगलांचा वंशज होता. त्याचा जन्म फर्घाना (कझाकस्तान) येथे झाला. सिरिज बघतांना जाणवते की हळूहळू चंगीज खानचे जीन्स त्याच्या आजीमार्फत प्रभावी होत जातात.  वडिलांनंतर  चौदा वर्षांचा असतानाच तो फर्घाना प्रांताचा राजा होतो व तेथून सुरू होतो त्याचा प्रवास जो भारतात येऊन संपतो. या प्रवासात कधीही सहज सोपा विजय त्याला मिळत नाही न त्याचा प्रवास एका लिनीयर पद्धतीने होतो. म्हणून तर जहीरुद्दीन मुहम्मद बाबरचा first mughal emperor बाबर कसा झाला हे यात पाहायला मिळते.  

स्टारकास्ट जबरदस्त आहे. शबाना आझमीचे बर्‍याच दिवसांनी झालेले दर्शन जबरदस्त. बाबरची आजी म्हणून प्रभावी. ती गेल्यानंतर बाबरची बहीण खानजादा बेगम म्हणून द्रष्टिने केलेलं काम देखील कौतुकास्पद. कुणाल कपूरने बाबरला न्याय दिला आहे. तो फिल्मी वाटतच नाही ही फार मोठी जमेची बाजू आहे. बाबरचा मित्र कसिमची भूमिका केलेला इमाद शाह 'दिल दोस्ती, etc' मध्ये 2007-08 मध्ये मी पहिला व शेवटचा पहिला होता. तिथे देखील तो मुख्य भूमिकेत असलेल्या श्रेयस तळपदेवर बर्‍याचदा हावी होतांना दिसतो. त्याचा तो बिनधास्त व कायम बॉक्स/रूल्स तोडण्याचा आवडेल असा अंदाज इथे देखील घेऊन आला आहे. राहुल देव मस्त. यातील सर्वात संस्मरणीय व धक्का देणारी  भूमिका केली असेल तर ती दिनो मोरीयाने. त्याच नाव घेतलं की बिपाशाबसू आठवते व तीच नाव घेतलं की तो ... इतपत आठवणीत असलेल्या दिनो मोरीयाने या सिरिज मध्ये शायबनी खान बनून जे काही केल आहे ते निव्वळ अप्रतिम म्हणता येईल. सिरिज बाबर वर असली तरी वाटत राहत शायबनी  खान स्क्रीनवर अजून हवा होता. (खर तर वेब सिरिजमुळे असे अनेक साईडला गेलेले कलाकार पुढे आले. जस आश्रम मध्ये बॉबी देओल.) 

डायरेक्टर मिताक्षरा कुमारला या सिरिजसाठी नक्कीच दाद द्यायला हवी. ती अर्थशास्रची पदवीधर आहे. तिने बाजीराव मस्तानी व पद्मावत मध्ये को-डायरेक्टर म्हणून काम केलेले असल्याने काही वेळा त्या चित्रपटांची आठवण येते पण ती तेव्हढ्यापुरती.  

थांबण्यापूर्वी अजून एक म्हणजे या सिरिज मधील संवाद. अगदी समर्पक व मनात जाऊन बसतील असे. कुठेही आक्रस्ताळे पणा नाही ना भडकपणा. जसे- 1) 'जो वक्त की जरुरते को समजते है, वक्त उनकी जरुरतो का  भी खयाल रखता है... ' 2)  'ना रिश्तेदारी के लिये ना मोहोबत के लिये....आप हमारी मदद कर रहे हैं सिर्फ तख्त के लिये...' 3) 'जिंदगी सिखा देती है, जितने के लिये हर चाल जायेज है..'  4) बात जब तखत की हो तो शराफत हार ही जाती है... 5) एक बाप नही एक शहेनशाह की तरह सोचो... असे अजून बरेच काही. 

इतिहास आवडणार्‍यानी तर ही सिरिज नक्की पाहायला हवी.

- समाधान महाजन 

थाळनेर - खानदेशची राजधानी

 

थाळनेर हे गाव धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात येते. आजूबाजूला असलेल्या गावांसारखे एक गाव ते आता दिसत असले तरी एकेकाळी मात्र हे गाव खानदेशची राजधानी होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एमए करत असतांना प्रथम वर्षाला आम्हाला खांदेशाचा इतिहास हा एक पेपर होता. त्यावेळी पहिल्यांदा समजले की या प्रदेशाला देखील स्वतःचा असा इतिहास आहे. तोपर्यंत फक्त जो इतिहास पाठ्यपुस्तकात आहे व जो स्पर्धा परीक्षांमध्ये आहे तोच इतिहास आम्हाला माहिती होता. म्हणून मग खानदेशच्या इतिहासावरील उमवि मधील एमएचे पुस्तक वाचतांना एकदम उत्सुकता वाढत गेली की किमान येथील महत्वाच्या स्थळांना आपण भेट दिली पाहिजे. ते बघितले पाहिजे. त्यांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. त्यातून आज 21 ऑगस्ट रोजी आम्ही थाळनेर येथे जाण्यास निघालो. 

यावेळी माझ्यासोबत होते, इतिहासकार डॉ. रनसिंग परदेशी सर व माझे एमएचे सहकारी तुषार सोनवणे सर. शिवाय तिथे गेल्यावर थाळनेर कॉलेजला शिकविणारे इतिहासाचे प्राध्यापक बोरसे सर देखील तिथून आम्हाला जॉइन झाले.  रनसिंग परदेशी सरांचा स्ट्रॉंग पॉइंट मध्ययुगीन इतिहास हा आहे. त्यांनी राजपूत राजे/राज्य व महाराष्ट्र याच्यातील सबंधांवर चार-पाच पुस्तके देखील लिहिली आहेत व अजून तितक्याच पुस्तकांवर त्यांचे काम सुरू आहे. मुळात थाळनेर देखील मध्ययुगीन इतिहासाचा एक महत्वाचा भाग होते. म्हणजे अत्यंत योग्य व्यक्ति योग्य ठिकाणी आमच्या सोबत होती.  

खांदेशात फारुकी घराण्याची स्थापना कशी झाली हे सांगतांना फरीश्ता त्याच्या गुलशन-ई-ईब्राहिमी या पुस्तकात   म्हणतो, मलिकराजाचे पूर्वज दिल्लीच्या दरबारात अल्लाउद्दीन खिल्जी आणि मुहम्मद तुघलकाच्या कारकिर्दीत प्रतिष्ठित सरदार असून त्यांनी मानाचे स्थान प्राप्त केले होते. मलिक राजाला फिरोजशाह तुघलकने आपले शरीररक्षक म्हणून नियुक्त केले होते.


फिरोजशाहला शिकारीची फार आवड होती. तो गुजरातच्या जंगलमय इलाख्यात आपल्या छावणीपासून 14 कोस अंतरावर शिकारीसाठी गेला. बादशाहबरोबरील इतर सर्व सेवक कंटाळून छावणीत परत आले. मलिक राजा मात्र शेवटपर्यन्त बादशाह बरोबर राहिला होता. त्यामुळे मलिक राजावर बादशाह खुश झाला. दिल्लीत परतल्यावर बादशाहने दरबार भरवून मलिक राजास दोन हजारी मनसब व थाळनेर आणि करवंद हे प्रदेश जहागिरी म्हणून दिले. फेरीश्ताणे फारुकी घराण्याचे सातशे पस्तीस वर्षात एकूण 16 बादशाह झाल्याचे नमूद केले आहे. शाह शमसुद्दीन यांनी फारुकी घराण्यात 27 बादशाह झाल्याचे आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. 1370 ते 1601 असे सुमारे 231 वर्ष फारुकी घराण्याची सत्ता खांदेशात होती.

खानदेशच्या इतिहासावर भरपूर लिखाण करणारे प्रा. डॉ.जी.बी.शाह यांच्या एका पुस्तकात फारुकी घराण्याची स्थापनेची एक वेगळी कहाणी देखील देण्यात आली आहे त्यानुसार फारुकी घराण्यातील कोणी पूर्वज दक्षिणेतील राज्यात लष्करी सेवेत होता. लष्करात सेवा करतांना काही कारणाने तो नाराज झाला आणि खानदेशमध्ये आला. यावेळी खानदेशमध्ये विविध राजे व सरदार यांचे राज्य होते. तो एका गावात पोहचला हे गाव मात्र त्याला आवडले. या गावात त्याच्याबरोबर असलेल्या कुत्र्याला एक ससा दिसला. कुत्र्याला ससा दिसताच कुत्र्याने सशाचा पाठलाग केला. परंतु थोड्याच वेळात त्या सशाने कुत्र्याच्या पाठीमागील बाजूने कुत्र्यावर आक्रमण केले. सशाचे हे साहस पाहून त्या सैनिकाला आश्चर्य वाटले व त्याने विचार केला की ज्या भूमीवर असे अद्भुत व साहसी दृश्य दिसते ती भूमी साहस आणि शौर्‍याची प्रतीक असली पाहिजे. असा विचार करून त्याने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्याने ही गोष्ट तेथील वतनदाराला सांगितली. पण त्याने त्या गोष्टीला नकार दिला. तेव्हा त्याने दिल्लीला जाऊन थाळनेर आणि करवंद हे दोन्ही परगणे दिल्लीचा सुल्तान फिरोजशाह तुघलक याच्याकडून 1370 मध्ये जहागिरी म्हणून मिळविले. ही जहागिरी मिळविणार्‍या व्यक्तीचे नाव होते मलिक राजा खान व घटना जेथे घडली त्या गावाचे नाव होते थाळनेर. तर असो, फारूकींच्या स्थापनेची कहाणी काहीही असली तरी सत्य हे आहे की त्यांची व पर्यायाने खानदेशाची पहिली राजधानी ही थाळनेर होती हे नक्की. 

खानदेश Gazetteer- 1880 मध्ये असा उल्लेख आहे की, स्थानिक अनुदानानुसार 12 व्या शतकाच्या सुरूवातीला (1128) while the country for twenty miles round was without a light,' and twenty -seven of its forts were deserted, Thalner prospered under Javaji and Govaji. 

मलिक राजा फारुखी या पहिल्या राजाने बस्तान थाळनेर येथे बसल्यानंतर त्याने साम्राज्याचा विस्तार करण्याचे ठरवले. गुजरातच्या सुलतांनांच्या ताब्यात असलेला सुलतानपुर आणि नंदुरबारच्या प्रदेशावर आक्रमण करण्याचे धाडस त्याने केले. पण हे आक्रमण निष्फल ठरले. पुन्हा वापस थाळनेर येथे येऊन त्याने गुजरातच्या सुल्तानाशी वाटाघाटी करून तह केला. 

