अ प्रिन्सेस रिमेम्बर्स- गायत्रीदेवी

अ प्रिन्सेस रिमेम्बर्स  हे जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांचे आत्मकथन आहे. जगातील सर्वात सुंदर स्रियांमध्ये ज्यांची गणना केली जाते त्या गायत्री देवी. (२३ मे १९१९ ते २९ जुलै २००९). अनेक दिवसांपासून फक्त हे नाव ऐकले होते. काही चित्रपटांमधून त्यांच्यावर आधारित नायिका होत्या पण ते सर्व वरवर होते.  काही इतिहासाच्या पुस्तकातून नाव वाचलेले होते पण तेही संस्थानावर असलेल्या त्रोटक माहितीतून. हे पुस्तक हाती आले आणि या सर्व अनसुलझे रहस्यांचा रहस्यभेद झाला माझ्यासाठी. 

एखाद्या व्यक्तीचे नशीब कसे असावे? आजोळ म्हणजे गायकवाडांचे बडोदा, वडील कुचबिहार संस्थानचे राजे व नवरा म्हणजे जयपूर संस्थानचा राजा. हि लीगेसी ज्या व्यक्तीला मिळाली त्या गायत्री देवींचे व्यक्तिमत्व देखील काळाच्या पडद्यावर झळाळून जाणारे होते. काही यु ट्यूब चानेल्स मधून त्यांची माहिती दिली आहे पण ती काहीशी अतिरंजित वा उथळ स्वरुपाची आहे. त्यातल्या त्यात सिमी गरेवाल यांनी गायत्री देवींची एक मुलाखत घेतलेली आहे. ती नक्कीच बघण्यासारखी आहे. 

असो, तर या पुस्तकातून अनेक अनटच प्रश्नांची उत्तरे आहेत. आणीबाणीत पाच सहा महिने तिहार जेल मध्ये त्यांना राहावे लागले होते. त्यांच्या घरांवर आयकर विभागाची रेड पडली होती. त्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. पण त्याआधीची रंजक माहितीही महत्वाची आहे. गायत्री देवी पहिल्याच प्रकरनात त्यांच्या  कुचबिहारवरून बडोदा या त्यांच्या लहानपणीच्या  रेल्वेप्रवासाची माहिती सांगतात. कुचबिहार वरून एक रात्र प्रवास करून ते कलकत्त्याला पोहचायचे. तेथे त्यांचे ‘वूडland नावाचे घर होते तिथे दोन दिवस थांबायचे. मग पुढील प्रवासास निघायचे. शेवटी बडोदा संस्थानच्या लक्ष्मीविलास palace मध्ये पोहचल्यावर हा प्रवास संपायचा. ज्या इंजिनियरने कुचबिहारचा राजवाडा बांधला होता त्यानेच हा palace देखील बांधला होता. दोन्ही वास्तूंसाठी इंडो-सरसानिक शैली वापरली होती. 

गायत्रीदेवींच्या आजीला , आजोबांनी शिकविले. त्यासाठी शिक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. या आजी पुढे all इंडिया कॉन्फरन्सच्या अध्यक्ष झाल्या. त्यातील एक नात आणि आजोबांचा संवाद महत्वाचा आहे. आजोबा म्हणतात, “तू पलंगावर पडली तर झोपायला हवस. तू वाचत असली तर फक्त वाचायचे. खात असली तर फक्त खायचं, विचार करायचा असला तर फक्त विचारच करायचा. दोन वेगळ्या गोष्टी मिसळू नकोस. त्यातून काहीच चांगल निष्पन्न होत नाही. आनंदही मिळत नाही आणि फायदा हि होत नाही” 


१९११ च्या दिल्ली दरबाराला हे सर्व महत्वाची संस्थांनी लोक उपस्थित होते. गायत्री देवींच्या आईचे नाव इंदिरा गायकवाड. त्यांचे लग्न घरच्यांना ग्वाल्हेरच्या शिंद्यांशी करायचे होते. पण त्यांनी नकार दिला व जुलै १९१३ ला लंडन मध्ये कुचबिहारच्या राजाशी त्यांचे लग्न झाले. त्या स्वतः दिसायला सुंदर होत्या. पहिले महायुद्ध संपल्यावर ते सुट्टी घेऊन लंडनला गेले. २३ मे १९१९ रोजी गायत्रीदेवींचा जन्म झाला. गरोदरपणात त्यांची आई रायडर हेगार्डची she /शी नावाची कादंबरी वाचत होती. तेव्हा त्यांनी ठरवले कि त्यांना मुलगी झाली तर तिचे नाव या कादंबरीतील नायीकेवरून आयेशा असे ठेवायचे. गायत्रीदेवींनी बारा वर्षांची असतांना एका बिबट्याची शिकार केली. त्या शिकारीचे व एकूणच कुचबिहार संस्थानचे केलेले वर्णन वाचन्यासारखे आहे. 

