खेळ


मोठे झाल्यानंतर स्वानुभवातून, वाचनातून, कार्यालयीन प्रोटोकोल म्हणून वा मित्रांचा प्रभाव म्हणून आपल्याला खेळाचे महत्व पटत जाते. आयुष्यातील स्ट्रगल पिरिअड संपत जातो व मनुष्य जसजसा सेटल्ड होत जातो तस तो आपल्या आरोग्याबाबत जास्त जागरूक होत जातो. मग तो सकाळी मैदानावर फिरायला जातो, जॉगिंग ग्रुप, लाफ्टर ग्रुप जॉईन करतो, ट्रेकिंग ग्रुप जॉईन करतो , या ना त्या मार्गाने फिटनेस कडे लक्ष देतो. मुलांना लहानपणापासून खेळाबाबत सजग करतो, विविध खेळांची शिबीर अलीकडे सुट्टीत व वर्षभर सुरु असतात. त्या ठिकाणी आलीकडे खूप गर्दी दिसते. आम्ही कार्यालयीन कामात जास्त व्यस्त झालो कि स्ट्रेस वाढतो अशा वेळी कोणताही खेळ किंवा व्यायाम आम्हाला रील्याक्स करतो. अलीकडे तर मी ट्रेकिंग ग्रुप तयार करून बरेच किल्ले, डोंगर चढून गेलो, गेल्या दोन वर्षापासून जिम सुरु आहे  त्याचा कामावर होणारा परिणाम खूप सकारात्मक होतो. सर्वात महत्वाचे म्हणजे घरी  आल्यावर मुलांसोबत खेळन्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी उर्जा टिकून राहते.
पण जस मला आठवते तस लहानपणी खेळाची मला इतकी आवड नव्हती. कदाचित त्याचे कारण असेल कि वडिलांची सतत बदली व्हायची मग गाव बदलले कि माझी शाळा माझा वर्ग सर्व बदलायचे त्यामुळे सर्वात मोठा परिणाम व्हायचा तो म्हणजे खेळायसाठी मित्र भेटायचे नाहीत,  जेमतेम ओळख होऊन खेळणे सुरु झाले कि बदली व्हायची त्यामुळे ग्रुप टिकायचा नाही मग परत दुसऱ्या ठिकाणी जावून त्यांच्याशी लगेच ओळख करून घेण्याइतपत माझा बोलका स्वभाव पण नव्हता.  त्यामुळे कुठ गेले कि खेळणारे मुल दिसले कि मला जुने मित्र आठवायचे. मला आजपण वाटत कि जी मुले लहानपनापासून एकाच ठिकाणी राहतात त्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांना गोतावळा मोठा भेटत जातो. शेवटी काही इनडोअर गेम सोडले तर मुळात खेळ हा सांघिक पणे खेळण्याचा प्रकार आहे. अशा वेळी शाळेतील खेळाच्या तासिका सोडल्या तर सुट्टीच्या काळात मुलांना खेळायला मित्र हवेत.  
आजकाल ज्या शाळा खेळांकडे लक्ष देतात त्या सोडल्या तर बाकी ठिकाणी अधिक मार्क्स च्या ‘मार्क्सवादात’ मुलांचे बालपण खुरटले जाते. शाळा सुटली कि काही वेळातच पुन्हा पाठीवर दप्तर घेवून शिकवणी वर्गाला पळणारी पोर दिसली कि ती काही तरी गमावत आहेत अस वाटत राहत. आलीकडे थोड्याफार प्रमाणात खेळांना ग्ल्यामार आलय पण त्याची कारणे वेगळी आहेत. नेहमीप्रमाणे क्रिकेट मध्ये येणारा अफाट पैसा सोबत प्रसिद्धी हे तर आहेच शिवाय मेरी कोम, चक दे इंडिया, दंगल , गोल्ड, भाग मिल्खा भाग, सारख्या चित्रपतांमुळे खेळूडांना मिळणारी प्रसिद्धी पाहून पालकांना आपल्या मुलांनी पण अस काही केल पाहिजे अस वाटण्यातून पण खेळाकडे लोकांचा ओढा वाढला आहे. शिवाय सरकारी प्रोत्साहानातून अनेक बाबी सुरु आहेत, एशियाड, कॉमोनवेल्थ, ऑलम्पिक सारख्या अंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून जिंकणाऱ्या खेळाडूंवर होणारा बक्षिसांचा वर्षाव व प्रसिद्धी पण काही जणांना या कडे आकर्षित करते पण त्या साठी त्यांनी घेतलेली मेहनत व त्रास पण पाहिला गेला पाहिजे. एक एक खेळाडू त्याचे सर्वोत्तम देण्यासाठी व ध्येय गाठण्यासाठी अहोरात्र किती कष्ट करतो ते महत्वाचे आहे.    

खेळाचे व माझे तसे सुरुवातीपासूनच कधी जमले नाही. अधिकृतपणे खेळ व मैदान  या प्रकाराशी माझा सबंध आला तो सहावीला नवोदय विद्यालय मध्ये गेलो त्या वेळी. तिथे आमचा सकाळचा दिनक्रमच सुरु व्हायचा "मॉर्निंग पी टि" या कम्पल्सरी व जीवघेण्या प्रकाराने,  सकाळी पाच साडेपाच ला ऐन गाढ झोपेत असतांना जाणीव पूर्वक टेपरेकॉर्डर वर मोठ्या आवाजात देश भक्तिपर गीते , सोबत मुलांच्या हालचालींचे आवाज, ग्राऊंड वर पालवे सरांची वाजणारी जोरदार व्हिसल, सकाळच्या निरव शांततेत 'गिनती कर' म्हणून घुमणारा सरांचा आवाज , पाठोपाठ"एक दो तीन ...." गिणती चा होणारा आवाज व लगेचच राउंड मारतांना येणाऱ्या सर्वांच्या बुटांचे एका तालासुरात होणारे टप टप आवाज ...या क्रमाने हळूहळू आमची झोप उडत जायची व  दिवस सुरु व्हायाचा. संपूर्ण झोप उडून स्वतःच्या देहासकट आजूबाजूच्या स्थल काल परिस्थितीचे आकलन होईस्तवर एक तर मोठ्या मुलांची क्रॉस कंट्री स्पर्धा सुरु होऊन संपयाच्याच बेतात आली असे, वा क्लस्टर किंवा रिजनल साठी मुलांचे सिलेक्शन सुरु असे. किंवा आम्ही फार फार तर परतिच्या मार्गाने राहत असो.
