थाळनेर - खानदेशची राजधानी

 

थाळनेर हे गाव धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात येते. आजूबाजूला असलेल्या गावांसारखे एक गाव ते आता दिसत असले तरी एकेकाळी मात्र हे गाव खानदेशची राजधानी होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एमए करत असतांना प्रथम वर्षाला आम्हाला खांदेशाचा इतिहास हा एक पेपर होता. त्यावेळी पहिल्यांदा समजले की या प्रदेशाला देखील स्वतःचा असा इतिहास आहे. तोपर्यंत फक्त जो इतिहास पाठ्यपुस्तकात आहे व जो स्पर्धा परीक्षांमध्ये आहे तोच इतिहास आम्हाला माहिती होता. म्हणून मग खानदेशच्या इतिहासावरील उमवि मधील एमएचे पुस्तक वाचतांना एकदम उत्सुकता वाढत गेली की किमान येथील महत्वाच्या स्थळांना आपण भेट दिली पाहिजे. ते बघितले पाहिजे. त्यांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. त्यातून आज 21 ऑगस्ट रोजी आम्ही थाळनेर येथे जाण्यास निघालो. 

यावेळी माझ्यासोबत होते, इतिहासकार डॉ. रनसिंग परदेशी सर व माझे एमएचे सहकारी तुषार सोनवणे सर. शिवाय तिथे गेल्यावर थाळनेर कॉलेजला शिकविणारे इतिहासाचे प्राध्यापक बोरसे सर देखील तिथून आम्हाला जॉइन झाले.  रनसिंग परदेशी सरांचा स्ट्रॉंग पॉइंट मध्ययुगीन इतिहास हा आहे. त्यांनी राजपूत राजे/राज्य व महाराष्ट्र याच्यातील सबंधांवर चार-पाच पुस्तके देखील लिहिली आहेत व अजून तितक्याच पुस्तकांवर त्यांचे काम सुरू आहे. मुळात थाळनेर देखील मध्ययुगीन इतिहासाचा एक महत्वाचा भाग होते. म्हणजे अत्यंत योग्य व्यक्ति योग्य ठिकाणी आमच्या सोबत होती.  

खांदेशात फारुकी घराण्याची स्थापना कशी झाली हे सांगतांना फरीश्ता त्याच्या गुलशन-ई-ईब्राहिमी या पुस्तकात   म्हणतो, मलिकराजाचे पूर्वज दिल्लीच्या दरबारात अल्लाउद्दीन खिल्जी आणि मुहम्मद तुघलकाच्या कारकिर्दीत प्रतिष्ठित सरदार असून त्यांनी मानाचे स्थान प्राप्त केले होते. मलिक राजाला फिरोजशाह तुघलकने आपले शरीररक्षक म्हणून नियुक्त केले होते.


फिरोजशाहला शिकारीची फार आवड होती. तो गुजरातच्या जंगलमय इलाख्यात आपल्या छावणीपासून 14 कोस अंतरावर शिकारीसाठी गेला. बादशाहबरोबरील इतर सर्व सेवक कंटाळून छावणीत परत आले. मलिक राजा मात्र शेवटपर्यन्त बादशाह बरोबर राहिला होता. त्यामुळे मलिक राजावर बादशाह खुश झाला. दिल्लीत परतल्यावर बादशाहने दरबार भरवून मलिक राजास दोन हजारी मनसब व थाळनेर आणि करवंद हे प्रदेश जहागिरी म्हणून दिले. फेरीश्ताणे फारुकी घराण्याचे सातशे पस्तीस वर्षात एकूण 16 बादशाह झाल्याचे नमूद केले आहे. शाह शमसुद्दीन यांनी फारुकी घराण्यात 27 बादशाह झाल्याचे आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. 1370 ते 1601 असे सुमारे 231 वर्ष फारुकी घराण्याची सत्ता खांदेशात होती.

खानदेशच्या इतिहासावर भरपूर लिखाण करणारे प्रा. डॉ.जी.बी.शाह यांच्या एका पुस्तकात फारुकी घराण्याची स्थापनेची एक वेगळी कहाणी देखील देण्यात आली आहे त्यानुसार फारुकी घराण्यातील कोणी पूर्वज दक्षिणेतील राज्यात लष्करी सेवेत होता. लष्करात सेवा करतांना काही कारणाने तो नाराज झाला आणि खानदेशमध्ये आला. यावेळी खानदेशमध्ये विविध राजे व सरदार यांचे राज्य होते. तो एका गावात पोहचला हे गाव मात्र त्याला आवडले. या गावात त्याच्याबरोबर असलेल्या कुत्र्याला एक ससा दिसला. कुत्र्याला ससा दिसताच कुत्र्याने सशाचा पाठलाग केला. परंतु थोड्याच वेळात त्या सशाने कुत्र्याच्या पाठीमागील बाजूने कुत्र्यावर आक्रमण केले. सशाचे हे साहस पाहून त्या सैनिकाला आश्चर्य वाटले व त्याने विचार केला की ज्या भूमीवर असे अद्भुत व साहसी दृश्य दिसते ती भूमी साहस आणि शौर्‍याची प्रतीक असली पाहिजे. असा विचार करून त्याने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्याने ही गोष्ट तेथील वतनदाराला सांगितली. पण त्याने त्या गोष्टीला नकार दिला. तेव्हा त्याने दिल्लीला जाऊन थाळनेर आणि करवंद हे दोन्ही परगणे दिल्लीचा सुल्तान फिरोजशाह तुघलक याच्याकडून 1370 मध्ये जहागिरी म्हणून मिळविले. ही जहागिरी मिळविणार्‍या व्यक्तीचे नाव होते मलिक राजा खान व घटना जेथे घडली त्या गावाचे नाव होते थाळनेर. तर असो, फारूकींच्या स्थापनेची कहाणी काहीही असली तरी सत्य हे आहे की त्यांची व पर्यायाने खानदेशाची पहिली राजधानी ही थाळनेर होती हे नक्की. 