 गायत्रीदेवी लंडनच्या ग्लेनडोवर स्कूलमध्ये शिकल्या. शांतीनिकेतन मध्ये देखील त्यांचे वर्षभर शिक्षण झालेले आहे. १७ एप्रिल १९४० ला जयपूरचे राजे जय यांच्याशी त्यांचे लग्न झाले. जय यांच्या त्या तिसऱ्या पत्नी होत्या. badmintan असोसीयशान ऑफ इंडियाच्या त्या अध्यक्ष होत्या. टेनिस असोसिएशन ऑफ इंडिया च्या त्या उपाध्यक्ष होत्या. 

भारताच्या पहिल्या निवडणुकीच्या काळात जोधपुरचे महाराज निवडणुकीस अपक्ष म्हणून  उभे राहिले. प्रचार संपून मतदान झाल्यानतर एका विमान अपघातात त्यांचे निधन झाले. जेव्हा निकाल लागले तेव्हा महाराजांचा दहा हजार मतांनी विजय झाला होता. त्यांच्या विरोधातील कॉंग्रेसचे उमेदवार जयनारायण व्यास यांचे डीपोझिट जप्त झाले होते. पण नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रतिस्पर्धी नसल्याने व्यास निवडून आले व राजस्थानचे मुख्यमंत्री बनले. 

गायत्रीदेवी पुस्तकात एका ठिकाणी म्हणतात, ज्या जमिनीवर नवी दिल्लीची उभारणी झाली आहे. ती पूर्ण जमीन एके काळी जयपूरच्या महाराजांची व्यक्तिगत मालमत्ता होती. पण बऱ्याच काळापूर्वी त्या जमिनी सरकारला दिल्या गेल्या. नवी राजधानी वसविण्यासाठी जयच्या दत्तक वडिलांनी पंजाबमधील एका खेड्याच्या बदल्यात ती जमीन देऊन टाकली. 

गायत्री देवी यांनी जयपूर हस्तकलेचे प्रदर्शन नवी दिल्ली येथे भरवले होते तेव्हा त्याचे उद्घाटन पंडित नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले होते. १९६२ च्या निवडणुकीत गायत्री देवी यांनी सी. राजगोपालाचारी यांच्या  स्वतंत्र पक्षाकडून निवडणूक लढवली. प्रचार केला. कॉंग्रस पक्षाचे चिन्ह होते एकत्र जुंपलेली बैलजोडी, समाजवादी पक्षाचे चिन्ह होते वटवृक्ष, साम्यवादी पक्षाचे चिन्ह होते कोयता आणि गव्हाच्या ओम्ब्याच्या तीन डहाळ्या, स्वतंत्र पक्षाचे चिन्ह तारा होते. गायत्रीदेवींना ते चिन्ह  पटवून देण्यात खूप त्रास व्हायचा. अखेर निकाल लागला तेव्हा कॉंग्रेस उमेदवाराचा एक लाख पंच्यात्तर हजार मतांनी  पराभव करून गायत्री देवी निवडून आल्या. या बहुमतामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झाली. सर्व विरोधी उमेदवारांचे डीपोझीट जप्त झाले. तेव्हाचे अमेरिकन अध्यक्ष केनेडी यांच्याशी भेट झाली होती. 

एकूणच गायत्री देवी यांच्या आयुष्याच्या विविध घटनांची आपल्याला माहिती तर मिळतेच शिवाय तत्कालीन समाजव्यवस्था, संस्थानिक व जनता यांच्यातील नाते. तत्कालीन राजकारण अशा विविध बाबींची महत्वपूर्ण माहिती या पुस्तकातून आपल्याला मिळते. 

- समाधान महाजन / १७ मार्च २०२५ 


सतीश आळेकर

काल  १० मार्च २०२५ रोजी  सतीश आळेकर यांना जनस्थान पुरस्कार देण्यात आला. नाशिकच्या  गुरुदक्षिणा हॉल इथे संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम होता. इथे कुमार केतकर, जब्बार पटेल, वसंत आबाजी डहाके,  प्रभा गणोरकर, आदी मंडळी उपस्थित होती.

कार्यक्रम बघतांना जाणवत होते, हि  एक जुनी पिढी आहे. काळाच्या पडद्याआड झपाट्याने जात आहे. या मंडळींचा जन्म स्वातंत्र्य मिळाले त्याच्या आसपासचा. त्यामुळे स्वातंत्र्याच्या काळातील पिढीचा यांच्यावर एक पगडा असेल. आदर्शवाद आणि त्याला जोडून स्वातंत्र्योत्तर काळात आलेला भांडवलवाद व मुक्तपणा अशा पार्श्वभूमीवर वावरणारी हि पिढी होती.