मलिक खान हा 1399 मध्ये मरण पावला. त्याला दोन मुले होते पैकी जो इफ्तिकार नावाचा जो लहान मुलगा होता त्याला थाळनेरचा किल्ला व त्या सभोवतालचा प्रदेश दिला. तर मोठा मुलगा नसीरखान याला लळींगचा किल्ला व त्या सभोवतालचा प्रदेश दिला. नसीरखान हा महत्वकांक्षी राजा होता. त्याने गैरमार्गाचा वापर करून असा आहीर याच्या ताब्यातील असिरगडचा किल्ला घेतला व आपले राज्य मजबूत केले. त्यानंतर थाळनेर येथे असलेला त्याचा लहान भाऊ इफ्तीकार याच्यावर 1417 मध्ये आक्रमण केले. लहान भावाचा पराभव करून त्याला कैद केले व असीरगडच्या किल्ल्यात बंदिस्त ठेवले. त्याच्यानंतर 1511 आणि 1566 या दोन्ही वर्षात पुन्हा गुजरातचा सुलतान व खानदेशचा सुलतान यांच्यामध्ये युद्ध झालेली दिसतात. 1600 मध्ये सम्राट अकबराने खानदेशच्या फारुकी घराण्याचा शेवटचा राजा बहादुरशाह फारुकी याचा पराभव केला. आणि थाळनेरचा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.

फारुकी राजांच्या कबरी – असा हा फारुकी राजांचा इतिहास पाहिल्यानंतर या गावात त्यांच्या आज रोजी
अस्तित्वात असलेल्या कबरी या कोणाचेही लक्ष वेधून घेतील अशा आहेत. तिथे आता संपूर्ण परिसराला तारेचे कंपाऊंड केलेले आहे. आत प्रवेश करताच एका उंच चौथार्‍यावर चार मोठे घुमटाकार वास्तू आपले लक्ष वेधून घेतात. या चार कबरी मलिकराजा, नासिरखान, मिरन आदिलखान आणि मुबारीक खान यांच्या आहेत. या सर्व कबरींमध्ये मिरन मुबारकखान याची कबर आकाराने सर्वात उंच मोठी व भव्य आहे. त्याच्या महान कारकीर्दीचा उल्लेख त्याच्या थडग्यावरील शिलालेखात दिसतो. 

फारूकींच्या या वास्तू त्यांच्या सांस्कृतिक कलेची प्रतीके आहेत.  

या कबरिंची काही वैशिष्ट्य अशी आहेत – 

1) लांब, चौरसाकृती चौथार्‍यावर एकावर एक असे तीन चौथरे आणि तिसर्‍या चौथार्‍यावर मुख्य वास्तूची केलेली उभारणी. 

2) चौकोनी वास्तूच्या छतावर भव्य, उंच परंतु पसरट असा टेकवलेला घुमट. मांडूच्या होशंगशाहच्या थडग्यावरील इमारतीप्रमाणेच ही इमारत असून घुमटाच्या वजनाचा भार एकाच ठिकाणी पडू नये म्हणून वास्तूच्या आकाराएवढा पसरट घुमट बनवून तो इमारतीवरील सर्व भागावर विखुरलेला आहे. तसेच घुमटाच्या वजनाचा भार सभोवार तोलला जावा म्हणून इमारतीचा दर्शनी भाग अत्यंत उंच व भव्य केला आहे. 

3) इमारतीच्या आरंभीच्या भागात एक मुख्य दरवाजा आणि बाजूच्या खिड्कींसाठी मोकळी व विस्तृत जागा.

4) इमारतीच्या वरील बाजूस काढलेले सजजे व पागोळया हे फारूकींच्या थडग्याचे आणखी एक वैशिष्ट्य मानावे लागेल. इमारतीचा आरंभीचा भाग आणि छताच्या बाहेर काढलेल्या पागोळया (सज्जे) व घुमटाचा दर्शनीय भाग इत्यादींवर असलेल्या वरवंडी (लहान भिंती) हेही एक वैशिष्ट्य. 

5) थडग्याच्या छतावरील चारही कोपर्‍यात लहान लहान आकारांचे बुरूज असून ते इमारतीवरील मुख्य घुमटाला शोभून दिसणारे आहेत. 


6) कबरीच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी अरबी व पर्शियन भाषेत कोरलेला शिलालेख हे मिरन मुबारक खानच्या थडग्याचे वैशिष्ट्य मानावे लागेल. 

थाळनेर येथील स्थापत्य कलेवर अरबी स्थापत्य शैलीचा प्रभाव जाणवतो. कारण अरबी स्थापत्य शैलीप्रमाणे राजाच्या कबरीवर शिलालेख कोरण्याची पद्धत फारुकी सुल्तंनांनी उचललेली दिसते. येथील राजांच्या कबरीच्या वास्तू या इंडो-इस्लामिक शैलीचे नमुने मानले जातात. तरी त्यांच्यावर हिंदू कला व सौंदर्याचा प्रभाव पडलेला जाणवतो. अनेक ठिकाणी कमळ व तोरणाची नक्षी वापरली आहे. एकूण फारूकींच्या स्थापत्य शैलीवर हिंदू, अरब व मुस्लिम शैलीचा प्रभाव असल्याचा दिसतो. 

या मोठ्या कबरीच्या शेजारी खाली एका ठिकाणी वीस-बावीस छोट्या कबरी व पलीकडे मेहरब आहे. समोर अजून


नंतरच्या काळातील काही दोन-तीन कबरी आहेत. गावाच्या जवळच हा सर्व परिसर आहे. तेथून आम्ही नदीच्या जवळ असलेल्या थाळनेर या किल्ल्याकडे निघालो. 

थाळनेर किल्ल्याची निर्मिती- 1370 मध्ये हा मलिक राजा थाळनेर येथे आला आणि त्याने खानदेश मध्ये फारुकी घराण्याचे राज्य स्थापन केले. तसेच थाळनेर ही आपल्या राज्याची राजधानी म्हणून जाहीर केली. कारण थाळनेरचा किल्ला हा राज्य संरक्षणाच्या दृष्टीने भक्कम व अभेद्य असा किल्ला होता. पर्सि ब्राऊन या किल्ल्याचा उल्लेख बादशाही किल्ला म्हणून करतो. हा किल्ला तापी नदीच्या किनारी बांधला आहे. किल्ल्याच्या पश्चिमेला तापी नदीचा अर्ध चक्राकार प्रवाह वाहतांना दिसतो. आजही पावसाळ्यात किल्ल्याच्या वर जाऊन
पाहिले तर नदीच्या बाजूचे अत्यंत विहंगम दृश्य तिथे दिसते. या किल्ल्याच्या भिंतीची ऊंची सुमारे 60 फुट असून


या किल्ल्यातील सगळ्या तोफांचा मारा बहुतेक पूर्वेच्याच बाजूला आहे. कारण पश्चिमेच्या बाजूला तापी नदीचे खोल पात्र आहे तसेच उत्तर आणि दक्षिण या दिशांनी तुटलेले कडे आहेत यामुळे तिन्ही बाजूला किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण मिळाले आहे. 

मोगलांनंतर हा किल्ला मराठा काळात पेशव्यांच्या ताब्यात गेला. तेव्हा त्यांनी तो इंदोरच्या होळकरांना सरंजाम म्हणून दिला होता. 1800 च्या दरम्यान तो निंबाळकरांच्या देखरेखीखाली होता. काही वर्षांनी तो पुन्हा होळकरांच्या ताब्यात गेला. मंदसोरचा तह होईपर्यंत तो त्यांच्या ताब्यात होता.

आता मात्र या किल्ल्यावर कोणतीही जुनी इमारत अस्तित्वात नाही. एक देवीचे छोटेसे मंदिर म्हणून आहे पण ती मूर्ति जुनी असली तरी मंदिर मात्र नवे वाटते. पर्यटन विभागाकडून इथे आलिकडे छोटी तटबंदीची किनार बांधलेली दिसते तसेच पायर्‍या देखील केलेल्या आहेत. किल्ला उंचावर आहे त्याच्या सपाट पृष्टभागावरून आजही खूप लांब पर्यंतचा प्रदेश दिसतो. जेव्हा इथे मोठ्या इमारती असतील तेव्हा तर खूप मोठा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येत असेल. या ठिकाणी किल्ल्याच्या बाजूला तापी नदी वाहते. तिच्या U आकाराचे वळण गळ्यातील हारासारखे सुंदर दिसते. अजूनही खूप प्रमाणात विकास या ठिकाणी झाला पाहिजे असे वाटते.   

थाळनेरचे आर्थिक व सांस्कृतिक महत्व - तापी नदीमुळे या प्रदेशातील जमीन सुपीक होती. त्यामुळे शेतीचे उत्पन्न चांगले होते.  तसेच थाळनेर हे सूरत ते बरहानपुर या महत्वाच्या व्यापारी मार्गावर वसलेले होते. पावसाळ्यात थाळनेर येथे येणार्‍या व्यापार्‍यांना व प्रवाशांना आश्रय घेता येई. थाळनेर अर्थात खानदेशमधील व्यापार्‍यांचे सबंध दौलताबाद, हैदराबाद, अहमदनगर, विजापूर इत्यादि विविध शहरांशी फार पूर्वीपासून होते. थाळनेरचा सांस्कृतिक सबंध माळवा-गुजरातशी आला होता. 1660 मध्ये टर्विनियर या परदेशी प्रवाशाने थाळनेरच्या प्रदेशातून प्रवास केला. सूरत-बरहानपूर मार्गावरील थाळनेर हे व्यापाराचे प्रमुख केंद्र असल्याचा उल्लेख तो आपल्या प्रवास वर्णनात करतो.  थाळनेरचे भौगोलिक, सांस्कृतिक व व्यापारी महत्व ओळखून मलिक राजाने खानदेशची राजधानी म्हणून त्या ठिकाणाची निवड केली.   

1857 चा उठाव व थाळनेर –  होळकर व ब्रिटीशांचे युद्ध 1817 मध्ये झाले. ब्रिटीशांचे नेतृत्व जॉन माल्कम व थॉमस हीस्लोप हे करत होते. त्यांनी मराठा लष्कराचा पराभव करून होळकरांशी 21 डिसेंबर 1817 रोजी एक तह केला. यानुसार होळकरांना खानदेशमधील सर्व मुलुख ब्रिटीशांच्या स्वाधीन करावा लागला.  उत्तरेकडील सेंधव्याकडून


येणार्‍या सर थॉमस हिसलोप आपल्या सैन्यासह 27 फेब्रुवारी 1818 रोजी थाळनेर परिसरात दाखल झाला. त्याने किल्लेदार तुळशीराम मामास शरण येण्यासबंधी निरोप पाठविला पण तेथील किल्लेदार तुळशीराम मामाने यास नकार दिला. आहे तितक्या सैंनिकांसह व सामुग्रीसह त्याने किल्ला लढविण्यास सुरुवात केली. अखेर मुख्य किल्लेदार इंग्रजांच्या हाती आला. त्याला ब्रिटीशांनी 27 फेब्रुवारी 1818 रोजी सर्वांसमोर फाशी दिली. तुळशीराम मामा हा खानदेशमधील पहिला हुतात्मा ठरला. की ज्याने ब्रिटीशांना खानदेशमध्ये पाऊल टाकताच प्रथम विरोध केला. 

