झोडगे येथील प्राचीन मंदिर

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात झोडगे येथील मानकेश्वर हे प्राचीन मांदिर प्रसिद्ध आहे. मालेगाव ते धुळे मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र.3 वर हे गाव लागते.रस्त्याने जातांना उजव्या बाजूला हे मंदिर स्पष्ट दिसते. असे जरी असले तरी ' अतीपरीचायात आवज्ञा ' या उक्तीनुसार ' जवळच तर आहे ' पाहू कधीतरी म्हणून या मंदिराला भेट देणे शक्य झाले नाही असे या परिसरातील अनेक जण असतील. मी देखील कित्येकदा ठरवून देखील आजवर जाणे शक्य झाले नव्हते. पण आज हा योग आला. 

अंबरनाथ येथील शिवमंदिर ,सिन्नर येथील गोंदेश्र्वर मंदिर,तसेच त्र्यंबकेश्र्वर व औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लंगांची मंदिरे हे याच शैलीतले आहेत. मंदिरावरील शिल्प अत्यंत कोरीव आहेत मंदिराची डावी बाजू काही प्रमाणात ढासळलेली असली तरीही उजवी बाजू अजूनही जशीच्या तशी आहे .भगवान विष्णूच्या १० अवतरांची शिल्प इथे पाहावयास मिळतात .येथील शिवलिंग कोकणातील "मारलेश्वर शिवलिंगाशी साधर्म्य साधणारे आहे. मंदिर पाश्चिमाभिमुख आहे . त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरण थेट गाभर्यात प्रवेश करतात . मंदिराचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील एकमेव असे मंदिर आहे की,  ज्याला ३ "कीर्तीमुख " आहेत . याच्याशी सलग्न कुठल्याही हेमाडपंथी अथवा इतर शैलीतल्या मंदिरांना १ च कीर्तीमुख आहे.  सध्या यातील दोन किर्तिमुख तसेच आहेत तर तिसरे ढासळले आहे. 

महाराष्ट्रातील प्रसिद्ध हेमाडपंत शैलीत या मंदिराची रचना आहे. अत्यंत सुबक व सुंदर कलाकृती येथील मंदिराच्या दगडांवर कोरलेल्या आहेत. याच मंदिराच्या समोर अजुन अशाच एका मंदिराची निर्मिती होत होती. पण काही कारणाने ते पूर्ण झाले नाही. त्यामागील परंपरागत कथा मला कमलाकर आबा देसले यांनी सांगितली. 

झोडगे येथील प्रसिद्ध कवी, गझल कार, लेखक श्री कमलाकर आबा देसले हे आज माझ्यासोबत मंदिर दाखविण्यासाठी आले होते. झोडगे येथे आलो म्हणजे आबांची भेट मी आवर्जून घेतो. खरं तर आबांच्या अनेक लेखात या मंदिरा बद्दल उल्लेख असायचा. काही वर्षांपासून आबांच्या दोन्ही मुलांनी व त्यांच्या मित्रपरिवाराने या मंदिरात दिवाळीच्या काळात दीपोत्सव साजरा करण्याची एक अत्यंत चांगली प्रथा पाडली आहे. दिवाळीत एक दिवस ही सर्व तरुण मित्र मंडळी एकत्र येते संध्याकाळी मंदिराच्या एका विशिष्ट उंचीपर्यंत दिवे / पणत्या लावल्या जातात. जसं जसा अंधार पडतो तसे या दिव्यांच्या उजेडात हे मंदिर अत्यंत सुंदर दिसते. आबा सांगत होते की अलीकडे प्रसार माध्यमांनी देखील या उपक्रमाची दखल घेऊन या दिपोत्सव ला प्रसिद्धी दिल्यामुळे अनेक पावले या ठिकाणी वळत आहेत. 

शिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते, तेव्हा भाविकांची गर्दी मंदिर दर्शनासाठी आवर्जून येते. 

आबांसारख्या व्यक्ती व दक्ष झोडगेकर ग्रामस्थांना मूळे हा महाराष्ट्राचा बहुमूल्य सांस्कृतिक ठेवा टिकून आहे. पुरातत्व खात्याने करण्यासारख्या अनेक गोष्टी अजुन आहेत. त्या झाल्या तर या सर्व प्रयत्नांना नक्कीच पूर्णत्व होईल. 

