काळेकरडे स्ट्रोक्स

 

प्रणव सखदेवची काळेकरडे स्ट्रोक्स हि कादंबरी वाचली. तिला २०२१चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. खरे तर मागे काही वर्षांपूर्वी ‘निळ्या दाताची दंतकथा’ हा प्रणवचा कथासंग्रह वाचला तेव्हा त्याच्याच भाषेत सांगायचे म्हटले तर मला वाटले हा कथासंग्रह लिहिणारा लेखक ‘मजबूत’ मच्यूर,वयस्क असावा. पण नंतर त्याला युवा साहित्य अकादमी घोषित झाला तेव्हा कळले तो तर below 35 आहे. आणि मग अतीव कुतूहलाने मी ‘स्ट्रोक्स’ घेऊन आलो. मिळेल तशी दोन दिवसात वाचून संपवली. साठ सत्तर पेजेस झाले असतील मला अचानक लेखकाशी बोलावे वाटू लागले. तेव्हा न राहवता मी नामदेव कोळी या मित्राकडून प्रणवचा नंबर मागितला. नामदेवने लगेच पाठवला. प्रणवशी थोडा वेळ बोललो मग बर वाटले. 

अलीकडे नको म्हणत असतांना काही कथासंग्रह, कादंबऱ्या मी वाचण्यास घेत असतो. आणि नेमक्या त्या इतक्या अफलातून निघतात कि पूर्ण झाल्याशिवाय सोडाव्या वाटत नाहीत. त्यातच स्ट्रोक्स मोडते. सुरुवातीला नायक समीर व त्याचा मित्र अरुण यांच्यातलं संभाषण सुरु असतांना थोडी पार्टनरची आठवण आली. पण ती तितकीच नंतर त्यात इतके चढ उतार ...आलट...पालट...झाले कि एकदम दणदणीत बाकी शून्य समोर आली....मध्येच कोसलाचा पांडुरंग सांगवीकर उभा राहिला....पण नाही हे सर्व प्रवाह पार करत स्ट्रोक्स वेगळ्याच मार्गाने घेऊन जात राहिली. 

भाषा बोल्ड झाली म्हणजे कादंबरी दर्जेदार असतेच असे नाही...कादंबरीतील अरुणच्या भाषेत सांगायचे म्हणजे ... ‘फकून टाका. बरेच प्रश्न सुटतील. स्वच्छ नजर होईल तुमची.’ रोजचे जगणे, सेक्स व त्यापलीकडे जाऊन जे गुंतागुंतीचे जग व त्यातील प्रश्न असतात ते यात आहे. 

नवीन कुठे काय लिहिले जाते? मराठीत relevant काहीच लिहिले जात नाही किंवा नवीन पिढी कुठे काय काही लिहिते किंवा स्वतःचे प्रश्न मांडते? असे विचारण्याआधी प्रणव सखदेवचे ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ हि कादंबरी वाचायला हवी. 

-समाधान महाजन 

३१/०८/२०२२


नंदा खरे

 


अस्सल वऱ्हाडीमध्ये कॉर्पोरेट बिझनेस चे फंडे, मीडिया रूम पॉलिटिक्स ते नक्षल एरियातील जगणे.... नंदा खरे...काळासोबत चालणारा मोठा लेखक होता ... साहित्य अकादमी मिळेपर्यंत अनेकांना नाव ही माहीत नव्हते...नंदा बाई की माणूस असेही प्रश्न? 

त्यांचे उद्या प्रकाशित झाले 2015 ला ... आणि त्यांचा मृत्यू झाला 2022 ला. 'उद्या ' प्रकाशित झाले तेव्हा त्यांचे वय जवळपास 70 इतके होते..... 

पण त्यातील सर्व रेफ्रंसेस व संवाद आजच्या पिढीचे आहेत. आणि विशेष म्हणजे भिन्न भिन्न विषयांवर आहेत. तरी देखील त्या त्या क्षेत्रातील कोअर एरियावर आहेत व त्यातील भेद उलगडून दाखवणारे आहेत. 