या तुळशीराम मामांच्या घराण्यातील वाड्याची जुनी मध्ययुगीन वास्तू अत्यंत देखणीय आहे. लाकडी बांधकाम या ठिकाणी आहे. जुन्या विटांचा बुरूज आहे. जुन्या काळातील रंग अजूनही फ्रेश आहेत. यानंतर आम्ही या तुळशीराम मामांचे वंशज असलेल्या नरेंद्रसिंह जमादार यांच्या घरी गेलो. डॉ. परदेशी सरांच्या ओळखीमुळे ते शक्य झाले. त्यांनी देखील बराच वेळ आम्हाला त्यांना माहीत असलेला इतिहास सांगितला. 

एकूण खानदेशची राजधानी असलेल्या थाळनेरचा इतिहास उज्ज्वल आहे. गरज आहे त्या ऐतिहासिक वास्तू टिकविण्याची व त्यांचा इतिहास जतन करून पुढील पिढ्यांकडे पोहचविण्याची. 

- समाधान महाजन   

थाळनेर विषयीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील you tube link वर क्लिक करा. 

https://youtu.be/v1UJxhW3zIY

https://youtu.be/v1UJxhW3zIY 


संदर्भ पुस्तके- 

1) खानदेश Gazetteer(1880)

2) खानदेशचा राजकीय व सांस्कृतिक इतिहास - प्रा. डॉ. टी. टी. महाजन 

3) उपेक्षित दुर्गांचा इतिहास - प्रा.डॉ.जी.बी.शाह

3) मध्ययुगीन खानदेशचा इतिहास - प्रा.डॉ.जी.बी.शाह

4) गुलशन-ई-ईब्राहिमी - फरीश्ता (मराठी अनुवाद - कॅ.डॉ.भ.ग.कुंटे)

5) यशार्थ - धुळे जिल्हा डिजिटल  ई -साप्ताहिक (दिनांक -20 मे  2018)



राजदेहेरे किल्ला (चाळीसगाव, जिल्हा-जळगाव)

चाळीसगावपासून साधारण 20-22 किलोमीटर असलेला हा एक बळकट डोंगरी किल्ला आहे.नाशिक जिल्ह्यात माणिकपुंज या छोट्या टेकडीवजा गडाजवळ सातमाळा रांग संपते आणि अजिंठा रांग सुरु होते. या रांगेतील पहिला मानकरी म्हणजे हा "राजधेर उर्फ ढेरी". वास्तविक सातमाळा रांगेत राजदेहेर, कोळदेहेर आणि ईंद्राई असे किल्ल्यांचे त्रिकुट आहे. बरेच ट्रेकर्स तिकडे भेट देतात. पण त्याच राजदेहेरेशी नामसाधर्म्य असणारा हा राजदेहेर किल्ला मात्र तुलनेने उपेक्षित आहे.

किल्ल्यावर जाण्यासाठी दगड फोडून अतिशय अरुंद अशी पायवाट केली आहे. हा किल्ला दोन टेकड्यांचा असून दोन्ही टेकडया जोडणार्‍या घळईतून किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. किल्ल्याचे दरवाजे ढासळलेल्या स्थितित असले तरी तरी ते दौलताबाद किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखे भासतात. किल्ल्याच्या पायथ्याशी राजदेहरे गावाचे काही अवशेष, पांढर्‍या मातीच्या भिंती व तळे दिसून येते. येथील तळ्याला श्रावण तळे असे नाव होते. तळ्याच्या काठावरील महादेव मंदिरात एक शिलालेख आहे. त्याचा बराचसा भाग नष्ट झाल्याने वाचने कठीण आहे. मंदीराबाहेर भग्न शिवपिंडी पडल्या आहेत. 

वर जातांना पश्चिमेकडील भागास लहान किल्ला म्हणतात. लहान किल्ल्याच्या डोंगरकपारीत एक गुहा असून ती बौद्ध लेणी असावी असा अंदाज आहे. तिला टेहळणी चावडी असे म्हणतात.लेण्याच्या समोरील ओट्यावर बसले म्हणजे संपूर्ण राजदहरे परिसर नजरेच्या टप्प्यात येतो.  याच्याजवळ एक मुख्य दरवाजा असावा. येथे भग्न मंदिराचा पाया व मंदिराजवळ आयाळ असलेल्या सिंहाच्या नक्षीचे दोन खांब दिसतात. दरीच्या बाजूस उत्तरेस प्रचंड खडक आहे. खडकात खांब रोवण्यासाठी खोल खड्डे आहेत. याचा अर्थ तिथे इमारत असावी. याच खडकावर एक पिंड व पादुका कोरल्या आहेत. पलीकडील चौथार्‍यावर भग्न नंदी असून पुढे दरबाराच्या दरवाजाचे 3/4 फुट उंचीचे अवशेष आहेत. येथून पूर्वेकडील अवघड वाटेने जुन्या महादेव मंदिरास जाता येते. तिला आडाई शिडी म्हणतात.दीपमाळेचा उपयोग किल्ल्यावर इशारा देण्यासाठी केला जात होता असे सांगितले जाते. कारण देवगिरीकडील सपाटीचा प्रदेश येथून बर्‍याच लांबपर्यन्त स्पष्ट दिसतो. 

किल्ल्याच्या दोन्ही टेकड्यांमध्ये जी प्रचंड दरी (घळई) आहे तिला गावदरी आणि बाजूच्या खोल दरीस पाताळ दरी असे म्हणतात. किल्ल्याच्या पूर्वेकडील दरीस  भवानी दरी असे म्हणतात. ही दरी म्हणजे एक प्रचंड दगडी कडा असून त्याच्या मध्यभागी एक भुयार आहे. ते पाटणा देवीजवळ निघते असे सांगतात. 

या किल्ल्यात पाण्यासाठी जवळपास सहा टाके कोरलेले आहे. पूर्वी सर्वांमध्ये पानी होते आता फक्त एकाच टाक्यात पानी आहे. किल्ल्याच्या दरवाजाचे अवशेष, काही संरक्षक भिंती व त्यावरील जंग्या, पडका बुरूज, पाण्याचे टाके, काही इमारतींचे अवशेष याशिवाय आता काहीही शिल्लक नाही. 

राजदेहेर हा किल्ला गवळीकालीन किंवा यादव पूर्वकालीन असावा. इ.स. १००० ते १२१६ पर्यंत निकुंभांची या भागावर सत्ता होती असे पाटणेदेवी मंदिरातील शिलालेखानुसार सिद्ध होते. पाटणे या राजधानी जवळच हा किल्ला असल्यामुळे लष्करीदृष्ट्या महत्वाचा असावा. इ.स. १२१६ - १७ च्या सुमारास यादवांनी हा किल्ला ताब्यात घेतला. यादवानंतर अल्लाऊद्दीन खिलजीकडे व त्यानंतर फारुकींकडे हा किल्ला होता. इ.स. १६०१ मध्ये खानदेश सुभा मुघलांकडे गेला त्यावेळी भडगावच्या रामजीपंतांनी अशिरगडच्या वेढ्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना जहागिरी देण्यात आली, त्यात राजदेहेर किल्ल्याचा समावेश होता. शिवकालीन पत्रात या किल्ल्याचा उल्लेख नाही, पण १०९ कलमी बखरीत शिवाजीमहाराजांच्या किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा समावेश केला आहे यावरून कदाचित १६७० च्या दरम्यान हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. पुढे १७५२ च्या भालकीच्या तहात निजामाकडून हा भाग पेशव्यांनी घेतला. इ.स. १७६२ मध्ये माधवराव पेशव्यांनी राजदेहेर किल्ला विठ्ठल शिवदेव विंचुरकर यांच्याकडे सोपवून १० हजार रुपयांचा सरंजाम किल्ल्याला मंजूर केला. हि सनद देताना अशी अट ठेवली होती कि शिबंदीचा खर्च शक्य तितका कमी ठेवावा किमान मागील खर्चापेक्षा वाढु नये. या दहा हजार रुपयातच गडाची डागडु़जी करावी. यासाठी वेगळा खर्च दिला जाणार नाही. पुढे १६६४ मधे पेशव्यांनी खानदेशचा सरसुभेदार नारो कृष्ण याला पत्र पाठवून, " राजदेहेर किल्ला कोणत्या अवस्थेत आहे तसेच त्यावर कोणत्या वस्तु आहेत याची यादी पुण्याहून पाहणी करण्यासाठी आलेल्या कारकुनास देण्यास सांगितले होते. इ.स. १७६४ मध्ये चाळीसगावचे जहागिरदार जगजीवनराम व माधवराव या पवार बंधूंनी बंड केल्यावर दुसर्‍या बाजीरावाने विठ्ठलराव विंचूरकर यांना चाळीसगावावर पाठविले. त्यांनी पवारांचे बंड मोडून राजदेहेर ताब्यात घेतला.

१७९६ नंतर १८१८ पर्यन्त हा किल्ला नाममात्र मराठ्यांच्या ताब्यात होता. हा काळ अस्थिरतेचा गेला. १८१८ मध्ये मराठ्यांना राज्य गमवावे लागले. कर्नल मॅकडॉवेल हा औरंगाबादमार्गे एप्रिल १८१८ मधे चांदवड येथे आला व १० एप्रिल १८१८ ला चांदवडचा किल्ला त्याने घेतला. त्यानंतर त्याने आपला मोर्चा राजदहरेकडे वळविला. त्यावेळी किल्ल्यावर मराठ्यांची अरब शिबंदी होती. १८१८ मध्ये हा किल्ला मराठ्यांचे सरदार पाटण्याच्या निकम कुलातील देशमुखांच्या ताब्यात होता. हे निकम देशमुख निकुम्भांचे वंशज असल्याचे सांगितले जाते. 

कर्नल मॅकडॉवेल या किल्ल्याच्या पायथ्याशी आला व मुकाट्याने गड ताब्यात देण्याचा निरोप त्याने किल्लेदाराला, निकम देशमुखांना पाठवला. पण हा निरोप किल्लेदार व आतल्या अरबी सैनिकांनी  धुडकावून लावला व आतून गोळीबार व जेजल्याचा मारा सुरु केला. दरवाजावर व  कड्यांच्या बाजूला दगडांच्या राशी रचून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मराठा सैन्यास पुष्कळ प्रतिकार करता आला. नाईलाजाने ईंग्रजांना लढाईची तयारी करावी लागली. ठिकठिकाणी मोर्चे बसवून ११ एप्रिलला ईंग्रजानी तोफा डागायला सुरवात केली. १२ एप्रिलला ते आणखी पुढे सरकले. किल्ल्यावरच्या सैनिकांनी पुढे येउन ब्रिटीशांवर मारा सुरु केला, पण फारसा उपयोग झाला नाही. म्हणून मराठ्यांनी ब्रिटीशांकडे निरोप पाठवला कि ते जर सैनिकांचे थकलेले पगार देणार असतील तर किल्ला त्यांच्या हवाली केला जाईल. मात्र ब्रिटीशांनी हि अट नाकारली,  फक्त खाजगी चिजवस्तू घेऊन पळून जाण्याची मुभा आक्रमकांनी देण्याचे मान्य करून दोन तासांचा अवधी विचारासाठी दिला. फक्त सैनिकांचे वैयक्तिक धन घेउन जाण्यास परवानगी दिली. व आतील सैनिकांना निर्णय घेण्यास दोन तासाचा अवधी दिला. याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून ईंग्रजांनी शेजारच्या टेकडीवर तोफा चढवून किल्ल्यावर मारा करायचे ठरले. यापुर्वी हा प्रयोग बर्‍याच ठिकाणी यशस्वी झाला होता. मात्र टेकडीवर तोफ नेणे अवघड होते. यासाठी तोफेचे सुट्टे भाग करुन टेकडीवर नेले व तिथे जोडून रात्री नउ वाजता तोफ मार्‍याला सज्ज झाली. सर्व तयारी झाल्यानंतर तोफगोळ्यांचा मारा सुरु झाला. एक तोफगोळा दारुकोठारावर पडला आणि ज्याच्या जीवावर गड लढवायचा तेच नष्ट झाले. सहाजिकच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेउन सैनिक निघून गेले. दुसर्‍या दिवशी म्हणजे  १५ एप्रिल १८१८ला जेव्हा ब्रिटीशांच्या ताब्यात गड आला तेव्हा जिवंत ४० माणसे, पाच मृत व्यक्ती, १२ तोफगोळे आणि खजिना हातात पडला.