नवोदयची हि पाच वर्ष व त्यातही तिथली सकाळ ही स्मरणीयच राहीली आहे. सकाळी मॉर्निंग पी टि  साठी जाग यावी म्हणून लाउडस्पीकरवर मोठ मोठ्या आवाजात गाणी लावली जात. 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो', 'ए मेरे वतन के लोगो' , ए देश है वीर जवांनो का' अशा प्रकारची.  त्यामुळे पी.टी. साठी तयार होणे म्हणजे एक प्रकारे युद्धासाठी तयार होतोय कि काय असला फील यायचा. त्यातही अगदी सहावीलाच सर्व जन घर सोडून होस्टेल मध्ये आलेले, त्यामुळे घरची सकाळ ज्या निरव शांततेत व्हायची तस काही इथे नसायचे त्यामुळे सकाळी सकाळी बुटांच्या लेस बांधून ग्राउंड वर पळत जाण्यात एक   मिशन चे स्वरूप यायचे.
या पी.टी. चे सर्वसाधारण स्वरूप म्हणजे सुरुवातीला 'हाउस' नुसार गिनती, नंतर मोठ्या मैदानावर राउंड मारणे, मग वार्मअप साठीचे व्यायाम करणे, नंतर काही स्पर्धा असतील तर त्यांची तयारी थोडा वेळ व मग नंतर डीस्बर्स. पण यात बऱ्याचदा पी.टी च्या सरांचा मूड, बाहेरचे पावसाळी वातावरण किंवा शाळेतील कार्यक्रम यानुसार बदल होत असत. मग सकाळी ग्राउंड वर जमलो, गिनती झाली कि  'इनथ्रीज'मध्ये (म्हणजे मुलांच्या तीन मिळून  जोड्या)  गाव जागे व्हायाच्या आधी सकाळी साडेपाच पावणेसहाच्या आसपास  आम्ही गावातील एकमेव मुख्य रस्त्यावर   लागायचो अर्थात पळत. हळूहळू गार वारे अंगाला झोंबू लागले व पळन्यामुळे अंगाला घाम येवू लागला कि झोप उडून जायची. हे सकाळी बाहेर पडणे म्हणजे सरळ निसर्गाच्या अंगणात जाणे होते. अजूनही ते गवतावर पडलेले दवबिंदू, झाडे, जंगली फुले व गवताचा वास जसच्या तस आठवत.
काही अंतर पळत गेलो कि केव्हा केव्हा पालवे सर क्रॉस कंट्री स्पर्धा घ्यायचे. एकदम सुरुवातीची काही दिवस हा शब्द समजण्यातच गेला. अर्थात सहावीची मुले लहान म्हणून आम्हाला त्यात भाग घेता येत नसे. पण थोडे मोठे झाल्यानंतर आम्ही पण सहभागी होऊ लागलो. आमची हि क्रॉसकंट्री स्पर्धा मजेशीर असे शेतातून, बांधावरून, कच्च्या रस्त्याने अशी वेडीवाकडी बरीच अंतर गेल्यावर एंड पौईट येत असे. अशा वेळी पांढरे बूट व पांढऱ्या कपड्यांची वाट लागत असे, पण अर्थात मजा येई. मोठमोठ्या गवतामधून, चिखलाने घसरड्या झालेल्या बांधावरून पळण्यात भीती सोडा वेगळेच थ्रील यायचे. आजकाल स्वतः ची मुल अस काही वेगळे करू लागली कि पटकन त्यांना घरात बोलवण्याचा आमचा कल असतो. नको कुठे काही हातापायाला लागेल, गवतामधून काही निघेल, चिखलात कपडे भरतील, आजारी पडतील एक ना दोन हजार शंका. आमच्या सर्वांच्या आई वडिलांनी मनात कुठलीही शंका मनात न ठेवता आम्हाला नवोदयच्या हवाली केले तस आजही आम्ही आमच्या मुलांसाठी करू कि नाही यात शंका आहे.

पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पाउस पडत असला कि आम्ही राहत असलेल्या एम.पी हॉल मध्ये किंवा गोडाऊनमध्ये सर योगासन करायला म्हणून सर्वांना बोलवत. अर्थात सर्व कॉट टाकलेली जागा सोडली तर मध्ये असलेली रिकामी जागा कमी होती त्यात काही जन बसत व बाकीच्यांना कॉटवर बसून योगासन करण्याची मुभा असे. सर अधून मधून आतील भागात फिरत असत पण पाउस जास्त सुरु झाला व सरांचे लक्ष नसले कि आहे तिथेच सरळ झोपून जाण्यात मजा असे. योगासनात सर्वांचे सर्वात आवडत आसन म्हणजे शवासन. एकदा कॉटवर पडल कि केव्हा झोप लागयाची कळायचं नाही. पण मुळात असा दिवस उगवला कि बाहेर उठून न जाण्याचा आनंद मोठा आसायचा. कारण सकाळी उठण्याचा खूप कंटाळा यायचा. नको नको वाटायचं. कधी एकदा नवोदय मधून बाहेर पडतो व सकाळी खूप वेळ आरामात गोधडी पांघरून पडून राहायला मिळेल  असं वाटायचं. आमच्याच आजूबाजूच्या शाळेतील मुलांना असं सकाळी लवकर उठण्याची सक्ती  नव्हती त्यामुळे ते आरामात उठून मग शाळेत यायचे. त्यामुळे ती मुले खूप नशीबवान वाटायची.