- समाधान महाजन

(कीर्तीमुख म्हणजे हिंदू धर्मात घरच्या प्रवेश द्वाराला लावले जाणारे मुखवटे. ज्याचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण 

महत्व आहे. तसेच अनेक मंदिरांच्या प्रवेशव्दापाशी एक राक्षसाच्या मुखासारख एक शिल्प कोरलेले दिसते. या शिल्पाच नाव आहे "किर्तीमुख". ही किर्तीमुख मंदिराच्या प्रवेशव्दापाशी ठेवण्या मागची सुध्दा एक कथा आहे.. किर्तीमुख नावाचा असूर होता. तो शंकराचा भक्त होता त्याने तहान भूक विसरून घोर तपश्चर्या केली. कालांतरान शंकर त्याला प्रसन्न झाले. शंकराने त्याला वर मागण्याची आज्ञा दिली. तेंव्हा प्रचंड भूकेची जाणीव झालेल्या त्या असूराने महादेवांना खायला देण्यास सांगितले. महादेवाने त्याला स्वत:च शरीर पायापासून खायला सांगितले. त्या असुराने तसे केल. तरीही त्याची भूक भागली नाही. त्यावर उपाय म्हणून शंकराने त्याला सांगित्ले, की तू माझ्या दारात येऊन बस आणि येणार्‍या जाणार्‍या सर्व भाविकांची पाप खा. तुला ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हा पासून या किर्तीमुखाच शिल्प शिवमंदिराच्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली. हरीश्चंद्रगडावरील मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी ही किर्तीमुख आहेत. अनेक ठिकाणी लहान लहान किर्तीमुखांतून फुलाच्या माळांची तोरण विणलेली दाखेवलेली आहेत.)

 


धुळे शहर, डॉ बाबासाहेब आंबेडकर व लांडोर बंगला (लळींग)

आजचा दिवस माझ्यासाठी महत्वाचा होता. माझ्या स्वतःच्या तालुक्यात व जिल्ह्यात अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला येथे आज मला मित्रांसोबत जाता आले. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1937 मध्ये भेट दिली होती. सन १९३७ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर धुळे शहरात न्यायालयीन कामकाजासाठी आले होते. धुळ्यातील प्रेमसिंग तवंग नावाच्या वक‌िलांचा खटला चालविण्यासाठी त्यांना धुळे शहरात बोलाविण्यात आले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी दि. २९, ३० व ३१ जुलै १९३७ ला तीन दिवस शहरातील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या लळींग किल्ल्याजवळील लांडोर बंगला येथे मुक्काम केला होता. 

बाबासाहेब  धुळे शहरात आले असता त्यांनी शहरातील विजयांनद चित्रमंदिरामध्ये जाहीर सभा घेवून दलित जनतेला मार्गदर्शन केले. धुळ्यातील असंख्य कार्यकर्त्यांसह लळींग येथील विश्वासू सहकारी अण्णासाहेब  पुनाजी लळींगकर यांना भेटायला गेले. त्यांच्या घरीच भोजन करून  लांडोर बंगल्यावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी करण्यात आल्या. या तीन दिवसांच्या मुक्कामात बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना, समाजाला आणि महिलांना उपदेश व मार्गदर्शन केले. 

याच काळात त्यांनी धुळे शहरातील गरूड वाचनालयाला भेट दिली आणि इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळाला देखील भेट देऊन अभिप्राय नोंद केला आहे. त्याचा आजही संग्रह आहे. आण्णासहेब लळींगकरांची बहिण कृष्णाबाई यांनी स्वरचित अहिराणी गीते गावून तर तालुक्यातील नरव्हाळचे दिवंगत रतन जाधव या शाहीराने आपल्या शाह‌िरीतून बाबासाहेबांचे मनोरंजन केले. दि.१ ऑगस्टला बाबासाहेब मुंबईला परत जाताना आण्णासाहेब लळींगकरांना तात्कालीन धुळे जिल्ह्यातील तालुका असलेल्या नंदुरबार या आदिवासी असलेल्या गावी जावून शैक्षणिक कार्य करण्यास सांगितले.  त्यानंतर लळींगकर यांनी नंदुरबार शहरात जिल्ह्याचे तत्कालीन धुळे जिल्हाधिकारी कॅप्टन कुऱ्हे यांच्या हुकुमाने साक्री नाका परिसरात पातळगंगा नदीकिनारी जागा मिळवली होती. आणि त्याठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी छात्रालयाची स्थापना करण्यात आली होती.  अण्णासाहेब लळिंगकर यांनी अत्यंत जिद्दीने आंबेडकरी चळवळ चालवली होती. ते काही वर्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक म्हणून देखील राहिले होते. 

बाबासाहेबांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या या लांडोर बंगल्याच्या वास्तुस भेट देण्यासाठी असंख्य पर्यटक येतात. ३१ जुलै रोजी लळिंग जवळील या लांडोर बंगला परिसरात दलित बांधवांचा मेळावा भरतो. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.


वन विभागाने अत्यंत सुंदर पद्धतीने या बंगल्याची निगा तर राखलीच आहे पण त्याचसोबत बंगल्याच्या आजूबाजूचा परिसर देखील खूप चांगल्या प्रकारे विकसित करण्यात आला आहे. या ठिकाणी वन विभागाची जी मंडळी आहे ती अत्यंत आस्थेने व काळजीपूर्वक सर्व निगा राखत असल्याचे दिसते तसेच तितक्याच तळमळतेने लोकांना ही सर्व माहिती व्हावी अशी त्यांची धडपड असते.

डॉ.बाबासाहेबांनी ज्या दिवाण / बेडवर विश्राम केला होता. तो बेड देखील जतन करण्यात आलेला आहे. तसेच अलीकडे त्याच खोलीत बाबासाहेबांचा एक सुंदर अर्धकृती पुतळा देखील बसविण्यात आलेला आहे. लगतच्या उर्वरित दोन खोल्या रिकाम्या आहेत. अशी अपेक्षा आहे या ठिकाणी बाबासाहेबांच्या ग्रंथाचे व त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांचं एक संग्रहालय करण्यास हरकत नाही तसेच त्यांचे त्या काळातील धुळे भेटीचे व इतर छाया चित्र देखील लावले तर ते अधिक चांगले होईल.

याच बंगल्याच्या परिसरात पावसाळ्यात अत्यंत रमणीय वातावरण असते. आज माझ्यासोबत मित्रवर्य  श्री मनजीत सिंग चव्हाण ( PI, ACB धुळे) व श्री योगेश सोनवणे ( शिक्षक)  हे होते. या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ वनस्पतींचे एक राखीव उद्यान बनवलेले आहे तसेच विविध प्रकार असलेले एक कॅक्ट्स गार्डन देखील बनविण्यात आले आहे. 

बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या स्थळास एकदा नक्की भेट द्या.  

- समाधान महाजन 

इतिहासाचा अभ्यास

 


२०२० या संपूर्ण वर्षात कोरोनाच्या साथीने अवघ्या जगात थैमान घातले होते. मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन झालेला देश नुकताच कुठे मोकळ्या हवेत श्वास घेऊ पाहत आहे. पण या पूर्ण कालावधीत फक्त देशालाच नव्हे तर अवघ्या विश्वाला एक नव्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी हा एक नवीन इतिहास लिहिला जात आहे.

आता नवीन वर्ष सुरू झाले आहे. गेल्या वर्षी आयोगाच्या सततच्या बदलत्या तारखामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा ठरवणे अवघड होत गेले. एक वेळ अशी आली की आयोगाच्या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी तहकूब करण्यात आल्या, त्यांच्या तारखा अजूनही निश्चित झाल्या नाहीत. त्या लवकरच होतील पण एक परीक्षार्थी व विद्यार्थी म्हणून आपले काम असते की आपण सदैव तयार असले पाहिजे. सैनिक जसे युद्धासाठी तयार असतात अगदी तसे. कुठलाही excuse अशा वेळी स्वतः साठी देणे हे आपल्याचसाठी जोखमीचे ठरू शकते. म्हणून अंतिम विजय गाठायचाच असेल तर न थांबता आपण स्वतः ठरलेल्या नियमांप्रमाणे चालत राहिले पाहिजे.

आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करत असताना अनेक विषयांचा अभ्यास आपल्याला करायचा असतो.  इतिहास हा त्यातीलच एक विषय. मुळात शालेय वयात काही ठिकाणी ज्या पद्धतीने  इतिहासाचे अध्ययन व अध्यापन केले जाते त्यातून विद्यार्थ्यांची इतिहासाविषयीची निम्मी आवड संपलेली असते. कला शाखेतील विद्यार्थी काही प्रमाणात इतिहासाशी सबंध ठेऊन असतात पण अकरावी पासून सायन्स साईड घेतलेल्या विद्यार्थ्यांचा इतिहासाशी सबंध येतो तो थेट आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करतेवेळी. अशा वेळी इतिहास हा विषय नकोसा वाटणारे अनेक विद्यार्थी आहेत. पण मार्कांच्या शर्यतीत एक एक गुण महत्वाचा असतांना तो टाळता देखील येत नाही. मुळात खरेच इतिहासाचे स्वरूप असे आहे का? तर मुळीच नाही. इतिहास हा एक अत्यंत रंजक विषय आहे व तितकाच तो गुण देणारा देखील आहे. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेपासून तर एमपीएससी वा जिल्हा स्तरावरील अगदी वर्ग ३ च्या परीक्षांमध्ये देखील इतिहास आपले महत्वाचे स्थान राखून आहे. म्हणून या वेळी आपण पाहणार आहोत इतिहास या विषयाबद्दलचे गैरसमज दूर करून अधिकाअधिक गुण आपल्याला त्यात कसे मिळवता येतील.

सर्वात प्रथम इतिहासाबद्दल असणारा अगदी प्राथमिक  गैरसमज असा की इतिहास म्हणजे फक्त सनावळ्या व
युद्ध. वरवर पाहता त्यात तथ्य आहे पण अलीकडील आयोगाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका जर आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की अलीकडे खूप क्वचित प्रश्न  सनावळ्यांवर असतात. उदाहरणार्थ २०१९ या वर्षात झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा व यूपीएससी ची पूर्व परीक्षा यांचे पेपर पाहिले असता आपल्या लक्षात येईल की
, दोन्ही पेपर मिळून(१५+१५) अर्थात एकूण ३० प्रश्न जे इतिहासावर आहेत त्यातील फक्त दोन ते तीन प्रश्न सनावळ्यांवर आहेत. तेही अप्रत्यक्षपणे विचारले गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा आपला गैरसमज मनातून काढून टाका की इतिहास म्हणजे फक्त वर्ष व सन.

इतिहास म्हणजे जुनी गाडलेली भुते. त्यांना परत का जमिनीवर आणायचे? हा अजून एक गोड गैरसमज. मुळात कुठल्याही समाजाच्या, राज्याच्या वा देशाच्या प्रगतीचा पाया हा इतिहासावर आधारलेला असतो. ऐतिहासिक आकलन न झाल्यास वर्तमानातील प्रश्नांचे स्वरूप कळने अवघड जाते. अशी इतिहासाचा कोणताही पाया नसलेली व्यक्ती शासन प्रक्रियेतील महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत कशी बरे सांगोपांग विचार करून निर्णय घेऊ शकेल? आज आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थीच उद्या आयएएस, आयपीएस, उपजिल्हाधिकारी, प्रांत, पोलिस उपधीक्षक, तहसिलदार अशा विविध पदावर काम करणार आहेत. त्यांना या देशाच्या इतिहासाची व समाजाची वीण कळलीच नाही तर ते देत असलेल्या योगदानाचे मूल्य त्यांना कसे कळेल? ते अवघड प्रसंगी सर्वांचा विचार करून निर्णय कसे घेऊ शकतील?

भारतातील आरक्षणाचा प्रश्न, काश्मीरचा प्रश्न, श्रीलंकेचा प्रश्न, भारतातील आदिवासी जाती-जमाती, भारतातील भटक्या जाती व जमाती, भारतातील विविध ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळे, सामाजिक पद्धती, प्रथा- परंपरा या सर्वांचे आकलन केव्हा होईल जेव्हा या सर्वांचा थोडा का असेना इतिहास आपल्याला माहिती असेल. आणि तेव्हाच आपण आपल्या भावी पिढीला एक समृद्ध वारसा देऊ शकतो.