राजदेहेरे जिंकल्यावर इंग्रजांनी राजदेहेरे ऐवजी चाळीसगाव हे मुख्य ठिकाण केले व मिर फास्त आली जहागीरदार याला चाळीसगावची जहागिरी दिली. नंतर त्याचीही जहागिरी काढून घेतल्याचे दिसते. तेव्हापासून राजदहरे गाव ओस पडले. 

- समाधान महाजन 


संदर्भग्रंथः-

१) जळगाव जिल्हा गॅझेटियर

२) उपेक्षित दुर्गांचा ईतिहास- प्रा.डॉ. जी.बी. शहा.

३) जळगाव जिल्ह्यातील किल्ले व गढया- नी. रा. पाटील 




लोणार सरोवर

लोणारचे जगप्रसिद्ध सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. आम्ही 2021 मध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी या ठिकाणी गेलो. या आधी 2003-04 मध्ये मी गेलो होतो त्यापेक्षाआता खूपच सकारात्मक बदल या ठिकाणी झालेले मला दिसले. पूर्वी सरोवराच्या कोणत्याही ठिकाणाहून लोक खाली उतरत असत. त्यावर कोणतेही निर्बंध नसल्याने खाली कचरा घाण देखील होत असे. ज्या गोमुखातून पानी पडते व सरोवरात जाऊन मिळते तिथे लोक आंघोळ करत कपडे धुवत आता या सर्व प्रकारांवर बंदी आलेली आहे. ठीकठिकाणी सुरक्षारक्षक व फॉरेस्ट ची लोक असतात. त्यामुळे आता खाली देखील स्वच्छता आहे. 20 नोव्हेंबर 2015 मध्ये लोणार हे वन्यजीवसंरक्षक अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले तसेच नोव्हेंबर 2020 मध्ये या ठिकाणाचा समावेश रामसेर साईट मध्ये करण्यात आला आहे.

सत्ययुगात लोणार सरोवर वैरज तीर्थ (वैरज तीर्थ) या नावाने ओळखले जात असे. लोणासुराच्या कथेनुसार विष्णूने लोणासुराचा वध केला व या सरोवराच्या खोलगट भागात त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या रक्तापासून येथील सरोवरातील पाणी तयार झाले, अशी आख्यायिका आहे. भोगावती कुंडात भगवान रामाने स्नान केले होते. पांडवांच्या काळात युधिष्ठिराने येथे वडिलांचे श्राद्ध केले होते , असेही सांगितले जाते. भारतीय पुराणात लोणार सरोवर आणि परिसराला कपिलतीर्थ , विरजतीर्थ , धारातीर्थ , नाभीतीर्थ , तारातीर्थ , पवित्रतीर्थ , पद्मसरोवर , पंचाप्सर आदी विविध नावे आहेत. स्कंद पुराणात ब्रह्मदेव , नारदमुनी , कपिलमुनी , अगस्तीऋषी , भृगुऋषी , याज्ञवल्क , शुक्राचार्य आदी ऋषीमुनींनी लोणार सरोवर परिसरात तपश्चर्या केल्याचा उल्लेख आहे.  कृतयुगात लोणार  या गावाची स्थापना झाली, अशी दंतकथा आहे. त्याचे जुने नाव ‘विरजक्षेत्र’ असे होते. स्कंदपुराणात वर्णिलेल्या लोणासुराची (लवणासुराची) कथा याच ठिकाणाशी निगडित असावी. विरजमाहात्म्यात याचा तीर्थ म्हणून उल्लेख आहे. प्राचीन भारताचा इतिहास पाहता ही सरोवराची भूमी दंडकारण्याचा भाग होती याचे संदर्भ मिळतात. म्हणून या भूमीला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. 

लोणार सरोवराचा शोध १८२३ साली ब्रिटिश लष्करी अधिकारी सर सी. जी. ई. अलेक्झांडर यांनी लावला आणि त्यानंतर जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली असे म्हणतात. 

शास्त्रज्ञांच्या मते दहा लाख वर्षापूर्वी ६९ मी. रुंदीच्या व वीस लक्ष टन वजनाच्या अशनी पडल्याने १,९००  मी. व्यासाचे व १९०  मी. खोलीचे विवर निर्माण होऊन तेथेच या गोलाकार सरोवराची निर्मिती झालेली असावी. या सरोवराचा बाह्य परिघ ६ किमी. अंतर्परिघ ३.५ किमी. व खोली ९० ते १९० मी. आहे. सरोवराच्या कडा १३० मीटरपर्यंत उंचावलेल्या आहेत. कडांवर काचेच्या छोट्या कणांपासून १० ते १५ सेंमी.पर्यंत आकाराचे काचेचे तुकडे पडलेले आढळतात. सरोवराचे पाणी अत्यंत खारट व मचूळ आहे. मात्र काठावरील व आजूबाजूच्या विहिरींमधील पाणी गोड आहे. सरोवराच्या पाण्यात आढळणारे क्षार, मीठ आणि अन्य पदार्थ अन्यत्र कोठेही न सापडणाऱ्या प्रकारचे आहेत. काहींच्या मते चुनखडीयुक्त विवराचे प्रचंड छत कोसळून तेथे या सरोवराची निर्मिती झाली असावी तर दख्खनच्या पठारावरील ज्वालामुखीउद्रेकाच्या वेळी जोराच्या वायुरूप स्फोटामुळे ज्वालामुखीच्या खोलगट भागात हे सरोवर निर्माण झाले असावे, असेही काहींचे मत होते. परंतु अलीकडील काळात केलेल्या संशोधनावरून उल्कापातामुळेच हे सरोवर तयार झाले असावे, असे शास्त्रज्ञांच निश्चित मत बनले आहे. बेसॉल्ट खडकरचना(अग्नीजन्य) असलेल्या प्रदेशातील अशा स्वरूपाचे हे जगातील एकमेव विवर असावे. अशाप्रकारचे बेसॉल्ट खडका पासून तयार झालेले सरोवर मंगल ग्रहावरच सापडत असल्याने  लोणार सरोवराचे महत्व वाढले आहे. जगातील उल्कापाषाण पतनामळे निर्माण झालेल्यांमध्ये हे तिसऱ्या क्रमांकाचे मोठे विवर आहे. एकूण चार सरोवरांमध्ये अॅरिझोना (अमेरिका) , ओडेसा (अमेरिका) , बोक्सव्होले (ऑस्ट्रेलिया) आणि लोणार (भारत) यांचा समावेश आहे. लोणारच्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराच्या निमिर्तीबाबत विविध मतप्रवाह आहेत. या विवरात दडला गेलेला उल्कापाषाण साधारण ६००  मी. खोलीवर रुतून बसला असावा, असा अंदाज आहे.

सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५,७०,००० ± ४७,००० वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे. सरोवराच्या वयाचे अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. थर्मोल्युमिनेसेन्स तंत्रज्ञानावरून काढलेले वय अंदाजे ५२,००० वर्ष आहे. अलीकडील अरगॉन डेटिंग वापरून काढलेले वय ५,४७,००० आहे. वयाचा नवीन अंदाज सरोवराच्या कडेला झालेल्या झिजेशी सुसंगत आहे.

जून २०२० या महिन्यात लोणार सरोवराचे पाणी लाल रंगाचे झाले होते. तज्ञांच्या मते हे पाणी तलावाच्या तळाशी काही रासायनिक क्रिया घडून आल्यामुळे किंवा हॅलो बॅक्टीरिया व ड्युनोलीला या  बॅक्ट्रियामुळे झाला असावा असे म्हणतात.परंतु या घटनेमुळे लोणार सरोवर पुन्हा एकदा जगभरात चर्चेत आले होते.     

लोणार सरोवराभोवती अनेक मंदिरे असून ती बव्हंशी मोडकळीस आलेली आहेत.  लोणार सरोवराच्या काठावर दहाव्या शतकापासून तर तेराव्या शतकापर्यंतचे जवळपास २७ मंदिरे आहेत. त्यातील अनेक मंदिरे हे यादव काळात बांधली आहेत. या मंदिरामध्ये  महादेव मंदिर, राम मंदिर, देवीचे मंदिर, सूर्य मंदिर कृष्ण मंदिर इत्यादी मंदिरांचा समावेश आहे.यातील अनेक मंदिर नामशेष झालेले आहे. या सरोवरात प्रवेश करतांना सुरवातीलाच विवर सारखा दिसणारा खड्डा आहे. येथेच हनुमानाचे मंदिर आहे.कमळजा देवी मंदिर , दैत्यसूदन मंदिर , शंकर गणेश मंदिर , रामगया मंदिर , विष्णू मंदिर , वाघ महादेव मंदिर , मोर मंदिर , अंबरखाना मंदिर , कुमारेश्वर , पापहरेश्वर , सीता न्हाणी , शुक्राचार्याची वेधशाळा , याज्ञ वल्केश्वर , धारेजवळील मंदिर , ब्रह्मकुंड , यमतीर्थ , लोणारची धार , उंबरझिरा (औदुंबरतीर्थ) , सोमतीर्थ , लिंबी बारव (वायूतीर्थ) , अगस्तीतीर्थ , त्रिपुरुषांचा मठ , आडवा मारोती आदी मंदिरांनी लोणार नगरी समृद्ध आहे. सम्राट अशोक , वाकाटक , सातवहन , चालुक्य यांच्या काळात या सरोवर परिसरातील विविध मंदिरांची निर्मिती झाली. जैन राजांनीसुद्धा मंदिरे बांधली आहेत. यादवांनी मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला.

