पद्मावत व संजय लीला भन्साळी......

पद्मावत व संजय लीला भन्साळी..

आज पद्मावत पाहिला ....अन का इतकं वातावरण पेटलं होत काही कळाल नाही ......मुळात राजस्थानी घुमर नृत्य व एकूणच राजपुताना तील राजवंशाच्या  वातावरणाचे भव्यदिव्य चित्रण,  जोहार व युद्धातील वीरांचा पराक्रम अस सर्व एकूणच खूप छान आहे.....बऱ्याच वृत्तपत्रीय समीक्षणातून पण चित्रपटाच्या शेवट दाखवण्यात आलेल्या जोहारच्या प्रसंगाने चित्रपट उंचीवर पोहोचतो अस म्हटल आहे..... पद्मावती च्या एकूणच चरित्र व आख्यायिकेला कुठे बाधा पोहचेल अस वाटल नाही...
मुळात यात दाखवण्यात आलेल्या सर्वच घटना जशाच्या तशा शंभर टक्के घडल्या असण्याची शक्यता कमी आहे .....एक प्रवाद असाही वाचण्यात आलाय कि या घटना घडल्या नंतरच्या काही वर्षांनी मलिक मोहोम्मद जायसी ने जे पद्मावत नावाचे दीर्घकाव्य लिहिले त्यातून या कहाणीचा जन्म झाला अस म्हणतात....चितोड व खिलजी ची लढाई झाली होतीच पण त्यातील पद्मावतीशी सबंधित या सर्व कहाण्या जायशी व इतर समकालीन दरबारी लेखकांच्या लिखाणातून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असो ...इतिहास ... लहान मोठे क्षण आपल्या सोबत घेवून जातो जे काळाच्या उदरात सामावून जातात......कुठल्याही पुराव्याविना....
मुळात संजय लीला भन्साळी चे चित्रपट पाहतांना अस सारख वाटत राहत कि  इतिहासातील तो फक्त एक घटना घेतो त्याचा अभ्यास करतो त्यातील पात्र व घटनांचा क्रम तोच ठेवतो पण ते कस दाखवायचं त्याच पूर्ण स्वातंत्र्य तो घेतो ...त्यामुळे त्याचे चित्रपट पाहतांना जरी घटना व तपशील माहिती असले तरी सतत त्या सर्व परीघावर संजय लीला भन्साळी चा ठसा उमटलेला दिसतो त्याच स्वतःच अस्तित्व जाणवत राहत....ही सर्व प्रक्रिया आपल्या मनःपटलावर घडत असते .....
मग तो चित्रपट बाजीराव-मस्तानी असो वा पद्मावत असो...
त्याच्या चित्रपटाची काही वैशिष्ट्य मला जाणवतात जी कमी अधिक पणे त्याच्या बहुतांश चित्रपटातून दिसून येतात.....सर्वात प्रथम म्हणजे  पहिल्या फ्रेम पासून वेगळेपण दिसते ते कलर मध्ये. एक विशिष्ट रंगात वा काही विशिष्ट रंग संपूर्ण चित्रपटभर पसरलेले असतात.....देवदास ...हम दिल दे चुके सनम, रामलीला, पद्मावत वा बाजीराव .....रंग त्यातही लाल रंगाच्या विविध छटा एकाच वेळी पडद्यावर दिसतात....हा शेड त्या पात्रांचे वेगळेपण तर दर्शवतो पण पाहणाऱ्याला पण तो त्या मोड व मूड मध्ये घेवून जातो जी एक वेगळीच अनुभूती असते.... त्यातही क्लायमेक्स च्या टप्प्यावर चित्रपटातील रंग अधिकच गडद होत जातात...(आठवा देवदास मधील ..रामलीला मधील ...बाजीराव मधील व आता पद्मावत मधील क्लायमेक्स चे क्षण).

भन्साळी च्या चित्रपटाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यात त्याच्या संपूर्ण कथावस्तुमध्ये पाया असतो दुःखाचा....बेदम, प्रचंड वा आत्यंतिक दुःख कथेचा आत्मा असते व त्या बिजाभोवती संपूर्ण चित्रपटाचे कथानक उभे असते ......खामोशी हा त्याचा सुरुवातीचा चित्रपट.....देवदास  वा ब्लक .....यात तर दुःख आत्मा आहे....हम दिल दे चुके सनम मध्ये तर इतर कुठल्याही गाण्यापेक्षा तडप तडप के इस दिल से .....हे गाण विशेषतः तरुणांनी डोक्यावर घेण्याच कारण त्या गाण्यातील सर्वच प्रकारचे परफेक्शन .....बाजीराव मधील बाजीराव च्या मृत्यूच्या क्षणांना आठवा वा देवदास मधील देवचे शेवटचे क्षण आठवा वा पद्मावत मधील अल्लाउद्दिन व पद्मावतीचे शेवटचे क्षण पहा ....दुःख ठासून भरलंय.