हॅट्स ऑफ हिम.... हे सोपे नाही... त्यासाठी अनेक बाबी लागतात....स्वतःवर उमटवून घ्याव्या लागतात... मग शब्दात ही ताकदीने मांडाव्या लागतात... हे सर्व नंदांनी केले.... ते आपल्यात होते आणि ते आता आपल्यात नाहीत....या दरम्यानच्या कालावधीत त्यांनी भरपूर दर्जेदार साहित्य निर्मित करून ठेवलेय.... आपल्याकडून वाचलं गेलं तरी भरपूर..

कवी ग्रेस, इनग्रीड बर्गमन, रॉबर्तो रोस्सेलिनी व सोनालिनी दासगुप्ता

इनग्रीड बर्गमन

  कवी ग्रेस, इनग्रीड बर्गमन, रॉबर्तो रोस्सेलिनी व सोनालिनी दासगुप्ता .......
   या सर्व व्यक्तींचा काय परस्परसबंध? 

   तर आहे... अगदी जवळचा आहे. 

 मला पहिल्यांदा इनग्रीड बर्गमन हे नाव समजले ते कवी ग्रेस यांच्या कविता वाचतांना.     तेव्हा ती कोणीतरी पाश्चात्य अभिनेत्री आहे इतके माहित होते. नंतर हळूहळू काही     बाबी  समजल्या जसे-  १९५८ पासून ग्रेस यांनी जेव्हा आपल्या काव्यलेखनाला प्रारंभ   केला. त्याच काळात इन्ग्रिड बर्गमन या अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांनी ग्रेस हे नाव धारण केले. 

दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी, "शी इज इन ग्रेस" असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, असे त्यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा-रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला, तिचे ऋण आठवत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. संध्याकाळच्या कविता हा १९६७ साली प्रकाशित झालेला त्यांचा पहिला काव्यसंग्रह. हा कवितासंग्रह त्यांनी इनग्रिड बर्गमनला अर्पण केला आहे. त्यात इन्ग्रिड बर्गमन नावाची कविता देखील आहे ज्यात

कवी ग्रेस
ते म्हणतात- 

"आषाढातील भर्जरी मेघांसारखे पूर्ण ऐहिक डोळे 
घेऊन तू आलीस; नेस्तनाबूत झालेल्या या 
साथीच्या गावात......"

तर अशी हि इनग्रीड बर्गमन स्वीडिश अमेरिकन अभिनेत्री होती. जिला तीन वेळा ऑस्कर पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार  मिळाले होते. माय स्टोरी हे तिचे आत्मचरित्र. तिला चार मुले होते. पीटर लिन्डस्टोर्म हा तिचा पहिला पती. त्यानंतर ती व रॉबर्तो रोस्सेलिनी हे एकमेकांच्या प्रेमात पडले. रॉबर्तो हा एक इटालियन दिग्दर्शक होता. या रोबर्तो रॉसेलिनीची पहिली पत्नी होती  मार्शेला द मार्शी. तो तिच्यापासून दूर होऊन बर्गमनच्या जवळ गेला. 

रॉबर्तो रोस्सेलिनी
हा इटालियन दिग्दर्शक भारतात एक डॉक्युमेंटरी तयार करण्यासाठी येतो व येथील एक भारतीय बंगाली गृहिणी सोनालिनी दासगुप्ता हिच्या प्रेमात पडतो. ते दोघे अनेक वर्ष एकत्र राहतात. या सर्व प्रकरणावर दिलीप पाडगावकर यांनी 'under the spell' हे पुस्तक लिहिले होते. पाडगावकर हे रोस्सेलिनीला भेटलेले होते. त्यांचे हे इंग्रजी पुस्तक 2010 मध्ये सुजाता देशमुख यांनी मराठीत केले व राजहंसने ते 'तिची मोहिनी' या नावाने प्रकाशित केले. ग्रेस सोडून उर्वरित सर्व माहिती या पुस्तकात येते. ग्रेसचा संदर्भ खास अस्मादिकाचा!