अर्थात त्या वयात ते साहजिकच होते पण नंतर कळत गेल कि खरे नशीबवान तर आम्ही होतो ज्यांना खूप चांगली सवय लावली जात होती अर्थात तेव्हा ती मनाविरुद्ध का असेना पण अंतिमतः आमच्या फायद्याची सवय होती. तिथे शिकवलेले सर्व व्यायामाचे व जॉगिंग चे प्रकार नंतरच्या आयुष्यात खूप कामी आले. वार्म अप करतांना कसा करावा त्याचा एक क्रम असतो, शरीराचा रक्तपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी एक तर खालून वर किंवा वरून खाली अशा पद्धतीने व्यायामाची सुरुवात करायची असते हे कळले. शास्रीय पद्धतीने सूर्यनमस्कार कसा करावा हे प्रथम तिथल्या शिक्षकांनी शिकवले.
थोडा पाउस कमी असला कि आम्हाला शाळेच्या व्हरांड्यात बसवत व वेगवेळ्या पार्थना गाणी आमच्याकडून म्हणून घेत असत. सकाळची ती शांत वेळ, अंधार कमी होत पूर्वेकडे दिशा उजाळत चाललेल्या व एकाच सुरात आम्ही ‘अधरम मधुरम वदनम मधुरं’ अस मधुराष्टकम म्हणतोय, गीतेचे श्लोक म्हणतोय किंवा अजून काही प्रार्थना म्हणतोय हे फारच सुंदर चित्र असायचं. काहीतरी वेगळी उर्जा अंगात यायची आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने दिवसाची सुरुवात करतोय व त्या मुळे संपूर्ण दिवस प्रसन्न चित्त जायचा.
सकाळची पी.टी. व संध्याकाळचे गेम्स यात फरक राहायचा. सकाळची पी.टी हि व्यायाम, वार्म अप, रनिंग वर भर देणारी आसायची. तर गेम्स मध्ये संध्याकाळी खेळायला मिळायचे. फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, बास्केट बॉल यासोबतच खो-खो, कबड्डी असे आपले देशी खेळ पण भरपूर खेळायला मिळायचे.
   
आमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा खच्चून भरलेल्या असत,  विविध प्रकारात सातत्याने त्या होत असत. शाळेत मुलांचे हाउस पाडलेले असत, त्याचे साधारण स्वरूप असे कि जवळपास प्रत्येक वर्गातील सात आठ ते दहा मुले एका हाउस मध्ये येतील. मुलांना कोणता हाउस भेटेल ते निश्चित नसे अन त्याचे वाटप सहावीला अडमिशन घ्यायच्या वेळेसच व्हयाचे. आपला हाउस व आपला रोल नंबर सहावीला एकदा मिळाला कि तो कायमसाठी राहत असे. आज अगदी वीस बावीस वर्ष झालेत तरी आम्हाला सर्वांना आमचे रोल नंबर व हाउस लक्षात आहेत म्हणजे फक्त आमचेच नाहीत सर्व bachchya मुलांचे लक्षात आहेत. तर असे हे हाउस विविध नावांनी असत. हिमालय,सातपुडा, सह्याद्री, विन्ध्य, अरवली अशी मुलांच्या हाउस ची नावे होती. मुलींची निलगिरी कांचनगंगा अशी नावे असली तरी ज्या विविध स्पर्धा होत त्या साठी त्या आमच्या हाउस लाच aatach राहत.
तर अशा या विविध हाउस मध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा होत असत त्यात बरीच चढाओढ राहत असे. प्रत्येक हाउसच्या मुलांना वाटायचे कि आपले हाउस एक नंबर आले पाहिजे. वर्षाच्या शेवटी सर्व क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे मिळून मार्क्स लक्षात घेवून हाउसेस ला विनर घोषित करण्यात येत असे. पण यात  स्पोर्ट स्पर्धांकडे मार्क्स चे पारडे झुकलेले असायचे. म्हणून मग ग्राउंड वर जास्त मार्क्स असणारा हाउस ट्रॉफी घेवून जाणार हे निश्चित असे.
नवोदय विद्यालय हे ग्रामीण talentला वाव देणारे नाव. या ठिकाणी ग्रामीण पण हुशार व मजबूत काटक विद्यार्थी येत. त्यामुळे खेळाडूंच्या संख्येला काही तोटा नसे. त्यातही आमचे अक्कलकुवा नवोदय म्हणजे सातपुड्याच्या अगदी कुशीत  अक्कलकुवा  येथे. त्यामुळे सातपुड्यातील आमचे आदिवासी बंधू बऱ्याच संख्येने येथे राहत. त्यातील काही जन अव्वल नंबरचे खेळाडू होते. खो-खो व कबड्डीतील त्यांच्या अंगाचे चापल्य, वेगवान हालचाली अतिशय देखण्या व विजय मिळवून देणाऱ्या असत. भाला फेक,  थाळी फेक, फुटबॉल व विशेषतः रनिंग मध्ये हि पोर एक नंबर असत. त्यांचा stamina व कौशल्य जबरदस्त असे. आजही त्यातील काही जन अक्षरश त्यांच्या खेळासह डोळ्यापुढे उभे राहतात. एक जन जो आम्हाला सिनिअर होता, त्याचा खो-खो मधील खेळ पाहणे म्हणजे एक सुंदर अनुभव असे. पाठलाग करणाऱ्या स्पर्धकांना चुक्वतांना तो एक  प्रकारे नृत्यच करत असे. त्याच्या हालचाली फार चपळ असत कधी कधी वेळ संपून जायची  पण तो बाद होत नसे. त्याचे ते मैदानभर वावरणे डोळ्याचे पारणे फिटणारे असे. जालमसिंग पावरा नावाचा आमचा एक सोबती होता तो जेव्हा भाला घेवून मैदानात उतरायचा तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स बघण्यासारखा असायचा. दमदार पावलांनी पायात योग्य ते अंतर घेवून समोरून धावत येणाऱ्या जालमसिंग ला पाहतांना हा जणू शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक तडफदार मावळा स्वराज्यासाठी शत्रूवर तुटून पडतोय कि काय असला त्याचा आवेश असायचा व त्याच वेळी त्याने फेकलेला भाला समोर चुन्याने मारलेल्या सीमारेषेच्या पलीकडे जावून जमिनीवर सरळ उभा रोवलेला असायचा. तसाच तो गोळाफेकेतही तरबेज होता. अनेक जन रनिंग मध्ये चाम्पियान होते, १०० मीटर असो ८०० मीटर असो वा रिले असो वा क्रॉस कंट्री असो हि मुले कायम एक नंबर अगदी रेकॉर्ड वेळेत पूर्ण करत. त्यांची क्षमता हि आम्हा नोकरदार घरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांच्या तुलनेत खूप जास्त होती.