तिसरे वैशिष्ट्य म्हणजे भन्साळी च्या चित्रपटातील मुख्य पात्र कुठल्याशा उद्देशाने झपाटलेली असतात....व त्या उद्दिष्टपूर्ती साठी ते त्यांचे आयुष्य पणाला लावताना दिसतात.....खामोशी..black...रामलीला ...हम दिल दे चुके ....देवदास...आठवा इतकेच नव्हे तर बाजीराव वा पद्मावत या ऐतिहासिक चित्रपटात स्टोरी आधी जरी माहिती असली तरी तीच पात्र नायक वा नायिका म्हणून त्याने चित्रपटासाठी निवडली जी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात झपाटलेली होती.   

इतिहासात अशी अनेक चरित्र लपलेली असतील जी भन्साळीतील  दिग्दर्शकाला  खुणावत असतील.....पण पद्मावत चा अनुभव पाहता भन्साळी अजूनहि एखादे ऐतिहासिक चरित्र आपल्या पुढच्या चित्रपटासाठी निवडतो कि काय हे पाहणे कुतुहलाचे व उत्सुकतेचे ठरणार आहे.
-समाधान महाजन 

हमारी मुठ्ठी में आकाश सारा

हमारी मुठ्ठी मे आकाश सारा......




हमारी मुठ्ठी में आकाश सारा......

पप्पा मला उद्या शाळेला सुट्टी दिलीय.....

का रे ?

काय माहित , दंगल बिंगल झाली असेल किंवा काही मोर्चा का काय ते असतं तसं काही असेल ....

मी अवाक् होवून त्याच्याकडे पाहत म्हटलं, नाही रे, काही वेगळं कारण असू शकतं, शाळेत विचारून तुला सांगतो ....

पण त्याचं उत्तर ऐकून क्षणभर काय बोलावं तेच कळेना मला.....

आजकालची लहान मुले हुशार आहेत अस आपण म्हणतो पण त्यांना गेल्या काही वर्षापासून एक समाज म्हणून आपण काय देतोय .....शाळा बऱ्याचदा सुरक्षेच्या कारणांवरून बंद असतात ...तेव्हा त्यांना साहजिकच प्रश्न पडतो की कोणताही सण जवळ नसतांना , शाळेत कुठलाही कार्यक्रम नसतांना वा काहीही कारण जे त्यांना नेहमी माहिती असतं ते कारण नसतांना सारखी शाळेला सुट्टी का दिली जातेय .....

मग आपण बघत असतांना ते टीव्हीच्या बातम्या पाहतात...मोडकातोडका पेपर वाचतात ...त्यांच्यातील अर्धवट माहिती असलेला मुलगा त्यांना अजून काही कारणं सांगतो ...मग घरी मुले आपल्याला प्रश्न विचारतात. वरवर ते सोपे वाटतात ..पण नीट लक्ष दिल्यास कळतं की या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या  भविष्यातील वैचारिक पाया बांधत असतात...मग दंगल म्हणजे काय? ती कोण करतं? ती माणसं अस का करतात? मग ते गाडी का जाळतात? दगड का फेकतात? त्यांना लागत नाही का?  मोर्चा म्हणजे काय ? जात म्हणजे नक्की काय ???  आपली जात कोणती? .........हे प्रश्न संपत नाहीत ....किंबहुना यांची उत्तरे देत गेलं की माणसाचा कधी अभिमन्यू होवून जातो कळत नाही ...हा प्रकार घरोघरी सुरु असतो. कधी पालक गप्प बसतात तर कधी मुलांना गप्प बसवलं जात.

एकूणच शाळेतील शिकवला जाणारा अभ्यासक्रम व आजकाल आजूबाजूला घडत जाणाऱ्या दाहक घडामोडी  याचा एखाद्या संवेदनशील शाळकरी मुलाच्या ठिकाणी स्वतःला ठेवून पाहिलं तर हा गुंता अधिकच जाणवतो ....

कधी नव्हे इतके आपण जातीयवादी व धार्मिक झालो आहोत. ....

कालच्या आंदोलनात चक्क एक शाळेची बस पेटवून दिली. जी मुले रोज त्या बसने प्रवास करत असतील त्यांना काय वाटत असेल बस समोर जळतांना पाहून ...कोणी दगड फेकले? कोणी आग लावली?  आमचीच बस का? आम्ही काय केलं ज्यामुळे आमची बस जाळली? हे सर्व प्रश्न व त्याची जी माहिती होतील ती उत्तरे  या मुलांच्या भावविश्वात कायमची कोरली जातील .....आंदोलन कालचेच नाही याही आधी जेव्हा जेव्हा हिसंक आंदोलनं दगडफेक जाळपोळ यांचा अनुभव लहान वयातच ज्या मुलांनी घेतला असेल त्यांच्या मनात एकूणच भारतीय समाज व आपला भारत देश याच्याबद्दल नक्कीच काही बाबी रुतून बसतील ज्या पुस्तकी शिक्षणातून केव्हाच भरून येणार नाहीत.