रोस्सेलिनी व सोनालिनी दासगुप्ता
रोस्सेलिनीने  भारतात येऊन जो चित्रपट तयार केला तो म्हणजे  "इंडिया:मातृभूमी".  हा चित्रपट कांस चित्रपट महोत्सवात झळकला 9 मे 1959 रोजी. पाडगावकरांनी पुस्तकात रोस्सेलिनीच्या चित्रपट निर्मितीचा सखोल आढावा घेतला आहे. एका परकीय दिग्दर्शकाच्या कॅमेऱ्यातून भारताकडे बघण्याचे अनेक angles दिसतात. तो भारत म्हणजे नुकतेच स्वातंत्र मिळून आठ दहा वर्ष झालेला भारत असतो. हिराकूड धरणाच्या राष्ट्रसमर्पणाच्या कार्यक्रमासाठी रोस्सेलिनी स्वतः नेहरुंसोबत विमानात असतो. पाण्यात गेलेल्या शेतजमिनीला पाहून विमनस्क झालेले नेहरू तो टिपतो. भारतातल्या अनेक लहान लहान बाबी तो चित्रित करतो. त्यात त्याची ओळख आधी हरी दासगुप्ता यांच्याशी होते व नंतर त्यांची पत्नी सोनालिनी हिच्याशी. 

सोनालीनी दासगुप्ता बंगालच्या प्रसिद्ध घराण्यातील एक स्री. तिचे काका म्हणजे प्रसिध्द चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बिमल रॉय. टागोरांच्या शांतीनिकेतन मध्ये तिचे सहा काका मामा शिकवायला होते. लहानपणीच नेहरूंची तिची ओळख झाली होती. सत्यजित रे यांच्यमुळे हरी दासगुप्ता यांची सोनालिशी शांती निकेतन मध्ये भेट झाली होती. नंतर दोघांचे लग्न झाले. 

चित्रपट निर्मितीच्या काळात रोस्सेलिनी सोनालिनीच्या प्रेमात पडले. या प्रकरणाची सगळीकडे चर्चा व्हायला लागली. त्या काळात आतासारखा मिडिया नव्हता. पण जो होता तोहि कमी नव्हता. या प्रकरणावर सगळीकडे प्रचंड टीका व्हायला लागली. फिल्मिडिया चे बाबुराव पटेल यांनी अत्यंत विखारी भाषेत या प्रकरणाचा समाचार घेतला. ते जात्याच नेहरू विरोधी असल्याने याचे धागेदोरे त्याने नेहरूंच्या पाश्चात्य धोरणावर नेऊन ठेवले.ब्लीट्झचे आर के करंजिया यांनी देखील असाच लेख लिहिला.

यानंतर विदेशात असताना बर्गमनने पंतप्रधान पंडित नेहरू यांची भेट घेऊन रोझेलिनीला भारतातून त्याने शूटिंग केलेल्या रीलांसहीत येऊ देण्याची विनंती केली जी नेहरूंनी मान्य केली. बर्गमन, रोस्सेलिनी व सोनालिनी या सर्वांसोबत नेहरूंची ओळख होती. या सर्व प्रकरणात केंद्र स्थानी असलेल्या सर्व व्यक्ती आपआपल्या क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर होत्या त्यामुळे या प्रकरणाची चर्चा भारतातच नाही तर अमेरिका युरोप आदी प्रदेशातही होत होती. चित्रकार एम एफ हुसेन यांनी रोस्सेलिनीची पाठराखण केली. सोनालीने भारतातून बाहेर जातांना सुरक्षिततेसाठी  हुसेन यांची बायको  सौ हुसेन या नावाने प्रवास केला होता हे विशेष. 

नौदल अधिकारी नानावटी ज्यावर अलीकडे अक्षयकुमारचा रुस्तम नावाचा चित्रपट आला होता. त्याची बायको सिल्व्हिया जी जन्माने ब्रिटिश होती. ती ज्या प्रेम आहुजाच्या प्रेमात पडते तो आहुजा रोस्सेलिनीचा चांगला मित्र होता. या प्रकरणावर 'अपराध मीच केला' हे नाटक प्र के अत्रे यांनी लिहिले होते. जे त्या काळात तुफान चालले होते. 