तेव्हाही, त्यानंतरही व आताही मला वाटत कि भारताला ऑलम्पिक सारख्या खेळात सुवर्णपदक हवे असेल तर असे आदिवासी talent लहानपणीच हेरून त्यांना त्या angle ने प्रशिक्षण दिले गेले तर nationalच काय अनेक अंतरराष्ट्रीय व ऑलम्पिक रेकॉर्ड तोडण्याचे सामर्थ्य या युवकांमध्ये आहे. पण दुर्दैवाने अजूनही तस होतांना दिसत नाही. नवोदयला असतांना आमच्या क्लस्टर, रिजनल व अगदी national पर्यंत हे खेळाडू चमकायचे पण पुढे काय? सर्व अंधार. आधीच सातपुड्याच्या आदिवासी पाड्यातील कुठल्यातरी पाड्यातील किंवा वस्तीतील घर, घरी आठराविश्व दारिद्र्य व  शिक्षण म्हणजे नोकरी मिळेलच समजून कसतरी शिक्षण झाल कि कुठतरी नोकरीवर चीटकायाचे इतकी माफक अपेक्षा व दुर्दैवाने तस नाहीच झाले तर काही तरी पोट भरण्यासाठी करणे इतकच. या सर्व प्रकारात अनेक दर्जेदार खेळाडूनी आपला खेळ सोडून दिला. मग मैदानावर राजासारख्या वावरणाऱ्या अशा दर्जेदार खेळाडूंना कुठेतरी वर्ग तीन चार च्या कारकुनी प्रकारची कामे करतांना पाहिले कि त्रास होतो. जर काही वेगळ घडल असत तर आज अनेक रेकॉर्ड नावावर असलेले ते स्टार खेळाडू राहिले असते.

मी स्वतः मात्र नवोदयला असतांना खेळात खूप मागे असायचो. जेव्हा क्रीडांगनावर जाण्याचा प्रसंग यायचा तेव्हा तेव्हा मी व् माझे एक दोन  मित्र आम्ही मागे राहून टाईमपास कसा करता येईल ते बघायचो. आमचे काही batchmets अजूनही आम्हाला बांधावरचे म्हणून चिडवतात. कारण आमच्या शाळेचे जे मैदान होते ते पूर्वी शेती होती मध्ये सर्व आखून रेखून मैदान झाले असले तरी त्या शेतीचे जुने बांध तसेच होते. त्यामुळे खेळ सुरु झाले कि नजर चुकवून त्या बांधावर जावून आम्ही बसायचो किंवा त्यावरून पिरीयड संपेपर्यंत फिरत तरी बसायचो.
विविध क्रीडा स्पर्धांसाठीची निवड सुरु झाली कि मनात धडकी भरायची. इतके सगळे रथी महारथी बघितले कि आपण कशात काय म्हणून अजूनच कमीपना वाटायचा पण त्यातल्या त्यात मी अभ्यासात चांगला असल्या कारणाने (म्हणजे किमान मला तरी तस वाटायचं)  किमान न्यूनगंडापासून स्वतःला वाचवू शकत होतो.
या ठिकाणी सर्वात महत्वाच म्हणजे मला खेळांविषयी अनेक बाबी समजल्या. खेळातील बऱ्याच बाबतीत मुलांना पण समाविष्ट करून घेतल्यामुळे त्यांचे या बाबतीचे ज्ञान चांगले होते. खेळांचे ग्राउंड कसे आखायचे. खो-खो, कबड्डी, फुटबॉल पासून तर पार रनिंग track आखण्यापर्यंत विद्यार्थी सोबत असल्याने त्यांना मैदानाची माहिती असायची. वरच्या स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड झाली कि त्यांना थोडे विशेष प्रशिक्षण देण्यात येई. आमची रेग्युलर पी.टी सुरु होण्या आधी व नंतर पण त्यांचा सराव सुरु असायचा. दुध सोबत अंडी दिले जायचे. किमान ते मिळण्यासाठी तरी आपल्याला काही खेळता यायला हव होते अस वाटायचं. त्यांना रनिंग साठी विशेष ते खिळ्यांचे बूट मिळायचे. संध्याकाळी पण बराच वेळ त्यांचा सराव सुरु असायचा. स्पर्धा सुरु झाल्या कि माहोल अजून रंगतदार व्हायचा. जिंकलेल्या स्पर्धकांना बक्षिसे व कप मिळायचे ते बघायला खूप छान वाटायचे. एकूणच खेळ सर्वांच्या अंगात भिनायचा. अर्थात याचे श्रेय त्या काळात असलेले आमचे क्रीडा शिक्षक पालवे सर, मुदलियार madam, राव सर व अर्थातच त्यांच्या कडून हे सर्व काम करवून घेणारे आमचे प्राचार्य वाळिंबे सरांना जाते. जागतिक स्तरावर घेतल्या जाणाऱ्या फुटबॉल स्पर्धांचा कार्यक्रम टी. व्ही  वर सरांनी आम्हाला दाखवला. त्या विषयीची  भरपूर माहिती दिली, त्यामुळे इतक्या लहान वयात अंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांबाबत काय सुरुय हे कळायचे. त्याचा आवाका कळायचा. आमचे सर खेळणाऱ्या मुलांसोबत राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावरील रेकॉर्ड बाबत चर्चा करायचे हे एक प्रकारचे त्यांना त्यांच्या क्षेत्रात मिळणारे वैश्विक भानच होते.
