जीवन सुसह्य कसे होईल?

जीवन सुसह्य कसे होईल?

आजकाल मुलामुलींना सगळ लगेच instant पाहिजे. पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी .....(मी शाळा कॉलेजात होतो तेव्हा..’ आमच्या लहानपणी’.. असे वाक्य वाचले कि तो लेख किंवा कथा जे काही असेल ते कधीच वाचायचो नाही, आयला जो उठतो तो आम्हाला डोसच देतो, उठता लाथ व बसता बुक्की असं काहीसा प्रकार वाटायचा. आमच्या लहानपणी असे लिहिणारा एखादी म्हातारा असेल व  त्याचे outdated विचार आपण कशाला वाचायचा वा ऐकायचा असा पोक्तपणा त्या अननुभवी वयात ठासून भरलेला होता.😉 तर असो,  पण आता अनुभवांती व वयांती या निष्कर्षाला मी आलोय कि या वाक्याशिवाय जे काही सांगायचे त्याला पूर्तता येत नाही. तर आता पर्यंत जे टिकून आहेत त्यांनी पुढे वाचण्यास हरकत नाही😂)

आजकाल मुलामुलींना सगळ लगेच पाहिजे. पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी साधारण मध्यमवर्गीय घरातून काही बाबी समान असायच्या जशा कि, आई वडिलांचे मुख्य ध्येय असायचे मुलांचे शिक्षण, नोकरी लग्न, स्वतःची नोकरी किंवा उद्योग सांभाळून जे करता येईल ते. आणि आयुष्याच्या शेवटी शेवटी निवृत्तीच्या काळात किमान स्वतःच घर असावं. इतपत ते मर्यादित होते. 

तेव्हा लहान असणारी ती पिढी आता आई बाप बनली पण त्यांच्या मुलांचा हा जो काळ सुरु आहे. तो त्यांच्या इतकाच वेगवान आहे. आयुष्यभर वैगेरे शब्द पण नको वाटतात त्यांना ऐकायला. लग्नापूर्वी स्वतःचा अलिशान flat. कार, भरभक्कम पगार अस सगळ पाहिजे.  मुलीकडच्यांना मुलाकडे हे सर्व पाहिजेच पण मुलाचे आई बाप भाऊ बहिणी घरात चालणार नाही. त्यांनी दुसरीकडे राहणे आवश्यक आहे. पसंती अशा स्थळांना जास्त असते. हे एक दुर्दैवी सत्य आहे. 

आता पती पत्नीच्या नात्यात पण सहनशीलता संपत चाललीय. लग्नानंतर काही महिन्यातच घटस्फोटाचे प्रमाण कधी नव्हे इतके वाढले आहे. प्रत्येकाला स्वतःची स्पेस पाहिजे. प्रत्येकाला स्वतःचे आयुष्य आनंदात व आपल्या मर्जीने जगायचे आहे पण दुसऱ्याने ते आपल्यासाठी adjust केले पाहिजे. मी adjust करणार नाही. अशी मनोवृत्ती आहे. 

चंगळवादी व ऐषोआरामी जगण्याची क्रेझ वाढत आहे. branded वस्तू लागतात. विकेंड outing, पार्टी, शॉपिंग, कार, फ्रेंड्स, ....आणि चिक्कार आनंद पाहिजे. या सर्व बाबींसाठी पैसा लागतो. तो कुठून येईल किंवा कसा याचा विचार आजच्या पिढीला नाही. फक्त पैसा पाहिजे. तुम्ही कुठूनही आणा असे बापाला सांगणारी पोर आजूबाजूला आहेत. 

काही गोष्टी हळूहळू होतात व त्यांच्या प्रवासातच आनंद असतो.  लहानपणी रामायण पाहत असतांना टीव्ही चांगला दिसावा म्हणून antenna ची सेटिंग करायला तीन चार जण लागायचे व अर्ध्या एक तासाच्या अथक परिश्रमानंतर चित्र दिसायला लागले कि स्वर्गीय सुख मिळायचे. 

मानवी इतिहासातील सगळ्यात वेगवान प्रगतीच्या टप्प्यात आपण आहोत. शोध लागला कि त्याचे परिणाम तत्काळ लोकांना पोहचवले जातात. गेस्टेशन कालावधी संपत आलाय. technology हातात आहे. पुरावे मागितले व दिले जातात.  नात्यातील ओलावा संपून गेलाय कि काय असे चित्र आहे. 

प्रश्न पडत नाहीत. प्रश्न विचारले जात नाहीत. 