१९५७ ला सुरू झालेले हे प्रकरण १९७४ ला संपले जेव्हा रोस्सेलिनीने  सिल्व्हिया या त्याच्या नवीन मैत्रिणींशी लग्न केले. तत्पूर्वी  त्याने इनग्रीड बर्गमन सोबत  १९६२ मध्ये घटस्फोट घेतला होता. सोनालिनी व रोस्सेलिनी यांना दोघांची दोन मुले होती जील व राफाएला.

रोस्सेलिनी व बर्गमन
जून 1977 ला रोस्सेलिनीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तेव्हा त्याची पहिली बायको त्याच्या सोबत होती.

ऑगस्ट १९८२ मध्ये इंग्रिड बर्गमन चे निधन झाले.

ऑगस्ट १९९६ मध्ये हरी दास गुप्ता वारले.  

या कहाणीचा असा अंत होत गेला.

इथे बर्गमनच्या प्रभावात असलेल्या ग्रेस यांच्या तिच्यावर लिहिलेल्या पुढील ओळी आठवतात- 

"तसे माझ्या झोळीत काही नाही; ......
फक्त एवढेच : नि;शब्द भासांच्या काठाला लटकलेले 
हे स्टेशन आणि संवेदनांच्या आवर्तांना झुगारून, 
कोण्या मावळत्या संताला तू दिलेले 
एकाकी आलिंगन ..... "

या ओळी लिहितांना 1967 मध्ये ग्रेस यांच्यासमोर कोण असेल? 
बर्गमन कि सोनालिनी ? 
कि रोस्सेलिनी कि हरी दासगुप्ता? .... 
कि स्वतः ग्रेस.... ?

कविता अमर असतात त्या अशा .... 