खानदेश Gazetteer- 1880 मध्ये असा उल्लेख आहे की, स्थानिक अनुदानानुसार 12 व्या शतकाच्या सुरूवातीला (1128) while the country for twenty miles round was without a light,' and twenty -seven of its forts were deserted, Thalner prospered under Javaji and Govaji. 

मलिक राजा फारुखी या पहिल्या राजाने बस्तान थाळनेर येथे बसल्यानंतर त्याने साम्राज्याचा विस्तार करण्याचे ठरवले. गुजरातच्या सुलतांनांच्या ताब्यात असलेला सुलतानपुर आणि नंदुरबारच्या प्रदेशावर आक्रमण करण्याचे धाडस त्याने केले. पण हे आक्रमण निष्फल ठरले. पुन्हा वापस थाळनेर येथे येऊन त्याने गुजरातच्या सुल्तानाशी वाटाघाटी करून तह केला. 

मलिक खान हा 1399 मध्ये मरण पावला. त्याला दोन मुले होते पैकी जो इफ्तिकार नावाचा जो लहान मुलगा होता त्याला थाळनेरचा किल्ला व त्या सभोवतालचा प्रदेश दिला. तर मोठा मुलगा नसीरखान याला लळींगचा किल्ला व त्या सभोवतालचा प्रदेश दिला. नसीरखान हा महत्वकांक्षी राजा होता. त्याने गैरमार्गाचा वापर करून असा आहीर याच्या ताब्यातील असिरगडचा किल्ला घेतला व आपले राज्य मजबूत केले. त्यानंतर थाळनेर येथे असलेला त्याचा लहान भाऊ इफ्तीकार याच्यावर 1417 मध्ये आक्रमण केले. लहान भावाचा पराभव करून त्याला कैद केले व असीरगडच्या किल्ल्यात बंदिस्त ठेवले. त्याच्यानंतर 1511 आणि 1566 या दोन्ही वर्षात पुन्हा गुजरातचा सुलतान व खानदेशचा सुलतान यांच्यामध्ये युद्ध झालेली दिसतात. 1600 मध्ये सम्राट अकबराने खानदेशच्या फारुकी घराण्याचा शेवटचा राजा बहादुरशाह फारुकी याचा पराभव केला. आणि थाळनेरचा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.

फारुकी राजांच्या कबरी – असा हा फारुकी राजांचा इतिहास पाहिल्यानंतर या गावात त्यांच्या आज रोजी
अस्तित्वात असलेल्या कबरी या कोणाचेही लक्ष वेधून घेतील अशा आहेत. तिथे आता संपूर्ण परिसराला तारेचे कंपाऊंड केलेले आहे. आत प्रवेश करताच एका उंच चौथार्‍यावर चार मोठे घुमटाकार वास्तू आपले लक्ष वेधून घेतात. या चार कबरी मलिकराजा, नासिरखान, मिरन आदिलखान आणि मुबारीक खान यांच्या आहेत. या सर्व कबरींमध्ये मिरन मुबारकखान याची कबर आकाराने सर्वात उंच मोठी व भव्य आहे. त्याच्या महान कारकीर्दीचा उल्लेख त्याच्या थडग्यावरील शिलालेखात दिसतो. 

फारूकींच्या या वास्तू त्यांच्या सांस्कृतिक कलेची प्रतीके आहेत.  

या कबरिंची काही वैशिष्ट्य अशी आहेत – 

1) लांब, चौरसाकृती चौथार्‍यावर एकावर एक असे तीन चौथरे आणि तिसर्‍या चौथार्‍यावर मुख्य वास्तूची केलेली उभारणी. 

2) चौकोनी वास्तूच्या छतावर भव्य, उंच परंतु पसरट असा टेकवलेला घुमट. मांडूच्या होशंगशाहच्या थडग्यावरील इमारतीप्रमाणेच ही इमारत असून घुमटाच्या वजनाचा भार एकाच ठिकाणी पडू नये म्हणून वास्तूच्या आकाराएवढा पसरट घुमट बनवून तो इमारतीवरील सर्व भागावर विखुरलेला आहे. तसेच घुमटाच्या वजनाचा भार सभोवार तोलला जावा म्हणून इमारतीचा दर्शनी भाग अत्यंत उंच व भव्य केला आहे. 

3) इमारतीच्या आरंभीच्या भागात एक मुख्य दरवाजा आणि बाजूच्या खिड्कींसाठी मोकळी व विस्तृत जागा.