मुळात प्रश्न विचारलेले आवडत नाही. स्वतःला प्रश्न पडले कि स्वतःच्या  मानसिक प्रगल्भतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जाते, कारण भोवताल उत्तरे मागत नाही. अशा केओस वातावरणातून जात असलेल्या आजच्या पिढीला जीवन सुसह्य होण्यासाठी किमान थोड्या तरी वैचारिक बेसची गरज आहे.

otherwise थोड्या काळासाठी मोबाईल व माणसे आजूबाजूला नसतील तर मानसिक शांततेचे सुख घेण्याऐवजी अस्वस्थ होणाऱ्या माणसांची संख्या वाढत आहे.

-       समाधान महाजन

२३ जून २०२३

महासम्राट - रणखैंदळ

 वाचक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या विश्वास पाटील यांच्या बहुचर्चित  महासम्राट मालिकेतील दुसरा भाग मे २०२३ मध्ये प्रकाशित झाला. साधारण वर्षभरापूर्वी १ ऑगस्टला महासम्राटचा झंझावात हा पहिला भाग प्रकाशित झाला होता.  त्यात जुलै १६२९ ते १६५९ हा कालावधी घेण्यात आला होता. रणखैंदळ या नावाने असलेला हा दुसरा भाग आता प्रकाशित  झाला आहे. यात १६५९ ते १६६४ पर्यंतचा कालावधी घेण्यात आला आहे. 


शिवरायांच्या आयुष्यातील हा सर्वात धावपळीचा काळ होता. अनेक लढाया या काळात झाल्या. अनेक प्रसंग या काळात झाले. अगदी रणखैंदळ माजली होती.  याच काळात  २५ नोव्हेंबर १६६४ ला सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणीस सुद्धा सुरुवात झाली होती.  फक्त पाच वर्षाच्या काळात स्वराज्याची एका नव्या अर्थाने बांधणी होत होती. इतक्या कमी कालावधीत इतक्या घटना महाराजांच्या आयुष्यात व एकूणच महाराष्ट्राच्या इतिहासात घडून गेल्या कि अनेक पाने त्यावर खर्ची पडावीत. पण अवघ्या ४४२ पानांमध्ये विश्वास पाटील यांनी समर्पक शब्दात हा भव्यदिव्य पट आपल्यापुढे त्यांच्या नेहमीच्या चित्रमय व ओघवत्या शैलीत मांडला आहे. वेढ्यात अडकलेले शिवाजी महाराज, त्यांची मनोभूमिका, उंबरखिंड, पन्हाळा ते विशाळगड हा प्रवास, हे सारे इतक्या ताकदीने लेखकाने मांडले आहे कि आपण त्या काळात आहोत व आपल्यापुढे हे प्रसंग घडत आहेत इतक एकरूप माणूस वाचतांना होऊन जातो.
विश्वास पाटील यांच्यासोबत..


सातत्याने आपल्या पुढे शिवाजी महाराज येतात त्यांच्या विविध पराक्रमी प्रसंगातून. पोवाडे, जयंती निम्मित होणारे व्याख्याने यातून प्रभावीपणे महाराजांचे पराक्रम सांगितले जातात. एक मोठी प्रतिमा नकळत निर्माण होते. आणि अर्थात त्यात काही वावगे आहे असे नाही. पण विश्वास पाटील यांनी महासम्राट मधून शिवाजी महाराजांचे जे चरित्र मांडले आहे ते अधिक वास्तवाशी भिडणारे, जिवंत वाटते. आपल्या सारख्या हाडामांसाचा माणूस या सह्याद्रीच्या रानावनात राहून जे काही बेफाम जगलाय ते अधिकच प्रेरणा देणारे आहे.

एखादा चित्रपट पाहतांना  किंवा व्याख्यान ऐकतांना अगदी रोमांच उभे  राहतात. पण त्याच वेळी हे सर्व दैवी आहे कि काय असे वाटत राहते. या उलट महासम्राट वाचतांना महाराज हे माणूस वाटतात. यश, अपयश, जय पराजय, मान अपमान, राग, आनंद, चेष्टा, मस्करी, कडकपणा, हळवेपणा हे सामान्य माणसाला वाटणाऱ्या भावना त्यांना पण आहेत व ते सर्व असून त्याच्यासहित ते जे काही आयुष्य जगतात. जे काही निर्णय घेतात ते जास्त भावते. हि लेखकाची ताकद आहे.