लोणार गावाच्या मध्यभागी विष्णूने ज्या ठिकाणी लोणासुरावर विजय मिळविला असे मानले जाते, तेथे दैत्य-सूदन हे सुंदर व प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे यादवकालीन हेमाडपंथी वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. याशिवाय नरसिंह, गणपती, रेणुकादेवी, कुमारेश्वर व मारुती यांची अन्य उल्लेखनीय मंदिरे आहेत. निझाम व पेशव्यांच्या काळातही लोणारचा विकास झाला. ब्रिटिश काळात कर्नल मॅकेन्झीने लोणारचा सविस्तर अभ्यास केला. त्याच्या नोंदीनुसार , तेव्हा लोणारला ३२ मंदिरे , १७ स्मारके , १३ कुंड आणि पाच शिलालेख होते.

- समाधान महाजन 

संदर्भ - 

1) वर्‍हाडचा इतिहास - या.मा.काळे

2) मराठी विश्वकोश

3) www.wikimapia.org

4) www.buldhana.nic.in

अनंत सामंत

 

के फाईव ही अनंत सामंत यांची कादंबरी जबरदस्तच आहे. अजुन पर्यंत एखाद्या वेबसीरिज वाल्यांच्या ती का लक्षात आली नाही असे वाटते. अवघ्या 105 पानांमध्ये  कंटेंट ठासून भरला आहे. एकदा का पुस्तक वाचायला सुरू केलं की पूर्ण होइस्त व ठेवता येणं अशक्य. 

मुळातच सामंत हे एक लेखक म्हणून चांगले व ताकदीचे  आहेतच पण ते आयुष्य देखील भन्नाट च जगले आहेत. आखून दिलेल्या रेषेवर उभ्या आयुष्यात ते कधी गेले नाहीत म्हणून जीवनाची विविध रूपे जवळून त्यांनी पाहिली. आणि म्हणून कदाचित त्यांच्या लिखाणात जाणवणारी विविधता व त्या त्या वेगळेपणा तील सूक्ष्म मांडणी वाचकाला अचंबित करते. 

ऑक्टोबर एंड मध्ये उल्लेख येणाऱ्या आर्ट गॅलरी, चित्रकाराच्या रोजच्या आयुष्यात तो वापरत असलेली भाषा आणि एकूणच त्या क्षेत्रातील बारकावे पाहता वाटत की लेखकाने अनेक वर्ष त्या क्षेत्रात घालवले असावेत किंवा मग ते स्वतःच पट्टीचे चित्रकार असावेत. 

त्यांची के फाई व वाचतांना  तर अनेक धक्के बसतात. आजच्या फॅमिली मन वेब सिरीज सारखे  किंवा त्याही पेक्षा खुंखार अशी ही रचना आहे. यातील वर्णन वाचतांना अनेकदा ती डोळ्यापुढे घडत आहेत इतके जिवंत चित्रण सरांनी केले आहे. 

सामंत यांच्या लिखाणात निर्दयी जाणवेल इतकी तटस्थता आहे. एकाचवेळी वाचकाच्या  मानवी मन व हृदयाला चुचकारत  असताना ते स्वतःला तटस्थ तर ठेवतातच पण त्यांचा नायक त्याहीपेक्षा कठोर असतो. अनेकदा वाचकाला नायकाचा राग येऊ शकतो.... 

हे विशेषतः जाणवते सामंतांची फेमस एम टी आयवा मारू वाचतांना. ही कादंबरी वाचून झाल्यावर सरांशी बराच वेळ बोलणे झाले होते... त्या वेळी इतर बोलण्यासोबतच  त्यांनी सांगितले होते की के फाईव तुला नक्की आवडेल. आणि अर्थातच.... 

त्यांच्या कादंबरीची नायिका ही शोभेची बाहुली नसते. परिस्थिती सोबत मिळेल त्या साधनाने व मिळेल त्या सहकार्याने ती लढत असते. एक वेळ अशी येते की कादंबरी मुळातच तिच्यासाठी लिहिलेली आहे की काय अशी शंका यावी इतपत तिचा लढा ती स्वतः चाा मानते व जीवनाला झुंज देते.... शरीराचे पाश तर ती केव्हाच फेकून देते किंबहुना आपल्या सोबत वाचकाला देखील फेकण्यास भाग पाडते....नग्न देहापेक्षा माणसाच्या स्वभावातील क्रूर नग्नता एखादा बुरखा टरा ट र फाडावा त्या प्रमाणे त्याप्रमाणे फाडून ती उभा करते....तेव्हा कादंबरी एका वेगळ्याच टप्प्यावर पोहचलेली असते. 

आजच्या   पिढीला अनंत सामंत  नाव माहीत आहे की नाही ठाऊक नाही. माझा  अनुभव   तरी नकारात्मक आहे. एम टी आयवा मारू म्हटल्यावर एकाने ही शिवी आहे का असेही विचारले होते.....

असो, आता त्यांच्या उरलेल्या पुस्तकांची सुरूवात आश्र्वस्थ ने करतो.

- समाधान महाजन

पारोचा देवदास अर्थात रॉबर्ट गिल(अजंठ्यांतील चित्रांचा चित्रकार)

 11 जुलै 2021च्या सकाळी जळगावमध्ये सकाळपासून पाऊस सुरू झाला होता. आम्ही निघून भुसावळला जाईपर्यंत पावसाने चांगलाच वेग पकडला होता. नव्यानेच झालेल्या चारपदरी मार्गावर सगळीकडे पाणीच पानी पसरले होते. वाहने पार्किंग लाइट लाऊन हळुवार जात होती. भुसावळच्या रेल्वे डीआरएम कार्यालयाच्या थोडे पुढे गेले की रस्त्याला लागूनच कॅथॉलिक सीमेट्री आहे. ब्रिटिश कलावधीतील अनेक युरोपियनांच्या समाध्या या ठिकाणी आहेत. आम्ही पोहचलो तेव्हा पाऊस थांबला होता. सीमेट्रीचा दरवाजा बंद होता पण आम्हाला पाहताच तेथे अनेक वर्षांपासून कामाला असणारे इंगळे नावाचे गृहस्थ लगेचच आले. दरवाजा उघडून आत गेलो. किमान मी तरी पहिल्यांदाच एखाद्या ख्रिश्चन सीमेट्रीमध्ये पाय ठेवत होतो. आत सगळीकडे गवत व झाडे वाढलेली होती. अर्थात मधला मार्ग चांगल्या स्थितीत होता. त्यावरून चालत आम्ही थोडे पुढे गेलो आणि डाव्या बाजूला असलेल्या एका कबरीजवळ थांबून इंगळे म्हटले की हीच ती कबर. 
होय, हीच ती कबर होती जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यातील चित्रे ज्याच्यामुळे पहिल्यांदा जगापुढे आली व प्रसिद्ध झाली त्या रॉबर्ट गिलची. स्थानिक पारो नावच्या आदिवासी युवतीच्या प्रेमात असणार्‍या देवदासची.     

28 एप्रिल 1819 रोजी जॉन स्मिथ नावाचा एक यूरोपियन सैनिक शिकारीच्या मागावर अजंठाच्या या परिसरात आला आणि आता प्रसिद्ध असलेल्या व्यू पॉइंटवरून त्याला 10व्या क्रमांकाच्या लेणीची कमान दिसली. ही अजिंठा लेणीच्या शोधाची सुरुवात होती. अर्थात येथील आजूबाजूच्या स्थंनिकांना याची माहिती होती पण जगासाठी हा मौल्यवान ठेवा लपलेला होता. जॉन स्मिथने या लेणीचा शोध लावल्यानंतर पुढील 24 वर्ष काहीच झाले नाही. पण ब्रिटीशांच्या शिरस्त्याप्रमाणे अहवाल तयार झाले. अभ्यास झाला. अखेर 1844 मध्ये कंपनीने कॅप्टन रॉबर्ट गिलची नियुक्ती अजिंठ्यावर केली. 

कोण होता रॉबर्ट गिल?  

26 सप्टेंबर 1804 ला लंडनच्या बिशपगेट येथे रॉबर्ट गिलचा जन्म झाला.गिल वयाच्या 19 व्या वर्षी पी.पी.ग्रेलीमर यांच्या शिफारशीने जेम्स पॅटीस यांच्या आदेशानुसार मद्रास येथील इस्ट इंडिया कंपनीच्या ‘‘44 मद्रास नेटिव्ह या सैन्य दलात’’ भरती झाल्यानंतर भारतात आला. मद्रास आर्मीत तो एक कॅप्टन होता. 1843 पर्यन्त त्याने आर्मीच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी काम केले. तो लंडन रॉयल एशियाटिक सोसायटीचा क्वालिफाइड आर्टिस्ट होता. 

रॉबर्ट गिलची अजिंठा येथे नियुक्ती-  कोर्ट ऑफ द डायरेक्टर्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनीने त्याच्यातील सुप्त कलाकाराला ओळखून 1 ऑक्टोबर 1844ला अजिंठ्यातील चित्र-शिल्पांच्या आरेखनासाठी (ड्राफ्समन) अजिंठा येथे नियुक्ती दिली. त्यात त्याला एक सहाय्यक ड्राफ्समन व तीन स्थानिक कुशल कारागीर ठेवण्याचे अधिकार दिले. त्याने वेल्लोरमधला एक निष्णात चित्रकार सहायक म्हणून मिळविला.  रॉबर्ट गिलची या कामासाठी निवड करताना केलेला शिफारशी शेरा असा आहे, ‘‘आलेखकार म्हणून कॅप्टन गिलचे कौशल्य सर्वविदित आहे. प्रस्तावित काम जोखमीचे आहे. ते निभावताना साहसी आयुष्य जगण्याची ओढ पाहिजे. कॅप्टन गिलची कलाकारी साहसाची जी धारणा आहे त्याचा या कामगिरीशी अगदी मेळ बसतो.’’

अजिंठा येथे आगमन - 13मे1845 ला सतरा सुरक्षा जवानांसह रॉबर्ट गिल अजिंठ्याला आला. असाईच्या लढाईच्या वेळी जिथे ड्यूक ऑफ वेलिंग्टन राहात होता तोच बंगला निवासाकरिता गिलला दिला गेला. (काही ठिकाणी असा उल्लेख आहे की, अजिंठा येथील सैन्य प्रशिक्षण केंद्राच्या स्थानिक वैद्यकीय उपचार केंद्रात तो राहत असे. त्या ठिकाणी आज ग्रामीण रुग्णालय अस्तीत्वात आहे. त्यासमोरील प्रवेशद्वारावर असलेल्या इमारतीत रॉबर्ट गिल अनेक वर्ष राहिला. त्याला स्थानिक लोक गिल टोक म्हणून ओळखतात.) तो १३ मे १८४५ रोजी पोहोचला. त्यानंतर चार महिन्यांनी सप्टेंबरमध्ये चित्रांच्या गरजेचे साहित्य पोहोचले. 