4) इमारतीच्या वरील बाजूस काढलेले सजजे व पागोळया हे फारूकींच्या थडग्याचे आणखी एक वैशिष्ट्य मानावे लागेल. इमारतीचा आरंभीचा भाग आणि छताच्या बाहेर काढलेल्या पागोळया (सज्जे) व घुमटाचा दर्शनीय भाग इत्यादींवर असलेल्या वरवंडी (लहान भिंती) हेही एक वैशिष्ट्य. 

5) थडग्याच्या छतावरील चारही कोपर्‍यात लहान लहान आकारांचे बुरूज असून ते इमारतीवरील मुख्य घुमटाला शोभून दिसणारे आहेत. 


6) कबरीच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी अरबी व पर्शियन भाषेत कोरलेला शिलालेख हे मिरन मुबारक खानच्या थडग्याचे वैशिष्ट्य मानावे लागेल. 

थाळनेर येथील स्थापत्य कलेवर अरबी स्थापत्य शैलीचा प्रभाव जाणवतो. कारण अरबी स्थापत्य शैलीप्रमाणे राजाच्या कबरीवर शिलालेख कोरण्याची पद्धत फारुकी सुल्तंनांनी उचललेली दिसते. येथील राजांच्या कबरीच्या वास्तू या इंडो-इस्लामिक शैलीचे नमुने मानले जातात. तरी त्यांच्यावर हिंदू कला व सौंदर्याचा प्रभाव पडलेला जाणवतो. अनेक ठिकाणी कमळ व तोरणाची नक्षी वापरली आहे. एकूण फारूकींच्या स्थापत्य शैलीवर हिंदू, अरब व मुस्लिम शैलीचा प्रभाव असल्याचा दिसतो. 

या मोठ्या कबरीच्या शेजारी खाली एका ठिकाणी वीस-बावीस छोट्या कबरी व पलीकडे मेहरब आहे. समोर अजून


नंतरच्या काळातील काही दोन-तीन कबरी आहेत. गावाच्या जवळच हा सर्व परिसर आहे. तेथून आम्ही नदीच्या जवळ असलेल्या थाळनेर या किल्ल्याकडे निघालो. 

थाळनेर किल्ल्याची निर्मिती- 1370 मध्ये हा मलिक राजा थाळनेर येथे आला आणि त्याने खानदेश मध्ये फारुकी घराण्याचे राज्य स्थापन केले. तसेच थाळनेर ही आपल्या राज्याची राजधानी म्हणून जाहीर केली. कारण थाळनेरचा किल्ला हा राज्य संरक्षणाच्या दृष्टीने भक्कम व अभेद्य असा किल्ला होता. पर्सि ब्राऊन या किल्ल्याचा उल्लेख बादशाही किल्ला म्हणून करतो. हा किल्ला तापी नदीच्या किनारी बांधला आहे. किल्ल्याच्या पश्चिमेला तापी नदीचा अर्ध चक्राकार प्रवाह वाहतांना दिसतो. आजही पावसाळ्यात किल्ल्याच्या वर जाऊन
पाहिले तर नदीच्या बाजूचे अत्यंत विहंगम दृश्य तिथे दिसते. या किल्ल्याच्या भिंतीची ऊंची सुमारे 60 फुट असून


या किल्ल्यातील सगळ्या तोफांचा मारा बहुतेक पूर्वेच्याच बाजूला आहे. कारण पश्चिमेच्या बाजूला तापी नदीचे खोल पात्र आहे तसेच उत्तर आणि दक्षिण या दिशांनी तुटलेले कडे आहेत यामुळे तिन्ही बाजूला किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण मिळाले आहे. 

मोगलांनंतर हा किल्ला मराठा काळात पेशव्यांच्या ताब्यात गेला. तेव्हा त्यांनी तो इंदोरच्या होळकरांना सरंजाम म्हणून दिला होता. 1800 च्या दरम्यान तो निंबाळकरांच्या देखरेखीखाली होता. काही वर्षांनी तो पुन्हा होळकरांच्या ताब्यात गेला. मंदसोरचा तह होईपर्यंत तो त्यांच्या ताब्यात होता.

आता मात्र या किल्ल्यावर कोणतीही जुनी इमारत अस्तित्वात नाही. एक देवीचे छोटेसे मंदिर म्हणून आहे पण ती मूर्ति जुनी असली तरी मंदिर मात्र नवे वाटते. पर्यटन विभागाकडून इथे आलिकडे छोटी तटबंदीची किनार बांधलेली दिसते तसेच पायर्‍या देखील केलेल्या आहेत. किल्ला उंचावर आहे त्याच्या सपाट पृष्टभागावरून आजही खूप लांब पर्यंतचा प्रदेश दिसतो. जेव्हा इथे मोठ्या इमारती असतील तेव्हा तर खूप मोठा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येत असेल. या ठिकाणी किल्ल्याच्या बाजूला तापी नदी वाहते. तिच्या U आकाराचे वळण गळ्यातील हारासारखे सुंदर दिसते. अजूनही खूप प्रमाणात विकास या ठिकाणी झाला पाहिजे असे वाटते.   