असा पाया जोपासला गेल्यामुळे आयुष्यभर सजग राहण्याइतपत भान मिळाले. असेच शिक्षक व अशाच शाळा मुलांना मिळाल्या तर आजच्या काळात खेळातील एखाद्या प्रकारात अव्वल दर्जाचे खेळाडू निर्माण होणे अशक्य नाही.


समाधान महाजन


आठवणीतील नाशिक


एकदा सरकारी नोकरी म्हटली कि बदली हा प्रकार अटळ असतो, त्याचा त्रास एकूणच जीवनात माणसाला होतो, सततच्या बदलांमुळ काहीशी अस्थिरता माणसाला स्वीकार करावी लगते. पण त्याचा दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेगवेगळ्या गावात शहरात जायला मिळते,राहायला मिळते, विविध माणसांशी परिचय होतो, मैत्री जोडली जाते, आयुष्यभरासाठी चांगली माणसे, चांगले क्षण आपल्या आयुष्यात जोडली जातात.

बालपण वडिलांच्या सततच्या बदल्यांमुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात तसेच शाळा कॉलेजची सुरुवातीची वर्षे धुळे व नंदुरबार जिल्ह्यात व नंतर स्वतः  शिक्षक म्हणून बरीच वर्ष मराठवाड्यात काढल्याने मला नाशिकबद्दल तसे मनातून खुप आकर्षण होते. जीवनाच्या एकूण तीन वेगवेगळ्या टप्प्यावर माझा नाशिकशी संबंध आला. शालेय वयात, बारावी नंतर व तिसऱ्यांदा आला तो थेट माझी पोस्टिंग सहायक आयुक्त म्हणून विक्रीकर खात्यात झाली तेव्हा आला. जुलै २०१८ ला माझी बदली नाशिकहून जळगाव झाली अन नेमक त्याच वेळी नाशिकविषयी लिहिण्याच व्यासपीठ चे पत्र मिळाले हा योगच.

एकदा शालेय वयात असतांना एक परीक्षा देण्यासाठी वडिलांसोबत नाशिकला आलो होतो. तेव्हा इतक मोठ शहर पाहून दबुन गेलो होतो. ऐसपैस रस्ते, भल्या मोठ्या बिल्डिंग, नळाला येणारे पानी, मोठमोठे मॉल त्यातील चकचकीत वातावरण, एकदम झगमगाट,  झगमग कपडे सारे कसे चित्रपटातील वाटत होते. त्यामुळे अगदी एक किंवा अर्धा दिवस जरी अशा शहरात आपण फिरतोय अस वाटल तरी त्याचे खूप अप्रूप वाटे. मी नाशिकला अस भरपूर काही पाहिलंय हे कधी एकदा गावी जावून मित्रांना सांगतोय अस सारख वाटायचं.

अन नाशिकहून परत गावी गेल्यानंतर असला प्रकार पण गेला, माझ्या ज्या मित्रांनी धडगाव व तळोद्या पलीकडे मोठे गाव पाहिले नव्हते त्यांच्यासाठी मी नाशिकविषयी सांगतोय तो एक वेगळाच अविष्कार ठरत होता, कळत नकळत माझ्या मित्रांमध्ये माझे वजन वाढले होते. नाशिक बघितलेला मी एक मोठा माणूस आहे अस त्यांच्या नजरेत मी टिपत होतो, अन मनातून मला आनंद वाटत होता.

तर असं हे नाशिकबद्दल तेव्हापासूनचे आकर्षण मनात कायम होते,  कॉलेज म्हणजे बारावी संपली पुढे काय करावे याबाबत अंधार होता. आईचे म्हणणे होते डी एड केलं तर पटकन नोकरी लागेल, वडिलांना वाटायचे हा हुशार आहे काहीतरी वेगळं केलं पाहिजे, पोरगं अधिकारी वैगेरे झालं पाहिजे पण कस होईल याबाबत त्यांच्याच कल्पना स्पष्ट नसाव्यात वा परिस्थितीपुढे त्यांना काही सुचत नसावं पण मग काहीतरी करन भाग होत
........हा दीर्घ सुट्ट्यांचा अनिर्णित कालावधी कुठंतरी घालणं भाग होतं. तेव्हा माझा मोठा भाऊ ज्याला आम्ही दादा म्हणायचो तो नाशिकला राहत होता. अर्थात कुठल्यातरी कंपनीत हजार बाराशे रुपयाच्या पगारावर तो काम करत होता, सिडकोतील छोट्याशा एकाच खोलीच्या रूम मध्ये दादा वहिनी राहत होते. आमच्या दृष्टीने तेव्हा तो नाशिकला राहतोय याचं अप्रूप वाटायचं, आमच्या गावाकडे अशी नाशिकला कामानिमित्त गेलेली अनेक जण होते, ते गावी येत तेव्हा हे शहरात राहणारे कोणीतरी मोठी माणसे आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत लोक एकतर फटकून वागत किंवा कौतुकाने तरी अर्थात सरळ सरळ कामगार म्हणून काम करतांना मिळणारा तुटपुंजा पगार ज्यात घरखर्च धड भागवता येत नसे व इकडे गावी काही मदत करीत नाही म्हणून गावातील घरचे लोक कायम नाराज राहत असत. असं सारख मन कुरतडत कसंतरी दोन दिवस सनासुदीचं गावी राहून परत कधी एकदा नाशिक जाणाऱ्या गाडीत बसतो अशा मानसिकतेत अनेक जण तेव्हा नाशिक - गाव व गाव- नाशिक असा प्रवास करत, आता तर त्यांच्या नंतरच्या पिढीने गावाकडे जाणे तर दूर पाहणेही सोडून दिलेय अर्थात त्याला दोन्ही बाजूंची अनेक कारणे आहेत.