अलीकडे जेव्हा विद्यार्थी मला भेटतात वा संपर्क करतात तेव्हा त्यांचा प्रश्न असतो आयोगाच्या परीक्षेत आजकाल इतिहासाचे “काहीही” प्रश्न विचारतात. या या अमुक पुस्तकात त्याचे उत्तरच सापडत नाही. किंवा अगदीच काही निरागस मुले म्हणतात, “आयोगाने बहुतेक या वर्षी आऊट ऑफ सिलेबस प्रश्न विचारले आहेत.” खर तर बहुतांश परीक्षेमध्ये आयोगाचा अभ्यासक्रम आधुनिक भारताचा इतिहास- महाराष्ट्राच्या विशेष संदर्भातअसा आहे त्यामुळे कोणताही प्रश्न विचारला तर तो यात बसतो. दुसरे म्हणजे प्रश्नांचे स्वरूप. आता आपण हा विचार केला पाहिजे की स्वातंत्र मिळून आपल्याला 73 वर्ष झाली आहेत. 1947 ते 2020 या दीर्घ कालावधीत भारतीय राजकारण, विज्ञान-तंत्रज्ञान, माहिती व दळवळण यात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. मूल्य-व्यवस्था बदलेली आहे. 70-80 च्या दशकातील पिढी व या 2020 मधील तरुनांची पिढी यांच्यात एकूणच सर्वांगीण अंतर पडले आहे. साहजिकच  जस जसा कालावधी वाढतो व नवनवीन शोध लागत जातात तसे एकाच घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलत जातो. उदाहरणार्थ 1950-60 च्या दशकातील लोक ज्या पद्धतीने व विचाराने एकूणच भारतीय स्वातंत्र्य चळवळीकडे व त्यांच्या नेत्यांकडे पाहत असत त्यात आता बदल झाला आहे. हा बदल चिकित्सक व समीक्षक पद्धतीचा आहे. राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेली चळवळ व राष्ट्रीय नेते यांच्याबद्दल पूर्ण आदर ठेऊन आजकाल नवीन संशोधक या पद्धतीने विचार करत आहेत की त्या काळात त्यांच्या आजूबाजूला कोणत्या घटना घडत होत्या. त्यांच्या आसपास या चळवळींचा काही प्रभाव होता का? किंबहुना प्राचीन भारताच्या हडप्पा मोहेंजोदडो साइट्स जगप्रसिद्ध आहेत पण मग आपल्या राज्यात आपल्या जिल्ह्यात त्या संस्कृतशी सबंधित काही सापडते का? असे प्रश्न तरुण संशोधांकांना पडतात, ते त्याचा अभ्यास करतात. त्यावर लिहितात. त्यांना विज्ञान तंत्रज्ञानाची मदत मिळते. त्यातून अनेक नवे संशोधन प्रकाशित होत आहेत. त्या काळात महत्वाचे योगदान देणार्‍या घटना व व्यक्तींवर संशोधन होऊन त्या प्रकाशझोतात येत आहेत. परिघाबाहेरचे प्रश्न विचारले जात आहे. हा subaltern history आहे. नीचे से देखो असे त्याचे स्वरूप आहे. एका अर्थाने इतिहास हा स्थिर कधी नसतो.


या सर्व बदलांचा परिणाम आयोगाच्या अभ्यासक्रम व प्रश्न विचारण्याच्या पद्धतींवर देखील होतो. नुकतेच जून-2020 मध्ये आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात जो काही बदल केला आहे तो या सर्व घडामोडींचा परिणाम आहे. अजून एक उदाहरण आपणास देतो, 2020 मध्ये झालेल्या upsc च्या पूर्व परीक्षेत सखाराम गणेश देऊस्कर व रखमाबाई राऊत यांच्यावर बहूपर्यायी प्रश्न विचारले गेले आहेत. जे देऊस्कर महाराष्ट्रीयन असून त्यांनी बंगाल मध्ये मोठे कार्य केले होते. 1884 च्या रखमाबाइ राऊत खटल्याचे परिणाम महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण भारतातील सुधारणा चळवळींवर पडले. तसेच काही वर्षापूर्वी राज्यसेवा परीक्षेत बुलढाणा जिल्ह्यात 1930 च्या काळात सत्यशोधक समाजाच्या धरतीवर झालेल्या चळवळीवर प्रश्न विचारले गेले होते.