रॉबर्ट गिलपुढील आव्हाने व त्याचे काम -  गिलचा  हा मुक्काम औरंगाबादपासून ६३ मैलांवर किंवा जालन्यापासून ५४ मैलांवर होता. टपाल घ्यायला किंवा द्यायला, सामानसुमान खरेदीला, पाठविलेली वस्तू मिळवायला किंवा पाठवायला एवढे अंतर तुडविण्याखेरीज तरणोपाय नव्हता. त्याला नेमून दिलेले काम चांगलेच कठीण होते. तेही अनेक अर्थाने. उष्ण कोरडी हवा, दिवस चढावा तसतसे वाढणारे रणरण तापमान. रोज तेथून वाघिरा दरीपर्यंत यायचे. टेकाडे तुडवून लेण्यांशी पोहोचायचे. जनावरांचे भय आणि वाटेवरचा चोराचिलटांचा उपद्रव नेहमीचाच. गिल आणि त्याचा चमू यांची तिथली रोजची हजेरी म्हणजे तर भिल्लांच्या दृष्टीने त्यांच्या मुलुखात केलेली घुसखोरीच! ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन गिलबरोबर शरीररक्षक देण्याची शिफारसदेखील केलेली होतीच. प्रवासाची यातायात इतकी की, कित्येकदा एखाद्या जरा बऱ्या गुंफेमध्येच तो आठ-दहा दिवसांसाठी मुक्काम करीत असे (फग्र्युसनने लिहिलेल्या वृत्तांतानुसार क्रमांक वीसची गुंफा). या सगळ्या जिकिरींची त्याला पूर्वकल्पना दिलेली होती. त्यात स्पष्ट लिहिले होते, ‘‘अनेक गुंफांमध्ये इतका अंधार आहे की झगमग दिव्यांखेरीज तिथले काहीही दिसणार नाही. काहींची छताची उंची इतकी आहे की शिडीवजा मचाण बांधूनच तेथील चित्रे दृग्गोचर होतील. काही गुंफांमध्ये चिखल-पाण्याचा  बुजबुजाट आहे. तिथे वायुविजन शून्यवत असते. एकूण वातावरण मलिन आणि रोगट आहे. मधमाश्यांची मोहोळे आणि वाघुळांचे थवे आहेत. भिंती आणि छतावरील ही राड आणि डागाळणाऱ्या मोहोळांचा निचरा केल्याखेरीज चित्रे दिसणार नाहीत.’’

त्याच्या हातातली चित्रसामग्री अर्थातच मूळ चित्रांपेक्षा अगदीच निराळी होती. त्याच्या किन्तानी पटाचा आकार मूळ चित्रांपेक्षा अर्थातच सरासरीने लहान होता. मूळ चित्रांबरहुकूम चित्रांमधली प्रमाणे तर राखायची, पण त्यातले तपशील सुटू द्यायचे नाहीत. (खरे तर निदान नजरेस पडू शकतात तेवढे तपशील तरी) प्रकाशाची मात्रा, रंगांची ठेवण, छटांचे मिश्रण असा सगळा तोल सांभाळण्याची बिकट कसरत साधायची होती. म्हटले तर चित्राचे चित्र, पण तरी मूळ चित्राचे लघुरूप. काही अगदी ‘लघु’ नव्हती. ९० चौरस फुटांचे किन्तान लागणारीदेखील होती. त्याने बहुतेक गुंफांचे नकाशे बनविले. अनेक चित्र/ शिल्पांतील आकृतींचे साधे सुटे रेखाटन करून केले. त्याची आणखी एक अडचण होती. या चित्रांतले प्रसंग, त्यामागची प्रेरणा आणि धारणा, त्यांचा गर्भितार्थ हे उमगावे तरी कसे? त्याचे आकलन होईल असे जे काही वाङ्मय असेल ते मला पाठवा असे त्याने लिहिलेदेखील. पण त्या काळात बुद्धचरित्र, इतिहास, जातककथा, त्यातील प्रसंग असे सहजसुगम आकलन आणि माहिती तुटपुंजीच होती. जी होती ती या चित्रांत कशी उमटली याची तर सुतराम जाणीव नव्हती.

हे अवजड काम पूर्ण करायला किती काळ लागणार? प्रारंभी गिलला वाटत होते की सुमारे अठरा महिने लागतील! तिथले अडथळे आणि अडचणींचा डोंगर त्याला अजून पुरेसा कळला नव्हता! त्याचे काम हरप्रकारच्या अडचणींनी

रेंगाळणार होते. तिथली साफसफाई हे पहिले काम! पावसाळ्यात वाघिरा ओलांडणे आणि वर गुंफांमध्ये पोहोचणे मुश्कील म्हणून काम ठप्प! १८५२ साली तर त्याचे किन्तानी कापडच चोरीला गेले! थंडीमुळे चोरांनी ते पळविले होते! त्यात लेण्यांचा अर्धगोली पसारा! त्यामुळे दिवस चढावा तसतशी प्रत्येक लेण्यांमधील सूर्यप्रकाशाची ठेवण बदलायची.  तसे काम करण्याची गुंफा बदलणे भाग पडायचे. उंचीवरील रेखाटने मचाणावरती पाठीवर झोपूनच करावी लागायची. १८५३ नंतर धाडलेल्या अनेक अहवालांमध्ये थकवा, आजारपण, रोगराई, औषधांची वानवा याबद्दल अनेकवार तक्रारी आहेत. एकदा चित्र पूर्ण झाले की त्यांचे तेल आणि रंग वाळायला दीड-दोन महिने जायचे. मग ते गुंडाळी करून टिनच्या डब्यात भरायचे. मुंबईमार्गे मद्रासला धाडायचे. कधी मूळ ‘हात देण्या’तील कमतरता व्हायची तर कधी हवा अतिकोरडी व्हायची, कधी सुरळी डब्यात भरताना हेळसांड व्हायची यामुळे काही चित्रांना चिराळलेपणा यायचा.

गिलच्या अजंठ्याच्या चित्रांचे प्रदर्शन - त्याने पाठविलेल्या रेखाटनांची, त्यावरून लाकडात खोदलेल्या उठावचित्रांची प्रसिद्धी आणि वाहवा होऊ लागली होती. क्रिस्टल पॅलेसमध्ये अनेक प्रकारची प्रदर्शने भरविली जात असत. नोव्हेंबर 1846 ला रॉबर्ट गिलने अजिंठ्याच्या आठ चित्रकृतींचा पहिला टप्पा पूर्ण केला होता. लंडनच्या इंडियन कोर्ट ऑफ द क्रिस्टल पॅलेस, सिडनेहॅम येथे सन 1851 ला त्याच्या अजिंठ्यावरील चित्रांचे प्रदर्शन भरले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतातील हा ठेवा सर्वप्रथम जगासमोर आला. रॉबर्ट गिलच्या एकूणच कामगिरीची दखल घेऊन 1 एप्रिल 1854 ला त्याला लष्करातील मेजर पदावर पदोन्नतीही देण्यात आली. या सर्व घडामोडींनंतर रॉबर्टने चित्रनिर्मितीच्या कामातील दुसरा टप्पा सुरू केला. त्याच्या या चित्रनिर्मितीच्या दोन वर्षांत (1854-55) भारतात प्लेगची साथ आली आणि त्यात 23 मे 1856 ला पारो हिचा मृत्यू झाला. या घटनेने रॉबर्ट अत्यंत दु:खी झाला.

ईस्ट इंडिया कंपनीच्या म्युझियमला १८५३ साली क्रिस्टल पॅलेस कंपनीच्या संचालकांनी रीतसर विनंती केली.

‘‘भारतीय कला आणि रूढींवर आधारित वेगळे दालन प्रदर्शनात असेल. त्यामध्ये कंपनीच्या संग्रहातील अजिंठा गुंफांची चित्रे प्रदर्शनामध्ये ठेवली गेली तर ती पाहण्याचा अनेकांना लाभ मिळेल. फार मोठ्या प्रमाणावर ती बघितली जातील.’’ या चित्रांचा कौतुकमय उदोउदो झाला. त्या काळात ओवेन जोन्स नावाचा ख्यातकीर्त वास्तुकार आणि नक्षीकार होता. १८५६ साली त्याने दुनियाभरच्या दागिन्यांचे सजावटी नमुने असलेले ‘ग्रामर ऑफ ऑर्नमेन्ट’ हे गाजलेले पुस्तक लिहिले. त्यातली भारतीय नक्षीकामाची उदाहरणे गिलच्या ‘अजिंठा चित्रां’वरून बेतलेली होती! त्याच सुमाराला प्रवाशांसाठी ‘भारतदर्शन’ मार्गदर्शक पुस्तकनिघाले; त्यातदेखील ही लेणी आणि तेथे तळ ठोकून राहिलेल्या गिलचा उल्लेख होता.

या धाडसी कलाकारीचे आपल्याला यथोचित श्रेय मिळावे अशी गिलची स्वाभाविक इच्छा आणि आकांक्षा होती. फग्र्युसनने हे प्रदर्शन पाहिले होते. त्याला या चित्रांचे अपार मोल वाटत होते. परंतु तो प्रदर्शनातील मांडणीवर फार नाराज झाला होता. तेथील प्रकाश यथोचित नसावा. खेरीज ही कुठली चित्रे आहेत? त्यांचे मूळ प्राचीनपण किती? त्यांचा संदर्भ काय? आणि महत्त्व काय? याची काही ओळखदेख न करताच ती मांडली गेली होती, अशी तक्रार त्याने नमूद केली आहे.

चित्रे जळाली-  १८६६ साली या क्रिस्टल हॉल नावाच्या भव्य वास्तूमध्ये मोठी आग लागली आणि गिलची ही तपश्चर्या एका फटक्यात भस्मसात झाली. त्यांचे कोठलेच छायारूपदेखील मागे शिल्लक नव्हते. कोणकोणती चित्रे गमावली हे सांगणेदेखील मुश्कील होते. हा काळ भारतातील ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट होता. एकीकडे 1857 च्या उठावाने कंपनी जेरीस आलेली असतांना अखेर 1858 पासून राणीच्या जाहीरनाम्याने कंपनीची सत्ता जाऊन ब्रिटिशांची प्रत्यक्ष सत्ता अस्तीत्वात आली. भारतात एकीकडे सुरू असणार्‍या या प्रचंड मोठ्या राजकीय सामाजिक उलथापालथीचा रॉबर्ट गिलसारख्या अवलियावर काहीही परिणाम झाला नव्हता. तो अजून अजंठ्याच्या चित्रातच बुडालेला होता. १८५८ नंतरसुद्धा उरलेसुरले काम आणि खूप पैसे मिळतील या आशेतला बेदरकार छांदिष्टपणा यात रमलेला गिल तिथेच राहिला होता. थोडाफार कर्जबाजारी झाला होता. सन 1857 ला त्याने स्वत:हून फोटोग्राफीचा अभ्यास सुरू केला. त्याने मागविलेल्या नव्या धाटणीच्या कॅमेऱ्याने त्याने घेतलेले अनेक फोटो होते. तेही त्याला जरा पडत्या किमतीला कंपनीला विकावे लागले! काही फोटो, रेखाटने आणि अपघातवशाने मद्रास डेपोत पडून राहिल्याने दहा चित्रे बचावली 