तर अशा या ये जा करणाऱ्या लवाजम्यात एका सुट्टीत मी पण शामिल झालो. एक चुलत भाऊ रहायचा एक दिवस त्याच्या छोट्या टेम्पोत सकाळीच त्याच्यासोबत गेलो , काही कंपन्यांचे स्पेआर पार्ट एक कम्पनीतून दुसऱ्या कंपनीत पोहचवण्याचे काम तो करत होता. त्याच्या ओळखीने अंबड एम.आय.डी.सी. च्या एका कंपनीत मला पण काम मिळाले. कामाचे स्वरूप पहिल्याच दिवशी मला फार आवडले. प्लास्टिकचे बॉक्स तयार होऊन एका ठिकाणी पडायचे ते बॉक्स एका ट्रोलीत भरून ती ट्रोली ढकलत दुसऱ्या ठिकाणी जावून खाली करावे लागत. पहिल्याच दिवशी खूप उत्सहाने मी दुपारपर्यंत हे काम केले. दुपारी जेवायला सर्वांसोबत बसलो , ते जेवण म्हणजे आतापर्यंतच्या जेवनापैकी केलेले सर्वात वेगळे जेवण होते, आजूबाजूला बसलेली माझ्यासारखीच मजूर मंडळी होती, अंगावर कंपनीचे कपडे,घामाचा उग्र वास पसरलेला, मिळेल त्या जागेवर बसलेली व त्यातल्या त्यात थोड्या वेळासाठी का असेना कामातून  मोकळा वेळ मिळाला याचा किंचितसा आनंद चेहऱ्यावरून न लपवणारी माणसे मला इतस्त दिसत होती.  मी पण माझा पहिल्या दिवसाचा डबा त्यांच्यासोबतच खाल्ला. याठिकाणी उदरभरण शब्दाचा खरा अर्थ मला कळत होता,
संध्याकाळी घरी जातांना शिफ्ट सुटल्यावर कामगारांची गर्दी रस्त्यावरून घाईगर्दीत  जातांना दिसायची, तेव्हा सायकली जास्त होत्या, समोरच्या हँडल ला डबे अडकवून कधी सिंगल तर कधी डबल सीट जातांना ते दिसायचे, कंपन्यांचे चिमणीचे धूर आसमंतात पसरलेला दिसायचा, दिवसभर एकच एक ठराविक काम करतांना जणू काही आपण यंत्रामध्ये प्रवर्तीत होत असल्याची भावना मनात अनेकदा येवून जायची. आर्थिक दृष्ट्या सतत रखडत व महिन्याचा खर्च मेटाकुटीस येवून पार पाडणारी अनेक कुटुंबे आजूबाजूला दिसत होती. सिडकोतील घरं म्हणजे एक प्रकारे खुराडेच. एक रूम फार फार तर कोणाला दोन रूम. पण अशा घरात राहणे म्हणजे एक प्रकारे कम्पनीच्या दोन ड्युटी मधील वेळ काढणे असं वाटायचं मला, एका बाजूला श्रीमंतीचे टोलेजंग मिनार चढत असतांना हे अस कोनाड्यात पडलेलं पाहतांना मार्क्स आठवायचा. त्याचा साम्यवादी सिद्धांत व आहे रे नाही रे ची दरी डोळ्यासमोर दिसत असतांना वेदना व्हायच्या पण आपण स्वतः काहीही नसतांना व हे सर्व बदलवण्याची कुठलीही क्षमता नसतांना फक्त विचारांचे  कढ काही कामाचे नव्हते त्यामुले अशा वेळी काहीतरी मोठे बनून हे सर्व बदलून टाकायची भावना प्रबळ व्हायची.
या काळात वया परत्वेआकलन कमी असल्याने व तितका आवाका  नसल्याने नाशिकची सांस्कृतिक ओळख झाली नाही, वेळ मिळाल्यास सी बी एस जवळ च्या हुतात्मा स्मारकात जाऊन पेपर वाचण्याचे काम करायचो, तेथून परत सिडको तील घरी येतांना सी बी एस च्या समोरील जे सिटी बसेस चे स्टॉप होते त्यात नेमकी कुठली बस आपल्या घराकडे घेऊन जाईल काही कळायचे नाही.कोणाला विचारायची इच्छा व्हायची नाही, भयंकर अपमानास्पद वाटायचं कि साल आपल्याला या जगात काहीच माहीत नाही. या शहराच्या एकूणच आधुनिक साच्यात आपण गावरान लोक बसू शकत नाही असा कसलासा न्यूनगंड आत साचत चालला होता.