थाळनेरचे आर्थिक व सांस्कृतिक महत्व - तापी नदीमुळे या प्रदेशातील जमीन सुपीक होती. त्यामुळे शेतीचे उत्पन्न चांगले होते.  तसेच थाळनेर हे सूरत ते बरहानपुर या महत्वाच्या व्यापारी मार्गावर वसलेले होते. पावसाळ्यात थाळनेर येथे येणार्‍या व्यापार्‍यांना व प्रवाशांना आश्रय घेता येई. थाळनेर अर्थात खानदेशमधील व्यापार्‍यांचे सबंध दौलताबाद, हैदराबाद, अहमदनगर, विजापूर इत्यादि विविध शहरांशी फार पूर्वीपासून होते. थाळनेरचा सांस्कृतिक सबंध माळवा-गुजरातशी आला होता. 1660 मध्ये टर्विनियर या परदेशी प्रवाशाने थाळनेरच्या प्रदेशातून प्रवास केला. सूरत-बरहानपूर मार्गावरील थाळनेर हे व्यापाराचे प्रमुख केंद्र असल्याचा उल्लेख तो आपल्या प्रवास वर्णनात करतो.  थाळनेरचे भौगोलिक, सांस्कृतिक व व्यापारी महत्व ओळखून मलिक राजाने खानदेशची राजधानी म्हणून त्या ठिकाणाची निवड केली.   

1857 चा उठाव व थाळनेर –  होळकर व ब्रिटीशांचे युद्ध 1817 मध्ये झाले. ब्रिटीशांचे नेतृत्व जॉन माल्कम व थॉमस हीस्लोप हे करत होते. त्यांनी मराठा लष्कराचा पराभव करून होळकरांशी 21 डिसेंबर 1817 रोजी एक तह केला. यानुसार होळकरांना खानदेशमधील सर्व मुलुख ब्रिटीशांच्या स्वाधीन करावा लागला.  उत्तरेकडील सेंधव्याकडून


येणार्‍या सर थॉमस हिसलोप आपल्या सैन्यासह 27 फेब्रुवारी 1818 रोजी थाळनेर परिसरात दाखल झाला. त्याने किल्लेदार तुळशीराम मामास शरण येण्यासबंधी निरोप पाठविला पण तेथील किल्लेदार तुळशीराम मामाने यास नकार दिला. आहे तितक्या सैंनिकांसह व सामुग्रीसह त्याने किल्ला लढविण्यास सुरुवात केली. अखेर मुख्य किल्लेदार इंग्रजांच्या हाती आला. त्याला ब्रिटीशांनी 27 फेब्रुवारी 1818 रोजी सर्वांसमोर फाशी दिली. तुळशीराम मामा हा खानदेशमधील पहिला हुतात्मा ठरला. की ज्याने ब्रिटीशांना खानदेशमध्ये पाऊल टाकताच प्रथम विरोध केला. 

या तुळशीराम मामांच्या घराण्यातील वाड्याची जुनी मध्ययुगीन वास्तू अत्यंत देखणीय आहे. लाकडी बांधकाम या ठिकाणी आहे. जुन्या विटांचा बुरूज आहे. जुन्या काळातील रंग अजूनही फ्रेश आहेत. यानंतर आम्ही या तुळशीराम मामांचे वंशज असलेल्या नरेंद्रसिंह जमादार यांच्या घरी गेलो. डॉ. परदेशी सरांच्या ओळखीमुळे ते शक्य झाले. त्यांनी देखील बराच वेळ आम्हाला त्यांना माहीत असलेला इतिहास सांगितला. 

एकूण खानदेशची राजधानी असलेल्या थाळनेरचा इतिहास उज्ज्वल आहे. गरज आहे त्या ऐतिहासिक वास्तू टिकविण्याची व त्यांचा इतिहास जतन करून पुढील पिढ्यांकडे पोहचविण्याची. 

- समाधान महाजन   

थाळनेर विषयीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील you tube link वर क्लिक करा. 

https://youtu.be/v1UJxhW3zIY

https://youtu.be/v1UJxhW3zIY 


संदर्भ पुस्तके- 

1) खानदेश Gazetteer(1880)

2) खानदेशचा राजकीय व सांस्कृतिक इतिहास - प्रा. डॉ. टी. टी. महाजन 

3) उपेक्षित दुर्गांचा इतिहास - प्रा.डॉ.जी.बी.शाह

3) मध्ययुगीन खानदेशचा इतिहास - प्रा.डॉ.जी.बी.शाह

4) गुलशन-ई-ईब्राहिमी - फरीश्ता (मराठी अनुवाद - कॅ.डॉ.भ.ग.कुंटे)

5) यशार्थ - धुळे जिल्हा डिजिटल  ई -साप्ताहिक (दिनांक -20 मे  2018)



राजदेहेरे किल्ला (चाळीसगाव, जिल्हा-जळगाव)

चाळीसगावपासून साधारण 20-22 किलोमीटर असलेला हा एक बळकट डोंगरी किल्ला आहे.नाशिक जिल्ह्यात माणिकपुंज या छोट्या टेकडीवजा गडाजवळ सातमाळा रांग संपते आणि अजिंठा रांग सुरु होते. या रांगेतील पहिला मानकरी म्हणजे हा "राजधेर उर्फ ढेरी". वास्तविक सातमाळा रांगेत राजदेहेर, कोळदेहेर आणि ईंद्राई असे किल्ल्यांचे त्रिकुट आहे. बरेच ट्रेकर्स तिकडे भेट देतात. पण त्याच राजदेहेरेशी नामसाधर्म्य असणारा हा राजदेहेर किल्ला मात्र तुलनेने उपेक्षित आहे.