- समाधान महाजन 

महासम्राट


  विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील एक मोठे नाव. त्यांच्या अनेक कादंबऱ्या बेस्ट सेलर आहेत. वाचकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.  शाळेत असतांना पहिल्यांदा मी विश्वास पाटील हे नाव वाचले होते. तेव्हा काहीतरी सातवी आठवीत असेन.  क्विझ कॉम्पिटिशन साठी तयारी करत असतांना झाडाझडतीसाठी तेव्हा त्यांना साहित्य अकादमी मिळाला होता हे समजले. तेव्हा वृत्तपत्रात त्यांच्याविषयी भरपूर काही लिहून आल्याचेही आठवते. प्रशासनात काम करत असतांनाच अनेक कादंबऱ्याचे लोकप्रिय लेखक व साहित्य अकादमी सारखे पुरस्कार यामुळे त्यांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले. 
  नंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे जवळपास नोकरी लागल्यानंतर त्यांच्या झाडाझडती, पांगिरा, महानायक, पानिपत या कादंबऱ्या माझ्या वाचण्यात आल्या. नुकतीच महासम्राट नावाची त्यांची कादंबरी प्रकाशित झाली. कादंबरी १ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाली व 5 ऑगस्टला माझ्या हाती आली. जसा मिळेल तसा वेळ काढत आज 15 ऑगस्ट रोजी मी ती 442 पानांची कादंबरी वाचून पूर्ण केली. हे असे माझ्याबाबतीत पहिल्यांदाच झाले कि पुस्तक प्रकाशित झाल्या झाल्या पंधरा दिवसांच्या आत ते वाचून पूर्ण झाले. 
शालेय वयात एक कालखंड असा गेला कि तेव्हा एकामागोमाग एक ऐतिहासिक कादंबऱ्या वाचण्याचा सपाटा मी लावला होता. स्वामी, राऊ, मंत्रावेगळा, राजश्री, जरीपटका, श्रीमान योगी असे लागोपाठ वाचत  असतांना भारावल्यासारखा तो काळ मी जगत होतो. अल्लड वय व त्या कादंबरयाच्या शब्दातील भावविश्व व मोठा भव्य पट उभा करण्याची कादंबरीकराची ताकद  यामुळे शिवकाळ, मराठा साम्राज्य, त्यातील भाषा, व्यवहार, काळ असा जिवंत उभा राहत असे. दुर्दैवाने त्या काळात पानिपत किंवा संभाजी वाचण्यात आली नाही. 
पण आज अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा मला त्या झपाटलेपणाचा प्रत्यय आला जेव्हा मी महासम्राट वाचत होतो. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील कादंबरीमालेतील हा पहिला खंड आहे ज्याचे नाव आहे झंझावात. यानंतर येणाऱ्या दुसऱ्या भागाचे नाव रणखैंदळ असेल असे लेखकाने प्रस्तावनेत म्हटले आहे. किती भाग येतील ते स्पष्ट केले नाही. झंझावातची सुरुवात जुलै 1629 मध्ये होते व 1659 मध्ये अफझलखानाच्या वधापर्यंत येऊन थांबते. सदरील पुस्तक विश्वास पाटील यांनी स्वरदेवता लता मंगेशकर यांना अर्पण केले आहे. 
विश्वास पाटील यांच्या कादंबर्याचे बरेचसे विषय ऐतिहासिक असतात. विशेष म्हणजे त्यातील प्रत्येक विषयावर सखोल अभ्यास व संशोधन ते करतात. मग ती पानिपत असो कि महानायक असो कि संभाजी. त्यांच्या कादंबऱ्या वाचतांना त्यातील त्यांचा अभ्यास, व्यासंग व संशोधन याची जाणीव होते. पण कादंबरीच्या विस्तारात व भाषेत ते fact इतक्या बेमालूमपणे मिसळतात कि वाचक कोणत्याही ठिकाणी अडखळत नाही, लिंक तुटत नाही किंवा ग्रीप सुटत नाही. ती त्यांच्या लिखाणाची ताकद आहे. 
लिखाणाची शैली चित्रमय आहे. प्रसंग, व्यक्ती  व ठिकाण आपल्या डोळ्यापुढे उभे राहतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, विविध घाट, जंगल. प्राणी, शेती शेतकरी ... कोसळणारा पाउस व या सर्व पार्श्वभूमीवर आकाराला येत असते पहिल्या स्वराज्याची स्थापना. 
या कादंबरीत शाहजी राजांच्या कामगिरीवर विशेष प्रकाश टाकला आहे. शहाजी राजे, जिजाऊ व शिवबा यांच्या एकमेकांच्या आयुष्यातील घटनाची सांगड इतक्या विस्ताराने व अभ्यासाने कदाचित पहिल्यांदाच मराठी कादंबरीविश्वात येत आहे. 
प्रस्तावनेतच लेखक म्हणतात कि, "शहाजीराजे उठसूट दुसऱ्यांच्या चाकर्या करत होते, असे धोपटमार्गाने व चुकीच्या पद्धतीने आजवर जे मानले गेले आहे ते अवास्तव आहे. उलट त्या वेळच्या काही अद्भुत घटनांनी व इतिहास प्रवाहाच्या रेट्यामुळेच त्यांना काही ठिकाणी सेवा पत्करावी लागली. त्या सर्व घटनांचे धडधडीत कागदोपत्री पुरावे आज उपलब्ध आहेत. शहाजीराजे भातवडीच्या लढाईत मुघल बादशहा जहांगीर यांच्या फौजेशी तर १६३५ मध्ये बादशहा शहाजहांशी प्रत्यक्ष लढले होते"
स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहणे व ते प्रत्येक्षात आणणे हे शिवछत्रपतींनी केले असे आपण मानतो व इतिहास आजपर्यंत आपल्याला तेच सांगतो... या कादंबरीत कळते कि ते स्वप्न पाहणे व  त्यासाठीचा पाया रचणे हे तर शहाजी राजांनी केले होते. 
शहाजीराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी उभारली होती ती म्हणजे पेमगड. जी आजच्या संगमनेर पासून फक्त २८ किलोमीटर अंतरावर आहे. सह्याद्रीच्या रांगेतील बाळेश्वर डोंगराजवळ हा प्राचीन किल्ला होता. तिथे सातवाहन काळातील पाण्याच्या जुन्या टाक्या व कुंडे होते. 1632 ते 1635 या काळात एका नामधारी निजामपुत्राला (मुर्तुजा निजामशाह) तख्तावर बसवून येथून शहाजीराजांनी नाशिकच्या गोदावरीपासून ते पुणे परिसरातील भीमेपर्यंतच्या 64 किल्ल्यांवर स्वतः कारभार चालविला होता.  त्यावेळी शिवराय अडीच तीन वर्षांचे असतांना जिजाऊमाता त्यांना घेऊन येथे राहिल्या होत्या