माझ्यासारख्या सामान्य वाचकाला या पुस्तकातून अनेक बाबी नव्याने समजल्या.
अफजलखानच्या वधानंतर चौथ्याच दिवशी नेताजी पालकर यांनी विजापूर गाठून वेढा दिला होता. शिवाजी महाराजांच्या सैन्याची चपळाई इतकी होती कि तोपर्यंत अफजलखान सोबत असलेले पराभूत सैन्य देखील त्यांच्या विजापूर या राजधानीत तोपर्यंत  पोहचले नव्हते. तिथे नेताजी आपल्या सैन्यासहित जाऊन पोहचले होते.
मिरजेच्या किल्ल्याची लढाई. ज्यात स्वतः महाराज सहभागी होते. वानरवळ काय आहे हा प्रकार देखील कळतो. गुणवंता मावशीने केलेली मदत व ते मावशीचे पात्र देखील पहिल्यांदाच समजले. चाकणच्या किल्ल्यातून फिरंगोजी नरसाळा याने दिलेली कडवी झुंज समजली. कुंवारखाम्बीची खिंडीच्या नावामागची दंतकथा  समजते. रायबाघन कोण होती व ती तिकडे कशी गेली हेही समजले.
औरंगजेब व शायीस्तेखान हे मामा भाचे किंवा शहाजी राजे व बडी बेगम किंवा आली आदिलशाह व त्याचा दरबार किंवा तानाजी, येसाजी, बाजी, नेताजी व महाराज यांच्यातील संवाद कसे असतील किंवा प्रत्यक्ष झालेला पत्रव्यवहार कसा होता या सर्वांची सांगड घालत उभे केलेले प्रसंग नाट्यमय न वाटता वास्तव वाटतात.
मराठेशाहीतील भाऊबंदकीबाबत बडी साहिबा जे शाहजी राजांना सांगते ते सत्य ऐकून काही क्षण शहाजी राजे देखील आवाक होतात.
मुधोळच्या बाजी घोरपडे याचे निर्मुलन महाराजांनी स्वतः कसे केले याचे वर्णन चित्तथरारक आहे. त्याहून अधिक महत्वाचे वाटते महाराजांनी फिरंगी/टोपीवाले यांचा ओळखलेला कावा. त्यांना दिलेली मात व त्या काळात जे भल्या भल्या राजांना जमले नाही तो विचार महाराजांनी प्रत्यक्ष कृतीत आणला तो म्हणजे सागरी संरक्षण. काळाची पावले व महत्व ओळखावे ते असे. या संपूर्ण सागरी सिद्धतेची तयारी व सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी हे सर्व प्रसंग कदाचित इतक्या सविस्तरपणे पहिल्यांदाच  विश्वास पाटील यांनी मराठी साहित्यात आणले असावेत असं माझा अंदाज आहे.
पन्हाळा ते विशालगड या प्रसिद्ध मार्गासहित शिवाजी महाराजांसंदर्भात असलेल्या अनेक ठिकाणी गड, किल्ले, खिंडी, डोंगरी वाटा, यावर लेखकाने स्वतः चालून प्रवास  केलेला आहे. त्यामुळे लिखाणात विविध भौगोलिक बारकावे जाणवतात. सह्याद्रीतील पावसाची विविध रूपे. तेथील स्थानिक आदिवासी व इतर समाज यांचा स्थानिक संदर्भ लिखाणात जाणवतो.

या पुस्तकातील काही वाक्य सरळ मनाला भिडणारी आहेत. जसे-
1. मनुष्याने गुदरलेला प्रसंग बघून आपला डामडौल, राजचिन्ह, सार विसरावं. आल्या प्रसंगाशी हुशारीने दोन हात करावेत. आधी ध्येय, मग देह आणि नंतर दौलत अशा मनुष्यजन्माच्या पायऱ्या खूप महत्वाच्या आहेत.’
2. मनुष्याने मस्तकात सतत हा मुसलमान, तो ख्रिश्चन, तो पलीकडचा कोण्या फलाण्या जातीचा, अशा जातीधर्मांच्या उतरंडी मानून भेदाभेद कशासाठी करत राहावे? जीवनाचा खरा अर्थ मनुष्याने बागेत कष्टनाऱ्या एखाद्या साध्या माळ्याकडूनही शिकावा- मातीत खुरप चालवणारा तो बागवान बगीच्यात फुलणारे गुलाब, केवडा, प्राजक्त यांच्यात तरी कधी करतो का हो भेदाभेद? तिथे फक्त सुगंध महत्वाचा. आमच मन कोणाच्या जातीपातीकडे नाही, त्याच्या कर्तबगारीच्या सुगंधाकडेच भ्रमरासारखे धाव घेते.’
3. एका मराठ्याला जन्मातून उठवायचे पवित्र काम फक्त दुसरा मराठाच चोखपणे पार पाडू शकतो.. ...आम्हा मराठ्यांच्या रक्तातला परस्पर द्वेष हाच आमचा खरा सद्गुण आसतो. साक्षात प्रभू रामचंद्र आयोध्येऐवजी आम्हा मराठ्यांच्या मुलखात जन्माला आले असते, तर त्या लंकापती रावणाने रामाच्या बरबादीची सुपारी मोठ्या भरवशाने लक्ष्मणाच्या कनवटीला बांधली असती.’
‘सुरतेच्या मुलखातला अंधार एखाद्या जीर्ण झिरझिरीत कापडासारखा फाटत गेला’ असे लयदार वाक्य मध्येच आपलं लक्ष वेधून घेते.