किल्ल्यावर जाण्यासाठी दगड फोडून अतिशय अरुंद अशी पायवाट केली आहे. हा किल्ला दोन टेकड्यांचा असून दोन्ही टेकडया जोडणार्‍या घळईतून किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. किल्ल्याचे दरवाजे ढासळलेल्या स्थितित असले तरी तरी ते दौलताबाद किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखे भासतात. किल्ल्याच्या पायथ्याशी राजदेहरे गावाचे काही अवशेष, पांढर्‍या मातीच्या भिंती व तळे दिसून येते. येथील तळ्याला श्रावण तळे असे नाव होते. तळ्याच्या काठावरील महादेव मंदिरात एक शिलालेख आहे. त्याचा बराचसा भाग नष्ट झाल्याने वाचने कठीण आहे. मंदीराबाहेर भग्न शिवपिंडी पडल्या आहेत. 

वर जातांना पश्चिमेकडील भागास लहान किल्ला म्हणतात. लहान किल्ल्याच्या डोंगरकपारीत एक गुहा असून ती बौद्ध लेणी असावी असा अंदाज आहे. तिला टेहळणी चावडी असे म्हणतात.लेण्याच्या समोरील ओट्यावर बसले म्हणजे संपूर्ण राजदहरे परिसर नजरेच्या टप्प्यात येतो.  याच्याजवळ एक मुख्य दरवाजा असावा. येथे भग्न मंदिराचा पाया व मंदिराजवळ आयाळ असलेल्या सिंहाच्या नक्षीचे दोन खांब दिसतात. दरीच्या बाजूस उत्तरेस प्रचंड खडक आहे. खडकात खांब रोवण्यासाठी खोल खड्डे आहेत. याचा अर्थ तिथे इमारत असावी. याच खडकावर एक पिंड व पादुका कोरल्या आहेत. पलीकडील चौथार्‍यावर भग्न नंदी असून पुढे दरबाराच्या दरवाजाचे 3/4 फुट उंचीचे अवशेष आहेत. येथून पूर्वेकडील अवघड वाटेने जुन्या महादेव मंदिरास जाता येते. तिला आडाई शिडी म्हणतात.दीपमाळेचा उपयोग किल्ल्यावर इशारा देण्यासाठी केला जात होता असे सांगितले जाते. कारण देवगिरीकडील सपाटीचा प्रदेश येथून बर्‍याच लांबपर्यन्त स्पष्ट दिसतो. 

किल्ल्याच्या दोन्ही टेकड्यांमध्ये जी प्रचंड दरी (घळई) आहे तिला गावदरी आणि बाजूच्या खोल दरीस पाताळ दरी असे म्हणतात. किल्ल्याच्या पूर्वेकडील दरीस  भवानी दरी असे म्हणतात. ही दरी म्हणजे एक प्रचंड दगडी कडा असून त्याच्या मध्यभागी एक भुयार आहे. ते पाटणा देवीजवळ निघते असे सांगतात. 

या किल्ल्यात पाण्यासाठी जवळपास सहा टाके कोरलेले आहे. पूर्वी सर्वांमध्ये पानी होते आता फक्त एकाच टाक्यात पानी आहे. किल्ल्याच्या दरवाजाचे अवशेष, काही संरक्षक भिंती व त्यावरील जंग्या, पडका बुरूज, पाण्याचे टाके, काही इमारतींचे अवशेष याशिवाय आता काहीही शिल्लक नाही. 

राजदेहेर हा किल्ला गवळीकालीन किंवा यादव पूर्वकालीन असावा. इ.स. १००० ते १२१६ पर्यंत निकुंभांची या भागावर सत्ता होती असे पाटणेदेवी मंदिरातील शिलालेखानुसार सिद्ध होते. पाटणे या राजधानी जवळच हा किल्ला असल्यामुळे लष्करीदृष्ट्या महत्वाचा असावा. इ.स. १२१६ - १७ च्या सुमारास यादवांनी हा किल्ला ताब्यात घेतला. यादवानंतर अल्लाऊद्दीन खिलजीकडे व त्यानंतर फारुकींकडे हा किल्ला होता. इ.स. १६०१ मध्ये खानदेश सुभा मुघलांकडे गेला त्यावेळी भडगावच्या रामजीपंतांनी अशिरगडच्या वेढ्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना जहागिरी देण्यात आली, त्यात राजदेहेर किल्ल्याचा समावेश होता. शिवकालीन पत्रात या किल्ल्याचा उल्लेख नाही, पण १०९ कलमी बखरीत शिवाजीमहाराजांच्या किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा समावेश केला आहे यावरून कदाचित १६७० च्या दरम्यान हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. पुढे १७५२ च्या भालकीच्या तहात निजामाकडून हा भाग पेशव्यांनी घेतला. इ.स. १७६२ मध्ये माधवराव पेशव्यांनी राजदेहेर किल्ला विठ्ठल शिवदेव विंचुरकर यांच्याकडे सोपवून १० हजार रुपयांचा सरंजाम किल्ल्याला मंजूर केला. हि सनद देताना अशी अट ठेवली होती कि शिबंदीचा खर्च शक्य तितका कमी ठेवावा किमान मागील खर्चापेक्षा वाढु नये. या दहा हजार रुपयातच गडाची डागडु़जी करावी. यासाठी वेगळा खर्च दिला जाणार नाही. पुढे १६६४ मधे पेशव्यांनी खानदेशचा सरसुभेदार नारो कृष्ण याला पत्र पाठवून, " राजदेहेर किल्ला कोणत्या अवस्थेत आहे तसेच त्यावर कोणत्या वस्तु आहेत याची यादी पुण्याहून पाहणी करण्यासाठी आलेल्या कारकुनास देण्यास सांगितले होते. इ.स. १७६४ मध्ये चाळीसगावचे जहागिरदार जगजीवनराम व माधवराव या पवार बंधूंनी बंड केल्यावर दुसर्‍या बाजीरावाने विठ्ठलराव विंचूरकर यांना चाळीसगावावर पाठविले. त्यांनी पवारांचे बंड मोडून राजदेहेर ताब्यात घेतला.