अजून एक महत्वाचा खुलासा या ठिकाणी होतो कि,  "शिवरायांना त्यांच्या पित्याने गनिमी काव्याची दीक्षा आणि स्वलिखित राजमुद्रा दिली होती. जी राजमुद्रा वयाच्या बाराव्या वर्षापासून राजांनी आपल्या कागदपत्रांमध्ये सन्मानपूर्वक वापरायला सुरुवात केली होती. हि राजमुद्रा स्वतः शहाजीराजांनी रचली होती"
याशिवाय कादंबरीतील पानापानांवर अनेक तथ्ये (facts) विखुरलेले आहेत. अलीकडच्या काळातील ही एक महत्वाची ऐतिहासिक  कादंबरीमाला ठरेल.  

- समाधान महाजन 

अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान


विश्वास पाटील हे साहित्यातील मोठे नाव. त्यांचे आतापर्यंत प्रकाशित झालेले अपवाद वगळता सर्व साहित्य माझ्या वाचनात आले आहे. पण विश्वास पाटलांनी अण्णा भाउंवर लिहिलेले हे पुस्तक मला जास्त आवडले. यात संशोधन आहे. स्वतः लेखकाला असलेली आस्था दिसते. अण्णा भाऊंच्या अनेक कादाबार्यांचा आढावा आहे. त्याचे रसग्रहण आहे.
या पुस्तकातून अनेक गोष्टी कळतात. ज्या मला महत्वाच्या वाटल्या त्या अशा-
  • 1930-31 च्या काळात अण्णांचे वडील भाऊ साठे आपले कुटुंब घेऊन वाटेगाव ते मुंबई हा प्रवास पायी करतात. हा प्रवास जीवघेणा आहे त्या काळात तो खूपच बिकट होता शिवाय परिस्थिती गरिबीची. तेव्हाचे वाटेगाव हे कुरुंदवाडी संस्थानात होते.
  • फकीरा ही कादंबरी अण्णांनी 1959 मध्ये लिहिली. व्यक्तिरेखा राधा व विष्णूपंत कुलकर्णी या व्याक्तीरेखांबद्द्ल खांडेकरांनी देखील कौतुक केले होते.
  • 14 मार्च 1931 रोजी प्रदर्शित झालेला पहिला बोलपट आलमआरा. गिरगावच्या मेजेस्टीक सिनेमात अण्णांनी पाहिला होता. तेव्हा पालव नावाच्या एका तरूणाकडून त्यांनी तिकीट मिळविले होते. कालांतराने तो पालव नावाचा तरुण पैलवान 'मास्टर भगवान' या नावाने मोठा नट बनला.
  • 1938 मध्ये अनेक दिवस चाललेल्या संपामुळे अण्णांनी मुंबई सोडली. गावी आले. 1925 च्या कायद्याने मांग जमातीला गुन्हेगार जमातीच्या यादीत टाकले होते. त्यामुळे आता जगणे अधिकच वाईट झाले होते.
  • अण्णांच्या आईचे नाव वालूबाई साठे, मोठ्या भावाचे नाव शंकर व दोन बहिणी होत्या. मे 1940 मध्ये त्यांचे लग्न झाले. कोंडूबाई उर्फ कोंडाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अण्णांचा दुसरा विवाह जयवंताबाई दोडके यांच्याशी झाला होता. गायन आणि अभिनयाच्या आवडीसोबतच दांडपट्ट्यासारखा मैदानी खेळ ते खेळत असे. त्यात त्यांना आवड होती. शंकर भाऊ साठे त्यांच्या मुलाखतीत म्हणतात अण्णा भाऊ स्वतः जिवंत नाग पकडत व त्यांना खेळवतसुद्धा.
  • अण्णाभाऊ म्हणतात 'मी फार वाचतो. कारण वाचन हे लेखकाच्या उद्योगाला पोषक असते. ते जर नसेल तर चांगली साहित्यनिर्मिती शक्य नाही.'
  • 1938 मध्ये वाटेगावला आलेले अण्णा 1942 मध्ये पुन्हा मुंबईत गेले. या मधल्या काळात त्यांनी प्रचंड वाचन केले.