काही वस्तुनिष्ठ निरीक्षणे जे लेखकाने लिहितांना मजकुरात ओघवते मांडले आहेत ती अशी –
1.      पन्हाळा किल्ला हा शिलाहार भोज राजाच्या काळात चारशे वर्षांपूर्वी बांधला होता. नंतर तो यादवांच्या ताब्यात गेला. नंतर बहामनी नंतर विजापूरचा आदिलशाह कडे असं किल्ला राजांनी जिंकला होता.
2.      सिद्धी जोहरचा जावाई सिद्दी मसूद होता. वारणेच्या काठी माले गावी त्याने आपला तळ काही काळ ठोकला होता. नमाजासाठी त्या गावात एक मस्जिद उभारण्यात आली होती. त्या गावाचे नाव मशिदीचे माले म्हणत ‘मसूदमाले’ असे पडले होते.

अशा अनेक वास्तव बाबी कादंबरीत ओघाने येतात. त्या सर्व कळण्यासाठी महासम्राट वाचणे महत्वाचे. शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीवर व आयुष्यावर महासम्राट मधून येत असलेला इतिहास हा अलीकडच्या काळातील एक महत्वाचा दस्ताऐवज आहे आणि म्हणून  महासम्राटच्या पुढील भागांची देखील उत्सुकता आहे. 

चुकीची मांडणी, चुकीचा इतिहास पसरवला जाण्याच्या काळात कागदपत्रे, प्रत्यक्ष भेटी, पुरावे, वास्तूंचा अभ्यास, लोककथा व परंपराचा अभ्यास या साऱ्यातून आकाराला आलेली महासम्राट ही कादंबरीमाला अत्यंत महत्वाची आहे. तसेच प्रत्येकाने वाचावी व संग्रही ठेवावी अशी आहे.

-       समाधान महाजन
 


वन साईड

मध्यमवर्गीय घरातील मुली एका सुरक्षित वातावरणात वाढतात. आई, वडील, बहिण, भाऊ इतकं चौकोनी जग, अध्ये मध्ये काका, मामा, आजोबा आजी इत्यादी पण सगळ कस विश्वसनीय व खात्रीशीर....

कोणी शरीर म्हणून त्यांच्याकडे पाहत नाही. त्या एक सेपरेट आयडेंटी असतात.

बाहेरच्या जगाशी संपर्क थेट येत नाही, आलाच तर फार कमी...

इकडे फक्त शरीरावर पोसलेले व  अफाट फोफावलेले parallel जग त्यांना माहिती नसते....

आणि एखाद्या क्षणी त्या जगाशी त्यांचा सबंध आलाच तर त्या गोंधळतात, भांबवतात. नेमक्या या वेळी परत त्यांना घराच्या सशक्त आधाराची गरज असते. तो या वेळी मिळायला हवा....

आम्ही लहान असताना उल्हासनगरच्या रिंकू पटेलची घटना झाली होती. दहावीच्या विद्यार्थिनीला वर्गात जाळण्यात आले होते. आयुष्यात समजलेले व वाचलेले ते प्रथम निर्घृण कृत्य होते....  त्या काळी सर्व वृत्तपत्रातून, चित्रलेखा, लोकप्रभा आदी साप्ताहिकातून त्यावर अनेक दिवस लिहून येत होते....रिंकूचा रेफ्ररंस देऊन पुढील महिला अत्याचाराच्या घटनांबाबत लिहून येत होते....

नंतर हे सर्व हळूहळू बंद होत गेले... एक वेगळ्याच काळात आता आपण जगत आहोत. मानवी संवेदना बोथट च नाही झाल्यात. संपल्यात अगदी. स्क्रीन वर दिसणारे हिंसक प्रकार व प्रत्यक्षात होणारे यात लोकांना काहीं फरक वाटतोय की..नाही.. असा प्रश्न उभा राहतोय...

फ्रीज, मिक्सर, कुकर...

राग, किळस, भीती...

मुलींनी स्वतः ला पण जपायला हवं..

व्यापक सामाजिक, मानसिक समस्या समोर उभ्या आहेत. आयुष्य एकच आहे. जगायला हवं.

# वन साईड