१७९६ नंतर १८१८ पर्यन्त हा किल्ला नाममात्र मराठ्यांच्या ताब्यात होता. हा काळ अस्थिरतेचा गेला. १८१८ मध्ये मराठ्यांना राज्य गमवावे लागले. कर्नल मॅकडॉवेल हा औरंगाबादमार्गे एप्रिल १८१८ मधे चांदवड येथे आला व १० एप्रिल १८१८ ला चांदवडचा किल्ला त्याने घेतला. त्यानंतर त्याने आपला मोर्चा राजदहरेकडे वळविला. त्यावेळी किल्ल्यावर मराठ्यांची अरब शिबंदी होती. १८१८ मध्ये हा किल्ला मराठ्यांचे सरदार पाटण्याच्या निकम कुलातील देशमुखांच्या ताब्यात होता. हे निकम देशमुख निकुम्भांचे वंशज असल्याचे सांगितले जाते. 

कर्नल मॅकडॉवेल या किल्ल्याच्या पायथ्याशी आला व मुकाट्याने गड ताब्यात देण्याचा निरोप त्याने किल्लेदाराला, निकम देशमुखांना पाठवला. पण हा निरोप किल्लेदार व आतल्या अरबी सैनिकांनी  धुडकावून लावला व आतून गोळीबार व जेजल्याचा मारा सुरु केला. दरवाजावर व  कड्यांच्या बाजूला दगडांच्या राशी रचून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मराठा सैन्यास पुष्कळ प्रतिकार करता आला. नाईलाजाने ईंग्रजांना लढाईची तयारी करावी लागली. ठिकठिकाणी मोर्चे बसवून ११ एप्रिलला ईंग्रजानी तोफा डागायला सुरवात केली. १२ एप्रिलला ते आणखी पुढे सरकले. किल्ल्यावरच्या सैनिकांनी पुढे येउन ब्रिटीशांवर मारा सुरु केला, पण फारसा उपयोग झाला नाही. म्हणून मराठ्यांनी ब्रिटीशांकडे निरोप पाठवला कि ते जर सैनिकांचे थकलेले पगार देणार असतील तर किल्ला त्यांच्या हवाली केला जाईल. मात्र ब्रिटीशांनी हि अट नाकारली,  फक्त खाजगी चिजवस्तू घेऊन पळून जाण्याची मुभा आक्रमकांनी देण्याचे मान्य करून दोन तासांचा अवधी विचारासाठी दिला. फक्त सैनिकांचे वैयक्तिक धन घेउन जाण्यास परवानगी दिली. व आतील सैनिकांना निर्णय घेण्यास दोन तासाचा अवधी दिला. याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून ईंग्रजांनी शेजारच्या टेकडीवर तोफा चढवून किल्ल्यावर मारा करायचे ठरले. यापुर्वी हा प्रयोग बर्‍याच ठिकाणी यशस्वी झाला होता. मात्र टेकडीवर तोफ नेणे अवघड होते. यासाठी तोफेचे सुट्टे भाग करुन टेकडीवर नेले व तिथे जोडून रात्री नउ वाजता तोफ मार्‍याला सज्ज झाली. सर्व तयारी झाल्यानंतर तोफगोळ्यांचा मारा सुरु झाला. एक तोफगोळा दारुकोठारावर पडला आणि ज्याच्या जीवावर गड लढवायचा तेच नष्ट झाले. सहाजिकच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेउन सैनिक निघून गेले. दुसर्‍या दिवशी म्हणजे  १५ एप्रिल १८१८ला जेव्हा ब्रिटीशांच्या ताब्यात गड आला तेव्हा जिवंत ४० माणसे, पाच मृत व्यक्ती, १२ तोफगोळे आणि खजिना हातात पडला.

राजदेहेरे जिंकल्यावर इंग्रजांनी राजदेहेरे ऐवजी चाळीसगाव हे मुख्य ठिकाण केले व मिर फास्त आली जहागीरदार याला चाळीसगावची जहागिरी दिली. नंतर त्याचीही जहागिरी काढून घेतल्याचे दिसते. तेव्हापासून राजदहरे गाव ओस पडले. 