  • एक मे 1942 या जागतिक कामगार दिनाच्या दिवशी मुंबईत जन नाट्य परिषदेची अर्थात ईपटाची IPTA ची स्थापना झाली. ( IPTA - Indian people's Theater Association. ) मे 1943 मध्ये तिला भारतीय स्वरूप देण्यात आले. मुंबईतील इपटाच्या संस्थापक सदस्यांमध्ये लेखक ख्वाजा अहमद अब्बास, शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा, अण्णाभाऊ साठे, अली सरदार जाफरी, श्री सरमाळकर आणि अनिल डिसिल्वा यांचा समावेश होता. लवकरच रांगडा ढोल वादक हे या संस्थेचे मानचिन्ह बनले. पुढे सांस्कृतिक जगाला जाग आणणारी ही देशातील अग्रगण्य संस्था बनली. काही वर्षातच हिंदी कवी कैफी आझमी, मजरुह सुलतानपूरी, साहिर लुधियांवी, बलराज सहानी, ईस्मत चुगताई, शैलेंद्र, सलील चौधरी आदी मंडळी IPTA मध्ये शामिल झाली.
  • इप्टाच्या अभ्यासमंडळाची शिबिरे अलाहाबाद, कानपूर, कलकत्ता आदि ठिकाणी होत त्यांचे सन्मानाचे अध्यक्षस्थान अण्णा भाऊकडे राहत असे. अण्णाभाऊ साठे तेव्हा फक्त तेवीस चोवीस वर्षांचे होते.
  • कम्युनिस्ट पक्षाचे तेव्हाचे नेते श्रीपाद अमृत डांगे हे अण्णांसाठी दैवत होते. त्यांचा मोठा प्रभाव अण्णांवर होता. अण्णा भाऊंना लिहिते ठेवण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाकडून लेबर कॅम्पात त्यांच्या भाडेकरू संघाच्या ताब्यात असलेली खोली उपलब्ध करून देण्यात आली होती. पार्टीला फंड साठी दोन लाखांची रक्कम उभी करायची होती तेव्हा माझ्याकडे पैसे नाहीत, मात्र पोवाडा आहे असे अण्णांनी वरिष्टांना सांगितले होते.
  • तिसरी कसम व इतर प्रसिद्ध हिंदी गाण्यांचे गीतकार कवी शैलेंद्र हे अण्णा भाऊंचे चांगले मित्र होते. शैलेन्द्र हे सुरुवातीला रेल्वेच्या माटुंग्याच्या मेकेनिकल विभागात एक शिकाऊ उमेदवार म्हणून दाखल झाले होते पण त्यांचे मन तिथे रमले नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अण्णांच्या आग्रहासत्व कवी शैलेन्द्र यांनी 'जाग मराठा आम जमाना बदलेगा' हे गीत लिहिले जे शाहीर अमर शेख यांच्या आवजात म्हटले जायचे.
  • तीसच्या दशकात मुंबईत अनेक आंबेडकरी जलसे स्थापन झाले होते. ज्यात अडागळे, साळवे, केरुजी बेगडे, भीमराव दादा कर्डक, जगताप, भालेराव मंडळींचे जलसे होते. आंबेडकरी विचार सामान्य अशिक्षित जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम या जलशांनी केले. पूर्वीचे सत्यशोधकीय जलसे हे आंबेडकरी जलशांचे प्रेरणा स्थान होते.
  • 1946 मध्ये अण्णाभाऊ दोन महिने तुरुंगात होते. आजारातून बरे झाल्यावर फेब्रुवारी 1968चा महिना अण्णा भाऊंनी जळगावमध्ये काढला. त्यांच्या वडिलांचे मित्र साधू साठे यांचे चिरंजीव दिनकर साठे विक्रीकर विभागात होते ते आग्रहाने अण्णांना जळगावला घेऊन गेले.
  • अण्णा भाऊ साठे यांचा मृत्यु 18 जुलै 1969 ला हृदय विकाराच्या धक्क्याने झाला. त्यांना अवघे 49 वर्षांचे आयुष्य लाभले. अण्णांच्या अंत्य यात्रेत दया पवार, नारायण सुर्वे, अर्जुन डांगळे, वामन होवाळ आदी मंडळी उपस्थित होती.