एकदा असंच कम्पनीला सुट्टी असल्याच्या दिवशी जरा बाहेर फिरून येऊ अस ठरलं, जायचं कुठं तर खूप नाव ऐकलेलं होत पंचवटीचे म्हणून म्हटलं पंचवटीला जाऊ. पंचवटी नाव रामायणकालीन त्यामुळे म्हटल तिथे छान मंदिरे वैगेरे असतील तर जावून बघू. तस सिडकोतून जाणाऱ्या जवळपास सर्व बसेस पंचवटी या नावानेच जायच्या, एक दिवस असाच मनात धीर धरून पंचवटी नावाची पाटी लिहिलेल्या  बसमध्ये बसलो हळहलू सिड्को चा भाग गेला सी बी एस मागे पडले, अशोकस्तंम्भ गेले , आर.के. गेले पंचवटी कारंजा म्हणून कंडक्टर जोरात ओरडला मग कंडक्टरला म्हटल पंचवटी चा स्टॉप हाच का  तर तो म्हटला की पंचवटी याचा पुढचा स्टॉप , झाले कही मिनीटातच  पंचवटी स्टँड आले सर्व जण  उतरले, गाडीत आता फक्त तीनच जण राहिले मी , कंडक्टर व ड्रायव्हर ....कंडक्टर माझ्याकडे '"कुठून कुठून येतात " अशा अत्यंत चमत्कारिक नजरेने पाहत होता . सर्व जन उतरल्यावर मी त्याला म्हटल,
            'पंचवटी कुठे आहे ?'
            तो म्हटला , हेच पंचवटी ,
            मी म्हटल,  'नाही हे नाही ते दुसरे पंचवटी,
             तो म्हटला अरे भाऊ हेच पंचवटी ...
बर म्हटल मग बस आता पुढे कुठपर्यंत जाणार?
            ' डेपो पर्यंत'
            ' मग म्हटल मला तिथपर्यंत सोडून द्या'
 ... त्यानंतर त्यानेही माझा विचार केला नाही व बस पुढे घेण्यास सांगितले. झाल बस काही अंतरावर गेल्यावर जशी डेपोत जायला लागली व आजूबाजूला बसेस दिसायला लागल्या तस मी पटकन बसचा स्पीड कमी होताच उडी मारून खाली उतरलो. आजूबाजूला फक्त दुकाने, रस्ता, रस्त्यातून वाहणारे वाहने यापलीकडे काही दिसत नव्हत. मंदिरांचा मागमूस पण नव्हता. उलट्या दिशेने झपाझप चालत मी परत पंचवटी stand कडे निघालो तेव्हा का कुणास ठावूक पण कोणालाच विचारल नाही..कि पंचवटीतील ती प्रसिद्ध मंदिरे कुठे आहेत ज्यांना पाहायला सर्व जन जात राहतात. अन अस काहीही न करता मी परत गप बस मध्ये बसून सिडकोच्या घराकडे जायला निघालो.माझी फार भव्य दिव्य अपेक्षा होती कि पंचवटी हे नाव फार मोठे आहे खूप वेळा खूप वेगवेगळ्या संदर्भात ऐकलेले आहे तर तस काही दिसावं पण त्या ऐवजी पंचवटी नावाच्या बस, पंचवटी नावाचे बस stand व डेपो पाहून माझा प्रचंड भ्रमनिरास झाला. असाच भ्रमनिरास माझा झाला होता जेव्हा लहानपणी वडिलांनी आणले होते नाशिकला व बस मधून मला दाखवले होते हि बघ हि गोदावरी नदी मी कुठ कुठ करेपर्यंत नदी निघून गेली होती मग परत येतांना परत लक्ष ठेवून वडिलांनी नदी दाखवली तीही खूपच छोटीशी वाटली ...पुस्तकात वाचून गोदावरी बद्दलच्या ज्या कल्पना होत्या त्या मानाने हि प्रत्यक्ष नदी खूप लहान जवळपास एखाद्या घाण नाल्यासारखा तिचा प्रवाह भासत होता.
अस हे दुसऱ्या टप्प्यातील नाशिक माझ्या वयाप्रमाणे धुक्यातील दिसणाऱ्या स्वप्नाप्रमाणे अर्धअपूर्ण होते. खर व परिपूर्ण नाशिक हे तिसऱ्या टप्प्यात मला भेटले ज्या वेळी माझी बदली धुळ्याहून नाशिकला २०१२ मध्ये सहायक आयुक्त म्हणून झाली. नाशिक व या पदावरची पोस्टिंग या दोन्हींसाठी मी तितकाच नवखा होतो जस नाशिक बद्दल मला जुजबी ज्ञान होते तसच नोकरीत पण फक्त एकच प्रोबेशन वर्ष झाल होत.
पण आता नाशिकला आलो होतो तेव्हा वयात पण समज आलेली होती, अर्थात मधल्या काळात गोदावरी मधून भरपूर पाणी वाहून गेले होते, इतक्या वर्षात माझ्या अभ्यासामुळे साहित्यविषयी वाचनाची लिखाणाची  व त्या अनुषंगिक कार्यात रमण्याची जी भूक बाकी होती तिला नाशिकला अत्यन्त सकस व योग्य वेळेस आहार पुरवला... येथील सावाना, कुसुमाग्रज स्मारक, सायखेडकर व कालिदास नाट्यगृह येथे सतत काहीना काही सुरु असते. अनेक कार्यक्रम ऐकायला पाहायला मिळाले, अनेक दिग्गज साहित्यिक व विविध क्षेत्रातील व्यक्तींना पाहण्याची, त्यांना जवळून ऐकण्याची संधी मला मिळाली ..अनेक वर्षांपासून लिहित आलेल्या कवितांची बाड बाहेर काढली, काही  पुस्तक विकत घेऊन वाचण्याची क्षमता थोडी निर्माण झाल्याने बरीच पुस्तके संग्रही जमा व्हायला लागली. सर्वात महत्वाचे म्हणजे नाशिकमध्ये अनेक मित्र गणगोत नाते तयार झाले.

एखादी नाव राहिले तर उगाच इतरांना  राग येईल अशी अनेक मित्र, गणगोत मला या काळात नाशिकने दिले.