- समाधान महाजन 


संदर्भग्रंथः-

१) जळगाव जिल्हा गॅझेटियर

२) उपेक्षित दुर्गांचा ईतिहास- प्रा.डॉ. जी.बी. शहा.

३) जळगाव जिल्ह्यातील किल्ले व गढया- नी. रा. पाटील 




लोणार सरोवर

लोणारचे जगप्रसिद्ध सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. आम्ही 2021 मध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी या ठिकाणी गेलो. या आधी 2003-04 मध्ये मी गेलो होतो त्यापेक्षाआता खूपच सकारात्मक बदल या ठिकाणी झालेले मला दिसले. पूर्वी सरोवराच्या कोणत्याही ठिकाणाहून लोक खाली उतरत असत. त्यावर कोणतेही निर्बंध नसल्याने खाली कचरा घाण देखील होत असे. ज्या गोमुखातून पानी पडते व सरोवरात जाऊन मिळते तिथे लोक आंघोळ करत कपडे धुवत आता या सर्व प्रकारांवर बंदी आलेली आहे. ठीकठिकाणी सुरक्षारक्षक व फॉरेस्ट ची लोक असतात. त्यामुळे आता खाली देखील स्वच्छता आहे. 20 नोव्हेंबर 2015 मध्ये लोणार हे वन्यजीवसंरक्षक अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले तसेच नोव्हेंबर 2020 मध्ये या ठिकाणाचा समावेश रामसेर साईट मध्ये करण्यात आला आहे.

सत्ययुगात लोणार सरोवर वैरज तीर्थ (वैरज तीर्थ) या नावाने ओळखले जात असे. लोणासुराच्या कथेनुसार विष्णूने लोणासुराचा वध केला व या सरोवराच्या खोलगट भागात त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या रक्तापासून येथील सरोवरातील पाणी तयार झाले, अशी आख्यायिका आहे. भोगावती कुंडात भगवान रामाने स्नान केले होते. पांडवांच्या काळात युधिष्ठिराने येथे वडिलांचे श्राद्ध केले होते , असेही सांगितले जाते. भारतीय पुराणात लोणार सरोवर आणि परिसराला कपिलतीर्थ , विरजतीर्थ , धारातीर्थ , नाभीतीर्थ , तारातीर्थ , पवित्रतीर्थ , पद्मसरोवर , पंचाप्सर आदी विविध नावे आहेत. स्कंद पुराणात ब्रह्मदेव , नारदमुनी , कपिलमुनी , अगस्तीऋषी , भृगुऋषी , याज्ञवल्क , शुक्राचार्य आदी ऋषीमुनींनी लोणार सरोवर परिसरात तपश्चर्या केल्याचा उल्लेख आहे.  कृतयुगात लोणार  या गावाची स्थापना झाली, अशी दंतकथा आहे. त्याचे जुने नाव ‘विरजक्षेत्र’ असे होते. स्कंदपुराणात वर्णिलेल्या लोणासुराची (लवणासुराची) कथा याच ठिकाणाशी निगडित असावी. विरजमाहात्म्यात याचा तीर्थ म्हणून उल्लेख आहे. प्राचीन भारताचा इतिहास पाहता ही सरोवराची भूमी दंडकारण्याचा भाग होती याचे संदर्भ मिळतात. म्हणून या भूमीला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. 

लोणार सरोवराचा शोध १८२३ साली ब्रिटिश लष्करी अधिकारी सर सी. जी. ई. अलेक्झांडर यांनी लावला आणि त्यानंतर जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली असे म्हणतात. 

शास्त्रज्ञांच्या मते दहा लाख वर्षापूर्वी ६९ मी. रुंदीच्या व वीस लक्ष टन वजनाच्या अशनी पडल्याने १,९००  मी. व्यासाचे व १९०  मी. खोलीचे विवर निर्माण होऊन तेथेच या गोलाकार सरोवराची निर्मिती झालेली असावी. या सरोवराचा बाह्य परिघ ६ किमी. अंतर्परिघ ३.५ किमी. व खोली ९० ते १९० मी. आहे. सरोवराच्या कडा १३० मीटरपर्यंत उंचावलेल्या आहेत. कडांवर काचेच्या छोट्या कणांपासून १० ते १५ सेंमी.पर्यंत आकाराचे काचेचे तुकडे पडलेले आढळतात. सरोवराचे पाणी अत्यंत खारट व मचूळ आहे. मात्र काठावरील व आजूबाजूच्या विहिरींमधील पाणी गोड आहे. सरोवराच्या पाण्यात आढळणारे क्षार, मीठ आणि अन्य पदार्थ अन्यत्र कोठेही न सापडणाऱ्या प्रकारचे आहेत. काहींच्या मते चुनखडीयुक्त विवराचे प्रचंड छत कोसळून तेथे या सरोवराची निर्मिती झाली असावी तर दख्खनच्या पठारावरील ज्वालामुखीउद्रेकाच्या वेळी जोराच्या वायुरूप स्फोटामुळे ज्वालामुखीच्या खोलगट भागात हे सरोवर निर्माण झाले असावे, असेही काहींचे मत होते. परंतु अलीकडील काळात केलेल्या संशोधनावरून उल्कापातामुळेच हे सरोवर तयार झाले असावे, असे शास्त्रज्ञांच निश्चित मत बनले आहे. बेसॉल्ट खडकरचना(अग्नीजन्य) असलेल्या प्रदेशातील अशा स्वरूपाचे हे जगातील एकमेव विवर असावे. अशाप्रकारचे बेसॉल्ट खडका पासून तयार झालेले सरोवर मंगल ग्रहावरच सापडत असल्याने  लोणार सरोवराचे महत्व वाढले आहे. जगातील उल्कापाषाण पतनामळे निर्माण झालेल्यांमध्ये हे तिसऱ्या क्रमांकाचे मोठे विवर आहे. एकूण चार सरोवरांमध्ये अॅरिझोना (अमेरिका) , ओडेसा (अमेरिका) , बोक्सव्होले (ऑस्ट्रेलिया) आणि लोणार (भारत) यांचा समावेश आहे. लोणारच्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराच्या निमिर्तीबाबत विविध मतप्रवाह आहेत. या विवरात दडला गेलेला उल्कापाषाण साधारण ६००  मी. खोलीवर रुतून बसला असावा, असा अंदाज आहे.

सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५,७०,००० ± ४७,००० वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे. सरोवराच्या वयाचे अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. थर्मोल्युमिनेसेन्स तंत्रज्ञानावरून काढलेले वय अंदाजे ५२,००० वर्ष आहे. अलीकडील अरगॉन डेटिंग वापरून काढलेले वय ५,४७,००० आहे. वयाचा नवीन अंदाज सरोवराच्या कडेला झालेल्या झिजेशी सुसंगत आहे.

जून २०२० या महिन्यात लोणार सरोवराचे पाणी लाल रंगाचे झाले होते. तज्ञांच्या मते हे पाणी तलावाच्या तळाशी काही रासायनिक क्रिया घडून आल्यामुळे किंवा हॅलो बॅक्टीरिया व ड्युनोलीला या  बॅक्ट्रियामुळे झाला असावा असे म्हणतात.परंतु या घटनेमुळे लोणार सरोवर पुन्हा एकदा जगभरात चर्चेत आले होते.     

लोणार सरोवराभोवती अनेक मंदिरे असून ती बव्हंशी मोडकळीस आलेली आहेत.  लोणार सरोवराच्या काठावर दहाव्या शतकापासून तर तेराव्या शतकापर्यंतचे जवळपास २७ मंदिरे आहेत. त्यातील अनेक मंदिरे हे यादव काळात बांधली आहेत. या मंदिरामध्ये  महादेव मंदिर, राम मंदिर, देवीचे मंदिर, सूर्य मंदिर कृष्ण मंदिर इत्यादी मंदिरांचा समावेश आहे.यातील अनेक मंदिर नामशेष झालेले आहे. या सरोवरात प्रवेश करतांना सुरवातीलाच विवर सारखा दिसणारा खड्डा आहे. येथेच हनुमानाचे मंदिर आहे.कमळजा देवी मंदिर , दैत्यसूदन मंदिर , शंकर गणेश मंदिर , रामगया मंदिर , विष्णू मंदिर , वाघ महादेव मंदिर , मोर मंदिर , अंबरखाना मंदिर , कुमारेश्वर , पापहरेश्वर , सीता न्हाणी , शुक्राचार्याची वेधशाळा , याज्ञ वल्केश्वर , धारेजवळील मंदिर , ब्रह्मकुंड , यमतीर्थ , लोणारची धार , उंबरझिरा (औदुंबरतीर्थ) , सोमतीर्थ , लिंबी बारव (वायूतीर्थ) , अगस्तीतीर्थ , त्रिपुरुषांचा मठ , आडवा मारोती आदी मंदिरांनी लोणार नगरी समृद्ध आहे. सम्राट अशोक , वाकाटक , सातवहन , चालुक्य यांच्या काळात या सरोवर परिसरातील विविध मंदिरांची निर्मिती झाली. जैन राजांनीसुद्धा मंदिरे बांधली आहेत. यादवांनी मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला.

लोणार गावाच्या मध्यभागी विष्णूने ज्या ठिकाणी लोणासुरावर विजय मिळविला असे मानले जाते, तेथे दैत्य-सूदन हे सुंदर व प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे यादवकालीन हेमाडपंथी वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. याशिवाय नरसिंह, गणपती, रेणुकादेवी, कुमारेश्वर व मारुती यांची अन्य उल्लेखनीय मंदिरे आहेत. निझाम व पेशव्यांच्या काळातही लोणारचा विकास झाला. ब्रिटिश काळात कर्नल मॅकेन्झीने लोणारचा सविस्तर अभ्यास केला. त्याच्या नोंदीनुसार , तेव्हा लोणारला ३२ मंदिरे , १७ स्मारके , १३ कुंड आणि पाच शिलालेख होते.

- समाधान महाजन 

संदर्भ - 

1) वर्‍हाडचा इतिहास - या.मा.काळे

2) मराठी विश्वकोश

3) www.wikimapia.org

4) www.buldhana.nic.in