अक्षय खन्ना

शेवटी आज ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर चित्रपट पाहण्याचा योग आला, अर्थात टीव्ही वर कारण थिएटर मधून तो मिस झाला होता. यात अक्षय पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मीडिया ऍडव्हायजर म्हणून काम करतांना दिसतो. 
अक्षय हा खूप गुणी व ताकदवान अभिनेता असून एकूणच चांगले स्क्रिप्ट, चांगले बॅनर व ब्लॉकबॅस्टर हिट न मिळाल्याने तो तसा वंचितच राहीलाय  असं माझं वैयक्तिक मत आहे. 
बॉर्डर मध्ये सगळ्या मुरलेल्या चेहऱ्यांमध्ये एकदम नवी पालवी सारखे त्याचे दर्शन सुखद वाटते, आजही जेव्हा केव्हा बॉर्डर दिसतो तेव्हा त्याची ती गालावर पडणारी खळी, किंचित ओठ बाजूला घेऊन हसन, डोळ्यातील चमक  फ्रेश करून जाते. 
ताल मध्ये अनिल कपूर, ऐश्वर्या समोर असतांना पण जी ग्रीप अक्षय ने पकडलीय त्याला तोड नाही. त्यावेळी त्याच्या डोक्यावर असलेली ती खास हिमालयीन टोपी व तो चेहरा नजरेसमोरून जात नाही, भलेही ऐश्वर्या कितीही आकर्षक दिसो.
आ अब लौट चले हा ऐश्वर्या सोबत असलेला अजून एक चित्रपट. आता कदाचित आवडणार नाही पण फॉरेन लोकेशन वर चित्रित करण्यात आलेली सुंदर दृश्य असणारा हा चित्रपट मी कॉलेजला असतांना आलेला व तेव्हा पाहिल्याने आवडलेला असा होता. 
मोहोब्बत हा माधुरी सोबतचा चित्रपट.  या वेळी चर्चा माधुरीच्या होत्या. कारण बाप विनोद खन्ना सोबत दयावान मध्ये व या मोहोबत मध्ये मुलगा अक्षय सोबत एकच हिरोईन ती म्हणजे माधुरी , याही चित्रपटात अक्षय जगला होता. 
नंतर काही कॉमेडी चित्रपटात व दिल चाहता है सारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिका चांगल्या होत्या. अजूनही कॅरॅक्टर रोल मिळाल्यास तो उत्तम न्याय देईल. 
आज ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरच्या निमित्ताने त्याची आठवण पुन्हा ताजी झाली इतकंच. 
- समाधान महाजन

गिरीश कर्नाड

नोव्हेंबर २०१६ च्या आसपास गिरीश कर्नाड यांचे खेळता खेळता आयुष्य हे पुस्तक वाचण्यात आले आणि मी खुप प्रभावित झालो.  त्याच वेळी त्या पुस्तकाबाबत फेसबुकवर एक  छोटी पोस्ट देखिल मी लिहिली होती.  खुप गोष्टी त्यांच्या आयुष्यातील व करीअर मधील माहिती नव्हत्या त्या या पुस्तकामुळ समजल्या. त्याचप्रमाने एखादी व्यक्ति एकाच आयुष्यात किती जीवन जगुन घेते हे कर्नाड सरांकडे पाहून कळले. साहित्य अकादमी,संगीत अकादमी,ज्ञानपीठला गवसणी घालन्यासह अनेक नाटक व चित्रपट यात आपला अमीट ठसा उमटवणाऱ्या या व्यक्तीचं आयुष्य कळण्यास या पुस्तकाने मोठी मदत केली. 
२०१२ मध्ये आलेल्या व सब कुछ सलमान  असलेल्या  "एक था टायगर" मधील त्यांची भूमिका ही सुखद धक्का देणारी होती. कदाचित त्या वेळी त्या चित्रपटात कोण कोण आहे याबाबत फार माहिती नसतांना तो पहायला मित्रासोबत गेलो होतो आणि  समोर एकदम गिरीश कर्नाडांकड़े पाहून उडालोच, त्याला म्हटले, 'अरे हां माणूस इकडे कस काय बुवा?' पण एकुणच त्यांनी तितक्याच ताकदीने ती छोटी भूमिका निभावली होती. 
पुढे २०१७ ला आलेल्या 'टायगर जिंदा है' मध्ये मात्र त्यांची ती नाकात असलेली नळी बिलकुलच आवडली नव्हती. भूमिकेची गरज असती तरी काही वेळाने ती काढता आली असती. पण हे असे नळीसह अभिनय करतांना त्यांना पाहण नक्कीच सुखद नव्ह्त. पुढे एका मित्राने अंदाज केला होता की, कदाचित ते स्वत आजारी असतील व् त्यामुळ देखील डॉक्टरांनी त्यांना तसेच अभिनय करण्यास सांगितले असावे. ते खरेही असू शकते. 
मला गिरीश कर्नाडांना फार जवळून ऐकायला व पाहायला मिळाले ते नाशिकला. त्या वर्षाचा जनस्थान पुरस्कार स्विकारताना त्यांनी केलेले  भाषण  आजदेखील आठवते.  मराठी हिंदी इंग्रजी बोलत बोलत व मध्येच मातृभाषा कन्नड़ चे एखादे वाक्य  फेकत चिंतनाचा व अभ्यासाचा भक्कम पाया असलेल्या त्यांच्या अत्यन्त सखोल भाषनाचे शब्द बरेच दिवस कानात तसेच ऐकू येत होते. 
त्याही आधी भूमिका चित्रपट पाहत असतांना जेव्हा कळल की याची पटकथा कर्नाडाची आहे तेव्हा हे काहीतरी वेगळे आहे असे लक्षात आले होते. पुढे निशांत, मंथन व उंबरठा मध्ये असलेल्या त्यांच्या भूमिका आवडल्या होत्या. 
उंबरठा मधील स्मिता पाटिल च्या पतीच्या भूमिकेत ते ठळक पणे मनावर उमटूण गेले ते आजतागायत. त्यामुळे नंतर कधी हा चित्रपट पाहण्याचा योग आला कि, स्मिताचा संघर्ष, धावपळ व मानसिक तगमग समजून घेता घेता तिचा नवरा म्हणून गिरीशच्या प्रतिक्रियेकडे पाहणे तितकेच महत्वाचे वाटायला लागले. 
अभिनेता ते ज्ञानपीठकार अस विविधांगी व तितकंच सखोल आयुष्य जगलेल्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रदांजली.

 (२८ नोव्हेंबर २०१६ च्या मुळ फेसबुक पोस्ट वरून व आज श्री गिरीश कर्नाड सरांचे निधन झाले त्यानिमित्ताने थोड़े संदर्भ वापरून पुन्हा लिहिलेले आर्टिकल)