मला अशा वेळी माझी नवोदयची शाळा आठवते ....दहावीपर्यंत व त्यानंतर हि बरेच दिवस आम्हाला जात काय असते माहित नव्हते. आम्ही कधी कुठला फॉर्म भरला नाही ज्यात जातीचा उल्लेख असेल वा आमच्या शिक्षकांनी आम्हाला कधी जातीबद्दल विचारले नाही वा शाळेच्या एकूणच आवारात व दैनंदिन जीवनात कधी जात हा शब्द आमच्या कानावर आला नाही न बोलण्यात आला. आम्ही एक कुटुंब होतो.. सर्व सारखे होतो.फरक असेल तर तो फक्त काही अंगभूत गुणांमध्ये बाकी सर्व सवलती सर्वांना सारख्याच ........हे स्पिरीट दिसत नाही अलीकडे कुठेच. आम्ही जुने मित्र भेटतो गेट टुगेदरच्या निमिताने तेव्हाही आमच्या कोणाच्या मनात जात येत नाही न धर्म.

पण अलीकडे भीती वाटायला लागलीय कि येणारी पुढची पिढी त्या त्या जातीची खंदी समर्थक म्हणून तर वाढत नाहीय ना ...हे धोकादायक आहे. महाराष्ट्राला पुरोगामी म्हटले जाते ते मुख्यतः येथील विचारधारेमुळे ...यु.पी.एस.सी. च्या मुलाखातीच्या काही दिवस आधी दिल्लीत असताना एके ठिकाणी मॉक इंटरव्हीयू  देत असतांना एका सदस्याने विचारले होते की, उत्तर प्रदेश मध्ये जितकी जिल्हे नवीन झालीत किंवा काही जुनी आहेत त्यांना व काही सामाजिक स्थळांना महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर अशी नावे का देण्यात आलीत....मग मायावती बसपा दलित कनेक्शन सांगून पाहिलं पण त्याचं समाधान झालं नाही ...त्यांचा पुढचा प्रश्न होता मग त्यांनी उत्तर भारतातील समाज सुधारकांची नावे का नाही ठेवली? प्रश्न रास्त होता ...तसं नामकरण त्या काळात घडतही होतं पण हे असच का हा विचार माझ्यासाठी नवा होता. मुलाखत नंतरच्या चर्चेत जे समजलं ते थोडक्यात अस होत की, ही जी समाजसुधारकांची व पुरोगामी विचारांची परंपरा महाराष्ट्राला आहे तितकी उत्तर भारतात नाही ...तितकं सातत्य व प्रयत्न पण इतिहासात झाले नाहीत.....दिल्लीला जावून महाराष्ट्राबद्दल हे मी नवीनच शिकत होतो जे खूपच अभिमानास्पद होत. ते मी नंतर माझ्या अनेक मित्रांजवळ व काही कार्यक्रमात बोलून दाखवले....

पण आता प्रश्न पडतोय या महापुरुषांनी केलेले काम पुढे नेण्याऐवजी आपण मागे का नेत आहोत? ...विचाराला व कृतीला उत्तर दगड व जाळपोळ नसतेच .....पुस्तक वा पुस्तकातील विषय व मुद्दे पटले नाही तर ते पुराव्यानिशी खोडून काढण्यासाठी नवीन पुस्तक लिहून त्याची जोरदार प्रसिद्धी करा...त्यासाठी वादग्रस्त पुस्तक जाळणे वा त्याच्यावर बंदी आणणे वा लेखकाला मारहाण करणे, त्याचा खून करणे हा काही पुरोगामी मार्ग नाही....हीच बाब एखादी विचार,व्यक्ती, संघटना वा चित्रपट यासाठी लागू आहे जे पटलं नाही आवडलं नाही त्यावर स्वतःचं मत मांडा....संघटन निर्माण करा....विचारधारा निर्माण करा. जे पटत नाही त्याला सकारत्मक मांडणी करून लोकांपुढे येवू द्या .....त्याचा प्रचार झाला पाहिजे ...

आताच्या प्रत्येक घरात असणाऱ्या लहान मुलांसाठी आपण कोणत भविष्य निर्माण करत आहोत ...दंगल,जाळपोळ,दगडफेक  की विचार, स्वातंत्र्य व ज्ञानाचं ...खूप गंभीर प्रश्न आहे.

                                                                                                     - समाधान महाजन                                                    -