आता फोटोग्राफीकडे-  सन 1857 ला त्याने स्वत:हून फोटोग्राफीचा अभ्यास सुरू केला. याच कालखंडात त्याने अजिंठ्याची 29 चित्रे साकारली. त्यातले शेवटचे चित्र जुलै 1863 ला त्याने पूर्ण केले. डिसेंबर 1866 ला तो अजिंठ्यात असताना त्याची चित्रे जळाली, त्यातली 1850 ते 1854 या कालखंडातील पाच चित्रे शिल्लक ती https://collections.vam.ac.uk/item/O115446/copy-of-painting-inside-the-oil-painting-gill-robert/वेबसाईटवर आजही पाहायला मिळतात. अजिंठ्याची चित्रकला आणि त्या अनुषंगाने रॉबर्ट गिलच्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात घडलेल्या घटना हा त्याच्या आयुष्यातील एक टप्पा आहे. त्यानंतर त्याने 1863 ला 200 स्टेरीओग्राफिक प्रकाशचित्रांची 200 दृश्ये लंडनला पाठवली होती. या फोटोग्राफीच्या माध्यमातून अजिंठा, वेरूळ, खान्देशातील, पश्चिम विदर्भातील लोणार सरोवर, मुक्तगिरी, हेमाडपंती मंदिरे, किल्ले, मुस्लिम वास्तुकला यांची प्रकाशचित्रे काढून भारतातील हा विशाल सांस्कृतिक वारसा जगासमोर आणला. त्याची नोंद ब्रिटिश लायब्ररीने घेतली आहे. आजही ब्रिटिश लायब्ररीच्या ऑनलाईन वेबसाइटवर ही प्रकाशचित्रे हजारोंच्या संख्येने उपलब्ध आहेत. रॉबर्ट गिलच्या प्रकाशचित्रांमुळे हा ठेवा ख-या अर्थाने जगासमोर आला. ज्याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. 1864 साली त्याच्या या प्रकाशचित्रांचा संग्रह असलेली “One Hundred Stereoscopic Illustrations of Architecture and Natural History in Western India, photographed by Major Gill”,, शब्दांकन वास्तुरचनाकार जेम्स फर्ग्युसन व याच प्रकारचा दुसरा छोटा खंड जॉन मुरॉय यांनी प्रसिद्ध केला, त्याचं नाव होतं “The Rock-Cut Temples of India, illustrated by seventy-four photographs taken on the spot by Major Gill”, याचंही शब्दांकन वास्तुरचनाकार जेम्स फर्ग्युसन यांनी केले होते. 

इतर महत्वाचे कार्य- अर्थातच त्याचे काम केवळ अजिंठा या विश्वविख्यात नावापुरते सिमीत ठेवणे उचित ठरणार नाही. लोणार या जगप्रसिद्ध सरोवराची, अमरावतीच्या जवळ मेळघाटात असलेल्या जैन तीर्थक्षेत्र मुक्तगीरीच्या मंदिर-शिल्पसमूहाची सचित्र ओळख जगाला करून देणारा रॉबर्ट गिल हा जगातला पहिला प्रकाशचित्रकार आहे. www.users.globalenet.co.uk वर उपलब्ध माहितीनुसार 1867 ला तत्कालीन शासनाकडून रॉबर्ट गिलवर अजिंठ्याच्या फोटोग्राफीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 1868 त्याला शासनाने डेलमियर लेन्सचा कॅमेरा व केमिकल्स दिली होती. अथक परिश्रमाने त्याने मार्च 1870 ला हे काम पूर्ण केले आणि 1872-73 ला हा ठेवा त्याने तत्कालीन ब्रिटिश सरकारला दिला. 

रॉबर्ट गिल व त्याची प्रियसी पारो –1845 मध्ये अजंठा येथे आल्यानंतर अजिंठ्यात लेण्यांच्या उत्खननाचे कामही जोरात सुरू होते. हजारो मजुर या कामात गुंतले होते. यातच एक म्हणजे लेणापुर गावची आदीवासी पारो. परिसराची माहिती असल्यामुळे पारो गिल यांना मदत करायची. हळु-हळु या संबधांचे प्रेमात रूपांतर झाले. ग्रामस्थांना यास विरोध केला. दोघांत तब्बल 10 वर्षांचे सहजीवन होते. यामुळे ग्रामस्थांनी तिला विष पाजुन मारले असे एक कथा सांगते. तर पारोचा मृत्यु आजारपणामुळे झाल्याचेही सांगीतले जाते. 


ना.धॊ. महानोरांचे खंडकाव्य "अजिंठा" – शिक्षक म्हणून मी जिंतुर येथे असतांना कवीमित्र श्री हरिष हातवटे यांनी मला प्रथम अजिंठा हा संग्रह वाचण्यास दिला. या वेगळ्याच कविता मी प्रथमच वाचत होतो. चौरस आकाराचे हे छोटेसे पुस्तक, त्यातील कविता आणि त्यातील पद्मा सहस्रबुद्धे यांची रेखाचित्रे छानच होती. महानोरांच्या काव्यात ऐतिहासिक कादंबरीप्रमाणे एकामागोमाग एक प्रकरणे नाहीत पण त्यांनी ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास करुन, कल्पनाशक्ती वापरुन एका तरल निर्मिती केली आहे. कविवर्य कुसुमाग्रजांची प्रस्तावनाही वाचनीय आहे. महानोरांचा हा संग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर ही गिल पारोची कथा अजून सर्वदूर पसरली. तो पर्यंत पारो-रॉबर्टची प्रेमकथा फारशी प्रसिद्ध नव्हती.  

अजिंठा चित्रपट - २०१२ मध्ये नितीन देसाईंचा "अजिंठा" चित्रपट आला आणि पारोच्या कथेला अजून प्रसिद्धी मिळाली. अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात, काठाकाठातला. झाडांच्या देठातला, रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला. या ना.धों. महानोर यांच्या कविताना चित्ररूप देऊन रुपेरी पडद्यावर आणले नितिन मनमोहन देसाई यांनी. 

एक आर्टिस्टची नजर घेऊन बनविलेला हा चित्रपट मराठी चित्रपटातील वेगळ्या विषयावर बनविल्या जाणार्‍या ज्या मोजक्या फिल्म्स आहेत त्यापैकि एक. मेजर रॉबर्ट गिल १९४४ मध्ये अजिंठ्याला आला. सैनिकी पेशाचा हा चित्रकार अजिंठा पाहून मंत्रमुग्ध होतो आणि त्याच बरोबर भाषेच्या पल्याड जाऊन पारो ह्या आदिवासी मुलीच्या प्रेमात पडतो त्याची ही कहाणी. महानोरांनी शब्दबद्ध केलेल्या ह्या शोकांतिकेत नैसर्गिक सौंदर्य आणि अजिंठ्यातील कलाकृती ह्या दोन्हींचा संयोग आहे. महानोरांच्या कविता कौशल इनामदारांनी संगीतबद्ध केल्या आहेत. यामध्ये ढोलकी आणि इतर एतद्देशीय वाद्ये वापरलेली आहेत. ही गाणी "जैत रे जैत" सारखी गळ्यात रुळली नाहीत तरी महानोरांच्या कवितेचा बाज राखून आहेत. सिनेमाचे सेट्स आणि अजिंठ्याचे विहंगम दृश्य ह्यांचे मिश्रण चांगले झाले आहे. गिलची चित्रे आकार घेतांना छान दाखवली आहेत. पारो जंगलातील संपत्ती वापरुन रंग तयार करते ते ही सुंदर रितीने दाखवले आहे. तिला इंग्रजी येत नसले आणि गिलला मराठी येत नव्हते तरी त्या दोघांना चित्रांमधील भव्यता आणि त्यामागची शब्दातीत पार्श्वभूमी माहीत असावी. ह्या प्रेमकथेला जातककथा आणि बुद्धाचे तत्त्वज्ञान ह्यांची सुंदर जोड आहे.  नितीन देसाईंनी (आणि मंदार जोशी) लिहीलेल्या पटकथेमध्ये गिलच्या पाश्चात्य मनातील विचार आणि जलालचे भाषांतर छान दाखवले आहे. फ़ीलीप स्कॉट-वॉलेस आणि सोनाली कुलकर्णी आपापल्या भूमिकेत शोभून दिसले आहेत. 

खरे काय आहे? रॉबर्ट- पारो यांचा विवाह झाल्याचे इतिहासात कोठेही नमूद नाही. 1854-55 मध्ये भारतात प्लेगची साथ आली आणि त्यात 23 मे 1856 ला पारो हिचा मृत्यू झाला. या घटनेने रॉबर्ट अत्यंत दु:खी झाला. देश, धर्म, भाषा, सामाजिक बंधने या सर्वांच्या पलीकडे जावून पारोने रॉबर्टला खूप सहकार्य केले होते. पारोच्या मृत्यूनंतर रॉबर्ट गिलने ब्रश ठेऊन बंदूक हाती घेतली. 1857 च्या उठावाच्या वेळी तो सैन्यात पुन्हा दाखल झाला. पण तिथे त्याचे मन रमेना म्हणून 1861 मध्ये त्याने पुन्हा चित्रकलेला वाहून घेतले. 

 सन 1845 ते 1856 या 11 वर्षांच्या सहवासातून त्यांना कुठलेही अपत्य झाले नाही किंवा होणार होते असाही उल्लेख दिसून येत नाही. परंतु पारोबद्दल असलेल्या अत्यंत प्रेमापोटी रॉबर्टने तिची कबर सिल्लोड तालुक्यात

अजिंठा गावात बांधली. ‘‘टू द मेमरी ऑफ माय बिलव्हड पारो हू डाईड 23 मे 1856’’ अशा ओळी तिच्या कबरीवर लिहिल्या आहेत. आज या कबरीच्या बाजूला पोलीस स्टेशन आहे! पारोच्या विरहाने रॉबर्ट गिल दु:खात आरपार बुडाला हे अर्धसत्य आहे. कारण वयाच्या 52 व्या वर्षी 1856ला तो अजिंठा येथे असताना अ‍ॅनी नामक स्त्री त्याच्या सहवासात आल्याचे दाखले इतिहासात उपलब्ध आहेत. अ‍ॅनीने रॉबर्टच्या सहवासात 26 फेब्रुवारी 1866 ला मिल्ड्रेड मेरी गिल या मुलीला व त्यानंतर रॉबर्ट (बग्गी) गिल या मुलाला मुंबई येथे जन्म दिला असल्याच्या नोंदी आहेत.

चित्रपटामुळे पारोचे नाव सगळीकडे पोहचले असतांना अजिंठा गावातील तिच्या समाधीकडे मात्र दुर्लक्षच आहे. गाजर गवत, उकिरडा आणि घाणीचा सामना करत या समाधीकडे जावे लागते. 

रॉबर्ट गिलचा शेवट व समाधी- एप्रिल 1879 च्या पहिल्या आठवड्यात खान्देशातल्या कडक उन्हाळ्यात भुसावळच्या एका दवाखान्यात रॉबर्ट गिल उष्माघाताने फणफणत होता. त्यातच 10 एप्रिल 1879 ला त्याचे निधन झाले त्याच्या निधनानंतर भुसावळ रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या दफनभूमीत त्याचे दफन करण्यात आले, तेथे त्याची कबर आजही आहे. तिच्या आजूबाजूला गवत, झुडपे वाढलेली आहेत. आपल्या सांस्कृतिक ठेव्याला जगात नेणार्‍या गिलची व त्याला मदत करणार्‍या पारोची किमान कबर तरी आपण सुस्थितीत  राखायला पाहिजे. 