शिक्षण व अभ्यास सुरु असतांना यातील कुसुमाग्रज, बापट, करंदीकर, पाडगावकर, श्रीराम लागू, निळू फुले, विजय तेंडूलकर आदी दिग्गज म्हणवली जाणारी व्यक्तित्व हे काळाच्या पडद्याआड गेले होते. अर्थात दैनदिन वावरात त्यांच्याबद्दल वाचत व ऐकत होतोच. माझ्या मोठ्या भावाला एका निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल निळू फुले यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले होते. तेव्हाचा तो फोटो लहानपणी पाहिलेला असल्याने चित्रपटापलीकडील निळू भाऊ आहेत असे माहिती झाले होते. विजय तेंडूलकर यांची एक दोन पुस्तके काही मुलाखती पाहिलेल्या. त्यातील माझ्या हाती बंदूक असती तर अशा प्रकारचे विधान त्यांचे त्या काळात बरेच प्रसिद्ध झालेले. असे एकूण, म्हणजे अशा दिग्गज म्हणवल्या जाणाऱ्यांच्या आठवणी या अशा पाहीलेल्या, ऐकलेल्या वा वाचलेल्या. भेट, फोटो असे नाही. आपल्या स्वतःच्या जगण्यानातील संघर्षाची किनार संपत नाही तोपर्यंत नाटक, कादंबरी, कविता हे सर्व लाड कोड व एकदम ग्रामीण भाषेत सांगयचे म्हटले तर हे सर्व चोचले जिथे वाटतील असा भोवताल आसपास असल्याने सुरुवातीला एक वाचन सोडले तर व त्यातून जागृत होणारी उत्सुकता सोडली तर या क्षेत्रात आमची तशी फर प्रगती नव्हती. अर्थात हे फार उशिरा कळल कि यालाच जगणे समजणारी लोक इकडे आहेत. स्वतःचे आयुष्य या क्षेत्रात वेचणारे लोक आहेत. लौकिकअर्थाने कदाचित सर्वांनाच सुख संपत्ती नाव असे मिळाले नसेल कदाचित पण याच क्षेत्रात राहून संघर्ष करणारी मंडळी नंतरच्या आयुष्यात समजत गेली. असो, 

 तर हे ज्या वरील मंडळींचे नाव मी सांगितले ती पिढी त्याच्याही आधीच्या पिढी सोबत वाढलेली. म्हणजे काल जब्बार पटेल व  सतीश आळेकर ज्या पद्धतीने कुसुमाग्रजांच्या आठवणी सांगत होते किंवा काही दिवसांपूर्वी पॉप्युलरच्या आठवणी ज्या प्रमाणे रामदास भटकळ यांच्या कडून एका कार्यक्रमात एकल्या. किंवा भालचंद नेमाडे त्यांच्या जुन्या काळातील आठवणी ज्या पद्धतीने सांगतात हे सर्व ऐकून वा या याच्यावर विचार करून असे वाटते कि या मंडळींना अगदी परीस असलेले माणसे भेटलेली. त्यांच्या संपर्कात आलेले. काम वा लिखाण याबद्दल त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालेले अशी हि लोक आहेत. ज्यांना काळाच्या पडद्याआड गेलेल्या लोकांचा परीसस्पर्श मिळाला. असो,


तर आपल काय ?


सॉरी माझ काय?


मी इकडे कुठे न कशात?


तर त्याचे असे झाले कि हा कार्यक्रम ऐकत असतांना जाणवले कि हि परीसस्पर्श लाभलेली सर्व मंडळी आज वयाने  साठच्या पुढे आहे. या लोकांना मी आज ऐकू शकत आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचे बालपण एकूणच हे मी अशा काळाबद्दल ऐकत आहे जेव्हा मी या भूतलावर नव्हतो. मला ते खूप आवडते. किती सुंदर ते दिवस असे वाटते. ...पण चटकन वाटते हि मंडळी देखील एकदिवस अशीच एकदम नाहीशी होतील एक एक. ..... तेव्हा ?

ऑफकोर्स काळ पुढे सरकतो. नवीन पिढी तिच्या कर्तुत्वाने वर येते. अगदी बरोबर....

पण काल सतीश आळेकर ज्या पद्धतीने कुसुमाग्रजांच्या घरातील भेटीगाठी याबद्दल सांगत होते. जे माझ्यासाठी पूर्णतः नवीन होते... जे त्यांच्या कोणत्या पुस्तकात नाहीय... हे मला कोण सांगणार..? याच्यावरची उत्तरे मला नको आहेत.


मी जे आता ऐकतोय..अनुभवतोय...हाही एक काळ आहे.


आणि आपल्या जगाच्या पलीकडे अनेक जग असतात तेथील यशाच्या फुटपट्टी वर ते लोक प्रचंड यशस्वी असतात. आपल्याला नावे माहिती असतात फक्त किंवा माहिती देखील नसतात. आपण समोर आलेले क्षण जगुण कृतार्थ व्हावे इतकेच! 

- समाधान महाजन. 

11/03/2025