सुरुवातीला आल्यावर मी कविवर्य  किशोर पाठक यांची भेट घेतली, साहित्यिक गप्पा झाल्या त्यांनी आवर्जून माझ्या लिहिलेल्या कविता मागवल्या त्या वाचल्या वाचून कौतुकाची थाप दिली प्रोत्साहन दिले व सर्वात महत्वाचे म्हणजे मला 'सिंचन भवन' च्या साहित्यिक वर्तुळाशी व त्यातही विवेक उगलमुगले सरांशी जोडून दिले. विवेक सरांना मी सरच म्हणेल एकतर ते वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत व आपल्या आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात ज्या हक्काने आपल्याला काही सांगू शकतात त्यापैक्की एक म्हणजे विवेक सर. माझा  कवितासंग्रह अस्तित्वात येवू शकतो याची पहिली जाणीव सरांनी करून दिली व इतकेच नव्हे तर संग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमापर्यंत सर्व प्रकारची मदत उत्स्फूर्तपणे व स्वतःचे शंभर टक्के देत दिली, याशिवाय त्याचं वैशिष्ट्य म्हणजे मी नेमक संध्याकाळी त्यांच्या भेटीस सिंचन भवनला जात असे अशा वेळी दिवसभरच्या कामाने सर खूप थकलेले असले तरी माझ्याशी बोलतांना कधी कंटाळा केला नाही. त्यांच्या विषयी सांगणे हा एक संपूर्ण लेखाचा विषय होईल पण काही व्यक्ती   अशा  असतात ज्या स्वतःत च एक शहर घेवून जगतात, त्यामुळे  नाशिक विषयी लिहितांना आपसूकच विवेक सरांविषयी लिहीन साहजिकच आहे.
त्यातूनच पुढे किरण भावसार, हेमन्त पोतदार सर, रवींद्र मालुंजकर, प्रशांत केंदळे, यांच्याशी सम्पर्क आला. किरणच्याच घरी कविवर्य खलील मोमीन सर व मी अशा तिघांची मैफेल एकदा जमली, निम्मित होते माझ्या ‘अस्वस्थ क्षणांचे पाश’ या कवितासंग्रहासाठीच्या कविता निवडीचे. पण असे असले तरी त्या दिवशी  मोमीन सरांकडून ऐकलेल्या त्यांच्या व इतर कवींच्या कविता आजही कानात तशाच ऐकू येतात.
नाशिकमध्ये अजून एक महत्वाचं काम करायला मिळाले ते म्हणजे  आतापर्यंत केव्हाच संधी मिळाली नव्हती इतके चित्रपट पाहायला मिळाले अर्थात यातील 90 टक्के चित्रपट पूर्वीच्या कलात्मक व समांतर चित्रपटाच्या व्याख्येत मोडणारे होते माझ्या बौद्धिक भुकेला हे गरजेचे होते सर्वात महत्वाचं म्हणजे थोड्या खर्चिक जरी असल्या तरी मल्टिप्लेक्स सारख्या सुविधा उपलब्ध असंन महत्वाचे होते, या काळात आलेल्या  अनेक दर्जेदार चित्रपटांनी माझं आयुष्य समृद्ध केलं. संतोष बागुल सारखा हक्काचा मित्र यासाठी मला सोबत होता, काही चित्रपट त्याने सुचवले बाकी मी पण आम्ही सोबत पाहिलेले चित्रपट
नाशिकच वातावरण अल्हाददायक आहे, ते सतत नाशिकला राहून जाणवत नाही त्यासाठी माणूस विदर्भ किंवा मराठवाड्यात राहून आलेला पाहिजे. नाशिकच्या या शांत व प्रसन्न वातावरणाचा माणसाच्या मनावरील परिणाम पण चांगला होतो, विविध ऋतूंमधील नाशिकचे रूपे मनात साठून राहिलेली आहेत. पावसाळ्यातील नाशिकच्या आजूबाजूचे निसर्गरम्य रूप बघण्यासारखे असते. तेथील सुरुवातीचे तीन वर्ष विक्रीकर भवनच्या तिसऱ्या मजल्यावर माझे केबिन होते तेथून मागच्या खिडकीतून पांडव लेण्यांचा डोंगर छान दिसत असे. कोसळणारा पाऊस, धुके, उन-सावलींचा खेळ खूपच मस्त वाटत असे. . कामाचा ताण निवळन्यासाठी मला त्या खिडकीतुन दिसणार्या दृश्याचा फार उपयोग होत असे. 
या काळातील नाशिकच्या रहिवासात  माझ्या  वैयक्तिक आयुष्यात खुप चांगल्या घटना घडल्या, स्वताचे घर झाले, गाड़ी झाली, आमचे त्रिकोनी कुटुंब चौकोनी झालेपार्थ नंतर पाच वर्षांनी प्रद्न्या चा जन्म झाला. माझा कविता संग्रह 'अस्वस्थ क्षणांचे पाश' प्रकाशित झाला. एम्.पि.एस.सी चा अभ्यास करणार्या मुलांसाठी 'आधुनिक भारताचा इतिहास' या पुस्तकाचे लिखाण तर माझ्याकडून झालेच पन शिवाय त्याच्या पाच आवृत्त्या देखिल प्रकाशित झाल्यात. या काळात अनेक व्याख्यानांच्या मदतीने मला अभ्यास करणार्या मुलांना मार्गदर्शन करण्याची संधि मिळाली. त्यांच्या समस्या सोडवन्याचे समाधान मिळाले. त्यातील अनेक जनाची नंतर अधिकारी म्हणून निवड झाली. 
एकुनच नाशिकने व नाशिकच्या गोतावल्याने मला आयुष्यभरासाठी खुप काही दिलेहे जे शब्दात मांडता आले व असे भरपूर काही जे मांडता नाही आले. 

                 - समाधान महाजन 
                    ७९७२५५२४३९