- समाधान महाजन 


संदर्भ – 

1) ‘त्यांची’ भारतविद्या : अजिंठा : तपश्चर्या आणि आहुती-  प्रदीप आपटे(दै.लोकसत्ता दि. 28 मे 2021)

2) रॉबर्ट गिल; प्रियकरापलीकडचा प्रज्ञावंत – रणजीत राजपूत (दै.दिव्य मराठीतील 2012 मध्ये प्रकाशित लेख)

3) अजंठा - भुजंगराव बोबडे (अजंठा विषयीचा एक लेख)

3) अजंठा – गौरी दाभोळकर (ऐसी अक्षरे, 29 डिसेंबर 2015)

4) अजंठा - ना.धों.महानोर 



यावलचा(जिल्हा, जळगाव) वैभवशाली इतिहास

यावल हा जळगाव मधील एक महत्वाचा तालुका आहे.  अंकलेश्र्वर शिरपूर रावेर बऱ्हानपुर महामार्गावरील यावल हे महत्त्वाचे गाव आहे पूर्वी यास यावल साखळी किंवा व्यावल असेही म्हणत. रावेर, फैजपुर, सावदा व यावल या भागात केळीचे महत्वपूर्ण पीक घेतले जाते. त्यास अनुकूल अशी इथली जमीन व वातावरण आहे. यावल मध्येच सातपुडयाच्या कुशीत  पाल हे थंड हवेचे व पर्यटनाचे ठिकाण आहे. या तालुक्याचा काही भाग हा सातपुडा पर्वताच्या परिसराने व्यापला आहे. यावल पूर्वी नीळ व हातकागद निर्मितीसाठी प्रसिद्ध होते. याच ठिकाणी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय आहे.  यावलच्या चहूबाजूंनी तटभिंती व चार दिशांना चार प्रमुख दरवाजे होते. दक्षिणेकडील दरवाजा अजूनही शाबूत आहे. उत्तरेकडील दरवाजाचे बुरूज अस्तीत्वात आहेत. शहराजवळ एक मोठी जुनी मशीद आहे.  
यावल मध्येच निंबाळकरांची गढी वा किल्ला असल्याचे ऐकले होते. जळगावला असेपर्यंत किमान तो पहावा अशी इच्छा होती. या रविवारी तो योग आला. इथली ही गढी वा किल्ला शोधण्यास फारसा वेळ लागला नाही. जवळपास गावाबाहेर पश्चिम बाजूला असलेल्या नदीच्या पलीकडील किनार्‍यावर ही गढी आहे. इथले कोर्ट कुठे आहे? असे जरी कोणाला विचारले. व तुम्ही कोर्ट पर्यन्त पोहचलात  तरी तुम्ही आपोआपच गढीच्या पायथ्याशी पोहचता. कारण इथले कोर्ट बरोबर गढीच्या  परिसरात आहे, किंबहुना आता जिथे कोर्ट आहे तो भाग पूर्वी गढीचाच असावा. कारण जेव्हा फिरून तुम्ही अलीकडील नदीच्या बाजूने खाली उतरता तेव्हा लक्षात येते की आताचे कोर्ट हे किल्ल्याच्या आतील बाजूस आहे. बाहेरून तटबंदीची बाजू दिसते. कोर्टच्या दक्षिणेच्या बाजूला उंचच उंच बुरूज दिसतात. त्या बुरूजांपासून व पलीकडील मोठ्या  भिंतीच्या अलीकडील भागापासून मध्येच असणार्‍या एक छोट्या जागेतून वर जाण्यास मार्ग आहे. कदाचित पूर्वी ते मोठे महाद्वार असावे. वर गेल्यानंतर पूर्वी भक्कम असलेल्या तटबंदीचे अवशेष किल्ल्याच्या चारी बाजूला आपल्याला दिसतात. पूर्वी कुठेतरी वाचले होते की किल्ल्यावर खूप कचरा व घाण आहे पण आता तसे काही दिसून येत नाही. बर्‍यापैकी किल्ला स्वच्छ आहे. येथील भव्य बुरूज हा 75.6 मी. लांब, 68.4 मी. रुंद आणि 45 मी. उंच आहे.  किल्ल्याच्या शाबूत असलेल्या भिंती मधून पूर्वीच्या बांधकाम कौशल्यासोबतच त्यांच्या आक्रमण व संरक्षण साठीची सिद्धता लक्षात येते. सुरूवातीला
आढळणार्‍या बुरूजांसोबत  पलीकडे देखील नदीच्या बाजूने एक मोठा बुरूज आढळून येतो. दक्षिण दिशेला गेल्यास यावल शहराचा एरिएल व्यू बघण्यास मिळतो. वरती पाण्याच्या दोन मोठ्या टाक्या आजही बघायला मिळतात. कदाचित मधील काही वर्ष वरती काही नसावे पण अलीकडे लावलेली झाडे आता बर्‍यापैकी वाढल्यामुळे भर उन्हात गेल्यास नक्कीच सावली मिळते व किल्ल्याचा आनंद घेता येतो. या किल्ल्याला अथवा गढीला निंबाळकरांची गढी किंवा निंबाळकरांचा किल्ला  असे म्हणतात. 
या गढीला वा किल्ल्याला निंबाळकरांचे नाव का पडले? कोण होते निंबाळकर?         हा किल्ला गोबादादा निंबाळकर यांचा मुलगा आप्पाजीराव याने बांधला होता.  ग्वाल्हेरच्या शिंदे यांच्या ताब्यात असताना यावल हे परगण्याचे मुख्य ठिकाण होते. सन 1788 मध्ये शिंद्यांने राव धार निंबाळकर यास या परगण्याचा अधिपती नेमले होते. निंबाळकर घराण्याकडे ही सत्ता कित्येक वर्ष राहिली. यावल परगण्यास लागून असलेले रावेर, थाळनेर व उंबर हे होळकरांच्या ताब्यात होते.
निंबाळकरांनी होळकरांना 3,50,000 रुपये देऊन हे भाग यावल परगण्यात समाविष्ट केले. राव धार निंबाळकरांचा
मुलगा सुराजी राव निंबाळकर याने कर्नाटकी (नाईकडा) शिबंदी ठेवली होती. या कर्नाटक शिबंदीचा उपयोग त्याने शेजारच्या जमीनदारांच्या प्रदेशात केला होता. सन 1821 मध्ये त्याने या शिबंदीचा ताबा ब्रिटीशांकडे हस्तांतरित केला.  काही काळ यावल परगणा कठीण परिस्थितीतून गेला. त्यावेळी सुराजीराव निंबाळकरने आपले अस्तित्व टिकविण्यासाठी भिल्ल व पेंढार्‍यांना  सक्रिय मदत केली. 1837 ते 1843 यावल हे शिंदेंच्या ताब्यात होते. सन 1843 मध्ये ब्रिटीशांनी हा परगणा ताब्यात घेतला. ब्रिटिश काळात या किल्ल्याचा उपयोग महालकारी कार्यालय म्हणून करण्यात आला होता. गडावर दोन मोठ्या इमारती होत्या. त्यातील एक जुनी कचेरी व दुसरी दुमजली इमारत ही निंबाळकरांचे निवासस्थान होती. पुढे तिला निमकचेरी असे संबोधण्यात जाऊ लागले. 
या गढीचे ठिकाण हे हडप्पासमकालीन/ ताम्रपाषाण वा मध्ययुगीन काळातील साईट आहे का? 
आज नेहमीप्रमाणे माझ्यासोबत इतिहासकार मित्र श्री भुजंगराव बोबडे होते. आम्ही किल्ल्यात प्रवेश करण्याच्या वेळेसच बोबडे सरांचे लक्ष खाली विखुरलेल्या पॉटरी/खापरांच्या तुकड्यावर पडली. सरांनी ती आम्हाला दाखविली. नंतर आम्ही व्यवस्थित पाहिले असता तशा प्रकारची अनेक खापरे त्या भागात पसरलेली दिसली. बोबडे सरांच्या म्हणन्यानुसार यांचा कालावधी प्रागैतिहासिक वा प्राचीन असू शकतो.  तसेच इथे मध्ययुगीन काळातील देखील काही खापरे आढळतात. यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. कारण या गढीला आजपर्यंत अशा अर्थाने कधी पाहिले गेले नाही. मुळात ही गढी  नदी किनारी आहे व पांढर्‍या मातीचा वापर करण्यात आला आहे. होऊ शकते की आधीच्या अस्तीत्वात असलेल्या पुरातत्वीय साईट वर या किल्ल्याचे बांधकाम झाले असावे किंवा
त्याची माती किल्ल्यासाठी वापरण्यात आली आसावी. कालांतराने किल्ल्याच्या भिंती व बुरूज ढासाळल्याने ही जुनी अवशेष वर आली असावीत. पण हे सर्व अंदाज आहेत. यावर पुरातत्व खात्यानेच अधिक प्रकाश टाकणे गरजेचे आहे.  आम्हाला त्या दिवशी जे काही आढळले त्यावर  खालील मीडियात आलेल्या बातम्यांच्या लिंक मी येथे शेअर करतो.                                                    1)https://m-tribuneindia-com.cdn.ampproject.org/v/s/m.tribuneindia.com/news/nation/late-harappan-era-artefacts-found-at-virgin-site-in-jalgaon-281570?amp_js_v=0.1&usqp=mq331AQKKAFQArABIIACAw%3D%3D#origin=https%3A%2F%2Fwww.google.com&prerenderSize=1&visibilityState=prerender&paddingTop=32&p2r=0&csi=1&aoh=16260660939334&viewerUrl=https%3A%2F%2Fwww.google.com%2Famp%2Fs%2Fwww.tribuneindia.com%2Fnews%2Fnation%2Flate-harappan-era-artefacts-found-at-virgin-site-in-jalgaon-281570&history=1&storage=1&cid=1&cap=navigateTo%2Ccid%2CfullReplaceHistory%2Cfragment%2CreplaceUrl%2CiframeScroll


व्यास मंदिर - याच निंबाळकर किल्ल्याच्या पुढे त्याच नदीकाठी सुंदर  व्यास मंदिर आहे. अलीकडे दक्षिण
भारतातील शैलीप्रमाणे एक मोठे प्रवेशद्वार मंदिराच्या समोर बांधण्यात आले आहे. तसेच मंदीरापर्यन्त जाण्यासाठी नदीवर सीमेंटचा एक छोटा पूल देखील बांधण्यात आला आहे. अलीकडे सुंदरसे गार्डन देखील आहे. मंदिराच्या पुजारी व सेवेकर्‍यांना विचारले असता त्यांनी सांगितले की भारतात महर्षि व्यासांची फक्त तीन मंदिरे आहेत त्यातील हे एक आहे. या ठिकाणी व्यासांचा निवास होता असे म्हणतात. दरवर्षी व्यासपौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते असे त्यांनी सांगितले. 

- समाधान महाजन