  • त्या आधी आचार्य अत्रे यांचे 13 जून 1969 रोजी निधन झाले होते. अण्णांच्या मनावर त्याचा मोठा परिणाम झाला होता. ते अधिकच हळवे झाले. अत्रे गेल्यानंतर शिवाजी पार्क च्या त्यांच्या घराच्या परिसरात अत्र्यांच्या सदनाकडे डोळे लावून घळाघळा रडत राहायचे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लढतांना ते अत्रेंना मोठ्या भावा प्रमाणे मानायचे. " भाऊ गेला आता आमची मराठी भाषा पोरकी झाली" असे ते म्हणत. अत्रेंच्या निधना नंतर शासनाने त्यांची कदर केली नाही याचे अण्णांना प्रचंड दुःख होते. अर्थात अण्णांनंतर देखील वेगळे काय झाले होते.
  • 29 ऑगस्ट 1969 रोजी पुणे सोलापूर रस्त्यावरील इंदापूर जवळ शाहीर अमर शेख यांचे मोटार अपघातात निधन झाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ गाजविणाऱ्या या तीन महनीय व्यक्तींचा मृत्यु एकाच वर्षी जून जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात एका पाठोपाठ एक झाला.
अण्णा भाऊंचे साहित्य-
  • अण्णा भाऊंच्या एकूण कथांची संख्या 170 च्या आसपास भरते. त्यातील जवळपास 55 कथा स्रीविश्वावर आहेत असे लेखकाचे म्हणणे आहे.
  • आधुनिक अश्वथामा नावाची कथा त्यांनी भाषावार प्रांतरचनेच्या प्रश्नावरून मराठी व गुजराथी समाजात उद्भवलेल्या उद्रेकावर लिहिली आहे.
  • अण्णा भाउंनी मक्झीम गॉर्कीला आपले साहित्यातील गुरु व आदर्श मानले होते. त्यांच्या टेबलावर गॉर्कीचा पुतळा ठेवलेला असायचा.
  • संयुक्त महारष्ट्र चळवळीचे गीत बनलेली लावणी 'माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली' हि अण्णा भाउंनी 1955 मध्ये लिहिली. शाहीर अमरशेख यांनी ती जानेवारी 1956 मध्ये पहिल्यांदा लोकांपुढे म्हटली.
कादंबऱ्या
  1. चित्रा (1951)
  2. चंदन (1959)- कामगारनायिका म्हणून चंदनचे चित्रण.
  3. वैजयंता (1959)- यावर चित्रपट आला ज्याचे दिग्दर्शक गजानन जहागीरदार हे होते. नायिका जयश्री गडकर या होत्या तर गाणी माडगुळकर यांनी लिहिली होती व वसंत पवार यांनी संगीत दिले होते.
  4. आवडी (1961)- या कादंबरीवर 'टिळा लावते मी रक्ताचा' हा चित्रपट आला. तो २८ जुलै 1969 रोजी प्रदर्शित झाला. त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.
  5. आग (1962)
  6. माकडीचा माळ (1963)
  7. फुलपाखरू (1967)
  8. आघात (1968)
  9. वारणेचे खोरे
  10. फकीरा- 1961 मध्ये महारष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तसेच दिग्दर्शक कुमार चंद्रशेखर यांनी त्यावर चित्रपट केला होता. सुर्यकांत मांढरे प्रमुख भूमिकेत होते. तसेच हिंदी अभिनेते जयराज व सुलोचनाबाई फकिराच्या आई वडिलांच्या भूमिकेत होते. तसेच सावळारामची भूमिका स्वतः अण्णांनी केली होती.
कथासंग्रह
  1. चिरागनगरची भुते (1958)
  2. गजाआड (1959)
  3. बारबाद्या कंजारी (1960)
  4. नवती
  5. ठासलेल्या बंदुका (1961)
वरील सर्व संदर्भ हे विश्वास पाटील यांच्या अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान या पुस्तकातील आहेत.
- समाधान महाजन