आता महत्वाचा प्रश्न म्हणजे हे प्रश्न कसे सोडवायचे व एकूणच इतिहासासाठी कोणते पुस्तके वाचायची? अभ्यास करतांना विद्यार्थ्यांची संदर्भ पुस्तकांची यादी ठरलेली असते. त्यात अधिकचे पुस्तक कोणालाही नको असते. वाटल्यास कमी झाल्यास चालेल अशी मानसिकता असते. एकूणच परीक्षेतील स्पर्धा व प्रत्येक विषयाला मिळणारा वेळ बघता एक प्रकारे ते बरोबरच आहे. अभ्यास करत असलेल्यांचे दोन प्रकार पडतात एक ज्यांचे उद्दीष्ट लगेचच येणारी परीक्षा असते व दुसरे ज्यांना पुढील एक दोन वर्षात परीक्षा द्यायची असते. ज्यांना परीक्षा देण्यास वेळ आहे त्यांनी त्यांच्याकडील सर्व संदर्भ पुस्तके वाचने गरजेचे आहे. कारण परत तितका वेळ भेटत नाही. आणि महत्वाचे म्हणजे वाचलेले अभ्यासलेले कधीच वाया जात नाही उलट ते आपल्या नॉलेज मधील अॅडिशन असते. फक्त इतिहासच नाही तर इतर विषयांना देखील हाच नियम लागू होतो.

आधुनिक भारताच्या इतिहासासाठी माझे पुस्तक अलीकडे जवळपास सर्वच विद्यार्थी वाचत असतात. या पुस्तकाचा फायदा हा आहे की हे पुस्तक संपूर्ण परिक्षाभिमुख व अभ्यासक्रमावर आधारित आहे. आयोगाचा अभ्यासक्रम व आयोगाच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न हा या पुस्तकाचा पाया आहे. फक्त राज्यसेवाच नव्हे तर संयुक्त परीक्षा गट-ब व क साठी देखील हे पुस्तक उपयोगी आहे. या पुस्तकाची रचना करण्यासाठी कोणते संदर्भ पुस्तके/ग्रंथ वापरली आहेत त्यांची यादी पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेली आहे. ज्यांना आता लगेचच येणारी परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी व आगामी वर्षात येणार्‍या परीक्षा द्यायच्या आहेत अशा सर्वांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल. त्याचप्रमाणे याच वर्षी प्राचीन भारताच्या इतिहासाची देखील पहिलीच आवृत्ती प्रकाशित झाले आहे. प्राचीनचे हे पुस्तक देखील परिक्षाभिमुख आहे.   

दुसरे महत्वाचे म्हणजे चालू घडामोडींचा अभ्यास करत असतांना विद्यार्थी ज्या वेळी वृत्तपत्रांचे वाचन करत असतात त्या वेळी त्यात इतिहासाबद्दल येणार्‍या लेखांचे आवर्जून वाचन करावे. इतकेच नव्हे तर इतिहासाच्या नवीनच प्रकाशित होणार्‍या पुस्तकांची समीक्षा देखील वाचण्यास हरकत नाही. त्यातून आपल्याला नवे दृष्टीकोण मिळतात. एखाद्या व्यक्ति विषयी वाचत असतांना त्याच्या जीवनातील विविध पैलूंवर लक्ष असू द्यावे. इतिहासाचे कोणतेही पुस्तक वाचत असतांना त्यातील कालानुक्रम सोबतच घटनांमागील कार्यकारणभाव त्याचे लॉजिक देखील समजून घेणे गरजेचे आहे.

खर तर इतिहास हा खूपच सुंदर विषय आहे. त्याविषयी भरपूर काही लिहिता येईल. तूर्तास आता इथे थांबू. नवीन वर्षाच्या व आगामी काळात होणार्‍या सर्व परीक्षांसाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!  

- समाधान महाजन 

(सदरील लेख युनिक बुलेटीनच्या जानेवारी 2021 च्या अंकात प्रकाशित झाला आहे.)